महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

खान्देशांतील मंदिरे भाग ४

By Discover Maharashtra Views: 1225 15 Min Read

खान्देशांतील मंदिरे भाग ४ –

मागील भागात मंदिर स्थापत्याचे विविध घटक आपण जाणून घेतले, या भागात मंदिर बांधणीच्या विविध शैली आणि त्यांची ओळख थोडक्यात करून घेऊया.  तसेच मंदिर उभारणीची फलनिष्पत्ती जाणून घेऊया.खान्देशांतील मंदिरे भाग ४.

मंदिर निर्माण ची शैली किंवा पद्धती-

उभारणी, विस्तार, दर्शन , समावेशकता इत्यादी घटकांचा विचार करून मंदिरांच्या  शैलींचे विविध प्रकार केले आहेत.  सुप्रभेदागमात १२, ईशानगुरुदेव पद्धतीत २० तर वैखानसागमात ९६ प्रकारही आहेत. विष्णुधर्मोत्तर पुराणात ही संख्या शतकापलीकडे जाते. बृहत्संहिता, विश्वकर्मप्रकाश, मत्स्यपुराण आणि भविष्यपुराण या ग्रंथातून वास्तु, भूमी, प्रतिमा इत्यादींचे तपशीलवार वर्णन आढळते. मंदिराचे व त्यांच्या शैलींचे पुढील प्रकार अनेक स्थळी सापडतात. १) मेरु (षट्कोणी व १२ ते १६ मजले) . २) मंदार (षट्कोणी व १० ते १२  मजले). ३) कैलास (षट्कोणी व ८ ते ९ मजले). ४) विमानच्छंद (षट्कोणी व ८ मजले).. ५) नंदन (षट्कोणी व ६ मजले). ६) सामुद्र (गोलाकार वा १६ बाजू व १ ते २ मजले). ७) पद्म(कमलाकृती व ८ ते १६ पाकळ्या). ८) गरुड़( गरुडाकृती व ६ ते ७ मजले). ९)नन्दी ( गरुडाकारच पण पंख व शेपुट नसलेले व ७ मजली). १०) गजकुञ्जर( हत्तीच्या पाठीचा आकार ६ ते ७ मजले). ११) गृहराज ( गुहेचा आकार व १ मजला). १२) वर्ष ( गोलाकार व १ ते २ मजले). १३) हंस (अंडाकृती व १ मजला). १४) कुंभघट ( कुंभाकारव १ ते ९ मजले). १५) सर्वतोभद्र ( चौरस व ५ मजले). १६) मृगसिंह (गोलाकार वा बारा बाजु व ५ मजले). १७) चतुरस्त्र (चौरस व १ मजला). १८) षोडशास्त्र  (सोळा बाजु  व १ ते २ मजले). १९) अष्टास्र (अष्टकोणी व १ ते ३ मजले) इत्यादी

शिल्पशास्त्रनुसार हिमालय ते कन्याकुमारी पर्यंत भारतातील मंदिर बांधणी च्या तीन प्रमुख शैली मानल्या गेल्या आहेत. अनुक्रमे ‘नागर शैली’  आणि ‘द्रविड़ शैली’. या दोन शैलींच्या संगमातून पैन एक उपशैली विकसित झाली त्याला ‘वेसर’ किवा ‘बेसर’ शैली म्हणून ओळखले जाते. ‘विष्णुतिलक’, ‘मानसार’, ‘मुक्तागम’, ‘शिल्परत्न’,’मयमत’, ईशानशिवगुरुपद्धती इत्यादी संस्कृत ग्रंथात या तिन्ही पद्धतीच्या मंदिरांची, शैलींची अतिशय मुद्देसूद विस्तृत चर्चा आहे. प्रत्येक शैलीच्या मंदिरांची वैशिष्ट्ये या ग्रंथानी विशद केली आहेत. विष्णुतंत्र’ आणि ‘मार्कंडेयसंहिता’ या ग्रंथात मंदिरांच्या नऊ शैलींचे वर्णन आले आहे. त्यात नागर, द्रविड़ आणि वेसर व्यतिरिक्त सर्वदेशिक, कलिंग, वराट( या तिन्हीना मिळून ‘कामिकागम’ म्हणतात), मंदिर, भवन, आणि योग या सहा अधिक शैलींचा उहापोह या ग्रंथानी केला आहे.मात्र या ग्रंथानी अशा शैलींच्या मंदिरांच्या सर्वांगाचे विवेचन केलेले  नाही. ‘शिल्परत्न’ व ‘ईशानशिवगुरुपद्धती’ या ग्रंथांच्यामते, या अन्य सहा शैली केवळ शिखरांचेच  वेगळे प्रकार आहेत मंदिराचे नव्हेत. नागर, द्रविड़ आणि वेसर या प्रमुख शैली मात्र सर्वमान्य आहेत. वरील पैकी नागर शैली सात्विक (वर्ण-ब्राम्हण, रंग-शुभ्र, आकार-चौकोनी, देवता-विष्णु). द्रविड़ शैली राजस( वर्ण-क्षत्रिय वा वैश्य, रंग-लाल किवा पिवळा , आकार-अष्टकोणी किवा षट्कोणी, देवता- ब्रम्हदेव) आणि वेसर शैली तामस( वर्ण-शूद्र , रंग-हिरवा, आकार-गोल, देवता-रूद्र)  असल्याचे शिल्परत्न ग्रंथात म्हंटले आहे.सुप्रभेदागमातील श्लोकात सांगितल्याप्रमाणे या तिन्ही प्रकारची मंदिरे कशी असतात हे पुढीलप्रमाणे सांगितले आहे.

‘नागरं चतुरस्त्रंच अष्टास्त्रं द्राविड़ं तथा l  वृत्तं च येसरम.

म्हणजे नागर देवालय हे चौकोनी, द्रविड़ हे अष्टकोणी व वेसर वर्तुळाकृती दिसते.

भूमिज शैली ही नागर या मुख्य श्रेणीची उपशैली मानली जाते. मंदिर निर्माणच्या सुरवातीस त्यांची रचना अत्यंत साधी होती. भाजलेल्या विटांची एक किवा दोन चौकोनी दालने असा त्यांचा आटोपशिर पसारा होता. कालांतराने वास्तुशास्त्राच्या विकासाबरोबर मंदिरे पक्की,दगडी, भव्य आणि अनेक शिल्पानी सुशोभित होऊ लागली. या प्रक्रियेत मन्दिरांच्या वास्तुशास्त्राबद्दल काही संकेत आणि नियम ठरवले गेले. तलविन्यासाच्या वेगवेगळ्या रचनांमुळे व् शिखरांच्या आकारांमुळे नागर,वेसर,द्रविड़ ही तिन्ही शैलीतील मंदिरे एकमेकांपासून वेगळी दिसतात.

  • नागर शैली

विंध्य पर्वताच्या वरील भागात उत्तर भारतातील प्रचलित शैलीला नागर शैली म्हणून संबोधले जाते. नागर शैलीचा प्रसार हिमालयपासून विंध्यपर्वतमाला पर्यंत बघायला मिळतो याचे उत्कृष्ट उदहारण म्हणून मध्यप्रदेशातील खजुराहो मंदिर कड़े बघितले जाते. नागर शैलीला ओड़िसात ‘कलिंग’, गुजरात मध्ये ‘लाट’ आणि हिमालय क्षेत्रात ‘पर्वतीय’ शैली म्हणून ओळखले गेले. नागर या शब्दाची उत्पत्ती ‘नगर’ या शब्दापासून झाली. या मंदिरांची बांधणी प्रथम नगरामध्ये झालेली असल्यामुळे या मंदिराना नागर शैली नाव प्राप्त झाले असे काही अभ्यासकांचे मत आहे. नागर या शब्दाची व्युत्पत्ति ‘नगर’ या शब्दापासून झाल्याचे सांगण्यात येते. आणि त्याचा संबंध ‘पुर’ किवा ‘गोपुर’ यांच्याशी आहे. कौटिल्यानुसार नगर निर्माणकरता मंदिराचा विचार सांगितलेले असून, नगरच्या कोणत्या दिशेला कोणत्या देवाचे मंदिर असावे याचे सुद्धा विवरण दिलेले आहे. मन्दिरांची रचना पहिल्याप्रथम नगरनिर्मितीच्या अनुषंगानेच झालेली असल्याने या पद्धतीला नागर म्हंटले असण्याची शक्यता आहे.  भारतात बृहतंसंहिता काळापासून ( इ.स. छे ५-६ वे शतक) किवा त्याच्याही आधी नागर शैलीतील मन्दिरांची निर्मिति बऱ्याच प्रमाणात झालेली आहे

नागर शैलीत गर्भगृहावर उंचच उंच शंकुसारखे निमुलते होत जाणारे शिखर आणि त्यावर बसवलेला आवळ्याच्या आकाराचा आमलक किंबहुना आवळ्यावरूनच त्याला आमलक हे नाव दिलेले आहे.नागर शैलीत मन्दिरांच्या पायापासून शिखरपर्यंत आठ भागात विभागलेले असतात, त्याना पीठ,पाबाध,जंघा ,गर्भ,विशाम, बेकी, आमलक, कळस असे नाव आहे. या शैलीला ८व्या ते १३व्या या ५०० वर्षात उत्तर भारतातील शासकानी संरक्षण आणि उत्तेजन दिले.

भूमिज शैली(नागर उपशैली)

या शैलीचे वैशिष्ट्य प्रामुख्याने त्याच्या शिखरावर व त्यांच्या तलविन्यास वर दिसून येते. मुळात नागरशैलीच्या ज्या मन्दिरांचा तलविन्यास (ग्राउंड प्लेन) विशिष्ट आकारत असतो, अशा मंदिराना ‘भुमिज’ मंदिरे म्हणतात. लतिन या एकान्डक शिखराप्रमाणेच या शिखराच्या चार प्रमुख दिशांना वरपासून खालपर्यंत, चैत्यमुखाच्या डिझाइन केलेल्या जाळीच्या लता किंवा पट्ट्या असतात, परंतु त्याच्या मध्यभागी, चारही कोणांमध्ये  खालपासून वरपर्यंत, निमुळत्या होत जाणाऱ्या शिखरांची श्रृंखला असते. याचे एक उत्तम उदहारण म्हणून  राजस्थानमधील पाली जिल्ह्यातील सेवेडी  येथील जैन मंदिर आहे.यानंतर मीनलचे महानालेश्वर मंदिर आहे जे पंचरथ आणि पंचभूम आहे.रणकपूरचे सूर्य मंदिर आणि चित्तोडचे अदभूतनाथ मंदिरही भूमिज शैलीचे आहे. महाराष्ट्रातील प्रमुख प्राचीन मंदिरे ही भुमिज शैलीत उभारली गेली, यातील सगळ्यात जुने मंदिर म्हणून मुंबई जवळील अंबरनाथ येथील ‘आम्रनाथ शिवालय ( इ.स. १०६०) तर दूसरे उदहारण म्हणून नासिक जवळील सिन्नरचे गोंदेश्वर मंदिर संकुल आहे.

  • द्रविड़ शैली

दक्षिण भारतात विक्सित झालेल्या शैलीला द्रविड़ शैली म्हणून ओळखले जाते. कृष्ण नदीच्या खोऱ्यापासून थेट दक्षिण टोकापर्यंत उभारलेले गेलेले प्रमुख पर्किं मंदिर द्रविड़ शैलीत उभारले गेले. चोल, चालुक्य,विजयनगर साम्राज्यात मंदिर निर्माण पूर्ण वैभवर होते. द्रविड़ शैलीची सुरवात सुद्धा ८व्या शतकात होऊन जवळ जवळ १००० वर्षे टिकून १८व्या शतकापर्यंत घडवली जात होती. पल्लव शासनात द्रविड़ शैलीचा उगम झाला, चौल व् पांडेय काळात द्रविड़ शैली आपल्या पूर्ण वैभवावर पोहचली. चोल काळातच द्रविड़ शैलीत मूर्तिकला आणि चित्रकला यांचा संगम झाला. द्रविड़ शैलीतून पुढे नायक शैलीचा विकास झाला याचे उदा.-मदुराई मीनाक्षी मंदिर, रंगनाथ मंदिर, रामेश्वर मंदिर.

द्रविड़ शैलीच्या मंदिरात शिखराच्या ऊंचीपेक्षा विस्तारावर जास्त भर दिलेला असतो या शैलीत शिखर  तळाला पिरामिडच्या आकाराचा असतो. तसेच वर आमलक ऐवजी मोठी शिळा असते जिला ‘स्तूपी’ म्हंटले जाते.  द्रविड़ शैलीचे अजुन एक वैशिष्ट्य म्हणजे ‘गोपुर’. गोपुर हे मंदिर प्रांगणाच्या चारही बाजूने तट बांधून या तटाच्या मुख्य प्रवेश द्वारावर बांधले जाते. कधी कधी हे मुख्य दिशेच्या प्रवेशद्वारावर बांधलेले दिसते.तर कधी कधी चारही दिशेच्या प्रवेशद्वारावार बांधलेले असते. काही दक्षिण भारतीय मन्दिरांच्या गोपुरांची उंची मुख्या मंदिराच्या शिखरापेक्षा ही उंच बघायला मिळते. द्रविड़ शैलीची अजुन काही वैशिष्ट्ये म्हणजे बहुमजली मंदिर, मुख्य मंदिराच्या चारही बाजूला तटबंदीने संरक्षित विशाल प्रांगण, प्रवेशद्वारवर असलेले गोपुर, पिरामिड आकारतील शिखर, स्वतंत्र मंडप, चौरस किंवा अष्टकोणी गर्भगृह(रथ) तथा प्रांगण मध्ये बनवलेली पुष्करणी किंवा तलाव.

-विजयनगरच्या पाडावनंतर मंदिर निर्माणावर झालेल्या इस्लामी आक्रमणानी या शैलीचा ऱ्हास झाला.

वेसर/बेसर (नागर आणि द्रविड़ यांच्या संगमातून निर्माण झालेली उपशैली)

ही मंदिरे प्रामुख्याने विंध्याचल पर्वत ते कृष्णा नदीच्या मधील प्रदेशात नागर आणि द्रविड़ शैलीच्या संगमातून विकसित झाले. याच शैलीला अभ्यासक चालुक्य शैली म्हणून सुद्धा संबोधतात. या शैलीचा काळ सुद्धा ८व्या ते १३व्या शतकापर्यंत समजला जातो. या शैलीतील देवालाये वर्तुळाकृती किवा लंबवर्तुळाकृती  असतात. वेसर शैलीची आणखी एक विशेषता म्हणजे त्यांची रचना बहुकोणी अर्थात तारकाकृती जोत्यावर केलेली असते.वेसर शैलीत मंदिराच्या आकार पीठ/पायथा पासून ते शिखर पर्यंत गोलाकार किंवा अर्ध गोलाकार बनवलेला असतो. पाया हां द्रविड़ शैलीत बनवलेला असतो तर वरील मुख्य संरचना नागर प्रकारत केलेला असतो. या शैलीचा उत्तम उदहारण म्हणून वृंदावन येथील वैष्णव मंदिर,या मन्दिरांच्या प्रवेशद्वारवर गोपुर बनवलेला आहे.खालिल तक्त्यात मंदिराची शैली व विविध राजवटीत विकसित झालेल्या त्यांच्या उपशैली दिलेल्या आहेत.

नागर                                   द्रविड़                                         वेसर

पाल उपशैली                     पल्लव उपशैली                          राष्ट्रकूट

ओडिशा उपशैली                चोल  उपशैली                            चालुक्य

खजुराहो उपशैली                पाण्ड्य उपशैली                          काकतीय

सोलंकी उपशैली                 विजयनगर उपशैली                      होयसल

नायक उपशैली

हेमाड़पंथी मंदिरे-

महाराष्ट्रातील काळ्या दगड़ातील सगळ्याच प्राचीन मंदिराना सरसकट ‘हेमाड़पंथी’ मंदिर म्हंटले जाते. वस्तुत: हेमाड़पंथी/पंती अशी मंदिर बांधणीची कोणतीही शैली अस्तित्वात नाही. महाराष्ट्रात ज्याना हेमाड़पंथी मंदिरे म्हणून सांगितले जाते त्या मंदिराना ‘शुष्कसांधी’ मंदिरे म्हणून ओळखले जातात. शुष्कसांधी मंदिरात चुना,माती किवा त्याप्रकारचा दर्जा न भरता शिलाना वेगवेगळ्या कोनातून काटेकोरपणे एकमेकांवर ठेवले जाते. त्या जागेवरून हलु नये यासाठी या शिलांमध्ये खाचा आणि खूंट्या घडवून त्या एकमेकांमध्ये अडकवून तलापासून शिखरापर्यंत मंदिराची सरंरचना आकार घेते.

हेमाडपंत हे देवगिरी यादवांच्या काळातील मुख्यप्रधान असलेले हेमाद्री पंडीत की ज्यांचा काळ वेगवेगळ्या इतिहासकारांच्यामते सन १२५९ ते १३१० या कालखंडात वेगवेगळा ठरवला गेला आहे. त्यानी व्रतांची माहिती देणारा ‘हेमाद्रीव्रत’ हा ग्रंथ रचला. याच हेमाद्री पंडित उर्फ़ हेमाडपंतानी अनेक ठिकाणी मंदिर उभारण्यास देणगी दिल्यामुळे महाराष्ट्रातील बहुतेक सर्वच प्राचीन मंदिराना हेमाड़पंथी मंदिर संबोधण्याचा प्रघात पड़ला. हेमाड़पंथी आणि यादववंशाविषयी विषयी माहिती चतुर्वर्गचिंतामणि ग्रंथ आणि ठाणे येथे उपलब्ध झालेल्या लेखातून मिळते. त्यानुसार ते वत्सगोत्री ,शुक्लयजुर्वेदी पंचप्रवरी ब्राम्हण होते. त्यांच्या पिताचे नाव कामदेव तर आजोबांचे नाव वासुदेव हे होते. कृष्णराय,महादेवराय,अविरामदेवराय या यादवराजांच्या कारकिर्दीत अनुक्रमे मंत्रींद्रचूड़ामणि, सकलकरणधिप, महाप्रधान या प्रतिष्ठित पदांवर होती. तसेच सेनापती म्हणून अनेक युद्धात सहभागी असल्याचा उल्लेख सुद्धा आढळतो.

मंदिराची उभारणी व फलनिष्पत्ति-

भारतातील मंदिरांची परंपरा अशी आहे की देवतेसाठी मंदिर आहे मंदिरांसाठी देवता नाही. म्हणूनच भारतात देवपूजा आधी आली अणि नंतर मंदिरांची उभारणी झाली. हा विकास इतक्या वेगाने झाला की चौथ्या-पाचव्या शतकापर्यन्त मंदिर निर्माण्याचे तंत्र-मंत्र-यंत्र आणि शैली यानी परमोत्कर्ष पहिला. काळाच्या ओघात आत्मार्थ (खाजगी) आणि परार्थ (सार्वजनिक) अशी दोन प्रकारची मंदिरे निर्माण झाली. पहिल्या प्रकारात पुजारी आणि केवळ एक कुटुंबच सहभागी असते. तर दुसऱ्या प्रकारात अवघा समाज सहभागी हो शकतो. सार्वजनिक मंदिरांची उभारणी प्राचीन ालखंडापासून होती, असे रामायण-महाभारतातील उल्लेखावरून दिसते.सर्व पुराणानी मंदिर निर्माण हे पुण्यदायी कर्म म्हणून गौरविले आहे. फ़क्त निर्माणाचा संकल्पच मागील अनेक जन्मांचा पातक जाळतो असे अग्निपुराण म्हणते. देवलयाचा केवळ मनसंकल्प शंभर जन्मांची पापे नाहीशी करतो. श्रीकृष्णमंदिराच्या संकल्पाने अच्युतलोकाची प्राप्ति होते. दान आणि कीर्तनपेक्षा मंदिरनिर्मिति  श्रेष्ठ आहे. मंदिरातील प्रतिमा स्थापनेचा फळ यागाहून श्रेष्ठ आहे असे शास्त्रवचन आहे. मंदिर निर्माण केल्यामुळे सप्तलोकांची प्राप्ति होते. ‘हयशीर्ष संहिता’ सांगते की मंदिराला एक वीट जारी दान दिली तरी स्वर्गप्राप्ती होते. विष्णुरहस्य सांगते की एखाद्याने फ़क्त वाळुचे मंदिर जरी केले तरी त्याला उत्तम लोकांची प्राप्ती होते.मंदिर निर्माण केल्यामुळे राजसूय आणि अश्वमेध यज्ञाचे फळ मिळते असे ‘विष्णुधर्मोत्तर’ पुराण म्हणते. बदरीवन, केदारनाथ, जगन्नाथपुरी (इंद्रद्युम्रपूरी), काशी, प्रयाग, सोमनाथ, सह्याद्री, वेंकटाचल, रामेश्वरम, कांचीपुरम इत्यादी स्थलाना पुराणानी ‘स्वयंभू’ वा ‘स्वयंव्यक्त’ म्हंटले आहे.मंदिरांची उभारणी महापुण्यशाली असल्याचे अनेक ग्रंथानी म्हंटले आहे. उदा-

श्रीकरं विजयं पुण्यमायूरारोग्यवर्धनमल l सर्वशत्रु क्षयकरं सर्वोपद्रव नाशनं l

भुक्तिदं मुक्तिदं नृणां सर्वसौभाग्य सम्पदं l एवं य: कुरुते मर्त्य: अन्ते सायुज्यमाप्नुयातं ll (कर्पादि संहिता)

अर्थात मंदिराची निर्मिति धनदायी, विजय प्राप्त करून देणारी, पुण्य-आयुष्य-आरोग्य यांचे वर्धन करणारी, सर्व-शत्रु सर्व-उपद्रव, यांचा नाश करणारी, मानवला सर्व सौभाग्यसह वैभव-भुक्ति-मुक्तिचा लाभ करून  देणारी शिवाय मर्त्यलोकात असे पुण्यदायी कार्य करणाऱ्याला सायुज्य मुक्तीचा लाभ करून  देणारी आहे.’पुरुषोत्तम संहिता’ सांगते की भगवान नारायणच्या मंदिर निर्मितीमुळे वाजपेय यज्ञ, सर्व तीर्थयात्रा, अलौकिक दान यांच्या फळाची प्राप्ती होते. ‘विष्णुधर्मोत्तर’ पुराणातही मंदिर निर्मितीचे असे अलौकिक फळ सांगितले आहे अर्थात, मंदिर निर्मितीसाठी लागणारे धन शुक्ल (स्वच्छ) व न्याय्य मार्गाने आलेले असावे. दूषित वा भ्रष्टाचारी नसावे. ‘श्रीविष्णुतिलक संहितेत’ भगवंताचाच स्पष्ट आदेशच आहे- द्रव्यं न्याय्येन सम्पाद्य मंदिरं कल्प येन्मम l अदत्तं नैव गुह्रियाद्धर्मद्रव्यं न चाहरेत l दुषितेन न कुर्वीत द्रव्येण मम मन्दिरम ll

मंदिराच्या शिल्पात मिथुनमूर्ती का ?

भारतातील काही मंदिरातून आपल्याला मिथुनशिल्पे पाहण्यास मिळतात.मन्दिरला आध्यात्मिक पुण्यतीर्थ म्हणतात. त्यामुळे रतिक्रीड़ा करणाऱ्या शिल्पाना मंदिर संकुलात स्थान कसे? असाही प्रश्न अनेकांच्या मनात येतो. त्याचे शास्त्रीय स्पष्टीकरण थोडक्यात असे देता येईल. मूर्तिशास्त्र संदर्भात ‘शाखा शेषां मिथुनविभूषयते’ असे वचन आहे. अर्थात मंदिर वा देवालय यांच्या अलंकरणाची, सुशोभीकरणाची शेवटची शाखा म्हणजे मिथुनाकृती शिल्पे होत. मिथुन हे ‘काम’ या पुरुषार्थाचे प्रतीक आहे. सृजनशक्तीचा आनंद आणि रस त्यात आहे. संपूर्ण सृष्टीची उत्पत्ती-स्थिति-लय यांचे प्रतीक म्हणजे शिवलिंग आहे. त्याचे पूजन संपूर्ण भारतात स्त्रीपुरुष भक्त मोठ्या संख्येने करतात. या शास्त्रधारेत मिथुन शिल्पांचे रहस्य उलगडावे लागेल. रतिक्रियाशिल्प संदर्भात चार महत्वाच्या गोष्टी ध्यानात घ्याव्या लागतील.

१) अशी शिल्पे देवलयाच्या बाह्य स्थळी असतात. मुख्य प्राकारत नाही.

२)अशी शिल्पे अधिष्ठानच्या वर म्हणजे भिंतीच्या तलाशी असतात.

३) देवालयाचे विशाल परिमाण लक्षात घेता हे शिल्प छोटे असतात.

४)तुलनेने अशी शिल्पे नगण्य असतात.

देवालय हे ब्रम्हांडाचे प्रतीक असल्यामुळे त्यात त्रिभुवने समाविष्ट आहेत. त्यामुळे देवालयचा तलातील भाग पाताल, मध्यभाग पृथ्वी व आमलक,शिखर भाग स्वर्ग यही धारणाआहे. दानव-मानव-देव  यांची ती क्रमश: प्रतीके आहेत. त्यामुळे मिथुनशिल्प मंदिरावर दिसतात. त्या सामान्य क्रियारूपातच. आध्यात्मिक दृष्टित कामवासनेला स्थान नाही. मंदिर म्हणजे धर्म-अर्थ-काम-मोक्ष अशा चतुर्विध पुरुषार्थाचे प्रतीक आहेत, त्यामुळे मंदिर संकुलात मिथुन शिल्पांना स्थान मिळाले असावे.

धन्यवाद
टीम एक्सप्लोर खान्देश
(Team Explore Khandesh)

Leave a comment