महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

छत्रपती राजाराम महाराज यांचे जिंजीला प्रयान…

By Discover Maharashtra Views: 3812 5 Min Read

छत्रपती राजाराम महाराज यांचे जिंजीला प्रयान…

छत्रपती संभाजीराजे पकडले गेल्यानंतर व त्यांचा बादशाही छावणीत अंत झाल्यानंतर जुल्फिकार खानाने मराठ्यांच्या राजधानीस म्हणजेच रायगडास वेढा घालण्याचे धाडस केले. रायगड म्हणशजे हिंदवी स्वराज्याच्या तख्ताची जागा. शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची निवड राजधानी म्हणून केलेली होती.(छत्रपती राजाराम महाराज)

असा हा किल्ला सहजासहजी आपणास प्राप्त होईल असे शत्रुसही वाटत नव्हते.” किल्ला अतिशय मजबूत होता. कोकणात रायगडाच्या तोडीचा दुसरा किल्ला नव्हता. किल्ल्याकडे जाण्यासाठी एकच वाट होती. किल्ल्याभोवती मोठमोठे डोंगर आल्यामुळे किल्ल्याखाली सुरुंग लावणे अशक्य होते.

जून ते सप्टेंबर या दरम्यान रायगडाच्या परिसरात धुवाधार पाऊस कोसळत असतो. अशा महाभयंकर पावसात किल्ल्याची नाकेबंदी करणे अशक्य नसले तरी मोठे अवघड गोष्ट होती . त्यामुळे जुल्फिकार खानाचा रायगडचा खरा वेडा सुरू झाला  असेल तर तो सप्टेंबरनंतरच. म्हणजे पावसाचा जोर कमी झाल्यानंतरच.

अशा या मजबूत व भक्कम किल्ल्यावर मराठ्यांचे राज्य कुटुंब वास्तव्यास होते. किल्ल्यावर मराठ्यांचे राजकुटुंब वास्तव्यास होते. संभाजी महाराजांची बादशाही छावणीत हालहाल करून हत्या करण्यात आली. मोगली आक्रमणात त्यांनी आठ-नऊ वर्षे यशस्वीपणे तोंड दिले .औरंगजेब बादशहास मराठ्यांचे स्वराज्य त्यांनी जिंकू दिले नाही. आपण दक्षिणेत गेलो की मराठ्यांची सत्ता सहजासहजी चिरडून टाकू अशी महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या औरंगजेबाचा त्यांनी पुरता भ्रमनिरास केला. पण आता संभाजीराजे यांच्या हत्येच्या घटनेने सर्व स्वराज्य नेतृत्वहीन झाले होते. शत्रूस मिळालेल्या या अपूर्व विजयामुळे स्वराज्यावर भयानक संकट कोसळले होते. या संकटाशी मुकाबला कसा करावयाचा,हा  एकच प्रश्न मराठी सैन्यापुढे उभा राहिला होता.

याप्रसंगी मराठी सैन्यात शिवछत्रपतीच्या तालमीत वाढलेली कर्तबगार पुरुषांची एक पिढी महाराष्ट्रात अस्तित्वात होती. त्यामध्ये प्रल्हाद निराजी, रामचंद्र पंडित, शंकराजी नारायण, मोरेश्वर, जनार्दन, हनुमंते ,खंडोबल्लाळ ,संताजी घोरपडे, धनाजी जाधवराव, मामाजी मोरे ,रुपाजी भोसले, मालोजी घोरपडे, विठोजी चव्हाण ,हरजीराजे महाडिक व केसोत्रिमल ही मंडळी प्रामुख्याने स्वराज्यात होती.छत्रपती  संभाजी महाराजांच्या हत्तेच्या सुमारास बहुतेक ही सर्व प्रमुख मंडळी भावी मसलतीच्या  बांधणीसाठी एकत्र आली.

छत्रपतीं संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत ज्यांनी त्यांच्याविरुद्ध कटकारस्थाने केली अशा काही व्यक्ती या वेळी रायगडावर उपस्थित होत्या. बदललेल्या परिस्थितीत त्यांना महत्त्व प्राप्त होणे स्वाभाविकच होते. त्यांनी ठरवले असते तर छत्रपती  राजाराम महाराजांना सिंहासनावर बसवू शकले असते .परिणामी राजाराम महाराजांचा पक्ष व शाहू महाराजांचा पक्ष असे दोन पक्ष मराठी राज्यात स्थापन होऊन स्वराज्याची अपरिमित हानी झाली असती. मराठी असे भांडत बसले असते तर काही काळाने औरंगजेब बादशहाने त्यांना भांडण्यासाठी सुद्धा स्वराज्य ठेवले नसते .सर्व मराठ्यांनी एकत्र येऊन मोगली आक्रमणाची मुकाबला करणे, हीच काळाची खरी गरज होती .आणि म्हणूनच येसूबाई राणीसाहेबांनी आपल्या पुत्रास म्हणजेच शाहुराजांना मंचकी न बसवता आपले धाकटे दीर  राजाराम महाराज यांना वारस म्हणून मंचकारोहण  करण्याचा निर्णय घेतला.  स्वतःहून पुढाकार घेऊन येसूबाई राणीने स्वराज्यासाठी नि:स्वार्थ बुद्धीने हे कार्य केले.येसूबाई राणीसाहेबांच्या या निस्वार्थी व उदात्त कृत्याने स्वराज्यातील वारसाहक्कावरून  उद्भभवू शकणारा संभाव्य धोका आपोआपच मागे पडला.

प्राप्त परिस्थितीत रायगडा सारख्या बेलाग किल्ल्यावर शाहू महाराजांसह आपण वास्तव्य करण्याचा व राजाराम महाराजांनी राजधानी बाहेर पडून मोगलाचे संघर्ष चालू ठेवण्याचा येसूबाई राणीसाहेबांचा हा सल्ला योग्यच होता. रायगडावर जमलेल्या सर्व जेष्ठ  मुत्सद्द्यांना व सेनानींना हा सल्ला अगदी योग्य वाटला.ठरलेल्या मसलती प्रमाणे आपल्या दोन राण्या,  ताराराणी व राजसबाई यांना घेऊन छत्रपती राजाराम महाराजांनी रायगड सोडून गुप्तपणे प्रतापगड गाठला. त्यांच्यासमवेत प्रल्हाद निराजी ,धनाजी जाधव ,संताजी घोरपडे इत्यादी स्वराज्यातील प्रमुख अधिकारी व्यक्तीही होत्या. शत्रूस हुलकावणी देऊन जावळीच्या खोर्‍यातून छ. राजाराम महाराजांनी प्रतापगड गाठला. पण लवकरच त्यांचे हे पलायन शत्रूच्या लक्षात आल्याशिवाय राहिले नाही. रायगडाच्या पायथ्याशी वेढा घालून बसलेल्या जुल्फीकारखानाने तातडीने आपल्या लष्करातील फत्तेहजंगखान यास छ.राजाराम महाराजांच्या पाठलागावर रवाना केले.

दक्षिणेतील सर्व ठाणी राजाराम महाराजांच्या संभाव्य पलायनाबाबत  सावध केली गेली .तिथे पन्हाळगडाचा वेढा अधिक कडक केला गेला.

अशा परिस्थितीत 26 सप्टेंबर १६८९ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास छत्रपती राजाराम महाराजांनी आपल्या सहकाऱ्यांसह शत्रूस चुकून पन्हाळगड सोडला. छत्रपती राजाराम महाराज व त्यांचे सहकारी पन्हाळगडावरून इतक्या सावधानतेने व गुप्तपणे निसटले की, वेढा घालून बसलेल्या मोगली फौजेस त्यांची वार्ता समजू शकली नाही. छत्रपती राजाराम महाराजांनी शत्रूस चकविण्यासाठी पन्हाळगडाहून सरळ दक्षिणेचा मार्ग न धरता पूर्वेचा मार्ग धरला. शिवछत्रपतीनी आग्र्याहून निसटल्यानंतर अशीच युक्ती अवलंबिली होती. ते सरळ दक्षिणेस न जाता प्रथम उत्तरेस व पूर्वेस वळले होते.

अशा या शूर व धाडसी छत्रपती राजाराम महाराज , महाराणी येसूबाई ,व स्वराज्यातील सर्व सरदार, शिलेदार यांना आमचा मानाचा मुजरा.

लेखन  – डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर पुणे

Leave a comment