महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

बाजींद भाग २३ | बहिर्जी नाईक यांची कहाणी

By Discover Maharashtra Views: 5486 6 Min Read

बाजींद भाग २३ | बहिर्जी नाईक यांची कहाणी…

बाजींद भाग २३ – राजे येसाजीरावांच्या पत्नीला रखमाई बाईसाहेबाना सावीत्री येत आहे हे ऐकून आनंदाला पारावर राहिला नव्हता. तिने वाड्यातील बायका एकत्र करुन पंचारती घेऊन खंडू आणि साऊ ला ओवाळून वाड्यात घेण्यासाठी घाई केली.
राजे येसाजीराव निहायत खुश होते.
शिरक्याची अब्रू सहीसलामत परत येत होती,आणि तो घेऊन येणारा खंडू आपल्या पदरी असलेला पैलवान आहे ही भावना त्याला मनस्वी आनंद देत होती..!

अनेक जखमा घेऊन व गेली कित्येक दिवसांची दगदग त्यासोबत बाजींद सारख्या आख्यायिकेतून प्रसिद्ध असलेल्या मात्र आजवर कोणी न पाहिलेल्या अवलीयाला भेटून ,त्यांचे रहस्य ऐकून सोबत त्याच्या शंभर वर्षाच्या तपस्येचा ठेवा सोबत घेऊन आपण आलो आहोत याच्या जाणिवेने सावीत्री व खंडोजी मनात एक जबाबदारीच्या भावनेत होते..जखमा व दगदग याची चिंता उरली नव्हती..!
मोठ्या आनंदात ते यशवंतमाचीत प्रवेशले..!

शिंगे तुतारीच्या निनादात आणि यशवंतमाचीच्या हजारो लोकांच्या साक्षीने सावीत्री आणि खंडोजी वाड्यात आले.
येसजीरावांच्या पत्नी व सावित्रीची आई रखमाबाईसाहेबानी दोघांना ओवाळून वाड्यात घेतले.
राजे येसजीरावांनी खंडोजी ला आनंदाने मिठीच मारली..जड शब्दात ते बोलले…खंडू आज शिरक्याची अब्रू, इज्जत केवळ तुझ्यामुळे सहीसलामत आम्ही पाहत आहोत..तुझे उपकार शिर्के कधीही विसरणार नाहीत..!
त्यांचे जोडलेले हात हातात धरत खंडोजी उद्गारला…”राजे…हे तर माझे कर्तव्य होते, तुम्ही सांगाल ते काम मी मोठ्या आनंदाने करेन”
खंडोजी चे बोलणे ऐकून राजे येसजींनी त्याला पुन्हा मिठी मारली..!

त्याच्या अंगावरच्या जखमा पाहून त्यानी त्वरित वैद्यांना बोलावून आणले…!
वैद्यांनी जखमा पाहिल्या आणि शिरक्यांच्या वाड्याच्या मागे असलेल्या विहिरीत वर्षानुवर्षे ओतून जुने घट्ट बनवलेले तूप आणून त्याच्या जखमाना लावले…कित्येक दिवसांच्या वेदना शांत होताना पाहून खंडोजी दीर्घ श्वास घेत झोपी गेला….!
सावित्रीची तिच्या क्कक्षात पहुडली आणि गेली कित्येक दिवसांची चित्तथरारक घडत गेलेल्या गोष्टी आठवण्याचा प्रयत्न करु लागली….बेरडाच्या जीवघेण्या हल्ल्यात जीवाची बाजी लावून तिला वाचवणारा खंडोजी तिला वारंवार आठवत होता…ती दरीतून मारलेली उडी…भिल्लांचा हल्ला…बाजींद चे जंगल…खंडोजी ची बहाद्दुरी आणि ज्या प्राणप्रिय ध्येयासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तो यशवंतमाचीत पैलवान म्हणून आला,त्याचे ते काम सावित्रीला मनोमन आवडले होते..!
गेली कित्येक दिवस खंडोजी सहवासाची जणूकाही सवय तिला लागली होती…ती त्या रम्य आठवणीत झोपी गेली…!

खंडोजी यशवंतमाचीत आला आहे ही बातमी वाऱ्याच्या वेगाने वस्ताद काकांच्या कानावर गेली.
बहिर्जींच्या परवानगी शिवाय खंडोजी ने सावीत्री ला वाचवण्यासाठी सूर्यराव बेरडाचे जे वैर घेतले होते ते बहिर्जींच्या कानावर गेले होते.
खंडोजी ला गिरफ्तार करण्याचे आदेश वस्ताद काका व त्यांच्या तुकडीला मिळाले होते.
पण,खंडोजी सोबत आजवर शेकडो मोहिमा केलेल्या वस्ताद काकांचा खंडोजीवर जीव होता,कसेही करुन खंडोजी ला यशवंतमाचीच्या फौजेला पांगवून हिंदवी स्वराज्याचा भगवा झेंडा यशवंतमाचीवर फडकवायला जर आपण भाग पाडले, तर मात्र बहिर्जींचा राग शांत होईल असे त्यांना वाटत होते…त्यांनी त्वरित खंडोजीला भेटण्यासाठी राजे येसजीरावांच्या वाड्यातील तालमीत निघाले..!

तिकडे सूर्यराव बेरडाँच्या हेजीबाने बाजींद च्या जंगलात ऐकलेली बित्तबातमी खडानखडा सूर्यराव च्या कानी घातली.
हेजीबाने सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवावा कसा हा प्रश्न सूर्यराव ला पडला !!
ठेवावा तर जे काही त्याने सांगितले ते वस्तुस्थितीला मान्य नव्हते आणि न ठेवावा तर जीवावर खेळून ही माहिती काढलेला हेजीब खोट बोलणार नव्हता…द्विधा मनस्थितीत सूर्यराव पुढच्या योजना डोक्यात आखत होता.

पण, त्याच्या डोक्यातून कृती होण्याआधीच ते डोके धडावेगळे करण्याच्या दृढ निश्चयाने “बाजींद” व त्याची चिवट फौज वायू वेगाने सूर्यराव च्या फौजेवर छापा घालण्याचा तयारीत होती.

पहाटेच्या मंद वाऱ्याची झुळूक खंडोजीच्या सर्वांगाला स्पर्श करुन गेली, गाढ झोपेतून तो उठला..!
सावित्रीच्या अनामिक ओढीने त्याला अस्वस्थ केले होते.
कित्येक संकटे सावित्रीच्या साक्षीने त्याने पार केली होती..अंगावरच्या जखमांच्या वेदना कमी झाल्या होत्या,तो तसाच उठला आणि तालमीतून बाहेर जाऊ लागला..तालमीचा दरवाजा उघडला आणि बाहेर वाड्याकडे पाहिले..!
सावित्रीला भेटलोच नाही कालपासून…त्याचे मन त्याच्याशीच बोलू लागले…चंद्रचांदण्यांचा प्रकाश आणि पहाटेचा मंदवारा….दूरवर पाहरेकर्याचा आरोळीचा बारीक आवाज आणि उरात सवित्रीबद्धलची घालमेल….खन्डोजी निश्चय करुन वाड्यात शिरला….सांधीसपाटीत बोटे घालून त्याने वाड्याची दगडी भिंत चढली आणि सावित्रीच्या कक्षाजवळ प्रवेश मिळवला..!
समोरुन दरवाजा बंद होता म्हणून पाठीमागून तो जेमतेम एक पाऊल बसेल इतक्या निमुळत्या जागेतून चालत सावित्रीच्या कक्षाजवळ असलेल्या खिडकीत गेला आणि खिडकीतून आत झेपावला..!

समईच्या सोनेरी प्रकाशात सारे दालन उजळून गेले होते, कक्षाच्या मध्यावर असलेल्या भव्य मंचकावर सावीत्री पहुडली होती..!

तिला पाहताच खंडोजीच्या हृदयाचा आवेग पुन्हा वाढला…!
तो धाडस करुन मंचकाजवळ जाणार इतक्यात सावीत्री ला कोणीतरी असल्याची जाणीव झाली आणि तिने उशाला ठेवलेला जंबिया उचलून…सावध पवित्रा घेतला आणि ओरडली..कोण आहे…?

समईच्या मंद प्रकाशात खंडोजी चा तो धिप्पाड देह तिला दिसला..!
ज्याच्या आठवणीने रात्रभर ती अस्वस्थ होती तो समोर उभा पाहून तिच्या हातातील खंजीर गळून पडले..!
बेभान होऊन तिने खंडोजीला मिठी मारली..!
खंडोजीनेही तिच्या मिठीने होणाऱ्या जखमेच्या वेदना सहन करत तिला बाहुपाशात घेतली..!
त्या वेदनेत सुद्धा मोठा आनंद होता…!

पहाटेचा मंद वारा खिडकीतून आत आला आणि समई विझली..!

पहाटेच्या रम्य वातावरणात..चंद्राच्या शीतल प्रकाशात..अंधाऱ्या खोलीत ते दोन जीव एक झाले होते…!
ना भूतकाळाची काळजी ना भविष्याची चिंता…अश्या मिठीत काळाचे भान उरत नसते..ती एक समाधी अवस्था होऊन जाते…!
अनेक योगातून असाध्य असणारी ही अवस्था केवळ प्रेमयोगातच समजते..!
केवळ आनंद…केवळ आनंद….!
त्या मिठीत स्वर्गाचे सुखही अपुरे पडावे..!

सारी यशवंतमाची पहाटेच्या वेळी गाढ निद्रा घेत होती आणि हे दोन शरीरे जणू एक जीव झाले होते…!

त्या रेशमी आठवणी डोळ्यातून अश्रुवाटे घळाघळा वाहत होत्या आणि सावीत्री आपला भूतकाळ त्या चौघांसमोर कथन करत होती…!

क्रमशः – बाजींद भाग २३ | बहिर्जी नाईक यांची कहाणी

संदर्भ : बाजींद कांदबरी – लेखक पै.गणेश मानुगडे

लेखन/माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव

बाजींद कांदबरी

Leave a comment