अहदनामा कराराची कारणे भाग ३

अहदनामा कराराची कारणे भाग २, ३

अहदनामा कराराची कारणे भाग ३ –

उत्तरेतील मराठ्यांच वाढत वर्चस्व :-

औरंगजेबाच्या मृत्यूपासूनच मराठी सेना गुजरात माळव्यात आपला अधिकार सांगायला लागली होती.नानासाहेबांशी सलोखा निर्माण झाल्यानंतर १७४४ मध्ये प्रचंड फौजेनिशी भास्कर राम कोल्हटकरांना रघुजींनी बंगालमध्ये पाठवले . कपटी अलीवर्दीखानाने भास्कर राम कोल्हटकरांचा दग्याने खून केला.१७४५ मध्ये क्रुद्ध  झालेल्या रघुजी भोसलेंनी कटक जिंकले आणि अलीवर्दीखाना कडून नऊ कोटी वसूल केले. अलिवर्दीखानाने १७४९ मधे कटक पुन्हा जिंकली तरी भोसलेंनी अल्पावधीत कटक पुन्हा आपल्याकडे हस्तगत केले. १७५१  मध्ये केलेल्या अलीवर्दीखाना सोबतचा तहात मराठ्यांची सत्ता ओरिसा वर प्रस्थापित झाली.(अहदनामा कराराची कारणे भाग ३)

बाजीराव यांच्या काळापासून राजपुतांना मराठे मदत करत होते .छत्रसाल बुंदेला यांना बाजीरावांनी बंगशाच्या विरोधी मदत केली होती .जयपूर राजघराण्याच्या तंट्यात राजपूत मराठ्यांची मदत मागत होते.होळकरांच्या धाकामुळे तर ईश्वर सिंग याने स्वत ला नाग टोचून व विष प्राशन करून आत्महत्या केली होती.  मराठ्यांची ताकत आता हिंदुस्थानच राजकारण खेळण्याइतपत  वाढली होती.

रोहिले-पठान:-

अली मोहम्मद या बाटलेल्या हिंदू जाटाने १७२१ मध्ये गंगेच्या उत्तर भागातील मोगली मुलुख जिंकून तिथे रोहिंग्यांचा राज्य स्थापन केलं.१७४८ मध्ये अली मोहम्मदचा मृत्यू झाला आणि हाफिज रहमत खान आणि दुंदेखान रोहिल्यांचे पुढारी झाले.१७४३ मध्ये युसूफजाई या अफगाण टोळीतून आलेल्या पस्तीस वर्षांचा  नजीब रोहिल्यांच्या सैन्यात एक साधा सैनिक म्हणून दाखल झाला.याची उत्तरोत्तर पदोन्नती होत गेली.नजीबखान याने नजीबाबाद मध्ये आपली राजधानी बनवली व तिथे पत्थरगडचा मजबूत किल्ला बांधला.

फर्रुखसियर बादशहाला वारसा युद्धात मदत केल्यामुळे मोहम्मद खान बंगश याला फर्रुकसियरने नवाबपद दिले.बंगशाने आपली राजधानी फर्रुकाबाद आपल्या आश्रयदात्याच्या नावाने बसवली.रोहिले पठाणांचा ओढा अब्दालीकडे नेहमीच जास्त होता. यात अफगानी वंशाची स्थापना करणे हा उद्देशही असेल ! अंतर्गत राजकारणात उलथापालथी साधून अनेकदा अबदालीला हिंदुस्थानावर आक्रमणासाठी आमंत्रण रोहिले पठाणांनीच दिलं होतं ! उत्तरेतील मराठ्यांच वाढत वर्चस्व , दिल्लीच्या राजकारणात इराण, तुराणी, दख्खनी, राजपूती, पठाणी ,बुंदेली अशे अनेक गट निर्माण झाले हाेते ! मराठ्यांची भिती ही वेगळी होतीच ! या सगळ्या कटकटींपासून त्रस्त झाल्याने वजीर सफदरजंग याने शेवटी मराठ्यांशी  २३ एप्रिल १७५२ रोजी कनोज येथे मराठ्यांशी तह केला. या “अहदनामा” नामक तहान्वये –

१) अब्दालीसारखा परकीय आक्रमक असो किंवा पठाण आणि रजपूत जाट असो, सर्व शत्रूपासून या डळमळीत साम्राज्याचं रक्षण करण्याच पेशव्यांनी मान्य केल आहे पेशवे बादशहाचा गेलेला मुलुख जिंकून त्याला परत करतील.

२) अब्दालीची हकालपट्टी करण्याकरता तीस लाख आणि इथल्या बंडखोरांच्या बदोबस्ताकरता वीस लाख असे एकूण पन्नास लाख रुपये पेशव्यांना मिळावेत.

३) पंजाब आणि सिंधची चौथाई (यात सियालकोट, पसरूर, गुजरात आणि अब्दालीला दिलेलं औरंगाबाद) तसंच हिसार, बदाऊं, संभळ आणि मुरादाबाद हे जिल्हे पेशव्यांना देण्याचं बादशहानं मान्य केलं आहे.

४) बादशहानं पेशव्यांची अजमेरची सुभेदारी (यात नारनौलची फौजदारी येते) आणिआग्र्याची सुभेदारी (यात मथुरेची फौजदारी येते) बहाल केली आहे. पेशव्यांनी तिथवसुली करून ह्या मुलुखातल्या असलेल्या हक्कांचा उपभोग घेणे आहे.

५) परंपरागत चालत असलेल्या चालीरीति आणि नियम सांभाळून ह्या मुलुखांचा कारभार पेशव्यांनी बघावा.

६) मोगल मनसबदारांप्रमाणे पेशव्यांच्या सरदारांनी दरबारात यावं आणि बादशहाच्या मोहिमांत भाग घ्यावा.

पुढे याच तहामुळे रघुनाथराव १७५७ मध्ये अब्दाली निघून गेल्यावर दिल्लीत धडकले. त्यांनी दिल्ली काबीज केली.शीख जाट मराठे यांच्या फौजांनी सरहिंद मधून अब्दालीचा मुलगा तैमूर , शहा सेनापती जहानखान यांना पिटाळून लावले व लाहोर काबीज केले ! मराठा सरदार आदिना बेग आणि शिखांनी तैमूरशहाचा अटकेपर्यंत पिच्छा पुरवला.मराठ्यांचा भगवा ध्वज दिमाखाने आणि डौलाने अटकेवर फडकू लागला ! अब्दालीचा चौथ्या स्वारितल्या या अपमानामुळे पुढे पानिपताचं युद्ध अटळ ठरलं …….

(समाप्त – अहदनामा कराराची कारणे भाग ३)

संदर्भ:-
१) सोलस्टिस ओफ पानिपत :- उदय.स.कुलकर्णी
२)पेशवाई:- कौस्तुभ कस्तुरे
३)दौलतीचे खांब :- प्रा. मुकुंदराव आगासकर
४)आधुनिक भारत:- धनंजय आचार्य
५) निनादराव बेडेकर यांचं पानिपत विषयावर व्याख्यान .

Pruthvi Dhawad

अहदनामा कराराची कारणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here