महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

अहदनामा कराराची कारणे

By Discover Maharashtra Views: 2364 6 Min Read

अहदनामा कराराची कारणे :-

“दक्षिण दक्षिणांची” म्हणणारे शिवछत्रपती आणि “हिंदूस्तान हिंदुस्तानींचा” म्हणणारे सदाशिवरावभाऊ एकच राष्ट्रीयत्वाचा विचार  सांगणारे  ! शिवरायांचे दक्षिण वाचवण्याचे   धोरण मोगल परकीय आक्रमक म्हणून जन्माला आले तर  सदाशिव राव भाऊचे हिंदुस्थान वाचवण्याचे धोरण अफगाणी अब्दाली  हा परकीय आक्रमक या भावनेतून जन्माला आले होते ! शिवछत्रपतींच्या ऐंशी वर्षांनंतर राज्य रक्षणाचे धोरण तेच असले तरी लष्करी , आरमारी , न्यायव्यवस्थेच्या बाबतीत   मराठा साम्राज्यात अनेक बदल झाले हाेते . बाजीरावाच्या हाताखाली तयार झालेले मल्हारराव होळकर आणि इतर अनेक सरदार भाऊंच्या आधुनिक युद्धनीतीने लढायला पानिपत तयार नव्हते.(अहदनामा कराराची कारणे)

जयपूरच्या गादीच्या तंट्यात शिंदे होळकर पडल्यामुळे मराठासोबत राजपूतांनी एकप्रकारे शत्रुत्व धरल आणि हेच कारण राजपूत अब्दालीच्या बाजूने होण्यात परावर्तित झाला ! मराठ्यांचा १७१९ मध्ये खर्या प्रकारे उत्तरेच्या राजकारणात शिरकाव होण्यास सुरूवात झाली. 1750 ते १७६० हे एक दशक पूर्ण नाना-भाऊंच होतं ! रघुनाथरावांच्या अटक मोहिमेने मराठ्यांच्या हातात काहीच मोठ लागलं नाही ! राज्याच्या तिजोरित काहीच भरपाई झाली नाही. मुगल ,रोहिले-पठाण यांच्या झगड्यात १७५२ च्या अहदनामा तहान्वये मराठे खिचल्या गेले आणि हाच तह पानिपतच्या भीषण युद्धाला कारणीभूत ठरला !

इ.स. १६८० मध्ये शिवाजी महाराजांचा मृत्यू  , १६८९ मध्ये संभाजी महाराजांची औरंगजेबाने केलेली निर्घृण हत्या यामुळे मराठे अतिशय चिडले होते ! जो औरंगजेब दक्षिणेत पाच लाख सैन्य घेऊन स्वराज्य बुडवायला आला होता तोच औरंगजेब स्वराज्याच्या नादी लागून मोगली सत्ता गमावून बसला ! मराठ्याच्या स्वातंत्र्य लढा इ.स. १७०७ पर्यंत औरंगजेबाचा मृत्यू होईतो सुरू होता .शाहूराजे यांना मराठ्यांच्यात दुफळी माजवन्या करताच औरंगजेबाने स्वतःकडे ठेवले होते. आजमशाहने थोरल्या शाहूंना कैदेतून मुक्त केले आणि इथून मराठ्यांमध्ये वारसा युद्धाला तोंड फुटले.

कालांतराने बाळाजी विश्वनाथ , धनाजी जाधव सारखे मातब्बर शाहूंच्या पक्षात येऊन मिळाले. आगामी काळात शाहूराजे छत्रपती झाल्याने सातारा- कोल्हापूर अशा दोन गाद्या निर्माण झाल्या. पुढे स्वराज्याचे पेशवे बहिरोपंत पिंगळे व खंडो बल्लाळ यांना कान्होजी आंग्रेंनी कैद केले.स्वराज्याचा पेशवा कैद झाल्या कारणाने शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथांना पेशवे पद बहाल केले . कान्होजी आंग्रेंना आपल्या पक्षात आणल्याच्या कामगिरीमुळे ही पेशवाई त्यांच्याकडे कायम राहिली ! दिल्लीचे राजकारण अनेक आढेवेढे घेत होते औरंगजेबानंतर त्याचा मुलगा मुअज्जम गादीवर आला  हा १७१२ मध्ये मरण पावला यानंतर जहांदरशहा बादशाह  झाला या एकाच महिन्यात टिकला . यानंतर फर्रुखसियर बादशहा झाला. दिल्लीत बादशाह  गादीवर टिकत नव्हते आणि सत्ता सय्यद बंधूंच्या हातात आली होती. सय्यद बंधूंच्या हातात सत्ता आली असली तरी सय्यद बंधु शिया मुसनमान असल्यामुळे सुन्नी दरबार त्यांना जुमानत नव्हता. बादशाह चा दरबार म्हणजे पूर्णपणे कटकारस्थानाचे कोठार बनले होते. सय्यद बंधूंच्या विरूध्द दरबारातील इतर मंडळी बादशाह चे कान भरत गेल्यामुळे बादशहाने सय्यद बंधूंना कैद करण्याचे आदेश दिले !

सय्यद अब्दुल्लाने ताबडतोब दक्षिणेस हुसैन अलीला सैन्याची जमवाजमव करून दिल्लीत यायला सांगितले. हुसेन अली व मराठ्यांची फौज दिल्लीकडे निघाल्या. इथे मराठ्यांनी एक मोठा डाव खेळला ! मराठ्यांनी औरंगजेबाचा नातू म्हणजे अकबर-२ याचा मुलगा मोईनुद्दीन हा आमच्याकडे आहे अशी अफवा पसरवली ! यासाठी एक देखणा इसम शोधण्यात आला आणि त्याला सजवलेल्या हत्तीत बसवण्यात आले. ही मिरवणूक वाजत गाजत दिल्लीत पोहोचली ! इकडे बादशहाचे धाबे दणाणले आणि त्याने तहाची याचना केली. ठरल्याप्रमाणे या मोहिमेतुन मराठ्यांना दख्खनच्या सुभ्यातून चौथाईचा हक्क आणि सरदेशमुखी वसूल करण्याचा हक्क मिळाला आणि तोही बादशाहच्या  शिक्कामोर्तबा सहित . शाहू छत्रपती यांनी बाळाजी विश्वनाथांच्या “अतुल पराक्रमी सेवक” म्हणून गौरव केला.

१७२० मध्ये बाळाजी विश्वनाथ मरण पावल्यानंतर त्यांचा मुलगा बाजीराव , मल्हारराव होळकर , राणोजी शिंदे पिलाजीराव जाधवराव , उदाजी पवार , गोविंदराव बुंदिले,  चिमाजी अप्पा यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांच वादळ अवघ्या हिंदुस्थानात दरारा निर्माण करणारं होतं ! बाजीराव पेशवा शिवछत्रपतींच्या स्वराज्याचं साम्राज्यात रूपांतर करणार होता !

पोर्तुगीज , इंग्रज,  सिंद्दी,  मोगल,  निजाम यांच्यापासून स्वराज्याच एकाचवेळी रक्षण करणारा हा पेशवा जगात अजिंक्य योद्धा म्हणून नाव कमावणार होता !

“रावांचा पूण्य प्रताप ऐसा जाला आहे की हस्तिनापूरचे राज्य घेऊन छत्रपतींचं देतील तर आज अनुकूल आहे”

असं बुंदेलखंडाच्या यशानंतर एका मराठी सरदाराने बाजीरावांच वर्णन केलं आहे.

गुजरात माळव्याची चौथाई , सरदेशमुखी मोगल बादशाहाने  मराठ्यांना द्यायला अमान्य केल्यामुळे बाजीरावाने थेट दिल्लीत धडक देण्याची १७३७ मध्ये योजना आखली. बाजीराव सादतखान आणि कमरुद्दीनखानाला भोपाळजवळ चकवा देऊन दिल्लीत जाऊन पोहोचला. दिल्लीत मराठ्यांनी बरीच लुटालूट केली. बाजीरावाचा दिल्लीत पराक्रम होत असतांना बादशाहने निजामाची मदत मागितली निजाम पुण्यावर चाल करायला निघाल्यामुळे बाजीरावानं निजामाला गाठून त्याचा भोपाळजवळ नर्मदे पाशी मोठा पराभव केला तसंच थोरल्या शाहू छत्रपतींच धोरण मोगल पातशाही राखण्याचच होतं !शाहू महाराजांनी स्वत पत्र लिहून बाजीरावांना दिल्लीचा वेढा उठवायला लावला होता आणि दक्षिणेत दाखल व्हायला लावलं होतं.

१७३९ मध्ये दिल्लीची मुस्लीम मोगल पातशाही धोक्यात असल्याचं कारण सांगून अफ्शरी वंशाची स्थापना करणार्या इराणी नदीरशहाने दिल्लीवर आक्रमण केले. यावेळेस त्यांनी दिल्लीत प्रचंड लुटालूट , निर्दयी कत्तल केली.दिल्लीच्या लुटीत तो जगप्रसिद्ध कोहिनूर हिरा मयूर सिंहासन आणि करोडोंची संपत्ती घेऊन मायदेशी वापस गेला ! की बाजीराव दिल्ली वाचवायला येतोय म्हटल्यावर पळाला ?

अखंड हिंदुस्थानात मराठा सत्तेचे यथोचित वर्चस्व निर्माण करून शुर बाजीराव पेशवा  २८ एप्रिल १७४० ला परलोकवासी झाला !

क्रमश:- अहदनामा कराराची कारणे.

Pruthvi Dhawad

Leave a comment