महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

खानदेश स्वातंत्र्यसंग्राम भाग ७ | खानदेशातील इतर चळवळी

By Discover Maharashtra Views: 2478 4 Min Read

खानदेश स्वातंत्र्यसंग्राम भाग ७ | खानदेशातील इतर चळवळी –

खानदेशात बिगर कॉंग्रेस चळवळी झाल्या आणि राजकीय तसेच सामाजिक घडामोडी घडल्या त्यात इ.स.१९२० ते १९४७ दरम्यान सत्यशोधक चळवळ तसेच शेतकरी चळवळ, १९३७ मध्ये पश्र्चिम खानदेश जिल्हा शेतकरी परिषद, अमळनेर येथील टोल टॅक्स प्रकरण हे १९३८ मध्ये तर याच वर्षी जळगावात शेतकरी मोर्चा, खानदेशातील कामगार चळवळ,गिरणी कामगारांचा संप, धुळे गिरणी कामगारांचे प्रकरण, अमळनेर येथील गिरणी कामगार परिषद,संप, याव्यतिरिक्त विविध परिषदा झाल्या त्याविषयी थोडक्यात आढावा घेतला तर काय दिसते? (खानदेश स्वातंत्र्यसंग्राम भाग ७ – खानदेशातील इतर चळवळी)

खानदेशातील सत्यशोधक चळवळ –

खानदेशात सत्यशोधक चळवळीला सुरवात १९१५ पुर्वीच पोचले होते, कारण की १९१२ मध्ये खानदेश मराठा शिक्षण समाजाचे अधिवेशन धुळे येथे भरले होते. यात बऱ्याच ब्राम्हणेतर पुढाऱ्यांनी भाग घेतला आणि या चळवळीला सत्यशोधक समाजाचे मुहुर्तमेढ म्हटली पाहिजे. पुर्व खानदेशात जागोजागी शाखा उघडण्यात आल्या. १९१७ साली या चळवळीचा अहवाल प्रसिद्ध झाला त्यात चाळीसगाव तालुक्यातील बनसेंद्रे, एरंडोल तालुक्यातील आडगाव, पिंपळगाव, गुढे, पाचोरा तालुक्यातील कृष्णापूर येथे शाखा सुरू असल्याचे म्हटले आहे. अस्पृश्यता, कर्मकांडे, भेदाभेद हे कमी होण्यास बरीच मदत झाली. जलश्यामधून जनजागृती केली गेली.

जळगाव जिल्ह्यातील आडगाव येथे १९१४ साली सत्यशोधक समाजाचे अधिवेशन भरले आणि शाखा सुरू झाली. चहाडी, आडगाव, पिंपळगाव येथे शाखा सुरू करण्यात आली. वरणगाव, फुलगाव येथे सत्यशोधक समाजाच्या नेते मंडळी फिरत असल्याचे उल्लेख सापडतात. दिनबंधू जिल्हा अहमदनगर मे १९१६ मध्ये आहे. अमळनेर तालुक्यातील डांगरी येथे सत्यशोधक समाजाचे मोठे प्रभावी केंद्र होते आणि समर्थकांचा समुदाय होता.

खिरोदा येथे धनाजी नाना चौधरी यांचे बंधू सीताराम नाना चौधरी यांनी सत्यशोधक समाजाची शाखा सुरू केली होती.सत्यशोधक समाजाचा पुरस्कार करणारे आत्मोध्दार हे मासिक पत्र १९२२ सालापासून सुरू केले होते. वि.या.नेहेते हे सत्यशोधक समाजाच्या कट्टर अनुयायी होते. बातमीदार या पत्राचे ते संपादक होते आणि त्यातून महात्मा फुले यांचे विचारावर लेखमाला लिहित असत. स्वातंत्र्यपुर्व काळातील महाराष्ट्रातील सत्यशोधक समाजाच्या प्रांतिक मंडळावर सीताराम नाना चौधरी आणि धोंडो पाटील हे सदस्य होते.( माळी गजमल, फैजपूर कॉंग्रेस)

१९२३ नंतर पुर्व पश्चिम खानदेशात सत्यशोधक समाजाच्या भरीव कार्याची सुरुवात झाली.

कारण धुळ्यात डॉ.घोगरे, साक्रीमध्ये आप्पासाहेब बेडसे, नामदेवराव बुधाजी,नरडाणेचे दिपचंद सुपडू पुर्व खानदेशातील बाबाजी सुकराम,अमळनेरचे मुलाजीराव सौंदे,लोटन कोंडू पाटील,कलमाडीचे तर मोराणेचे उत्तम भिलाजी देशमुख हे होय. राजकिय घडामोडी पेक्षा यांनी सामाजिक बाबतीत जास्त रस घेतला. खानदेशात यांना रावपार्टीचे लोक म्हणत असत. १९२८ मध्ये या रावपार्टीने लोकल बोर्डाची निवडणूक लढवली. नामदेव बुधाजी अहिरराव हे अध्यक्ष निवडून आले. साक्री तालुका हा केंद्रबिंदू बनला पुढे १९२८ ला दिघावे येथे ब्राम्हणेतर परिषद व इ.स. १९३१ ला अस्पृश्यता निवारण परिषद भरल्याचा उल्लेख सापडतो.  १९२८-२९ काळात पुर्वी काँग्रेसचे मुखपत्र असलेल्या प्रबोध हे वृत्तपत्र हिंदू वादी भुमिका स्विकारून लिहू लागले. अ.वि.टिळक हे त्यांचे संपादक होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आता ब्राम्हण पक्ष आणि ब्राम्हणेतर पुढारी असे स्वरूप आले. आपसात झालेली ओढाताण बघून राष्ट्रहित कुणालाच कळत नाही अशी टिका पुण्याच्या केसरीत केली होती. (केसरी पुणे २२ ऑगस्ट १९३१)

१९३५ मध्ये ब्राम्हणेतर समाजाचे धुळे येथे अधिवेशन झाले.  यात काही ठराव करण्यात आले. कायमधारा पध्दती,जंगलांची गाऱ्हाणी दूर करणे शिवाय शिक्षण सक्तीचे करणे, सिंचनासाठी उपाययोजना आणि शेतकरी ऋणमुक्त होतील असे कायदे करावेत असे ठराव करण्यात आले.

१९३६ मध्ये फैजपूर येथे राष्ट्रीय अधिवेशन पार पडले. सत्यशोधक समाजाच्या संस्कारात पुढे शरद पाटील आणि तत्कालीन राजकीय आणि सामाजिक विचार करणारी एक पिढी तयार झाली.

Leave a comment