खांदेरीचा रणसंग्राम भाग ७

खांदेरीचा रणसंग्राम भाग ७

खांदेरीचा रणसंग्राम भाग ७

खांदेरीचा रणसंग्राम भाग ७ – चौलचा सुभेदार वाड्यासमोर एक घोडेस्वार दौडत आला. पहाऱ्यावरच्या मावळ्यांनी त्या व्यक्तीला आत घेतले आणि लगोलग सुभेदाराला बोलवायला धावले. रायगडावरून माणूस आलाय म्हंटल्यावर सुभेदार धावत बाहेर आला.
“बोला जी, म्याच सुभेदार”
” गडावरनं येन झालं, पत्र हाय जी”.

सांडणीस्वाराने पत्र सुभेदाराच्या हाती दिलं. सुभेदाराने सांडणीस्वाराला आराम करायला पाठवले. सुभेदाराने पत्र कपाळी टेकवत अलगद उघडलं. वाचता वाचता अचानक हुरूप येऊन त्याने लगेच घोडा तयार करायला सांगितलं. सुभेदार दौलतखानाच्या दिशेने धावत सुटला. धाप टाकत दौलतखानाला सामोरा जात म्हणाला
“संमतीपत्र आलाय, तयारी झाली आसंल, तर शत्रूला मराठे काय चीझ आहेत दाखवून येऊ”, काय म्हणता?”
आणि ते झुपकेदार मिश्यातून फुटलेले हास्याचे फवारे.

अनेक दिवसांपासून शिवरायांचा आरमाराचा एक अधिकारी दौलतखान चालून येणार अशी हवा इंग्लिश गोटात उठत होतीच. इंग्लिश आरमार ह्या चढाईची तयारी करून होते. त्यांचा अंदाज चुकीचा नव्हताच. नागावच्या खाडीत दौलतखान आपल्या मोहिमेची तयारी करत होता. खाडीत गुराब, गलबत सज्ज होत होती. तोफा बंदुका जागेवर बसवल्या जात होता. पिंपच्या पिंप दारुगोळा भरून जहाजात चढत होता. अशी सगळी शस्त्रसज्जता होत होती. बसरूर स्वारीनंतर मोठी सागरी मोहीम खांदेरी ठरत होती. १८ ऑक्टोबर च्या पहाटे सर्व जहाजांची शिड उभारण्यात आली. भगवा जरीपटका जहाजावर डौलत होता. रणचंडीकडे विजयाचा आशीर्वाद मागत हर हर महादेव चा रणघोष झाला. पहाटेच्या पहिल्या किरणाबरोबर सुमारे ४० ते ५० जहाज युद्धसज्ज होऊन नागावच्या खाडीतून बाहेर पडली.

सकाळचे ६ एक वाजता छत्रपतींचे आरमार शत्रूच्या नजरेत आलं. सरळ शत्रूवर चालून जाणं टाळून मराठी आरमार थळचा किनारा जवळ ठेवून पुठे जात होतं. पूर्वेकडून खांदेरीच्या दिशेने किनाऱ्यावरची थंड हवा सुटली होती. हवेचा रोख कुठेय ह्याचा अंदाज दौलतखान घेत होता. हवा आपल्या बाजूने आहे बघुन त्याने आपल्या आरमाराचा रोख अचानच इंग्रजांकडे वळवला. इथे आपापल्या जहाजावर इंग्रज नांगर समुद्रात सोडून वाट बघत होते. त्यांनी आपली जहाज एका ओळीत उभी केली होती. मिंचिन ला सांगण्यात आले होते की दौलतखान चालून आला की आपला माणूस पाठवून त्यांना आधी समजावून सांगा मग हल्ला करा. पण इथे मराठे थेट हल्ला चढवण्याचा विचाराने आले होते. सपासप पाणी कापत जोरजोरात वेल्हे मारत ते इंग्लिश आरमाराच्या जवळ पोचले सुद्धा. दौलतखानाने इशारा करताच बरकांजदाजानी एकत्र इंग्लिश बोटींच्या दिशेने बार काढले. मराठ्यांच्या माऱ्याला इंग्रजांना उत्तर देयला वेळच नव्हता. गरुडाने आपले पंख पसरवायला सुरवात केली. शिस्तबद्ध पध्दतीने दौलतखानाने आपले आरमार पसरवायला सुरवात केली. आपले नांगर ओढून घेण्याचे कॅप्टन कॅंग्विन ने आदेश दिले पण तितका वेळ इंग्रजांकडे होता कुठे. कारण नांगर वर ओढत बसलो तर मराठे जहाजावर चढतील. शेवटी मिंचिनने नांगराचा दोर कापून टाकायला सांगितलं.

दोन्ही बाजूने बरकंददाज बंदुका घेऊन तयार होते. इंग्रजांनी आपल्या लांब पल्याच्या बंदुकानी हल्ला चढवला पण त्याचा फायदा झाला नाही. मराठी जहाजांनी इंग्रजांना घेरायला सुरवात केली होती. त्यात येणं समरभूमीत काही इंग्रज अधिकाऱ्यांचा धीर सुटलाच. समोर खांदेरी बेटावर सुद्धा शत्रू तर किनाऱ्यावर जावं तर तिथेही हे मराठे ठाण मांडून बसलेले. इंग्लिश आरमार दक्षिण दिशेला पळत सुटलं. रिव्हेंज आणि डव ही दोन इंग्लिश जहाज पिछाडीला होती. मराठी आरमार येऊन कोसळलं ते ह्यां दोन जहाजांवर. बंदुकांचे बार दोन्ही बाजूने वाजत होते. धुराचे लोटच्या लोट आकाशात विरत होते. काही वेळ त्या लाटांचा आवाज देखील कानी पडत नव्हता. डवच्या कॅप्टनला आधीच्या रात्री म्हणजे १७ ऑक्टोबर ला सांगितले होते की बेटाच्या जितक्या जवळ जाऊन राहता येईल तितके आत जा. त्या ठिकाणी आता पाणी उथळ होतं. अश्या पाण्यात इंग्लिश जहाज म्हणजे एक झुलता हत्तीचं. आणि मराठी जहाज अश्या पाण्यात हवी तशी पुढे सरकत. ह्याचा फायदा मराठा आरमाराला होतं होता.

So soon as the day appeared we see sevagees Armada drawn out nagoun, rowing up to us alongst shore, keeping the shore close. They come upon mi so fast with the wind and their oars. With their prows upon me firing. That I had not time, we not being able to bring a gun to bear upon them. The fight began about seven o clock.

डवच्या मागच्या बाजूला मराठ्यांच्या जोरदार हल्ला झाला. लांब पल्याच्या बंदुकामधून मराठे अक्षरशः पाऊस पाडत होते. डवच्या मागच्या बाजूला चार सैनिक बंदुका सांभाळत उभे होते. त्यातले दोन ह्या हल्ल्यात मारले गेले. अनेक इंग्लिश शिपाई पटापट कोसळले. डव इंग्रजांनी भाड्याने घेतलेलं जहाज होत. ज्याची रचना निमुळती होती. त्यामुळे मोठ्या तोफा ह्यावर ठेवणे कठीण होते. तरीही काही तोफा त्या जहाजावर होत्या. शत्रू धाकात राहावा आणि लांब पळावा म्हणून त्याने चार, पाच तोफांचे बार काढले. पण तेव्हा परिस्थिती व संख्याबळ मराठ्यांच्या बाजूने होते. कॅप्टन डकट आणि कॅप्टन फुलर ह्यांनी त्यांचे मचवे डव च्या बाजूने काढून वेगाने पुठे नेले. पण ह्या दोघांनीही डव ला कोणतीही मदत केली नाही. मराठ्यांकडून अश्या प्रकारे हल्ला इंग्रजांना अपेक्षित च नव्हता.

इंग्लिश आरमार जिथे जागा भेटेल तेथून निघून पळून गेलं. काहींनी समुद्रात उड्या घेतल्या. त्यावेळी डव च्या जवळ एकच जहाज उरलं ते म्हणजे रिव्हेंज. डव वरून रिव्हेंज वर दोनदा मदतीची हाक देण्यात आली. पण आता आपण थांबलो तर ह्या वाऱ्याने वाहत जाऊन बेटावर आपटू. म्हणून आपल्या तोफांनी शत्रूला लांब ठेवा, आम्ही मदतीला येतो हा निरोप तिथून आला. पण मराठ्यांना थोपवण आता डवला शक्य नव्हतं. दौलतखान अर्ध्या मैलावर आला तेव्हा डव ने संपूर्ण शरणागती पत्करली. आपलं निशाण आणि वरच शिड डवने उतरवून ठेवलं. आणि डवच्या कॅप्टन मौलिव्हेररने आपल्या सैनिकांना आदेश दिला, ‘निशस्त्र होऊन शत्रूला स्वाधीन व्हा. असं नाही केलं तर शत्रू आपल्याला कापून काढेल’. हे त्याला पायलट जॉन नेलरने सांगितलं होतं. निशस्त्र होऊन इंग्लिश सैन्य मराठ्यांना शरण गेले. मराठ्यांनी लागलीच येऊन डवचा ताबा घेतला. आणि डवला खांदेरी च्या दिशेने नेले. त्याबरोबरच आणखी दोन एक बोटी मराठ्यांनी पकडल्या. त्या सगळ्या खांदेरी ला नेण्यात आल्या.

Room for non more then four person to ply there small shots, and two of them being killed that fire out of the sterne so discouraged the lascarrs that they run over board. And I being calling to the revenge for the releif from them. By order of john nailor the pilot of said groab, topsail and ancient was struck, and we being overpowered by the enemy fleet and non of our own by as to assist us in any respect, were taken by enemy.

डव खांदेरीवर नेण्यात आली. तिथे मराठी सैन्य तोफामध्ये दारुगोळा ठासून बसले होता. पण त्याची गरज नव्हती पडली. राजाचं आरमार मोठा जय मिळवत होत. डवला किनाऱ्यावर ओढून घेण्यात आलं. त्यावरच्या तोफा काढून खांदेरी वर नेल्या गेल्या. इंग्रज अधिकारी, खलाशी जे कोणी त्या हल्ल्यातून वाचले त्या सगळ्यांना कैदेत टाकलं. एक तात्पुरती जागा त्यासाठी केली होती. पण अजून युद्ध संपलं नव्हतं. रिव्हेंज समुद्रात दिसत होती. पण कदाचित तिनेही आता समर्पणाची तयारी केलेली. बराच वेळ समुद्रात ती उभी होती. आता किनाऱ्यावर सुद्धा जल्लोष करायला सुरुवात झाली.

क्रमशः – खांदेरीचा रणसंग्राम भाग ७

संदर्भ ग्रंथ : शिव छत्रपतींचे आरमार
English records

माहिती साभार – स्वराज्याचे वैभव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here