गजांतलक्ष्मी शिल्प, खोडद

गजांतलक्ष्मी शिल्प, खोडद

जुन्नर तालुक्यातील खोडद गावात आढळले तेरावे गजांतलक्ष्मी शिल्प –

पुर्वी म्हणे की पाऊस वेळेवर पडला नाही की खोडद ग्रामस्थ या दगडी शिल्पावर दगड रचुन बोजा दिला जायचा व पाऊस पडू दे अशी आर्त हाक या दगडी रुपातील शिल्प असलेल्या या भवानी मातेला दिली जायची मग काय आश्चर्य पाऊस हमखास पडायचाच असे ग्रामस्थ छान अनुभव सांगता व नंतर त्यावर ठेवलेल्या वजना इतकी गुळाची शेरणी गावात वाटली जायची व तो भवानी मातेवर ठेवलेला बोजा उतरविला जायचा. भवानी माता म्हणून या उघड्या पडलेल्या शिल्पाला हात जोडले जायचे आज याच उघड्या पडलेल्या शिल्पाला खोडद ग्रामस्थांनी मंदिर निर्माण करत खुप सुंदर जतन केले आहे. शेजारीच दक्षिणेकडुन एक अर्धवट तुटलेल्या विरघळीचा तुकडा पण पण जतन केला असुन गावातील एका विराचा जनू तो सन्मानच केल्यासारखे वाटते.(गजांतलक्ष्मी शिल्प, खोडद)

खोडद गावच्या इतिहासाची सर्वात मोठी जर साक्ष असेल तर या भवानी मातेच्या मंदिरा पेक्षा मोठी असुच शकत नाही व गावातील पुर्वी थोर कार्य करणाऱ्या विराची विरघळ साक्ष म्हणजे सामाजिक बांधिलकी जपणारे देशभक्त पण या मातीत घडुन प्राणाची आहुती देऊन गेल्याचे पण पहायला मिळते.

जुन्नर तालुक्यातील खामगाव, निरगुडे , निमगीरी (किल्ले निमगिरी वर), नाणेघाट, घाटघर, किल्ले जीवधन,घंगाळधरे, माणकेश्वर , बोरी शिरोली, भुत लेणी व पिंपळगाव तर्फे नारायणगाव आणि खोडद अशा तेरा ठिकाणी विविध गावांमध्ये म्हणजे जुन्नर तालुक्यातील प्रत्येक दिशेला ही गजांतलक्ष्मीची शिल्पे पहावयास मिळतात.

तालुक्यातील विस्तारलेल्या शिल्पांचे निरीक्षण करण्याचे मला लागलेले वेड व याच छंदामुळे भुतकाळात दफन झालेला जुन्नर तालुक्यातील गावांचा इतिहास उकरून काढण्याच्या लागलेल्या सवयीमुळे मी आज प्रथमतःच तालुक्यातील तेरा गजांतलक्ष्मी शिल्पांचे एकसाथ दर्शन आपणास घडवून आनू शकलो. नेमकी या शिल्पाची ओळख काय असते. याचा अर्थ काय असतो हे मी आपणास सांगु इच्छितो ताकी हे दगडी शिल्प आपल्या पाहण्यात आले तर आपण ते ओळखु शकाल. व आपल्या जवळपास हे शिल्प आढळुन आले तर आपल्या भागातही सातवाहनांचे वास्तव्य होते का? हे आपल्याला माहीत होईल. आपण शिल्पांचे निरीक्षण केलेत तर दोन बाजूने हत्ती आपली सोंड उंच करून टोकाला त्या मिळालेल्या असुन टोकाचा भाग खाली वाकलेला दिसतो.

अगदी याच ठिकाणी सरळखाली दोन हत्तींच्या मध्ये एक स्रीचित्र कोरलेले दिसते. या स्त्रीला ते सोंडेतून पाणी टाकून अंघोळ घालताना दिसते हे चित्र म्हणजेच लक्ष्मीमातेचे चित्र होय. म्हणून या शिल्पाला गजांतलक्ष्मी असे संबोधण्यात येते. गावा गावांत अशी अनेक विविध शिल्पे पडलेली असतात परंतु दगड म्हणून त्याकडे सर्वच दुर्लक्ष करत असतात. खरेतर गावाचा ऐतिहासिक वारसा दाखवून देण्याचे काम हि शिल्पे करत असतात म्हणून या शिल्पांना सोन्यांच्या दागिण्यापेक्षाही जास्त जपलं पाहिजे कारण तो संपूर्ण गावचा इतिहास उजेडात आणण्यासाठी महत्वपूर्ण पुरावा असतो. आज पण हजारो वर्षे उन,वारा व धुळखात पडलेली ही शिल्पे तगधरुन उभी किंवा पडलेली आहेत ती फक्त गावचा इतिहास उजेडात आणण्यासाठीच. आपण त्यांचे महत्त्व लक्षात घेऊन ती संवर्धीत करण्यासाठी योगदान दिले पाहिजे.

अशी शिल्पे आपणास कुठे आढळुन आली असतील तर कृपया आम्हाला कमेंट्स द्वारे नक्की कळवा.

लेखक/ छायाचित्र : श्री.खरमाळे रमेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here