शाश्‍वत पर्यटन : काळाची गरज

कन्टेन्ट | गाजलेली ऐतिहासिक दत्तक प्रकरणे २ ३ ४ ५ ६ ७ | मौर्य सत्तेचा उदय | गड कसे पाहवे | संभाजी कावजी व कावजी कोंढाळकर | जावळी मोहीम ६

शाश्‍वत पर्यटन : काळाची गरज –

२७ सप्टेंबर  हा जागतिक पर्यटन दिन. कोरोना काळात पूर्वीच्या खुप संकल्पना बदलून गेल्या आहेत. पर्यटनातही आता वेगळा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. शाश्‍वत पर्यटन (सस्टेनेबल टूरिझम) ही संकल्पना जास्त करून समोर आली युरोपातून. आपला देश, आपली संस्कृती, चालिरीती, रितीरिवाज, संगीत, खाद्य पदार्थ यांबाबत त्यांना जास्त आस्था राहिलेली आहे. दुसर्‍या महायुद्धानंतर जगात व्यापाराला आणि त्या सोबतच पर्यटनाला विशेष गती मिळाली. या पर्यटनाचा एक वेगळा आविष्कार म्हणजे शाश्‍वत पर्यटन. त्यात या स्थानिक मुद्द्यांना विशेष महत्त्व दिले जाते.

कोरोना आपत्तीनंतर भारतात आणि महाराष्ट्रातील पर्यटनाचाही आपण या दृष्टीने वेगळा विचार करू शकतो. आत्तापर्यंत पर्यटन म्हणजे उंची महागडे हॉटेल्स, खाण्यापिण्याची मौजमजा आणि यासोबतच जरा जमले तर बाहेर फिरणे. गोव्या सारख्या प्रदेशाने मौजमजेलाच पर्यटन म्हणा असा गैरसमज पसरवला. पण आता सगळीकडेच पैशाच्या अडचणी जाणवू लागल्या आहेत. याचा आघात पर्यटनावरही पडत आहे. मग यातून पर्याय काय? तर शाश्‍वत पर्यटन एक चांगला पर्याय समोर येतो आहे.

  1. वेगळी ठिकाणे :

जी अतिशय प्रसिद्ध अशी पर्यटन स्थळं आहेत त्यांचा विचार आपण बाजूला ठेवू. तसेही त्यांच्याकडे पर्यटक येत असतातच. अतिशय उत्तम पण पर्यटकांना ज्ञात नसलेली स्थळं शोधून पर्यटकांसमोर असे पर्याय ठेवता येतील. त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था, खाण्याची व्यवस्था मुद्दाम वेगळी न करता आधीच अस्तित्वात असलेल्या घरांमधून शक्य आहे.  ज्या गावांमधून जूने वाडे आहेत त्यांची जराशी डागडुजी करून घेतली तर पर्यटक विशेषत: परदेशी पर्यटक अशा जागी मुद्दाम रहायला जातात. पर्यटन स्थळाजवळ स्थानिक लोकांना हाताशी धरून अशा सोयी करता येणे सहज शक्य आहे. त्यांनाही रोजगार मिळेल, पर्यटकांचे पैसेही कमी खर्च होतील आणि यातून एका वेगळ्या व्यवसायाला चालना मिळेल.

उदा. म्हणून औरंगाबाद जिल्ह्यातील दोन किल्ल्यांचा आपण विचार करू. गौताळा अभयारण्याजवळ अंतुरचा किल्ला आहे. तसेच अजिंठा लेणी जवळ हळदा घाटात वेताळ वाडीचा किल्ला आहे. वाडीच्या किल्ल्या पर्यंत जाण्यासाठी उत्तम रस्ता आहे. अंतुर किल्ल्यासाठी मुख्य सडकेपासून 6 किमी. कच्या खराब रस्त्याने जावे लागते. या ठिकाणी राहण्याची खाण्याची कसलीही व्यवस्था नाही. स्थानिक गावकर्‍यांशी बोलून खाण्यापिण्याची व्यवस्था करता येते. (असा अनुभव आम्ही वाडिच्या किल्ल्या जवळ घेतला आहे. अगदी शेतात बसून जेवण केले आहे.) परदेशी पर्यटक असा अनुभव घेण्यासाठी मुद्दाम तयार असतात. या किल्ल्यांवर साहसी पर्यटकांना चांगली संधी आहे.

काही अतिशय चांगली मंदिरे दुर्गम ठिकाणी आहेत ज्यांची माहिती लोकांना नाही. काही मंदिरे अतिशय निसर्गरम्य ठिकाणी आहेत. त्यांचीही माहिती होत नाही. पाटणादेवी सारखे ठिकाण गौताळा अभयारण्यात आहे. घाटात आहे. तिथे चांगला धबधबा आहे. बीड जिल्ह्यात गेवराई तालूक्यात तलवाडा गावात छोट्याशा टेकडीवर त्वरिता देवीचे मंदिर आहे.  हे मंदिर शिवकालीन असून उत्तम दगडी बांधणीचे आहे. टेकडीवर असल्याने येथे निसर्गसौंदर्याचा आनंदही घेता येतो. तसेच अंबडच्या जवळ जामखेड म्हणून गाव आहे. येथील टेकडीवर असलेले जांबुवंताचे मंदिरही असेच उत्तम पर्यटन स्थळ आहे. अशा कितीतरी जागा महाराष्ट्रभर शोधता येतील. या ठिकाणी पर्यटनाच्या उत्तम संधी आहेत. गड किल्ले लेण्या जून्या वास्तू येथे पर्यटनास चालना देणे सहज शक्य आहे. जी ठिकाणं चांगल्या स्थितीत आहेत तेथे पर्यटन वाढू शकते.

शाश्‍वत पर्यटनातील पहिला मुद्दा येतो तो अशा फारशा परिचित नसलेल्या स्थळांबाबत. शिवाय काही निसर्गरम्य ठिकाणं शोधून तिथेही पर्यटनाला चालना देता येते.

  1. स्थानिक अन्न :

दुसरा मुद्दा यात पुढे येतो तो अन्नाचा. आपण पर्यटकांचा विचार करताना त्यांना जे पदार्थ खायला देतो ते त्यांच्या आवडीनिवडी प्रमाणे असावेत असा विचार केला जातो. पण स्थानिक जे पदार्थ आहेत, जे अन्नधान्य आहे त्याचा विचार होताना दिसत नाही. आपण जिथे जातो आहोत तेथील धान्य आणि तेथील पदार्थ यांचा अनुभव घेतला पाहिजे. त्यांच्या चवी समजून घेतल्या पाहिजेत. नसता कुठेही जावून आपण तंदूर रोटी आणि दाख मखनी पनीरच खाणार असू तर त्याचा काय उपयोग?  बारीपाडा हे गाव महाराष्ट्र गुजरातच्या सीमेवर धुळे जिल्ह्यात आहे. या गावात दरवर्षी रानभाज्यांची स्पर्धा भरते. या गावाने स्वत:चे जंगल राखले आहे. निसर्ग पर्यटन आणि या रानभाज्यांचा आस्वाद घेण्यासाठी आपण जावू शकतो. पर्यटनांत अशा ठिकाणांचाही विचार झाला पाहिजे.

विविध पदार्थ करण्याची पण एक प्रत्येक प्रदेशातील एक पद्धत असते.  तिचा अनुभव घेतला पाहिजे. अशामुळे स्थानिक आचार्‍यांना एक संधी उपलब्ध होते. त्यासाठी बाहेरून माणसे आणायची गरज उरत नाही. अगदी जेवणासाठी त्या त्या भागात मिळणारी केळीची पानं, पळसाच्या पत्रावळी यांचा उपयोग झाला पाहिजे. तोही एक वेगळा अनुभव असतो. हैदराबादी पदार्थात ‘पत्थर का गोश’ म्हणून जो मांसाहारी पदार्थ खाल्ल्या जातो तो खाताना कसे बसावे कसे खावे याचेही नियम आहेत. अशा रितीने पर्यटनाच्या एका वेगळ्या पैलूचा विचार यात केला जातो.

  1. लोककला, जत्रा, उत्सव :

खाण्यापिण्या सोबतच अजून एक मुद्दा शाश्‍वत पर्यटनात येतो. तो म्हणजे त्या त्या प्रदेशातील संगीत, रितीरिवाज, सण समारंभ, जत्रा, उत्सव, उरुस. आपल्याकडे देवस्थानच्या जत्रा असतात. त्यांचा एक विशिष्ट काळ ठरलेला असतो. त्याच काळात तिथे जाण्यात एक वेगळा आनंद असतो. उदा. अंबडच्या मत्स्योदरी मातेच्या मंदिरात कार्तिक पौर्णिमेला दिपोत्सव साजरा केला जातो. मंदिराच्या दगडी पायर्‍यांवर हजारो दिवे लावले जातात. (मागील वर्षी सात हजार दिवे लावले होते.) हा दिपोत्सव पाहणे एक नयनरम्य सोहळा असतो. काही ठिकाणी रावण दहन केले जाते दसर्‍याच्या दिवशी. त्याही प्रसंगी पूर्व कल्पना दिली तर पर्यटक येवू शकतात. गणपतीच्या काळात नवरात्रीच्या काळात पर्यटनात वाढ झालेली दिसून येते. हा एक वेगळा पैलू आहे. शिवरात्र आणि श्रावणातील सोमवारी बहुतांश महादेव मंदिरात मोठ्या प्रमाणात भक्त जमा होतात. शिवरात्रीला रात्रभर भजन चालते. हे दिवस ओळखून त्या प्रमाणे पर्यटकांच्या सहली आयोजीत करता येतात.

नवरात्रीत बहुतांश देवी मंदिरांत गर्दी होते. निसर्गरम्य असलेली ठिकाणं निवडुन अशा ज़त्रांच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते तिथे पर्यटकांना आवर्जून बोलावता येवू शकते.

काही दर्ग्यांमधून उरूस भरतात. उरूस म्हणजे त्या सुफी संताची पुण्यतिथी. अशा वेळी कव्वाल्यांचा कार्यक्रम आयोजीत केलेला असतो. त्यासाठी पर्यटकांना पूर्वकल्पना असेल तर तेही येवू शकतात. (खुलताबाद येथील दर्ग्यात अशा कव्वालीसाठी आम्ही परदेशी पर्यटकांना घेवून गेलो आहोत. तो अनुभव अतिशय आगळा वेगळा आहे.)

कोजागिरी पौर्णिमेला देवीच्या मंदिरात उत्सव साजरा केला जातो. रात्रीची जागरणं अशावेळी केली जातात. त्या जागी काही सांस्कृतिक सांगितीक कार्यक्रम करणे सहज शक्य आहे. अशा निमित्तानेही पर्यटकांना आणता येवू शकते.

  1. पर्यटन वाढीसाठी संगीत महोत्सव/ सांस्कृतिक कला महोत्सव :

ऐतिहासिक वास्तुंच्या परिसरांत संगीत महोत्सव आयोजीत करण्यासाठी शासकिय पातळीवर काही वर्षांपूर्वी प्रयत्न केले जायचे. लालफितीच्या कारभारामुळे ते जवळपास सगळे बंद पडले. या शिवाय काही मंदिरे आणि मठ, दर्गे यांच्या संस्था यासाठी सहकार्य करण्यास तयार असतील तर त्यांच्या परिसरांत संगीत महोत्सव छोट्या प्रमाणात घेणे सहज शक्य आहेे. यामुळे पर्यटनाचा एक वेगळा पैलू समोर येवू शकतो. शाश्‍वत पर्यटनात याचाही विचार केला जातो.

लोककला नृत्य लोकसंगीत यांचा अतिशय चांगला वापर पर्यटनाच्या वाढीसाठी करता येवू शकतो. शिवाय या कलांना प्रोत्साहन देण्याचेही काम यातून होवू शकते. तेलंगणात दलित किन्नरी वादक कलाकारांना शासन स्वत: प्रोत्साहन देवून विविध ठिकाणी पाठवते. त्यांचा कलाविष्कार लोकांच्या समोर यावा म्हणून धडपड करते. अशा काही योजनांतून पर्यटनाला चालना मिळू शकते.

शाश्‍वत पर्यटनात हस्तकलांचाही विचार केला जातो. हातमागावर कापड विणणारे, हॅण्डमेड कागदवाले, धातूवर कोरिवकाम करणारे (बिदरी कला), मातीची/लाकडाची खेळणी तयार करणारे असे कितीतरी कलाकार आपल्या जवळपास असतात. यात परदेशी पर्यटकांना विशेष रस असतो. समोर बसून चित्र काढून देणारे. किंवा एखाद्या ऐतिहासिक स्थळी तिथेच बसून त्या जागेचे चित्र काढणारे यांचाही विचार शाश्‍वत पर्यटनांत केला जातो. त्या त्या जागची चित्रे काढून त्याचे प्रदर्शन भरवता येवू शकते. त्या त्या भागातील वस्त्र विणण्याची परंपरा हा पण एक महत्त्वाचा विषय आहे. अशा वस्त्रांचे प्रदर्शन भरवता येवू शकते. उदा. पैठणी, हिमरू, महेश्वरी, पाटण पटोला, कांचीपुरम, बालुचेरी, बनारसी इ.इ.

  1. घरगुती राहण्याची व्यवस्था (होम स्टे) :

प्रसिद्ध अशा पर्यटन स्थळी जाताना वाटेत घरगुती राहण्याची खाण्याची व्यवस्था होणार असेल तर बर्‍याच जणांना ते हवे असते.  कोकणात तर मुद्दाम समुद्रकिनार्‍या जवळ घरांत जावून राहणे पर्यटक आजकाल पसंद करत आहेत. कर्नाटकांत हंम्पी हे गांव असे आहे की तिथे एक पन्नास शंभर घरांचे खेडेच संपूर्णत: पर्यटन व्यवसायावर चालते. तुंगभद्रा नदीच्या काठी छोट्या घरांतून लोक राहतात. तिथेच जेवायची चहापाण्याची व्यवस्था केली असते. काही परदेशी पर्यटक तर तिथे केवळ शांततेसाठी येवून राहतात.

काही दिवसांनी जंगलात, दूरवरच्या खेड्यात, एखाद्या तळ्याच्या काठी जावून आठ दिवस राहणे  हा प्रकारही लोकप्रिय होत चाललेला आपल्याला दिसेल. निसर्गरम्य वातावरण, शांतता, पक्ष्यांचे मधुर आवाज, चुलीवरचे जेवण, जवळपासच्या शेतांत डोंगरात फेरफटका, रात्री खुल्यावर बसून चांदण्याचा आनंद घेणे अशा गोष्टी लोक आवर्जून करताना दिसून येतील.

  1. उपसंहार :

शाश्‍वत पर्यटनांत सगळ्यांत महत्त्वाचा मुद्दा असतो तो आहे ती संसाधने आहे ते मनुष्यबळ याचा सुयोग्य उपयोग करून घेण्यावर भर दिला जातो. तेथील लोककलाकार, कारागिर यांचाही विचार यात केला जातो. तिथील जनजिवनाशी जूळवून घेण्यावर भर दिला जातो. अन्यथा इतर वेळी आपण पर्यटक म्हणून आपल्या आवडीनिवडी त्या प्रदेशावर तेथल्या माणसांवर लादत असतो. तेथील निसर्गाची हानी करत असतो.

कोरोना आपत्तीमधुन एक आर्थिक पेच समोर आला आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी काटकसरीने सर्व काही करण्यावर भर द्यावा लागणार आहे. यासाठी स्थानिकांना संधी, स्थानिक संसाधनांचा वापर यामुळे बचतही होवू शकते व रोजगाराच्या वेगळ्या संधीही निर्माण होवू शकतात.

याची सुरवात म्हणून प्रत्येकाने आपल्या जवळच्या अशा एखाद्या कधी न गेलेल्या थोडेफार माहिती असलेल्या ठिकाणी  गेलं पाहिजे. तेथील अनुभव इतरांना सांगितला पाहिजे. सध्या समाज माध्यमे (सोशल मिडिया) अतिशय प्रभावी पद्धतीनं काम करत आहे. त्यावरून हे अनुभव इतरांना समोर आले तर या पर्यटनाला चालना मिळू शकते. सहजपणे अर्थकारणाला गती येवू शकते.

   श्रीकांत उमरीकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here