महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

स्वतः शंभूछत्रपती नेतृत्व करत सामील असलेली टिटवाळा लढाई

By Discover Maharashtra Views: 1321 2 Min Read

स्वतः शंभूछत्रपती नेतृत्व करत सामील असलेली टिटवाळा लढाई !!

अकबर दक्षिणेत मराठ्यांच्या आश्रयाला गेल्याचे समजताच औरंगजेब मोठा धोका निर्माण झाला असल्याने अकबराचा नि:पात करण्यास आणि मराठा साम्राज्य जिंकण्यास दक्षिणेत उतरला. तेंव्हा त्याने हसनअली आणि शहजादा मुअज्जम (१६८२- १६८३ ) यास कोकणात शिरकाव करण्यास आदेश दिला पण या दोघांनाही मराठ्यांनी कोकणातून पिटाळुन लावले होते. आता या दोन्ही कोकण मोहिमा अयशस्वी ठरल्यावर औरंगजेबाने अजुन एकदा कोकण मोहीम काढण्याचे ठरवले आणि या मोहिमेचे नेतृत्व दिले ते रणमस्तखानाकडे. रणमस्तखानासोबत बहादुरखान, मुकर्रमखान, याकूतखान, रामसिंह राठोड़, पद्मसिंह असे मोगल सरदार होते.(टिटवाळा लढाई)

रणमस्तखान कल्याणवर चालून आला पण त्याच्यासोबत मुकाबला करण्यास स्वता छत्रपती संभाजीराजे त्याच्यावर चालून आले होते. यावेळी छत्रपती संभाजी महाराजांसोबत रुपाजी भोसले, केसोपंत, निळो पंत, मानाजी मोरे आणि दहा हजार सैन्य होते. अचानक हल्ले करून मराठ्यांनी रणमस्तखानाला पिसाळुन सोडले. खानाच्या रसदीच्या वाटाही मराठ्यांनी बंद केल्या. रणमस्तखानाची कोंडी होऊ लागल्याने बहादुरखान, पद्मसिंह, हरीसिंह यांनी मराठ्यांवर हल्ला चढ़वला. कल्याणच्या ईशान्यबाजूस टीटवाला गावाजवळ ही लढाई सुरू झाली.

पहिल्याच टप्यात मराठ्यांनी मोगलांना लोळवले. पद्मसिंह राठोड़ यात ठार झाला हे पाहुन रामसिंह राठोड़ मराठ्यांवर चालून आला पण तो ही आजारी असल्याने जास्त प्रतिकार करू शकला नाही तो ही ठार झाला. मोगल सैन्याची पळता भुई झाली आणि यात जवळ जवळ त्यांचे २५ सरदार जखमी झाले तर अनेक सैनिक मारले गेले. हरीसिंह राठोड़ कैद झाला त्याला घेऊन मराठे निघुन गेले. कल्याण जवळ ही लढाई झालेली इतिहासात नोंद असलेली तारीख आहे २७ फेब्रुवारी १६८३

पुढे मराठ्यांनी रणमस्तखानाला कोकण भागात घेरले हे पाहुन औरंगजेबाने रूहुल्लाखान यास रणमस्तखानास मदतीला पाठवले पण या दोन्ही खानांना मराठ्यांनी घाटात कोडुंन ठेवले आणि त्यांचाही पराभव केला ( मार्च १६८३ )

संदर्भ – शिवपुत्र संभाजी – डॉ कमल गोखले.
छत्रपती संभाजी महाराज – वा सी बेंद्रे.
राजा शंभूछत्रपती – विजय देशमुख.

Leave a comment