महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

आग्र्याहून सुटका

By Discover Maharashtra Views: 27309 10 Min Read

आग्र्याहून सुटका –

राजमाता जिजाऊ साहेब चरित्रमाला भाग २५.

शिवाजी महाराजांच्या जीवनात अनेक संकटे आली ,काही संकटे अशी होती की महाराज यातून सुखरूप बाहेर पडतील की नाही याबद्दल खूप मोठी शंका त्यावेळी महाराष्ट्रात निर्माण  झाली होती .अफजलखान प्रसंग, जयसिंगाची स्वारी अशी अनेक संकटे महाराजांवर कोसळली, परंतु या सर्व संकटामध्ये सर्वात मोठे संकट म्हणजे “आग्र्याची कैद “आग्यासारखे अतिदूरचे ठिकाण. औरंगजेबासारखा दगेखोर बादशहा ,कडेकोट पहारा आणि सर्वत्र निराशेचा अंधार ,आशेचा एकही किरण महाराजांसमोर नाही. अशी मोठी बिकट अवस्था महाराजांची आग्रा भेटीत झाली होती.या  औरंगजेब बादशहाचा कपटी व दगेखोर स्वभाव त्यांना माहीत होता. कारण शिवाजीराजे अत्यंत मुत्सद्दी, माणसांची पारख असणारे ,दूरदृष्टी व राजकीय जाण असणारे पुरुष होते. परंतु पुरंदरच्या तहाने महाराज कोड्यात अडकले होते .(आग्र्याहून सुटका)

महाराजांना आग्र्याचे आमंत्रण स्विकारण्या पलीकडे गत्यंतरच राहीले नाही. महाराज आपण होऊन गेलेले नाही तर त्यांना जाणे भाग पडले होते. आग्र्यास न जावे तर जयसिंहाची आणि बादशहाची गैरमर्जी ,नाही जावे तर बादशहा केव्हा दगा देईल सांगता येत नाही. अशा विचित्र परिस्थितीत महाराज अडकले आणि ही कोंडी फोडण्यासाठी त्यांनी आग्र्याला जाण्याचा धाडशी  निर्णय घेतला.मातोश्रींचा  आशीर्वाद घेऊन प्रवासाला सुरुवात केली. इकडे राजगडावर जिजाऊंच्या ह्रदयात काळजीने घर केले होते. म्हातारपणी आपला लाडका लेक, महाराष्ट्राचा स्वातंत्र्यसूर्य कपटी मोगलांच्या भेटीस जाणार, जिजाऊंचच काय पण सारी मराठी मने व्याकुळ झाली होती. महाराज धीरगंभीर निश्चल होते. ते

माॅसाहेबांना म्हणाले,” माँसाहेब काही काळजी करू नका. तुमची पुण्याई, थोरल्या महाराजांचा प्रताप,आई भवानीचा आशीर्वाद माझे या संकटातूनही  रक्षण होईल.”पण आईचे मन कसे थार्यावर येणार?

महाराष्ट्रधर्म संकटात सापडला होता. जिजामातेची अनेक वर्षांची तपश्चर्या संपुष्टात येणार होती. महाराज निघाले. सोबत राजपुत्र संभाजी राजे ,पाच वरिष्ठ अधिकारी , शंभर ईतर नोकर – चाकर व अडीचशे घोडेस्वार बरोबर घेतले होते .महाराजांचा सरंजाम मोठा आकर्षक व वैभवशाली होता .स्वतः महाराज व त्यांचे वरिष्ठ अधिकारी अत्यंत सुशोभित अशा पालख्यांतून त्यातून प्रवास करीत होते .त्यांच्यापुढे सोन्या-चांदीचे साज घातलेल्या घोड्यांवर स्वार झालेले घोडेस्वार चालत सर्वात पुढे होते. महाराजांचे सुवर्णांकीत भगवे निशाण एका मोठ्या हत्तीवर होते. महाराजांच्या स्वारीमागून दोन हत्तीनी डौलाने जात होत्या. खुद्द महाराजांच्या पालखीचे छत चांदीचे व खांब सोन्याचे होते.

महाराज निघाले तसे आई साहेबांचे चित्त उडाले. आपला पुत्र दूर-दूर निघाला आहे. तो कधी येणार माघारी ? आपला नातू ,आई  वेगळे पोर  म्हणजे शंभूराजे ही चालले.  आहेसाहेबांबरोबर साऱ्या रायगडाचा जीव वरखाली खाली होऊ लागला.पायी मस्तक ठेवून शिवबांनी आहेसाहेबांचा आशीर्वाद घेतला. मिर्झाराजेने वचन दिले होते. जमानत दिली होती. परंतु अखेर गाठ औरंगजेबाशी होती. म्हणूनच आईसाहेबांना काळजी वाटत होती. महाराजांनी सर्वांचा निरोप घेतला आमची काळजी करू नका. स्वराज्याची काळजी करा. आईसाहेबांना सांभाळा. म्हणून सर्वांना सांगितले. कर्तव्यासाठी आपली आई, आपले कुटुंबीय मंडळी, घर ,सखे ,सांगाती सोडून महाराज आग्र्याला निघाले.

सर्वात पुढचा हत्ती राजगडाच्या दरवाजातून बाहेर पडला .घोडेस्वार, सांडणीस्वारांनी लगाम खेचले. महाराजांनी गड सोडला. जिजाऊंची करून दृष्टी राजांना लवकर परत येण्यासाठी विनवत होती. पाच मार्चला महाराज रायगडावरून निघालेले ११ मे  १६६६ रोजी आग्र्याजवळ पोहोचले. औरंगजेब बादशहाने प्रवासात व पुढे राजधानीत महाराजांची बडदास्त उत्तम ठेवली होती .पण प्रत्यक्ष दरबार भेटीच्या प्रसंगी राजांना भलत्याच ठिकाणी स्थान देऊन त्यांचा अपमान करण्यात आला. ज्यांनी राजांना पाठ दाखवली त्यांना सुद्धा वरचे स्थान देण्यात आले. राजांना ही गोष्ट सहन झाली नाही. औरंगजेबाच्या अन्यायाने शिवाजी राजे संतापले. मराठी मन घायाळ झाले.औरंगजेबाच्या कानी हा प्रकार गेला .औरंगजेबाने आपले सरदार पाठवले .पण राजांचे मन शांत झाले नाही .औरंगजेबाने पूर्वनियोजन केल्याप्रमाणे दरबारी कोणतेही रितीरिवाज न पाळता अत्यंत सूडबुद्धीने शिवाजीराजांचा सर्व दरबारी सरदारां समोर अपमान तर केलाच परंतु शिवाजीराजांना तेथेच ताबडतोब फसवून कैद केले. खुद्द राजा जयसिंगानासुद्धा धक्का देणारी घटना घडली होती.

शिवाजीराजांच्यावर अत्यंत कडक पहारा ठेवण्यात आला होता. महाराजांना फौलादखान नावाच्या अत्यंत नीच व क्रूर माणसाच्या हवाली करण्यात आले होते .राजे देखील खूप घाबरले होते .काय करावे असे झाले होते. राजकारण पूर्ण फसले होते .सर्व खेळ जीवाशी बेतला होता. मरण जवळ आल्याचा भास राजांना होऊ लागला होता. कित्येक दिवस लोटले तरी उपाय सापडत नव्हता. शिवाजी राजे अतिशय चिंतातुर झाले होते. राजगडावर मासाहेब चिंतेच्या गर्तेत सापडल्या होत्या. जिजाऊंचा जीव तींळतीळ तुटत होता.औरंगजेबाच्या कैदेतून बाहेर कसे पडायचे ,याचाच विचार शिवाजीराजे करत होते.

दि.१८ ऑगस्ट १६६६ चा  दिवस उजाडला .शिवाजीराजेंनी कैदेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यासारखेच दिसणारे त्यांचे सावत्र भाऊ ‘हिरोजी फर्जंद‘ यांना त्यांनी स्वतःचा पेहराव घातला. त्यांना बिछान्यावर झोपवले.मदारी मेहतर  हिरोजी सोबत थांबले. शिवाजी महाराज वेषांतर करून फुलात खाणाच्या पहार्यातून दिनांक १८ ऑगस्ट १६६६ रोजी बाहेर पडले.  शिवाजी महाराज मिठाईच्या पेटा-यात बसून नव्हे तर वेशांतर करून निसटले. हिरोजी फर्जंद हे शिवरायांचे सावत्र भाऊ होते. ते शिवरायांसारखे दिसायचे .त्यांचा वेष त्यांनी परिधान केला.हिरोजींच्या वेषातच  महाराज पायी चालत पेटार्यासोबत बाहेर पडले. संभाजीराजांना कैद नव्हती त्यामुळे ते किल्ल्याबाहेर कुंभार वाड्यातच थांबले होते. संभाजीराजांना घेऊन शिवाजीराजे पुढे यमुना नदी पार करुन मथुरे कडे निघाले. अशा रीतीने वेषांतर करून त्यांनी स्वतःची सुटका करून घेतली. दिवसाढवळ्या शिवाजीराजेंनी फुलाद  खानाच्या फौजेच्या डोळ्यात धूळफेक केली. पुढे सारे वेषांतर करून बैराग्याच्या वेषात गेले.

फुलात खानाने भीत भीतच ही बातमी औरंगझेबाच्या कानावर घातली. तेव्हा औरंगजेब कमालीचा घाबरला. फुलातखानाचा  पहारा इतका कडेकोट व पक्का होता की त्यातून सुटणे मुंगीलासुद्धा शक्य नव्हते. तेव्हा फौलादखानाच्या हजारो पहारेकर्कयांच्या  कडेकोट बंदोबस्तातून  शिवाजीराजे निसटलेच कसे? औरंगजेबाने घाबरून प्रथम आपली सुरक्षाव्यवस्था भक्कम करुन घेतली.

शिवाजीराजे आपल्या विश्वासू दहा सहकार्य बरोबर वैराग्याच्या वेषात मथुरा ,आयोध्या, काशी, अंबिकापुर, अमरकंटक ,रतनपुर मार्गे रायपूर येथे आले. २० नोव्हेंबर १६६६ रोजी ते रायगडावर पोहोचले. शिवरायांनी राजगडावर येऊन जिजाऊंचे दर्शन घेतले. शिवाजीराजे वैराग्याच्या वेशात आऊसाहेबांना पुढे येउन उभे राहिले. जिजाऊंच्या आनंदाला पारावर राहिला नाही .सर्वांना आश्चर्य वाटले. शिवाजी राजांनी खरोखरच दुसरा जन्म घेतला  होता. जगदंब जगदंब अशी गंभीर वाणी उच्चारितच बैरागी ओसरीवर वर आले होते. त्यांच्यापैकी एकाने लवून मुजरा केला. दुसऱा बैरागी सस्मित मुद्रेने पुढे झाला आणि त्यांनी आवेगाने मातोश्रींचे पाय धरले. मातोश्री चपापल्या .बैराग्याच्या डोक्यावरील  जखमेच्या खुणेकडे लक्ष जाताच भावनावेगाने त्या तात्काळ ओरडल्या ‘ ‘ शिवबा ,माझ्या लेकरा उठा ‘मग मायलेकरे कडकडून भेटली. आनंदाने बेहोष झाली. जणू जिवाशिवाची भेट झाली. जिजाऊंचे मनोधैर्य अतुलनीय होते व तितकेच संयमीही होते. शिवाजीराजांनी प्रत्येक संकटाचे जे  आव्हान स्विकारले  होते ते केवळ आईसाहेबांच्या आशीर्वादानेच. आत्तापर्यंत अशी  कितीतरी संकटे राजांनी चुकूवून त्यातून ते सहीसलामत सुटले होते.ते आऊसाहेबांच्या आशीर्वादानेच. खग्रास राजे जेव्हा जाण्यास निघाले तेव्हा जिजाऊनी कोणतीही आडकाठी केली नव्हती.आईचा विश्वासु हात नेहमीच शिवाजीराजांच्या पाठीवर होता .आईच्या मनातील उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हवे ते प्रयत्न करण्यास राजे नेहमीच तयार असत.स्वराज्याचे कठोर व्रत दोघा मातापुत्रांनी घेतले होते. त्यामुळे कोणतेही संकट आल्यास त्यास तोंड देण्याची सर्व तर्हेची सिद्धता त्यांनी केली होती .

एवढ्या आनंदात एक रूखरूख नि चुट्पुट लागली होती ,ती एका गोष्टीची .लाडक्या नातवाचा ठावठिकाणा नव्हता .’ शिवबा शंभुराया कुठे रे आहे ?असे शब्द ऐकताच राजेही गहिवरले व आवंढा गिळून मोठ्या धीराने म्हणाले ,”माँसाहेब मी आलो तसा  तेही एक दिवस येतील.” जिजाऊही खूप अस्वस्थ होत्या. त्यांनी काळजीच्या स्वरात विचारले,शिवबा एकटेच आलात की काय तुम्ही? अहो माझा शंभूबाळ कुठे आहे?

पाठशाळेतला आपला मित्र,सुरपारंब्याच्या खेळातला सखा आणि ज्याला नवरा म्हणून सार्या   मैत्रिणी चिडवायच्या ते लडिवाळ शंभूराजे कधीच भेटणार नाहीत,या कल्पनेने येसूबाई राणीसाहेब सुद्धा खूप उदास झाल्या होत्या.

राजे म्हणाले,” माँसाहेब शंभूराजांच्या जिवास काही अपाय होऊ नये म्हणून आम्हीच त्यांच्याविषयी अशूभ वार्ता पसरली होती .पण आता शंभुराजेंची काळजी करू नका. ते लवकरच येतील. संभाजीराजे हे वाटेत मृत्यू पावल्या बद्दल शिवाजीराजेंनीच सर्वांना सांगितले होते. त्याचे राजकारणाचा मतितार्थ राजेंनी माँसाहेबांना बयाजवार  समजावून सांगितला. तेव्हा कुठे जिजाऊ शांत झाल्या.

संभाजीराजांच्या निधनाच्या बातमीने गडावर नातेवाईक व सरदारांनी गर्दी केली .येसुबाईंच्या वाटेला वैधव्य आले. निधनानंतरचे सर्व विधी आणि क्रिया पार पडल्या. कालांतराने औरंगजेबानेही संभाजीचा मृत्यू झाला असे समजून शोधकार्य थांबऊन टाकले .या संधीचा फायदा घेऊन शिवाजीराजांनी जासुदाला  पाठवून बाळराजांना राजगडावर आणण्याविषयीचे आदेश दिले. संभाजीराजांच्या सुखरूप आगमनाने रायगडावर आनंदोत्सवु सुरू झाला.

संभाजीराजांच्या बाबतीमधील राखलेल्या गुप्ततेमुळे शिवाजीराजे यांची दूरदृष्टी, हुशारी आणि शत्रूला फसविण्यातील  चाणाक्ष बुद्धी या सर्व गुणांचा जनतेला परिचय झाला. शिवाजीराजांच्या आग्रा येथील सुटकेने सर्व देश अचंबित झाला. औरंगजेब घाबरला .शिवाजीराजांनी आपल्या छाव्याला देखील सुखरूप स्वराज्यात आणले. शिवाजीराजे आग्र्यातून सुखरूप परत आल्यामुळे महाराष्ट्रात चैतन्य निर्माण झाले .औरंगजेब व खुद्द  मिर्झाराजेही चकित व भयभयीत झाले.  शिवाजीराजांच्या नावाची सगळीकडे दहशत बसली. या सर्व घडामोडीमुळे  पुरंदरच्या तहाचा डाग पुसला गेला .जिजामातेच्या नवसाला तुळजाभवानी पावली. मुलगा – नातू सुखरूप स्वराज्यात परत आले.

लेखन – डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर पुणे

आग्र्याहून सुटका,आग्र्याहून सुटका,आग्र्याहून सुटका,आग्र्याहून सुटका.

1 Comment