झुंज भाग १३

झुंज भाग १ ८

झुंज भाग १३ –

(झुंज – कथा रामशेजची)

दोन दिवसांनी किल्लेदार रामशेजवर पोहोचला. आल्या बरोबर त्याने आपल्या पत्नीला छत्रपतींच्या भेटीचा वृत्तांत कथन केला. तसेच लगेचच नवीन किल्लेदाराच्या ताब्यात गड देऊन सरनौबत हंबीरराव मोहित्यांच्या मदतीला जाण्याचे छत्रपतींचे फर्मानही सांगितले. आपल्या पतीला मिळालेला हा बहुमान पाहून त्याची पत्नीचे उर अभिमानाने भरून आले. ही बातमी काही क्षणातच संपूर्ण गडावर पसरली. ज्याच्या त्याच्या तोंडी संभाजी महाराजांनी केलेल्या किल्लेदाराच्या बहुमानाचाच विषय होता. खरे तर दर चार सहा वर्षांनी किल्लेदार बदलत होता. कित्येक वेळेस तर एक किल्लेदार एका ठिकाणी फक्त काही महिनेच अधिकारी म्हणून काम बघत असे. त्यामुळे गडावरील लोक आणि किल्लेदार यांच्यात सहसा तितका जिव्हाळा दिसून येत नसे. पण इथे मात्र चित्र पूर्णतः बदलले होते. किल्लेदारावर प्रत्येक जण जीव ओवाळून टाकत होता. त्याने तसा सगळ्यांनाच लळा लावला होता. एकीकडे किल्लेदारावर छत्रपतींनी टाकलेल्या विश्वासाचा अभिमान आणि दुसरीकडे यामुळेच होणारी त्यांची ताटातूट. आणि हेच कारण होते की प्रत्येक जण एकच विषय बोलत होता.

किल्लेदार आल्याच्या तिसऱ्याच दिवशी नवीन किल्लेदार गडावर हजर झाला. हा नवीन किल्लेदार जुन्या किल्लेदारापेक्षा वयाने काहीसा लहान होता. नवीन दमाचा. सहा फुट उंच, सावळा रंग, रुंद बांधा आणि सरदार म्हणून शोभू शकेल असा तरणाबांड गडी.

जुन्या किल्लेदाराने त्याचे खुल्या दिलाने स्वागत केले. परत एकदा सभा बोलवली गेली.

“गड्यांनो… आपलं राजं म्हंजी देवाचाच अवतार… त्यांच्याच आज्ञेनं आपन ह्यो गड बादशाला मिळू दिला नाई. शेवटी त्योबी त्रासला आन येढा सुटला. पन त्याचा काय भरोसा नाय. त्यो अवरंगाबादला तळ ठोकून हाये. त्याचा कोनचा बी सरदार कदीबी परत हमला करू शकतो. म्हनून आपन सावध ऱ्हायला पायजे. धाकल्या म्हाराजांनी मला इजापूरच्या मोहिमेवर जायला सांगितलं हाये. माह्या जागी ह्ये नवीन किल्लेदार आता गडाचं राखन करनार हायेत. तवा जी मदत तुमी मला केली तीच मदत यांना बी करायची हाये. आपन समदे स्वराज्याची रयत. याचपायी आपन जीव द्यायला बी तयार असलं पायजेल. पुना आपली भेट हुईल, ना हुईल… पन जवर बादशा हितं हाय तवर आपली झुंज संपलेली नाई… ह्ये समद्यांनी ध्यानात ठिवा आन आमचा रामराम घ्या…” इतके बोलून किल्लेदार उठून उभा राहिला. अनेकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या.

“हर हर महादेव…” असंख्य घोषणांनी वातावरण दुमदुमले.

दुसऱ्याच दिवशी किल्लेदाराने गडावरील आपला गाशा गुंधाळला. गडाच्या चाव्या नवीन किल्लेदाराच्या स्वाधीन केल्या. बरोबर काही निवडक स्वार आणि आपला कुटुंबकबिला घेऊन किल्लेदार रामशेजचा गड उतरू लागला.

रामशेजच्या किल्लेदाराने गड सोडून जवळपास ४/५ महिने झाले होते.

औरंगजेब बादशहाचा दरबार भरला होता. प्रत्येक ठिकाणचे हेर येऊन बादशहाला बातम्या देत होते. आज बादशहा जरा खुश होता आणि त्याचे कारण म्हणजे कोकणातील अनेक मोहिमेत त्याच्या फौजांनी चांगली कामगिरी केली होती. आणि एवढ्यात एक हेर त्याच्या पुढ्यात आला. बादशाहाला त्याने लवून कुर्निसात केला.

“क्या खबर है?” बादशहाने विचारले.

“हुजूर… त्रंबकगडके किलेदारको संबाने वापस बुलाया है…” त्याने खबर दिली आणि त्रंबकचे नांव ऐकताच बादशहाला रामशेजची आठवण झाली. मध्यंतरीच्या काळात त्याला या गडाचा पूर्णतः विसर पडला होता. तसे त्याला तिथे नवीन किल्लेदार आल्याचे समजले होते पण कुतुबशाहीचा पूर्ण बिमोड करण्यासाठी त्याने या बातमीकडे जरासे दुर्लक्ष केले होते. त्याचे डोळे आनंदाने चमकले. ज्याने रामशेज झुंजवला तोही बदलला होता आणि त्याला मदत करणारा त्र्यंबकचा किल्लेदार देखील बदलला म्हटल्यावर त्याच्या मनात परत एकदा रामशेजची जखम ताजी झाली.

“इखलास खान…” त्याने इखलास खानाला आवाज दिला.

“जी जहांपना…”

“तुम दस हजार फौज लेकर रामशेज जाव… जो भी हो… जैसे भी हो… रामशेजपे अपना चांदसितारा फडकाना…”

“ऐसा ही होगा जहांपना…” तलवारीच्या मुठीवर हात ठेवत खान उद्गारला.

“ये बात तो शहाबुद्दीन खान, फतेहखान और कासम खान भी बोला था… पर हुवा क्या? सबको खाली हाथ लौटना पडा… इसलिये अब मुझे सिर्फ फतेह चाहिये…” बादशहा काहीसा उखडला. कारण हेच वाक्य तो चौथ्यांदा या छोट्याशा किल्ल्याबद्दल ऐकत होता. शहाजहानने आपली कारकीर्द हाच किल्ला जिंकून सुरु केली होती आणि तोच किल्ला औरंगजेबाला घेता येत नव्हता.

दहा हजारांची फौज घेऊन इखलासखानाने रामशेजच्या तळाशी आपले ठाण मांडले. खरे तर रामशेज साठी ही गोष्ट नवीन राहिलेली नव्हती. त्यामुळे आलेल्या नवीन किल्लेदाराने तेच धोरण स्वीकारले जे पहिल्या किल्लेदाराने स्वीकारले होते. अनेक दिवस झाले पण इखलासखानाला यश मिळत नव्हते. अजून काही दिवसांनी आपली देखील बादशहाकडून खरडपट्टी काढली जाणार या एकाच गोष्टीची त्याला चिंता वाटत होती. तेवढ्यात त्याच्या मनात विचार आला. किल्लेदार तर बदलला आहे. मग पुन्हा पहिल्या पासून सुरुवात केली तर? काय हरकत आहे? कोणताही विलंब न करता त्याने त्या योजनेचे पहिले पाऊल टाकले.

————————————–

औरंगजेब बादशहा आपल्या आपल्या शामियान्यात बसला होता. शेजारीच तीन मौलवी कुराण आणि हदीसच्या प्रती घेऊन त्यात तोंड खुपसून बसले होते. बहुतेक कोणत्या तरी मोठ्या विषयावर बादशहाने त्यांचे मत मागितले होते आणि त्यावर धर्मशास्त्र काय सांगते याच गोष्टीची ते पडताळणी करत होते. तेवढ्यात हुजऱ्या आंत आला. त्याने बादशहाला कुर्निसात केला आणि नाशिकहून जासूद आल्याची वर्दी दिली. नाशिकचे नांव ऐकताच बादशहाने लगबगीने त्याला आत पाठवण्यास सांगितले.

“बोलो… क्या संदेसा लाए हो?” त्याने विचारले. जासुदाने कुर्निसात करून आपल्या जवळील इखलासखानाचा संदेश बादशहाच्या सुपूर्द केला. बादशहाने तो स्वतःच वाचायला सुरुवात केली. बादशहा संदेश वाचत असताना त्याच्या चेहऱ्यावर मात्र कोणतेच भाव दिसून येत नव्हते. संदेश वाचून झाल्यावर बराच वेळ बादशहा विचार करत होता.

“कौन है बाहर?” बादशहाने एकाएकी आवाज दिला आणि हुजऱ्या आत आला.

“जल्द से जल्द मुल्हेर के सरदार को यहां बुलानेका इंतजाम करो…” बादशाहने हुकुम सोडला.

पाचव्या दिवशी मुल्हेर किल्ल्याचा किल्लेदार सरदार नेकनामखान बादशहापुढे हजर झाला.

“नेकनामखान… तुम बडी चतुराईसे साल्हेरके किलेदारको पातशाहीकी खिदमतमे लाए थे… वहां जंग होती तो हमारा भी बहोत नुकसान होता. तुम्हारी सुझबुझसे हम बहोत खुश है… अब यही काम तुम्हे रामशेजके लिए करना है… अगर तुम ये काम करते हो तो तुमको पांचहजारी मनसबसे नवजा जायेगा और तुम्हे नगद १५००० दिये जाएंगे…” बादशहाने त्याला आमिष दिले.

“आपकी मेहेर है जहांपना… आपका फर्मान हमारे लिए खुदा का फर्मान है… थोडेही दिनोमे रामशेज आपका किला केहेलायेगा…” बादशहाला कुर्निसात करत नेकनामखान माघारी वळला.

मुल्हेर किल्ल्यावरील एका प्रशस्त दालनात तीन जण मसलत करीत बसले होते. एक होता मुल्हेर किल्लेदार नेकनामखान, दुसरा होता इखलासखान आणि तिसरा व्यक्ती होता पेठचा जमीनदार अब्दुल करीम. कसेही करून रामशेजवर चांदसितारा फडकवायचा ह्याच एका विषयावर त्यांचे खलबत चालू होते. बराच वेळ त्यांची मसलत चालू होती. शेवटी त्यांच्यात एकमत झाले आणि काहीशा प्रसन्न चेहऱ्याने अब्दुल करीम तिथून बाहेर पडला.

मुल्हेरवरून परतल्यावर इखलास खानाने आपला वेढा बराचसा ढिल्ला सोडला. वेढ्याच्या नावावर फक्त घटका दोन घटकांनी गडाच्या फेऱ्या चालू झाल्या.

आज रामशेज गडाच्या मुख्य दरवाजावर एक दूत उभा होता. त्याने दरवाजा ठोठावला. त्याची पूर्ण तपासणी करून त्याला आता घेण्यात आले. नवीन किल्लेदार आपल्या माणसांबरोबर सल्लामसलत करत बसला होता. इतक्यात हुजऱ्या आत आला.

“काये?” किल्लेदाराने विचारले.

“किल्लेदार… जमीनदार अब्दुल करीमचा मानुस आला हाये…” हुजऱ्याने सांगितले. अब्दुल करीम हा या परिसरातील एक नामवंत जमीनदार आहे हे किल्लेदार चांगले जाणून होता. पण त्याचे आपल्याकडे काय काम असावे? किल्लेदार विचारात पडला.

“आत पाठव…” किल्लेदाराने फर्मान सोडले. काही वेळातच जासूद आत आला. त्याने किल्लेदाराला मुजरा करून आपल्या जवळील खलिता किल्लेदाराच्या स्वाधीन केला. किल्लेदाराने तो स्वतःच्या ताब्यात घेऊन वाचायला सुरुवात केली. खलित्यात जमीनदाराने किल्लेदाराशी भेट घेण्याचा मानस बोलून दाखवला होता. काहीसा विचार करून आणि योग्य ती काळजी घेऊन किल्लेदाराने त्याची भेट घेण्याचे ठरवले. कोणत्याही शस्त्राविना फक्त एका व्यक्तीसह जमीनदाराने भेटीस किल्ल्यावर यावे असा त्याने निरोप पाठवला.

दिवस ठरला. वेळ ठरली आणि ठरल्या वेळेला जमीनदार अब्दुल करीम आपल्या एका माणसाला बरोबर घेऊन किल्लेदाराच्या भेटीला आला.

“बोला जमीनदार… आज इकडं कुठं?” किल्लेदाराने विचारले.

“हुजूर… हम तो सुकून पसंद आदमी है… सियासतसे हमारा क्या लेना देना?” जमीनदाराच्या बोलण्यावरूनच त्याच्या स्वभावाचा अंदाज येऊ लागला.

“नाई म्हंजी… तुमी आसंच येनार नाई हे ठावं हाये आम्हाला…” यावेळेस किल्लेदाराचा स्वर अगदी रुक्ष होता.

“गुस्ताखी माफ हुजूर… पर हम आपके लिए मुल्हेरका किलेदार नेकनामखान का संदेश लाए है…” जमीनदार एकेक शब्द अगदी तोलून मापून बोलत होता.

“मुल्हेरचा किल्ला तर मुगल बादशहाने घेतलाय ना?” किल्लेदार सावध झाला.

“जी हुजूर…”

“मंग त्याचं माज्याकडं काय काम?”

“हुजूर… आप तो जानते है… साल्हेर मुल्हेरपर मुगलोन्का अधिकार हो गया है, त्र्यंबक और अहिवंत को भी उनकी फौजोने घेरा है. यहां भी इखलास खान डेरा जमाये बैठा है. इस किलेपर ना तोपे है ना लोग. पहेले रुपाजी और मानाजी के साथ त्रंबकका किलेदार भी मदत करता था. अब वो भी नही है. रुपाजी सातारामे है, मानाजीको आपके संभाजी महाराजने कैद कर लिया… अब अगर मुगल फौजोने घेरा कडक किया तो यहां के लोग भूखे मरेंगे… और ये बात आप भी जानते हों…” प्रत्येक वाक्यावर जोर देत अब्दुल करीम बोलत होता. त्याची प्रत्येक गोष्ट खरी होती.

“मंग? काय म्हनतोय नेकनाम खान?” किल्लेदाराचा आवाज खाली आला.

“हुजूरने आपके लिए संदेसा भेजा है, अगर आप किला हमारे हवाले करते हो तो आपको पचास हजार नगद दिये जाएंगे. इसीके साथ आपको बादशहाकी तरफ से तीन हजार की मंसब और खिलत दी जायेगी.” अब्दुल करीमने एकेक आमिष दाखवायला सुरुवात केली.

“ये भी सोच लिजिए… संबाजी आपको कोई वतन नही देगा… लेकीन बादशहा सलामत की मेहेर हुई तो आप वतनदार भी बन सकते हो…” हे वाक्य अब्दुल करीमने उच्चारले आणि किल्लेदाराने वर पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर रागाची एक रेष दिसली पण अगदीच काही क्षण. त्याने लगेचच स्वतःला सावरले. आता मात्र त्याच्या डोक्यात जबरदस्त विचारचक्र सुरु झाले. कारण शेवटी निर्णय त्यालाच घ्यायचा होता. एकीकडे स्वराज्याशी बेईमानी करून स्वतःचा स्वार्थ साधायचा किंवा स्वराज्याशी इमानदारी करून येणाऱ्या संकटांना सामोरे जायचे. बरे संकटे देखील अशी की त्यात प्रत्येकाची गाठ मृत्यूशी. किल्लेदार विचार करत होता आणि जमीनदार अब्दुल करीम अगदी बारकाईने त्याच्या चेहऱ्याचे निरीक्षण करत होता.

क्रमशः- झुंज भाग १३.

मिलिंद जोशी, नाशिक…

झुंज भाग १

झुंज भाग 12

झुंज भाग 14

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here