Home इतिहास मराठा साम्राज्यात पाली सुधागडचे ऐतिहासिक महत्त्व काय आहे?

मराठा साम्राज्यात पाली सुधागडचे ऐतिहासिक महत्त्व काय आहे?

0
मराठा साम्राज्यात पाली सुधागडचे ऐतिहासिक महत्त्व काय आहे?

सुधागडचे ऐतिहासिक महत्त्व…

सुधागड हा लोणावळा डोंगर रांगांमधील किल्ला रायगड जिल्ह्यातील पाली गावापासून फक्त १० किमीवर आहे. या गडाची साधारणतः उंची ५९० मीटर असून गड विस्ताराने फारच मोठा आहे.

या प्राचीन गडाला भोरपगड असेही म्हणत असत. या परिसरात अस्तित्वात असणारी ठाणावळे लेणी, ही २२०० वर्षांपूर्वीची आहेत. यावरून असे अनुमान निघते की सुधागड हा देखील तितकाच जुना किल्ला असावा. पुराणात भृगु ऋषींनी येथे वास्तव्य केल्याचे अनेक उल्लेख आढळतात. याच ऋषींनी भोराई देवीची स्थापना या डोंगरावर केली.

एखाद्या मोठ्या सत्तेखाली या गडाची मूळ जडणघडण झाली असावी असा अंदाज असून या किल्ल्याने शिलाहार, यादव, बहमनी, मुघल अशा राजसत्ता पाहिल्या. व नंतर इ.स. १६४८ साली हा किल्ला मराठा साम्राज्यात सामील झाला. शिवरायांनी या गडाचे भोरपगडावरून सुधागड असे नामकरण केले. नारो मुकुंद यांनी शिवरायांना सुधागडला हिंदवी स्वराज्याची राजधानी करावी असे सुचविले होते. मात्र महाराजांनी रायगडाची निवड करून सुधागडाच्‍या बांधकामासाठी पाच हजार होन देऊन किल्‍ला लढाऊ बनवला. त्या काळी गडावर ७०० गडक-यांचा राबता होता.
महाराजांच्या मृत्यूनंतर सुधागड पुन्हा एकदा मोगलांच्या ताब्यात गेला. शेवटी सबनीस नारो मुकुंद यांनी १६८० मध्ये मोगलांकडून हा किल्ला जिंकून स्वराज्यात आणला. दक्षिणेत ठाण मांडून बसलेला औरंगजेब जेंव्हा स्वराज्यावर चालून आला त्यावेळी सुधागडावर घनघोर लढाई झाली. नारो मुकुंद यांचे सुपुत्र शंकरजी नारायण यांनी लढाईत मोठा पराक्रम गाजवला.
छत्रपती राजाराम महाराजांनी शंकरजी नारायण याला पंतसचिव केले. इ.स. १७१४ च्या सुमारास छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना सचिवपद वंशपरंपरेने दिले. त्यानंतर त्यांचे वंशज परंपरेने त्या पदावर बसत होते. इंग्रजांच्या काळात पंत सचिवांना संस्थानिक म्हणून मान्यता मिळाली. भोर संस्थानाचे ते राजे झाले. आजही भोर मध्ये पंत सचिवांचे घराणे चालू आहे.
रायगडाचा महादरवाजा आणि सुधागडचा महादरवाजा यात साम्य आहे. सुधागडाला लाभलेली अभेद्य तटबंदी, गडमाथ्यावरील विशाल पठार, पाण्याचे असंख्य टाक, तसेच भौगोलिकदृष्‍ट्या असलेले महत्त्व यामुळे सुधागड हा बळकट किल्‍ला म्‍हणून गणला जातो.
याव्यतिरिक्त गडाच्या पायथ्याशी असलेल्या पाच्छापूर या गावातच संभाजी महाराज व औरंगजेबाचा बंडखोर मुलगा अकबर याची भेट झाली होती. पाच्छापूर हे पातशाहपूर या नावाचा अपभ्रंश आहे. राजांच्या अष्टप्रधान मंडळात असलेल्यांपैकी अण्णाजी दत्तो, बाळाजी आवजी चिटणीस त्याचा मुलगा आवजी बल्लाळ आणि हिरोजी फर्जंद या राजद्रोहींना संभाजीराजांनी सुधागड परिसरात असणाऱ्या परली गावात हत्तीच्या पायी दिले होते.
सुधागड किल्ल्याला आजही पंचक्रोशीत भोराईचा डोंगर म्हणूनच ओळखतात. सुधागडावरून समोरच उभा असणारा सरसगड, घनगड, कोरीगड, तैलबैला तसेच अंबानदी व नदीच्या आजुबाजूची गावे हा परिसर दिसतो.
Credit – राहुल जाधव (Rahul Jaadhav), Procurement Executive

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here