महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १९५

By Discover Maharashtra Views: 1215 7 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १९५ –

“सरलष्करांचा अभिमान वाटतो आम्हास.” राजांची नजर हंबीररावांवरून दरबारभर सरकली. “हा कसला समय आणि ही कोण मानपानाची बाबत मोक्याच्या म्हणणाऱ्या तुम्हा आपल्या माणसांच्या मनी? कुलेशांना आम्ही “छंदोगामात्य’ केलं, पिरंग्यांच्या सुलुखासाठी “कुलएख्त्यार ‘ केलं ते त्यांचा वकूब बघून, त्यांना हिंदोस्थानी बोलभाषा चांगली अवगत म्हणून! कवी भूषण राहते आमच्या दरबारी, तर त्यांसही “छंदोगामात्य’ करून गौरविले असते आम्ही.”

प्रधानी-खांबालगतच्या मंत्रिगणांनी गर्दनी खाली घातलेल्या बघून राजांचे काळीज पिळवटले. विट्यासारखी आपली धार नजर कुलेशांवर रोखत ते म्हणाले, “कुलेश, मंत्रिगणांशी आमचा काय संबंध असं म्हणताना चुकताहात तुम्ही! सरलष्कर म्हणतात ते सही आहे. मानापानाच्या या गफलतींचा वेळीच कंडका पाडला पाहिजे. रामजी पांगेऱ्यांच्या कोरजाई गावठाणात केंबळी छपराखाली बसून रामजींच्या झोपडीतील कांदाभाकर प्रेमानं ओठांआड करणारे आमचे आबासाहेब आम्ही तर नाहीच, पण कुणीच विसरता कामा नये… पुन्हा असा बोभाट कानी येतो, तर लहान-थोर, आपला-परका कुणाचीच गय धरणार नाही आम्ही!!”

नाकशेंडा लालावलेले महाराज भावावेगाने आपसूकच खडे झाले. पुरा दरवार त्यांच्याकडे बघू लागला. वेगळाच भाव शंभूमुद्रेवर पसरला. तलवारीच्या पात्याच्या धारेसारखा शब्दन्शब्द फुटू लागला. “आदिलशाही पडली याची धास्त, काळजी करायलाही समय नाही आम्हास. जमल्या बाक्‍्यांना आम्ही निक्षून-निर्वाणीचं सांगतो. प्राणबाजी लावून आबासाहेबांचं हे राज्य राखण्याची आम्ही हरभातेनं कोशिस करणार आहोत. साऱ्यांनीच पोख्त विचारानं आमच्या पाठीशी राहावं. आपसांतील लहान-थोर मानपानाचे बगलेस ठेवून प्रसंगास साऱ्यांनी कसं सामोरे जावं, फक्त त्या मसलतीचं बोलावं.”

कोंडी फोडत हंबीररावच म्हणाले, “आता जमेल त्या ताकदीनिशी गोवळकोंडा राखाय पायजे. उगवतीच्या तोंडावयली आपली ठाणी रातध्याड जागती ठेवाय पायजेत. जमेल तेवढा घोडा गोवळकोंड्याभोवती फिरता ठेवाय पायजे.”

“आता निस्त्या मोगली फौजाच न्हाईत, आदिलशाहीचा मेळ घेऊन पुढची चालठेवील अवरंगजेब.” म्हलोजीबाबा पूर्वी आदिलशाहीत होते. तिथल्या सरदारांचा अंदाज बांधीत ते म्हणाले.

“विजापूरचा राजा बाळ. गोवळकोंड्याचा हसनशहा उमेदीचा आहे. कुतुबशाही नाही नमायची औरंगासमोर.” निळोपंत आपला सल्ला ठेवत म्हणाले. “पेशवे, मोगल कुतुबशाहीकडं वळतील हा अंदाज आहे. तसं घडेलच असं नाही. शक्‍यता आहे, तो शहाजाद्याचं निमित्त ठेवून आपल्या दौलतीचाच मोहरा धरेल.” प्रल्हादपंतांनी अकबराशी चाललेली बोलणी आपणाला पसंत नाहीत, हे हंबीररावांचे मतच पुढे घेतले. आता खऱ्या मसलतीला तोंड फुटले!

बराच वेळ दरबारात एकमेकांत उलट-सुलट खल झाला. एक गोष्ट त्यातून स्पष्ट झाली. आदिलशाही पडणे हा दक्षिणफळीला केवढा जबर धक्का आहे, हे सर्वांनाच जाणवून गेले. प्रधानमंडळ आणि कुलेश यांची मने परस्परांबद्दल साफ नाहीत, हेही सिद्ध झाले. हंंबीररावांसह अनेकांना मराठी मुलखातला शहजादा अकबर ही गोत्यात घालणारी अडगळ वाटते, हे उघड होऊनच चुकले.

पंतांकडील सुरनिशी दफ्तर शंकराजी नारायण यांच्याकडे सोपवून राजांनी पंतांना कोकणपट्टीसाठी मोकळे ठेवले होते. त्यामुळे रामचंद्रपंत नाराज तर नाहीत, या शंकेने त्यांनी विचारले, “तुमच्या ठायी शंकराजींना सुरनिशी दफ्तराकडं नामजाद केलं आम्ही. पंत, त्यासाठी तुम्ही नाराज तर नाही?”

“जी. तसं मनीसुद्धा नाही आमच्या. कोकणपट्टीची बंडाळी जोखमीची म्हणून तर आम्हावर ती बाब सोपविली आहे स्वामींनी, हे जाणतो आम्ही. ती पार पाडताना यातना होतात काळजास. जीभ धजत नाही, घडलं सत्य सांगावयास.”

“मतलब? रामचंद्रपंत खोलून बोला जे बोलणं ते.” महाराजांची नजर रामचंद्रपंतांवर जखडून पडली.

“जी. माफी असावी. पण – पण कुडाळच्या खेमसावंतास जाणारा खलिता स्वारसुद्धा कब्ज केलाय आपल्या जासुदांनी.”

“कुणाचा खलिता?”

“जी… जी…” रामचंद्रपंतांनी दुशेल्यातून खलितावळीच काढली. पण जबानीतून नाव काढणे काही जमले नाही त्यांना.

राजांनी पंतांच्या हातातील वळी ओढूनच घेतली. आतील खलित्यावर जसजशी त्यांची नजर सरसरत फिरू लागली तसतशी फरीसारखी दिसणारी त्यांची मुद्रा लाल होत घामाने डवरून आली.

आदिलशाही पडल्याचे कारण पुढे करीत कुडाळच्या खेमसावंतांना, आबासाहेबांचे जावई, राजांचे मेहुणे, फलटणकर महादजी नाईक-निंबाळकर लिहीत होते –

“मातीच्या ढेकळागत दिल्लीधिशासमोर इदलशाही पडली. संभाजीचीही बाबतराहणार नाही! भागानगरीची मोहीम जालियावरी दिल्लीश्वर याचाही परामर्श घेतील. दहा हजार घोडा आम्हीच तुमचे कुमकेस घेऊन येतो. रायरीपावेतो कडेकोट ठाणेबंदी केली जाईल.”

राजांच्या हातातला खलिता थरथरू लागला. संतापाने नाकपुड्या फाकल्या. वळी, खलिता तसाच पंतांच्या हातात खुपसून ते पुटपुटले, “हरामखोर. डोमकावळे.”

रामचंद्रपंतांनी मान खाली घालत कर्तव्य म्हणून सांगितले – “अशाच मजकुराचा खलिता शेख महमद बक्षी या मोगली सरदाराचा आहे… त्यानं सावंतास….”

राजांना तळहात दोन्ही कानांवर ठेवून घ्यावेसे वाटले. काही न बोलता ते महादरवाजातून दसराचौकाकडे चालले. रामचंद्रपंत, चांगोजी काटकर, खंडोजी, राया- अंता त्यांच्या पाठीशी झाले. गडाच्या महादरबाजाच्या रोखाने मोरेश्वर पंडितराव आणि निळोपंत झपाझप चालत येताना पाहून ते जागीच थांबले.

मोरेश्वरांनी नुकतीच गड चढून आलेली एक भगवी छाटीधारी असामी राजांना दाखवून म्हटलं, “पाटगावहून आलेत हे. म्हणतात.” पेशव्यांकडे बघत पंडितराव घुटमळले. आपल्या सुकल्या ओठांवरून त्यांनी जीभ फिरविली.

“मठशिष्य आहेत हे पाटगावचे.” निळोपंतही रुकले.

“पेशवे, यांना इथवर यायचा त्रास कशाला दिलात? आधीच गड चढलेत. आम्ही भेटलो असतो सदरेवर. काय बाबा, आमच्या मौनीबाबांची तब्येत कशी? नाराज नाहीत ना ते आम्हावर, बरेच दिवस दर्शनासाठी नाही आलो म्हणून?” राजांनी शिष्याला विचारले.

महाराजांच्या शब्दाशब्दांबरोबर मठशिष्याच्या भरल्या डोळ्यांतून आसवांचे थेंब छाटीवर टपटपले. त्याच्या तोंडून रखडते बोल बाहेर पडले, “बाबांनी – मौनीबाबांनी देहकार्य संपविलं महाराज! निर्वाण केलं त्यांनी भुदरगडतर्फेला पाटगावी.”

“जगदंब” म्हणत महाराजांनी हातबोटे छातीशी नेत गपकन डोळेच मिटले. त्या मिटल्या डोळ्यांसमोर सर्वसंगत्याग केलेल्या मौनीबाबांच्या शांत, सात्त्विक मुद्राच मुद्रा तरळू लागल्या.

विजापूर पडताच मोगली फौजा लगतच्या पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा भागात पांगल्या. सालार सर्जाखानासह झाडून सारे विजापुरी सरदार औरंगजेबाला मिळाले. आपले खान विजापूरभोवती पांगते ठेवून, विजापुरावर हत्यारी बंदोबस्त बसवून औरंगजेबाने विजापूर सोडले. तो सोलापुराकडे निघाला. कर्नाटकातून हरजीराजांचे सारखे हारकारे येत होते. राजांनी अंदाज केल्याप्रमाणे मिळतील ते कर्नाटकातील सरदार गळाला लावून, आपले फौजबंद खान सीमेवर पेरायला औरंगजेबाने सुरुवात केली.

हरजींची कुमक करायला पाठविण्यासाठी राजांनी केसो त्रिमल व संताजी घोरपड्यांना याद घेतले. समोर जिंजीकोट फिरत असलेले राजे त्यांना म्हणाले, “केसोपंत, तुम्ही आता संताजींसह कर्नाटकात हरजींच्या कुमकेला आपल्या जमावानिशी उतरा. रपुनाथपंत  गेल्यापासून त न हरजी एकले एवढा प्रांत सांभाळताहेत. जैतजी काटकर, काकडे आहेत त्यांच्या दि , तुम्ही त्यांना रघुनाथपंतांच्या ठायी आहात. त्यांच्या-तुमच्या एक विचारे कर्नाटक राखून असा.” राजांनी केसो त्रिमल व संताजींना मानवस्त्रे दिली.

हरजीराजांची जोड करण्यासाठी निरोप दिला.

क्रमशःधर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १९५.

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a comment