बलिदान निदर्शक वीरगळ | Sacrifice Herostone

By Discover Maharashtra Views: 3588 3 Min Read

बलिदान निदर्शक वीरगळ | Sacrifice Herostone

बलिदान याचा अर्थ स्वतःचा जीव कोणत्या तरी चांगल्या कारणासाठी अर्पण करणे होय .कोणतीही वस्तू अर्पण करीत असताना ती देवास अर्पण करण्याची पद्धत हिंदू धर्मात प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. आपल्या मनातील हेतू साध्य झाल्यानंतर आपल्याला प्रिय असलेली वस्तू देवास अर्पण केली जात असे .सर्वात प्रिय वस्तु म्हणजे जीव की प्राण होय. तीच अर्पण करण्यासाठी देवाला पण किंवा नवस ,प्रतिज्ञा , शपथा बोलल्या जात असत पण ,शपथ ,नवस ,प्रतिज्ञा करून स्वतःच्या प्राणांचे बलिदान केल्यानंतर ती घटना सर्वश्रूत होत असे आणि त्या घटनेची आठवण म्हणून गावकऱ्यांकडून त्या व्यक्तीची स्मारकशिला किंवा बलिदान निदर्शक वीरगळ उभी केली जात असे.

कोणत्याही पुण्य कर्मातून प्राप्त झालेला मृत्यू हाच वीरगळ निर्मितीचा मुख्य संकल्पना आहे .वीरगळ केवळ लढाईत मरण पावल्याचे तयार होत नाहीत तर काही धार्मिक पुण्यकर्म करणाऱ्यांचे देखील वीरगळ तयार केले जात असत. वीरगळ निर्मितीची खूप सारी कारणे आहेत. आपल्या राजाला युद्धात विजय मिळावा,राज्यावर आलेले परकीय आक्रमण दूर व्हावे, राजाला पुत्रप्राप्ती व्हावी ,गावावरील संकट दूर व्हावे ,राज्यात चांगला पाऊस पडावा ,रोगराई,दुष्काळाचे निवारण व्हावे म्हणून देखील शपथ पण नवस केले जात असत असे पण , शपथ , प्रतिज्ञा जनतेच्या कल्याणाकरिता असत अशा घटनाना समाजात फार मूल्य असे कारण अशा गोष्टीबद्दल जनतेला फार उत्सुकता असे .त्या घटनेकडे समाजाचे लक्ष असे .त्या व्यक्तीबद्दल समाजात आदराचे स्थान निर्माण झालेले असते नंतर त्या माणसाला बलिदान द्यावेच लागेल मग त्या व्यक्तीला देवतेसमोर, समाजासमोर सर्व समक्ष बळी चढवले जात असे त्याचे शीर कापून मस्तकापासून धड वेगळे केले जात असे .ते शिरकमल एका तबकामध्ये राजा किंवा देवतेस अर्पण केले जात असे .या प्रसंगात मोठ्या जनसमुदायासमोर राजा किंवा अधिकारी हत्तीवर किंवा घोड्यावर दाखवलेले असतात .जो वीर बलिदान देणार आहे त्याला वाजत गाजत जनसमुदायासमोर आणले जाते .त्या जनसमुदाय समोर त्याचे शिर कमल केले जात असे.

लढाईमध्ये धारातीर्थी पडलेल्या पराक्रमी वीरा प्रमाणेच बलिदान देणाऱ्या वीराचे महत्त्व असते .त्याच मोक्ष मिळतो मग स्वर्गातून अप्सरा येतात व त्या वीरास स्वर्गलोकी घेऊन जातात. पुण्यकर्म करून वीर स्वर्गात पोहोचलेला असतो त्यास स्वर्गप्राप्ती झालेली असते स्वर्गात तो आपल्या आराध्य देवतेची पूजा करत असतो त्यावरती कळसाच्या रूपाने त्याच मोक्ष मिळत असतो

स्वताचा जीव देणे ही काही सामान्य गोष्ट नाही त्यासाठी आत्मबल व निष्ठा असणे गरजेचे असते अशा पद्धतीचे कार्य देखील खुप पुण्यवान व स्वर्गप्राप्ती होण्याचे साधन असे .अशा व्यक्तीना स्वर्गात जाऊन मोक्ष मिळतो ही कल्पना समाजात असल्यामुळे त्या विचारधारेतून जीव गमावलेल्या वीरांचे स्मरण व्हावे म्हणून ग्रामस्थ त्याची स्मारक शिळा किंवा वीरगळ उभे करत असत ही एक प्रकारची धार्मिक आत्महत्या असते .याला बलिदान निदर्शक वीरगळ म्हणतात
असे वीरगळ मंगळवेढा,करकंब,वेळापुर ,म्हालूंग,फलटण, परळी ,नाशिक ,गोवा पणजी ,येथे मिळतात

© अनिल दुधाने – वीरगळ अभ्यासक

Credit – संतोष झिपरे

Leave a comment