नाईक निंबाळकर गढी, फलटण

नाईक निंबाळकर गढी, फलटण | मुधोजी मनमोहन राजवाडा

नाईक निंबाळकर गढी, फलटण

सातारा जिल्ह्यातील फलटण ह्या तालुक्याच्या गावी बाणगंगा नदीच्या तीरी नाईक निंबाळकरांची भव्य गढी म्हणजेच राजवाडा उभा आहे. “मनमोहन” राजवाडा व त्याच्या परिसरातील राममंदिर आणि ज्ञानेश्वर माऊलींचे मंदिर. जवळच असलेले एकदम प्राचीन जबरेश्वर मंदिर आपले मन मोहून टाकते. फलटणचा राजवाडा त्याची भव्यता आणि राजघराण्यातील सर्वांची विनम्र वागणूक आपल्या साम्राज्याचे मोठेपण दाखवून देते.(नाईक निंबाळकर गढी)

निंबराज पवार यांनी निंबळकमध्ये आपली वसाहत निर्माण केली. रामदेवराव यादवांचे राज्य अल्लाउद्दीन खिलजीने घेतल्यावर दक्षिणेतील मातब्बर व्यक्तींना पाचारण करण्यात आले. त्याच वेळी निंबराजांचे पुत्र पोदकुला जगदेवराव यांना खिलजी घराण्याने सरदारकी दिली. पुढे देवगिरी ऊर्फ दौलताबादची सत्ता तुघलक घराण्याकडे गेली. त्या घराण्यातील मुहंमद तुघलकाने आपली राजधानी दिल्लीहून दौलताबाद येथे हलविली. पुन्हा तो दिल्लीला गेला. त्याच्याबरोबर येथील काही सरदार गेले. त्यात जगदेवराव । निंबाळकर गेले. त्या वेळी त्यांनी आपल्या पराक्रमाने पंजाब प्रांतातील बंड मोडून काढले. परंतु बंडवाल्यांकडून त्यांच्या छातीवर भाल्याची जखम झाली व ते धारातीर्थी पडले. त्यांचे “धारापतराव” हे नाव तेव्हापासून घराण्याच्या इतिहासात नोंदले गेले. त्यांचा मुलगा निंबराज दुसरा यांस महंमद तुघलकाने १२०० स्वारांची मनसब दिली आणि नीरा नदी व शंभु महादेवाच्या डोंगरांची रांग यांमधील प्रदेश पश्चिमेस सरहद्दीच्या ओढ्यापासून पूर्वेस रायदंडच्या विठोबापर्यंतचा प्रदेश जहागीर म्हणून दिला. दरबारातून सन्मानाने ‘नाईक’ किताब दिला. मानाची वस्त्रे दिली. मंदिल, कंबरबंद पटका, चादर, मला, शिरपेच, मोत्याचा तुरा, सोन्याचा पायातला तोडा, पोच्या हिऱ्यांच्या, कलगी, १ कंठी मोत्याची, हिन्याच्या अंगठ्या, मोरचेल, पालखी, अंबारीसह हती, सोन्याच्या साजासह घोडा, भालदार-चोपदार ३० …असा बहुमान झाल्यावर हे घराणे नाईक-निंबाळकर या नावाने प्रसिद्ध आहे.

पुढे त्यांनी बाणगंगा नदीकाठी भव्य गढी उभारली त्याच्या प्रवेशद्वारातून अंबारीसह हत्ती जाईल इतकी त्याची भव्यता. त्याबद्दल एक शाहीर म्हणतात.

धारचं परमार कुल अतिथोर । निमराजाची तेग समशेर ।

जगदेवराव पुत्र त्याचा थोर । करुनिया युद्ध घनघोर । शोभतो मर्द तसा बहादूर । फलटणला आला हा वीर ।

बाणगंगेच्या काठी मलठण । राजधानी केली फलटण । शत्रूची केली दाणादाण । किती गावं त्याचं गुणगान । जीऽऽजीऽऽऽजी…

पुढे दुसरे निंबराज यांचे पुत्र वणंगपाल आले त्यानंतर त्यांचे दुसरे पुत्र मुधोजीराजे हे इ.स. १६३० मध्ये गादीवर आले. मुधोजीराजे यांचे शहाजीराजे भोसले यांच्याशी मित्रत्वाचे संबंध होते. जहागिरीत दुष्काळ पडल्यावर निजामशाहीत मुलखात लूटमार करून त्यातून आपल्या प्रजेला ते मदत करीत होते. आदिलशाही दरबार मुधोजी राजांची ही मनमानी समजून काळज गावाजवळ त्यांना पकडून सातारच्या किल्ल्यावर कैदेत टाकले. जहागीर जप्त केली. शहाजीराजांना हे समजल्यावर त्यांचे मित्र रणदुल्लाखान यांच्या मदतीने विजापूर दरबाराशी संधान साधून मुधोजीरावांनी अभय मिळविले. या उपकाराची फेड म्हणून मुधोजीरावांनी आपली कन्या सईबाई शहाजीराजांचे पुत्र शिवाजीराजे यांना वधू म्हणून स्वीकारण्याची विनंती केली. दि. १६ एप्रिल १६४० वैशाख शुद्ध पंचमी शके १६६२ सईबाईसाहेब छत्रपती शिवाजीराजांच्या ज्येष्ठ पत्नी म्हणून भोसले राजघराण्यात आल्या.

ह्याच फलटणमध्ये सईबाईंचे बालपण गेले.पुढे फलटणचा राजकारभार मुधोजींचे पुत्र बजाजींकडे गेला. सईबाईंना सखुबाई, अंबिकाबाई, राणूबाई व शंभूराजे सर्वात लहान ही अपत्य झाली. शंभूराजे सव्वा दोन वर्षाचे असताना सईबाईंना देवाज्ञा झाली. पुढे सखूबाईंचा विवाह बजाजी निंबाळकरांचे पुत्र महादजीं बरोबर लावून दिला.

साभार- महाराष्ट्रातील ऐतिहासिक वाडे

टीम- पुढची मोहीम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here