माणिकगड संवर्धन मोहीम

माणिकगड संवर्धन

माणिकगड संवर्धन मोहीम

माणिकगड संवर्धन मोहिमेत प्रथमच सहभागी झालेल्या आमच्या मित्राचा अनुभव.

जय शिवराय

मुळचा कोकणात ला असल्यामुळे किल्ले आणि दुर्गांची आवड लहानपणा पासूनच होती. आधी पण काही गड किल्ल्यांवर गेलो होतो पण ते फक्त फिरण्यासाठी , हो पण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तेव्हा ही तेवढच प्रेम आणि आदर होता. माझा परम मित्र हा मला नेहमी सांगायचा आम्ही जातोय मोहिमेला तू येतोय का आणि नेमकी मला सुट्टी नसायची.
शेवटी तो दिवस आला जेव्हा बऱ्याच वर्षांनी योग आला तो म्हणजे इतिहास जाणण्याचा आणि त्याची सुरुवात झाली ती प्रबळगड पासून. सुरुवात तर झाली आणि त्या सुरुवातीमुळे आवड वाढत गेली गडकोटांना भेट देण्याची, इतिहास जाणून घेण्याची ,मोहीम काय ते जाणून घेण्याची इच्छा वाढत गेली आणि मग एक दिवस आला जेव्हा श्री तीर्थ क्षेत्र माणिकगड च्या संवर्धन मोहीम ला जाण्याचा योग आला. प्रवास हा रात्रीचा सुरू झाला, पायथ्याशी असलेल्या गावी पोहचलो आणि टॉर्च पेटवून चालायला सुरुवात केली. सोबत होती ती स्वराज्याचे वैभव च्या काही मावळ्यांची. सुरुवातीचा पठार रमत गमत चालत त्याच्या शेवटी विश्रांती ला बसलो.रात्रीचे सुमारे २ वाजले होते. तिथून पुढे हा चढाईचा पट्टा सुरू झाला. हळुवार चढत असताना एका बाजूला उंच कातळाचा भाग आणि दुसऱ्या बाजूला दरी अशी वाट चालत होतो. पुढची वाट ही घळीतून उभ्या चढावाची होती. रात्री ची वेळ असल्या कारणाने चढायला अवघड जात नव्हत. चढून गेल्यावर टीम स्वराज्याचे वैभव ने घेराकिल्ला माणिकगड चा जो फलक लावला तिथे पोहचलो. थोडी विश्रांती घेतली एवढ्यात गडावरून प्रकाश दिसू लागला आणि काही लोकं आवाज देऊ लागले. शिवरात्री निम्मित लोक महादेवाचे दर्शन घ्यायला आली होती. सुमारे ४ ला माथ्यावर पोहचलो आणि तंबू लावुन आराम करण्याचं ठरवलं. काही जण झोपले, पण माझी पहिली वेळ असल्या कारणाने झोप येईना. मी अजुन दोघ सोबत कडयावरच्या पाण्याच्या टाक्याकडे गेलो आणि स्वच्छ पाणी भरून आणल. तिथुन महादेवाच्या मंदिरा कडे गेलो तिथे काही लोक भेटली. ही लोक तीच होती ज्यांनी आम्हाला हाक मारली होती.
पाणी घेऊन तंबू मध्ये जाऊन आराम केला आणि गजर लावुन सूर्योदयाची वाट पाहत बसलो. तंबू अश्या दिशेने लावला होता की उठताच सूर्य देवाचे दर्शन होईल. पहाटे सूर्योदयाचा आनंद घेऊन काही छायाचित्र टिपले आणि धुक्याच्या चादरित असलेल्या इर्षाळगड, प्रबळगड आणि कलावंतीण दुर्ग च हृदयाला मोहणारा दृश्य डोळ्यात भरून घेतल.

दिवसभराची काम ठरवून चहा-न्ह्यारी करून चालू असलेलं संवर्धनाच कार्य सुरू केल. दुपारच ऊन सहन होत नसल्याने जेवण्याची वेळ होई पर्यंत जमेल तेवढं कार्य करून जेवणाचा कार्यक्रम पार पाडला. काही वेळ विश्रांती घेऊन पुढची कामे चालू ठेवली. वाड्याचे संवर्धन कार्य करताना वाड्याचे वेगळे रूप समोर येत होते आणि ते कशासाठी असतील हे विचार करत सूर्यास्त ची वेळ झाली.
पहाटेच्या वेळेस इर्शाळगड व प्रबळगड आणि सूर्यास्त च्या वेळेला वायव्य दिशेस शिवलिंग च्या आकाराचा कर्नाळा किल्ला सूर्यास्ताची शोभा वाढवत होता. रात्रीच जेवण करून झोपण्याच्या तय्यारी ला लागलो. रात्री २ च्या वेळेस काही अनोळखी आवाज यायला लागले आणि पहाटे ४.३० ला अजुन जास्त आवाज येऊ लागले. तंबू मधून बाहेर आल्यावर कळल की ही माणस दुसरे तिसरे कोणी नसून तेच जुने दुर्गभटके आहेत जे प्रत्येक मोहीमेला मदत करण्यास येत असतात. त्यांचं कार्य करण्याच्या उत्साह काहीतर वेगळाच होता. शिवरायांचा जयघोष करत काम करण्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर जाणवत होता. आम्ही दुपारी निरोप घेतला आणि परतीच्या वाटेला लागलो.

सर्व शिवभक्तांना भेटून काहीतरी वेगळ वाटत होत जणू काहीतर जुनं नातं आहे त्यांच्यासोबत शिवरायांच्या स्वराज्यात त्यांचे वैभव जपण्याचे कार्य करताना एक वेगळी स्फूर्ती जाणवते आणि ती भविष्यात ही अशीच राहावी ही श्री चरणी इच्छा.

जय भवानी🚩 जय शिवराय🚩

माहिती साभार – स्वराज्याचे वैभव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here