जमखंडी संस्थान | बखर संस्थानांची

By Discover Maharashtra Views: 3023 4 Min Read

जमखंडी संस्थान | बखर संस्थानांची –

दक्षिण महाराष्ट्रांत कोल्हापुरच्या पोलिटिकल एजंटाच्या हाताखालीं असलेलें एक संस्थान. जमखंडी संस्थान हें असून याचें क्षेत्रफळ ५२४ चौरस मैल आहे. संस्थानांत जमखिंडी, बिद्री व कुंदगोळ हे तीन तालुके व वाठार, पाटखळ व ढवळपुरी हीं तीन ठाणीं आहेत. पटवर्धन घराण्याची जहागीरी जमखंडी संस्थान. दक्षिण महाराष्ट्रांतील पहिल्या प्रतीचे सरदार म्हणून येथील संस्थानिकास मान असून त्यांना दत्तकाची परवानगी आहे. ब्रिटिश सरकारास २०५१५ रुपये खंडणी द्यावी लागत असे.

मुळ पुरष हरभटजीस सात पुत्र होते. रामचंद्र, महादेव, भास्कर, गोविंद, कृष्ण, त्रिंबक आणि बाळकृष्ण; यांपैकीं त्रिंबक, गोविंद व रामचंद्र हे पुढें नांवलौकिकास चढले. रामचंद्राचा मुलगा परशुरामभाऊ हा तर सर्व पटवर्धन सरदारांत प्रख्यात होऊन गेला. या भाऊच्याच जहागिरीपैकीं जमखिंडी संस्थान हा एक अवशिष्ट भाग आहे.

भाऊचा पुत्र रामचंद्रपंत आप्पा  याला हरि, माधव व गणेश असे तीन भाऊ होते. रामचंद्रपंत हाच जमखिंडीचा पहिला अधिपती होता. हा जमखिंडीस येऊन राहिला व तासगांवीं गणेशपंत राहिला. ही वांटणी स. १८११ च्या सुमारास झाली. यावेळीं जमखिंडी जहागिरीचें उत्पन्न ४५४१६० रु. होतें व  पदरीं  स्वार बाळगले होते

पेशवाई गेल्यावर तासगांवीं गणेशपंत व त्याचे पुत्र गोपाळ व गोविंद हे होते. गणेशपंताचा वडील भाऊ हरि हा निपुत्रिक वारला. जमखिंडीकर रामचंद्रआप्पा या वेळी वारला असून त्याचा पुत्र गोपाळराव हयात होता. रामचंद्र आप्पाचा दुसरा पुत्र माधव वारला होता व त्याचा पुत्र गोविंद जिवंत होता. माधवरावानें आपला स्वतंत्र वाटा घेतला नाहीं तो जमखिंडी संस्थानांतच राहिला.

जमखिंडीस रामचंद्रआप्पानंतर गोपाळराव अधिपती झाला. याच्याशीं इंग्रजांनीं तह करुन त्याला तीन हजाराची तैनात स्वार ठेवण्यास सांगितले. चिंचणीसंस्थान जमखिंडीतून फुटून निघाल्यानंतर (१८२१) जमखिंडीचें उत्पन्न २४३४७६ रु. राहिलें  यावेळीं तैनाती फौज न ठेवितां रोख रुपयेच खंडणीदाखल देण्याचें ठरलें.   त्याप्रमाणें स्वारांबद्दल जमखिंडीसंस्थानानें २०५१५ रु. खंडणी दरसाल द्यावी असें ठरलें त्याप्रमाणें आजतागाईत इतकी रकम खंडणीदाखल दरसाल इंग्रजसरकारास मिळत होती.

गोपाळराव हा निपुत्रिक वारला (१९ नोव्हेंबर १८४०). त्यानें एक मुलगा दत्तक घेतला; त्याचें नांव रामचंद्रराव आप्पासाहेब. हा दत्तकाच्या वेळीं ७ वर्षांचा होता.  आप्पासाहेबास योग्य शिक्षण देऊन ता. १० जानेवारी १८५३ त संस्थानचा अखत्यार दिला. यांच्या कारकीर्दीत संस्थानांत पुष्कळ  सुधारणा झाल्या. मध्यंतरीं बंडाच्या वेळीं (१८५७) आप्पासाहेबांच्या वर्तनाविरुद्ध इंग्रज सरकारास संशय येऊन त्यांनीं त्यांस २२ मार्च १८५८ रोजीं प्रतिबंधांत ठेविलें; पुढें चौकशी करुन त्यांना मुक्त करण्यांत आलें (७ जानेवारी १८५९). त्यापुढें त्यांनी पुष्कळ दिवस राज्य करुन व सर्व तर्‍हेनें संस्थानजी सुधारणा करुन ता. १२ जानेवारी स. १८९७ रोजीं देह ठेविला.

आप्पासाहेब यांनीं (पुत्र न झाल्यामुळें) चिंचणी घराण्यातील गोविंदराव यांचा नातु व कृष्णरावाचा वडील पुत्र दाजीसाहेब यास ता. १५ दिसेंबर १८९६ रोजी दत्तक घेऊन त्याचें नांव परशुरामपंत भाऊसाहेब ठेविलें यांचा जन्म १८८३ च्या मे महिन्यांत झाला. त्यांना वयाच्या विसाव्या वर्षी ता. ४ जून स. १९०३ सालीं मुखत्यारी मिळाली.

नंतर संस्थानची मालकीश्री शंकरराव आप्पासाहेब यांच्याकडे आली आहे .लग्न बावडेकर अमात्य घराण्यांतील मुलीशीं झालें  नंतर श्री.मा.राणीसाहेब रीजन्सीच्या मदतीनें कारभार पाहत असत. (१९२५). (इंपे प्याझे पृ. १४; केसरी त. ४।३।१९२४; जमखंडी संस्थानाकडून आलेली माहिती). (fb साभार)

गांव – जमखिंडी हें गांव या संस्थानची राजधानी असून तें कोल्हापूरच्या पूर्वेस ६८ मैलांवर आहे.  उमा रामेश्वरची जत्रा येथें दरसाल भरते. येथें कापूस दाबण्याचा व सरकी काढण्याचा (सरकारी) कारखाना आहे. हातानें काढलेल्या सुताचा व कापसाचा येथें बराच व्यापार चालतो.

पटवर्धनांच्या सगळ्या स्टँप व कोर्ट फीवर गणपती पाहावयास मिळतो. तो या जमखंडी संस्थानाच्या पेपर वरही पाहायला मिळतो.

संतोष मु चंदने, चिंचवड ,पुणे

Leave a comment