मंदिरे कसे ओळखायचे !!

मंदिरे कसे ओळखायचे !!

मंदिरे कसे ओळखायचे !!

महाराष्ट्र मधील मंदिराच्या बाबतीत बहुतांश लोक गल्लत करतात. सर्व मंदिरांना हेमाडपंथी असं संबोधित करून त्याचे कालखंड, त्याचा इतिहास सर्व काही गाळून टाकतो. यादव सम्राट रामचंद्रदेव याचा हेमाद्री हा सेनापती “सकलकरणाधिप” म्हटला जाई.12ते-14व्या शतकापर्यंत ह्यांचा सुवर्णकाळ.  त्याच्या काळाच्या अगोदरच्या शतकातील मंदिरे कशी बांधली असतील ? हा प्रश्न काही जनांना नक्कीच पडला पण याचे उत्तर मात्र कोणी शोधले नाही. त्याच्या अगोदर शिलाहार काळात ( 8व्या ते 12व्या), राष्ट्रकूट, चालुक्य, वाकाटक यांच्या काळात उत्तम अशी घडीव मंदिरे बांधली गेली त्यांनाही लोक हेमाडपंथी म्हणून मोकळे होतात.

त्या भागात कोणती सत्ता होती ? कोणत्या सत्तेची राजधानी किंवा त्याचा जवळ आहे का ? शिव आहे की वैष्णव ? मंग सत्ताधारी कोणते होते ? दानपत्र किंवा शिलालेख आहे का परिसरात ? हे सर्व लक्षात घेऊन कोणी अभ्यास करत नाही.दिसेल तिला हेमाडपंथी म्हणून मोकळे होतो. मुळात हेमाडपंथी ही मंदिराची शैली नाहीच. तिला आपण यादवकालीन म्हंटल पाहिजे.

हेमाद्री हा कुशल सेनापती होता आणि मोठा धार्मिक ही होता त्याच्या हाताखाली अनेक मंदिरांचे काम झाले पण त्याचा नावाची शैली कुठेही नाही. शैली ठरवताना त्याचे शिखर हा घटक महत्ववाचा ठरतो. शिखरावरूनच त्या मंदिराची शैली ठरते.जसे कि द्राविड,नागर, वेसर,भूमीज असे. पण महाराष्ट्राचे दुर्दैव असे कि बरीच मंदिरांचे मूळचे शिखरे पडून गेली आहेत.पण सध्या स्तितीत जी मंदिरे आहेत त्या वरून असे लक्षात येते कि महाराष्ट्रातील जास्तीत जास्त मंदिरे दख्खन नागरशैलीची आहेत.परंतु इतर राज्यानंपेक्षा महाराष्ट्राची शैली वेगळी आहे.थोड्या फार प्रमाणात इतर प्रांताच्या शैलीचा प्रभाव त्या वर पडला. मंदिराचे शिखर पडून गेल्यामुळे त्याचा जीर्णोद्धार झाल्यामुळे शिखरवैशिष्ट्ये बदलतात हे एक मुख्य कारण आहे.खरं तर नागर आणि द्राविडशैलीतील वास्तुघटकांच्या मिश्रणातून वेसर मंदिर स्थापत्यशैली तयार होते.

महाराष्ट्र मध्ये आद्य मंदिरे ही विष्णूची आहेत. 5व्या शतकात रुद्रसेन वाकाटक ह्याची पत्नी प्रभावती हिने विदर्भ मध्ये रामटेक परिसरात महाराष्ट्र मध्ये सर्वप्रथम प्रथम घडीव मंदिरांची परंपरा सुरू केली. ही प्रभावती राणी गुप्त घराण्याची असून वैष्णव होते. तगर- तेर ला इ.स.400 ते 550 ला मंदिरे बांधली गेली. त्यात त्रिविक्रम चे मंदिर प्रसिध्द आहे. महाराष्ट्र मध्ये पहिल अस्सल मराठी शैलीचे अंबरनाथ येथील भूमिज मंदीर इ.स. 1060 मध्ये शिलाहार काळात बांधले गेले.  कल्याणीचे चालुक्य,द्वारसमुद्रमचे होयसळ या राजवंशाच्या ( इ.स. 1022 ते 1346 ) आश्रयाने कर्नाटकात जी मंदिरे तयार झाली ती वेसर मंदिरे होती.आणि मुख्य म्हणजे हि शैली इ.स.च्या 10 व्या शतकाच्या अखेरीस उदयास आली. चालुक्य राजांचे मांडलिक असलेल्या यादव,शिलाहार राजांच्या काळात महाराष्ट्रात या मंदिरांची निर्मिती झाली.त्यापैकी थोडी मंदिरेच आज शिल्लक आहेत.एकंदरीत एक गोष्ट लक्षात येते की प्रत्येक राजवटी मध्ये वेगळ्या वेगळ्या शैलीचा प्रभाव पडून पडून त्या त्या भागात तशी मंदिरे तयार केली गेली. त्यामुळे कोणत्याही मंदिराचा अभ्यास करूनच त्या बद्दल त्याची वर्णन किंवा लेखन करावे. ज्यामुळे खरा अर्वाचीन, सुंदर, अनेक वर्ष बारीक अवर्णनीय मनमोहन शिल्प असलेला हा कलात्मक इतिहास सर्वांच्या समोर येईल.

Rudraraj Ashok Pawar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here