टोलारखिंड मार्गे गर्द धुक्यातील हरिश्चंद्रगड दर्शन

टोलारखिंड मार्गे गर्द धुक्यातील हरिश्चंद्रगड दर्शन

टोलारखिंड मार्गे गर्द धुक्यातील हरिश्चंद्रगड दर्शन

मराठी चित्रपट “टिंग्या”मधील बालकलाकार म्हणून ज्याला 2011 साली राष्ट्रपती पुरस्कार मिळाला तो “टिंग्या” अर्थात शरद गोयेकर मित्रांसह आमच्या सोबत टोलारखिंड मार्गे हरिश्चंद्रगड ट्रेक ला येणार होता. धनगर समाजातील हे चिमुरड त्यावेळेस अवघ्या 11 वर्षे वयाच इयत्ता 5 वी मध्ये शिकत होत. कुठल्याही प्रकारच्या अभिनयाचा अनुभव नसताना निर्माता रविराय यांनी या छोट्या पात्राला जन्म दिला होता तर मंगेश हाडवळे यांनी शिवजन्मभुमीतील पुत्र या नात्याने एका हलाखीच्या परिस्थितीत जगणा-या धनगर समाजाच्या कुटूंबातील एक रत्न पारखून त्याच्या कुटुंबाला मोठा आधार दिला होता.

हरिश्चंद्रगडाला जाण्यासाठी गेली दिड वर्ष फोनवर टिंग्या व माझा संपर्कातून खेळ चालू होता. टिंग्या त्याचे आगामी येणारे मराठी चित्रपट “माझ्या प्रेमा” व “बब्या” चित्रपटाच्या शुटिंगसाठी व्यस्त होता. आज तो व्यस्ततेतून मोकळीक काढत राजुरीला आपल्या आई वडीलांना भेटायला आला होता. येतानाच सोबत कवी – धोंडीभाऊ टकले, संतोष गोयेकर या ढवळपुरीकरांना तर अभिनव कुमार या लखनौच्या युवकाला घेऊन आला होता. माझ्याबरोबर हरिश्चंद्राची गड सफर करायची ही टिंग्याची खुप दिवसांची इच्छा पुर्ण होणार होती.

पुर्वेकडुन आज सोनेरी रंगाची किरणे आसमंतात उधळन करत सुर्यदेवतेने डोके वर काढत परिसर प्रकाशमान केला होता. पक्षी किलबिलाट करत या कोवळ्या उन्हात आनंदाने विहार करताना दिसून येत होते. आमची हरिश्चंद्रावर जाण्याची लगबग सुरू झाली होती. मी खोडदला असल्याने जुन्नरला येऊन मग निघणार होतो. सोबतीला मित्र म्हणून आजुन पाच जण येणार होते. पैकी विनायक साळुंके भोसरीवरून येणार होता. टिंग्या व त्याचे मित्र आम्हाला मढ पारगाव फाट्यावर भेटणार होते. आवरा आवर करत व जुन्नरला पोहचायला वेळ झाला होता. विनायक दोन वाजता जुन्नरला पोहचला. मिलेट्रीमधील जवान अमोल भारमळ सुट्टीवर असल्याने तो पण येणार होता.

दोन वाजता तीन दुचाकीवर आम्ही विनायक,अमोल, स्वप्नील,मी,सोनू व गणेश सहाजण जुन्नरमधुन निघालो हरिश्चंद्राच्या सफरीसाठी. जुन्नर, पिंपळगाव सिध्दनाथ, गणेश खिंड मार्गे मढ पारगाव फाट्यावर पोहचलो. टिंग्या व त्याचे मित्र चारचाकी मधून येणार होते ते पोहचले नव्हते. त्यांना संपर्क केला तर समजले की त्यांच्या पैकी एका मित्राच्या घरी काही तरी मोठा अपघात घडला होता व बनकर फाट्यावरून चारचाकी घेऊन माघारी गेला होता. यांना येण्यासाठी वाहन नसल्याने ते जीप मधुन वाटखळपर्यंत येणार होते. तीन मित्रांना तेथेच सोडून आम्ही त्यांना वाटखळला आनायला गेलो.
प्रवास अडचणीचा होणार होता कारण दुचाकी तीन व आम्ही सर्व दहा. परंतु प्रवास जास्त नसल्याने एवढे विशेष वाटत नव्हते. मढ पारगाव फाट्यावरून आम्ही दहाजण निघालो. खुबी फाट्यावरून पिंपळगाव जोग धरणाच्या पश्चिम भिंतीवरून पाणी साचलेल्या वरखाली रस्त्यावरून हलाखीचा प्रवास सुरू झाला. ड्रायव्हर सोडून आम्ही येथील निसर्गाचा निखळ आनंद घेत पुढे चाललो होतो. पांढ-याशुभ्र आकाशात क्षणात एक काळी चादर कुणीतरी गुप्त रूपात ओढताना दिसत होत.धरणाच्या भिंतीवरचा वरखाली वरखाली करणारा प्रवास जहाजातून प्रवास करत असल्याचा भास निर्माण करत होता. पांढ-याशुभ्र ढगाला आता संपुर्ण काळ्या चादरीने झाकण घातले होते. कुठल्याही क्षणी मेघराजा आमच्या भेटी येण्याचे चिन्ह दिसत होते. हरिश्चंद्ररांगेस जणू एक आजगर गिळंकृत करत असल्याचे दिसून येत होते, आज प्रथमच हे सफेद रंग असलेले नविन प्रजातीचे आजगर धुक्याच्या रूपात पाहण्याची संधी मिळाली होती. जसजसे हे आजगर पुढे पुढे सरकत होते तस तसा हरिश्चंद्ररांग त्याच्या शरीरात प्रवेश करून अदृष्य होत होती. टोलारखिंडी पर्यंतचा संपूर्ण परिसर त्या अजगराने गिळून टाकला होता.

धाडधाड मोठाले थेंब आकाशातून अंगावर अचानकच कोसळू लागले. समोरच्या ऐश्वर्या हाॅटेल परिसरात बाईक पार्क करत आम्ही आडोशासाठी शिरलो. धावतच हाॅटेल मालक म्हणजे आमचा मित्र चिंतामण जवळ आला. या ना सर? बसा. बोलू लागला. अनेक पर्यटकांनी त्या छोट्या व छानशा हाॅटेलात गर्दीकेली होती. गरीब कुटुंबाची तुटपुंजी पर्यटकांच्या माध्यमातून भागावी म्हणुन चिंतामणने टाकलेले हे त्याच ऐश्वर्या नावाच विश्व होत. तोंडात साखर व डोक्यावर बर्फ असलेला हा चिंतामण पर्यटकांची काळजी घेणारा एक गरीब होतकरू छोटा हाॅटेल व्यवसायीक.
पाऊस उघडला होता. परंतु बुरबुर चालू होती. आम्ही चहा घेत सफरीला लागलो. सात डोंगररांगा तुडवण्यासाठी आमचा प्रवास सुरू झाला होता. सोबत आणलेल्या बियांचे रोपण करायचे होतेच.

जंगलातील प्रवास निसर्ग न्याहाळत चालू झाला. पायाखाली येणारे दगडधोंडे तुडवत गप्पा गोष्टी मारत वृक्षांची विविधता पाहत होतो. टिंग्याला झाडाला असलेले आंबे खायचे होते ते मिळतात का शोध चालू होता. करवंदाच्या पसरलेल्या जाळ्यांना करवंदे दिसत नव्हती. रान आवळेतरी खायला मिळेल अशी आशा सर्वांना होती परंतु आवळे आजुन हिरवीच दिसत होती. खिरेश्वर कडा पाॅईंटवर आम्ही पोहोचलो होतो. येथील आनंद घेत आम्ही पुढे झालो. पाऊस पुर्ण थांबला होता. टोलारखिंडीत पोहचायला जवळपास 1 तास गेला. खिंडीत असलेले व्याघ्र शिल्प पुरातन शिल्प कलेची आठवण काठून देत होत. ते शिल्प पुर्वी या परीसरात असलेल्या वाघांची जाण करून देत होते. पुन्हा एकदा जाम धुके दाटून आले होते. येथुन पुढे. रॅलिंगचा आधार घेत कातळ चढाई करावी लागणार होती. त्या काळात मार्गातुन आम्ही चालू लागलो.
धुक्यामुळे निसर्ग दर्शन दिसत नव्हते. आम्ही स्वर्गात प्रवेश केला की काय असा भास होत होता. पाऊलवाट सोडून चालने महागात पडणार होत. झप झप मार्गक्रमण चालू होते. दिवस मावळतीकडे चालला असावा कारण उजेड कमी होत चालला होता. पाऊलवाटेने आम्ही हरिश्चंद्रगड मंदिराकडेच चाललोय कि दुसरे कुठे काही समजत नव्हते. एका टेकडीवर आम्ही पोहचलो. छोट्या हाॅटेलात सरबत घेत प्रवास सुरू केला. आता बरेच लांबवर आम्ही चालून आलो होतो. पायवाट उताराच्या दिशेने जात असल्याचे लक्षात आले. नक्कीच आपण वाट चुकलो असल्याचे माझ्या लक्षात आले. आम्ही पुन्हा माघारी फिरलो.

आता मुख्य पाऊलवाटेवरून प्रवास सुरू झाला होता. मार्ग काढत काढत बरेच दुरवरपर्यंत पोहचलो. सर्वांना एकत्र करत बोललो. आपणास येथूनपुढे अडिच किलोमीटर जायचे आहे. क्षणात सर्वांनी चेहरे पाडल्याचे दिसून आले. थकलेल्या चेह-यावर हे ऐकल्यावर आनंद थोडाच दिसणार होता. परंतु तो मला पहायचा होता. धुक्यात काहीच दिसत नव्हते. त्यामुळे आपण प्रत्यक्ष जागेवर पोहचलोय हे कुणालाही कळले नव्हते. मी बोलू लागलो. आपणास जागेवर पोहचण्यासाठी व प्रवास थांबण्यासाठी जवळपास आता एक दोन मिनिटे लागणार आहेत. त्यामुळे मन घट्ट करा व चालत रहा. क्षणात सर्वांचे चेहरे पडले तर क्षणात सर्वजण चकीत होऊन माझ्या तोंडाकडे पाहत राहीली व एकच जल्लोष केला व बोलले म्हणजे आपण पोहचलोय? मी हो म्हटले.

धुक्यात गडप झालेले मंदिर चुकत चुकतच शोधले. महादेवाचे दर्शन घेत गणेश लेणी कडे विसाव्यासाठी मोर्चा वळवला. पाऊस जोरात पडू लागला होता. अंगात थंडी शिरली होती. चालून चालून गरम झालेले शरीर थंड पडू लागले होते. अंगात कापरे भरले होते. आम्ही दहाजण कोणत्या लेणींमध्ये जागा मिळेल ते सर्वत्र शोधत होतो. परंतु जागा कुठेच शिल्लक नव्हती. गड पहायला आलेल्या गडकरींना गर्द धुक्यामुळे परतीच्या वाटा बंद झाल्या होत्या. कोणत्या वाटेने कुठे जायचे काहीच समजत नव्हते. आमचा परतीचा मार्ग धो-धो कोसळणा-या पावसामुळे व धुक्यामुळे बंद झाला होता. रात्रीच्या परतीच्या प्रवासाचे आमचे स्वप्न भंगले होते.

एका लेणीत 15 मुली व 20 मुले होती. यामधे जागा बाकी होती. त्यांना विनवणी करूनही जागा मिळणे कठीण झाले होते. त्यांचीपण तशी चुक नव्हती, कारण मुलींच्या संरक्षणाची जबाबदारी गट प्रमुखाकडे होती. मनात विचार आला होता. जेथे संरक्षणाची भिती वाटते तेथे मुलींना आनायच तरी कशाला? परंतु व्यक्ती स्वातंत्र आहे? त्यांनाही निसर्ग आनंद घेण्याची मोकळीक आहे त्यामुळे तोंडातील शब्द तोंडातच दाबले. याच लेणीच्या वरांड्यात रात्र साजरी करायची होती. सकाळ होताच परतीला निघायच होत. मस्त गप्पा माराव्यात म्हटले तर बसायला जागा नव्हती. लेणीच्या आतमधल्या रूम मध्ये दोघांसाठी जागा होती. त्यामध्ये मी आणि विनू झोपलो. टिंग्या व सोबती व अमोल त्याचे सोबती वरांड्यात झोपले. रात्र जवळपास जागुनच काढली. सकाळी लवकर उठून धुक्यातच परतीला लागलो. मंदिर, तारामती शिखर, कोकणकडा व बालेकिल्ला पहावयाचे स्वप्न स्वप्नच राहून गेल होतो. जडपावले टाकत आम्ही पुन्हा पावसातच व धुक्यात हरवलेल्या वाटा शोधत परतीला लागलो. प्रथम ओढा ओलांडताना तेथेच हातपाय तोंड धुत फ्रेश होऊन चालू लागलो. दुरवरून आवाज कानी येत होता. वाचवा वाचवा. Help help. आमचे लक्ष तो आवाजाची दिशा वेधू लागले. कानोसा घेत घेत आम्ही त्या दिशेने चालू लागलो. आता दोन महिलांचा आवाज कानी स्पष्ट ऐकू येत होता. आम्ही त्यांना धिर देण्यासाठी ओरडून सांगत होतो. काळजी करू नका आम्ही पोहचतोय.

त्या महिला खुप घाबरलेल्या होत्या. रात्री साधारण दोनच्या सुमारास लेणीतुन बाहेर पडल्यानंतर रस्ता भरकटलेल्या होत्या. ओरडून ओरडून त्यांची आवस्था खुप वाईट झाली होती. खाली टिंग्या आणि मित्र तयार होऊन पाऊलवाटेवर आम्हाला दिशा दाखवण्यासाठी उभे होते. त्या महिलांना रस्ता दाखवत आम्ही त्या हरवलेल्या वाटेला धुक्यामध्ये शोधत शोधत वापस टोलारखिंडीत कधी पोहचलो समजलेच नाही. येथून पुढे धुके संपले होते. खुप पाऊस येऊ लागला होता. आम्ही झपाझप उतरणीला लागलो होतो पुन्हा घरट्याकडे परतन्यासाठी.

लेख व छायाचित्र – श्री रमेश खरमाळे
शिवनेरी भुषण
माजी सैनिक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here