शूर वीर धोंडोजी वाघ

By Discover Maharashtra Views: 3647 5 Min Read

शूर वीर धोंडोजी वाघ

शके १७२२ च्या भाद्रपद व. ७ रोजी प्रसिद्ध पुरुष धोंडोजी वाघ हे इंग्रजांकडून ठार झाले.
मराठेशाहीच्या पडत्या काळांत दक्षिणेत धोंडोजी वाघ यांचे मोठेच प्रस्थ होते. यांचे मूळचे आडनांव पवार असे असून सिधोजी व बहिरजी पवार हे दोघे आदिलशाहीच्या नोकरीस होते.

धोंडोपंत गोखले आणि धोंडजी वाघ यांचे वैमनस्य वाढतच गेले होते . एकदा पुढे झालेल्या एका झटापटीत धोंडोपंत गोखले हे झाड लागून घोड्या खाली आले. पाठलागावर असलेल्या धोंडजी वाघाने त्यांना पकडून जीवच मारले .वस्तुतः वाघाची बंडखोरी त्याच्या अगोदर पासूनच चालू होती. वाघाला ठार करण्यासाठी इंग्रज ,पटवर्धन आणि गोखले यांचे प्रयत्न चालू होते. पण वाघाने कोणालाही दाद दिली नाही .वाघांना पकडून देणाऱ्याला वेलस्लीने हजारो रुपयांची बक्षिसे जाहीर केली होती . एवढेच नव्हे तर प्रत्येक वेळेला तो इंग्रजांना आणि पटवर्धन ,गोखल्यांना नव्या अडचणीत आणून सोडत असे . या सर्वांनी संयुक्तपणे वाघाला कोंडीत पकडण्यासाठी सर्व प्रयत्न केले ,पण तो सापडला नाही .याचे कारण असे होते की वाघ स्वतःतर मोठा शूर आणि हिकमती होता, पण त्याने कर्नाटक भागातील देसाई ,देशपांडे, वतनदारांची सहानुभूती मिळवली होती .
पेशवे ,पटवर्धन आणि इंग्रज यांनी वेळोवेळी या वतनदारांना त्रस्त केले होते .धोंडजी वाघाने वतनदारांना आपल्या बाजूला वळवून व पेशवे किंवा टिपू यांनी घेतलेली ठाणी सोडवून वतनदारांना परत दिली होती. त्यामुळे त्यांच्याविषयी देसाई, देशपांडे यांच्या मनात आदर उत्पन्न झालेला होता .त्यापैकी अनेकांनी आपले किल्ले केव्हाही उपयोगात आणण्यासाठी वाघाला देण्याचे कबूल केले होते .त्यामुळे वाघाची शक्ती वाढली आणि तो सर्वांनाच भारी ठरला.वाघाचे वाढते सामर्थ्य लक्षात घेऊन कोल्हापूरच्या महाराजांनीही त्यांचे साहाय्य मिळविण्याचा प्रयत्न केला आणि वाघानेही महाराजांचा आश्रम मिळविण्याची संधी उपयोगात आणली .

पटवर्धन आणि इंग्रज यांचे सख्य झाल्याने स्वाभाविकच कोल्हापूरच्या महाराजांना एक नवीच चिंता उत्पन्न झाली .पटवर्धन सूड उगविण्यासाठी इंग्रजांचे सहाय्य घेऊन कोल्हापुरवर स्वारी करतील असे महाराजांना वाटू लागले. त्यामुळे त्यांनी पुण्याला दौलतराव शिंदे व सखाराम घाटगे यांच्याकडे तर संधान बांधलेच , पण त्याबरोबरच आपल्या राज्याच्या जवळपास असलेल्या धोंडजी वाघासारख्या फोजबंद लढवय्याचे साहाय्य मिळविण्याचेही ठरवले. पटवर्धन आणि वेलस्ली या दोघांनाही वाघ शत्रू होते. त्यानी शिवाजीराजे (करवीर दुसरे )यांच्याशी सख्य करण्याचे ठरविले तेही आपल्या शत्रूला जेरीस आणण्यासाठी एक नवे आश्रयस्थान मिळावे यासाठी .महाराजांनी वाघाची मैत्री करण्याचे ठरवले पण इंग्रज त्यांची मैत्री होऊ देत नव्हते.

धोंडजी वाघाचे मूळ आडनाव पवार होते. पित्याचे नाव पिराजी . ते वाघझरी गावाचे वतनदार. वाघ नाव पडण्यासंबंधी अशी आख्यायिका सांगतात की ,त्याच्या कोणी पूर्वजाने विजापूरच्या बादशहाला वाघिणीचे दूध मिळवून देण्यासाठी जंगलातून एका दुभत्या वाघिणीला पकडून आणले व दूध काढून सादर केले. त्यावर बादशहाने खुश होऊन इनामे व वाघ हा किताब दिला .धोंडजीला टिपू सुलतानाने दोनदा पकडून कैदेत ठेवले .त्याला जबरदस्तीने मुसलमानही केले ; पण तो दोन्ही वेळा तुरूंगातून निसटला व फौज जमा करून भोवतालच्या प्रदेशावर जरब बसवून त्याने धामधूम चालू ठेवली.

प्रथम काही दिवस धोंडजी वाघ हे पटवर्धन व करवीरकर यांच्या फौजेत चाकरीत होते. टिपू व मराठे यांच्या मुलखांत धोंडोजीनें अनेक प्रसंगी दंगेधोपे करून लुटालूट केली. शेवटी टिपूने त्यांना कैदेत ठेविले. टिपु सुलतान मेल्यानंतर सर्व कैद्यांना मुक्त करण्यांत आले. त्यांत धोंडोजी वाघही सुटले; लागलीच जमवाजमव करून इंग्रजांनाही उपद्रव देण्यास यांनी सुरुवात केली. जनरल आर्थर वेलस्ली हा टिपूच्या राज्याचा बंदोबस्त पाहत होता. तुंगभद्रेच्या दक्षिणेस पुंडाई करणाऱ्या घोंडोजीचे पारिपत्य करण्याचे इंग्रजांनी ठरविले. पटवर्धन, इंग्रज व व धोंडोपंत गोखले यांच्या फौजा एकत्र झाल्या. परंतु वाघांनी मोठ्या धोरणानिशी गोखल्यांच्या फौजेचा पराभव केला. धोंडोजीची प्रतिष्ठा फारच वाढली. वाघाचें शिर आणून देणारास हजारो रुपयांचे बक्षीस जाहीर झाले! इंग्रज आणि पटवर्धन यांनी मोठी योजना आंखून चोही बाजूंनी वाघास

कौंडण्याचा विचार केला. हे वृत्त धोंडोजीस समजलेच. लागलीच ते मलप्रभेचा कांठ सोडून पूर्व
दिशेस कृष्णा-मुंगभद्रा यांच्या दरम्यान रायचूरच्या दुआंबात शिरले. मागून त्यांचा पाठलाग होत होता. शेवटी कोठेहि जाण्यास अवकाश राहिला नाही
वाघ रात्रीसच पळून जातो की काय या धसक्यामुळे इंग्रजांना चैन नव्हती….
वाघांना पकडण्यासाठी इंग्रजांनी त्याच्या फौजेत फितुरीचे राजकारण केले .त्याच्या हाताखालच्या पठाण टोळ्यांना हाताशी धरले आणि अखेर 10 सप्टेंबर १८०० रोजी नंदीहाळजवळ लढता-लढता धोंडोजी वाघास १० गोळ्या लागून ते ठार झाले.

लेखन – डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर पुणे

संदर्भ – करवीर रियासत, स.मा.गर्गे

खांदेरीचा रणसंग्राम

Leave a comment