दिपाबाई बांदल

By Discover Maharashtra Views: 11755 7 Min Read

दिपाबाई बांदल…

दिपाबाई बांदल यांच्या आत्या सईबाई राणीसाहेब, दिपाबाई या फलटणच्या नाईक निंबाळकरांच्या.

आमच्याकडे अनंत काळापूर्वीची समुद्राच्या पाण्याखाली गेलेल्या मथुरा नगरीचे अस्तित्व आढळते, टीव्हीवरच्या बातम्यांमध्ये नको त्या विषयांवर कंटाळवाण्या चर्चा राजरोज घडतात. या व अश्या कित्येक गोष्टींवर मोठमोठाली चर्चासत्र देखील रंगतात, रामायणातील अमुक अमुक प्रसंग इथे इथे घडले आहेत असे 10 वेळा रिपीट करून सांगितले जाते. पण साडेतीनशे – चारशे वर्षापूर्वीचा काळ अभ्यासायचा म्हटलं तर इथे चाचपड़ावं लागतं ही खरी मराठेशाही इतिहासाची शोकांतीकाचं म्हणावी लागेल.

लोकांचे अडाणीपण, इतिहासाविषयची कृष्टता यांमुळे मराठ्यांचा इतिहास काळाच्या ओघात कुठेतरी मागे पडला आणि छत्रपती शिवाजीचा राजेंचे भाऊ कोण विचारले तरं मग तान्हाजी अशी उत्तरे मिळू लागली. जर शककर्त्या छत्रपती शिवरायांविषयी एवढी माहिती समाजाला असेल तर त्यांच्यासाठी जीवाच्या बाजीने लढलेल्या असंख्य मावळ्यांचा पराक्रम तर केवळ इथल्या गडकोटांनीचं पाहिला, आणी तेचं एकमेव या गोष्टीचे मूक साक्षीदार म्हणावे लागतील.

राजमाता जिजाबाई, महाराणी ताराराणी, अहिल्याबाईजी होळकर  सोडल्या तर  मराठा इतिहासाशी निगडित चौथी स्त्री सांगायला कौन बनेगा करोड़पतीच्या लाइफलाइन सुद्धा कमी पडाव्यात हीच सत्य परिस्थिती. पण आता चुलीत जाऊनं ख़ाक होण्यापासून वाचलेल्या, पोटमाळयावरील ट्रंकेत अखेरच्या घटका मोजत वाळवीशी लढणाऱ्या कागदपत्रातून आम्ही काहीतरी खऱ्या अर्थानं शोधण्याचा प्रयत्न केला आणि मराठा इतिहासातं मोलाची कामगिरी बजावलेल्या तरी कळत नकळत वगळण्यात आलेल्या एका कर्तबगार महिलेचे चित्र त्यातून स्पष्ट झालं आणि त्या महिला म्हणजे “दिपाऊ बांदल” होय.

महाराष्ट्रात जेव्हा परकीय सत्तांसाठी आप्तस्वकीयांच्या सर्रास कत्तली केल्या  जात हा तो काळ. स्वतःच्या मर्दुमकीच्या जोरावर अनेक मोठमोठ्या कुटुंबांनी आपली छाप महाराष्ट्रावर पर्यायानं इतिहासावर पाडली अश्यांपैकी एक असणाऱ्या निंबाळकर घरण्यातील “साबाजी राजे नाईक निंबाळकर” यांच्या घराण्याची लेकं “दीपाई” बांदल घराण्याची लक्ष्मी म्हणून हिरडस मावळातील नाईक बांदल देशमुख यांच्या घराण्यात आल्या.

दिपाबाई बांदल यांच्या पोटी जन्माला आलेला रणमर्द योद्धा म्हणजे “बाजी बांदल” होय.  ‘बांदल घरानं म्हणजे फितूर, स्वराज्याच्या कार्यात त्यांनी नेहमीच आड़काठी केली, रोहिड़ा जेव्हा स्वराज्यात दाखल झाला तेव्हा कृष्णाजी बांदलांचा विरोध मोडून त्यांना यमसदनी धाडले गेले आणि त्यानंतर उपरती होऊन बांदल घराण स्वराज्याच्या सेवेत दाखलं झाले, असे शालेय पुस्तकापासून मोठमोठ्या इतिहासकारांच्या कादंबरयातून सांगण्यात आले’.

परंतू बांदल घराण्यात असणाऱ्या या हरहुन्नरी, कर्तबगार स्त्रीचे कार्य आणि त्यांच्यासंबधीचे उल्लेखचं बोलके, की जेणे करून इतिहासचं आपोआपच बोलका झाला आणि बांदल यांच्यावरील ऐकवल्या जाणाऱ्या बंडल गोष्टी बंद झाल्या. पण अजूनही इतिहासाचे अज्ञान असणारी मंडळी त्याच त्याच विषयांची घोकम पट्टी करते, हे मोठे दुर्दैव.

मराठ्यांच्या आपापसातील युद्ध असोत वा शत्रू शाह्यांशी केलेली निकराची पंजेफाड़, संपूर्ण ताकदिनीशी पाठिंबा देणे हेचं दीपाई बांदल यांनी आपले आद्य कर्त्यव्य समजले., कान्होजी जेधे आणि कृष्णाजी बांदल यांच्यातील लढाई दरम्यान लढण्यासाठी कृष्णाजींस दीपाई साहेबांनी  शंभु प्रसाद नावाचा घोडा दिला होता, अशी इतिहासात नोंद आहे.

स्वराज्याच्या लुटुपुटुचा खेळ शिवरायांनी जेव्हा नुकताचं मांडला, तेव्हा नुकताचं मांडलेला डाव मोडून काढण्यासाठी विजापुरी दरबारने पाठवलेला कसलेला सरदार फत्तेहखान आणि त्याची कैक हजाराची फ़ौज स्वराज्यावर चालून आली यावेळी खळद बेलसर येथे स्वराज्याचा पहिला रणसंग्राम झाला., हे घडलेलं युद्ध सगळ्या जाणकारांना ठाऊक असेलचं., पण याचं युद्धात स्वराज्याला मदत म्हणून स्वता:च्या दिमतीस असलेलं सैन्य या लढ्यात शिवरायांच्या बाजूने लढण्यासाठी म्हणून दीपाई बांदल यांनी पाठवले हे ठाऊक असलेली लोकं नगण्यचं.

१६५९ साली स्वराज्यावर आलेली अफझलरूपी टोळधाड़ कायमची गर्दीस मिळविण्यासाठी झालेल्या प्रतापगडाच्या महाप्रतापी पर्वात “दिपाऊ बांदल ” यांचा सक्रीय सहभाग असल्याची नोंद इतिहासात आहे., पण आम्हाला ते कधी दिसलचं नाही कारण आम्हाला इतिहास माहितीये तो एवढाचं “विसरलात का वाघनखे”

राजं पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकले, तेव्हा अतिशय मुरब्बी राजकारणी पत्रांची, शब्दांची देवाणं घेवाणं करून, शत्रुला गाफिल ठेवत, मराठ्यांचा मुकुट शत्रुच्या तावडीतून निसटला खरा पण शत्रूला या गोष्टीचा सुगावा लागताचं त्यांचा पाठलाग सुरु झाला, पण लाख मेले तरी चालेल पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजेल एवढ्या जबरदस्त महत्वकांक्षी स्वराज्यनिष्ठा आपल्या मनाशी होती, म्हणूनचं गजापूरच्या खिंडीत स्वतःच्या देहाची चाळण करण्यासाठी बाजी बांदल हे खडे ठाकले आणि त्यांनी राजांना विशाळगडी जाण्यसाठीची विनंती केली., हे बाजी बांदल म्हणजे या वीर मातेचा वीर सुपूत होयं. राजे दुष्मनाच्या गर्दीतून निसटले खरे पण त्यासाठी या बांदल घराण्याने हसत हसत सूतक आपल्या घरावर घेतले., सूतक चढलेल्या घराला सांत्वन करण्याच्या आपल्या पूर्वपार चालत आलेल्या पद्धती प्रमाणे, जिजाऊनी स्वतः जातिनिशी जाउन दिपाऊंचे सांत्वन केल्याच्या उल्लेखाची नोंद आपण कुणी घेतली नसेल पण ती ऐतिहासिक दस्तऐवजात झाली हे नशिबचं. “पोटचं पोरं गेल्याचं समिंदराएवढं दुःख त्या माईनी कसं सोसले हे तिचं तिलाचं ठावं”

याचं युद्धानंतर भरविण्यात आलेल्या जखमदरबारात शाहीर अज्ञानदासानं गायिलेल्या पोवाड्यात जेधे आणी बांदल घराण हे शिवरायांना, प्रभू श्रीरामचंद्राला लभलेल्या अंगत-हनुमंताप्रमाणे नोंदवले गेले आहे., आणी याचं गजापुरच्या खिंडीतील पराक्रमापाई बांदल घरण्याला तलवारीच्या पहिल्या पातीचा मान मिळाला.

जशा दीपाई उत्तम माता, होत्या तश्या त्या उत्तम प्रशासकदेखील होत्या हे मानायला देखील इतिहासचं भाग पाड़तो., अत्ताच्या काळात चालणारे जमिनीचे तंटे हे त्या काळात देखील चालायचेचं तेव्हा शिवरायांना यात लक्ष घालून त्यासंदर्भात योग्य तो न्यायनिवाडा करावा लागायचा., अश्याच एकदा डोहर देशमुख यांच्या जमीनीविषयक तंट्यावर निवाडा करण्याची वेळ शिवरायांवर आली तेव्हा त्या निवाडा सभेत म्हणजे तत्कालीन कोर्टात न्यायाधीश म्हणून “दीपाई बांदल “या कार्यरत होत्या.

मिर्झाराजा जयसिंग जेव्हा स्वराज्यावर चालून आला, तेव्हा नाइलाजास्तव त्याच्यासोबत तह करणे शिवाजी राजांना भाग पडले., आणि याचं तहाच्या कलमानुसार राजे आणि बाळ संभू राजांना आग्र्यास बादशहाच्या भेटिस जावे लागले, मोघल दरबारी असणाऱ्या रिवाजाप्रमाणे यांच्यासोबत दगा होऊन पिता पुत्रास कैददेखील घडली, तेव्हा राजगड़ी जाउन दिपाबाई बांदल यांनी जिजाऊस धीर दिल्याचे उल्लेख देखील आपणास मिळतात .फक्त तटस्थ इतिहासकाराच्या हाती हा लेखाजोखा जायला हवा एवढीचं माफक अपेक्षा.

प्रस्तुत लेख वाचूनसुद्धा जरं कोणास रामाची सीता कोण असा प्रश्न उद्भवत असेल तर दस्तूरखुद्द “छत्रपती शिवरायांची प्रथम पत्नी, युवराज संभाजी महाराजांच्या मातोश्री “सईबाईसाहेब “राणीसरकार यांच्या दिपाऊ बांदल ह्या आत्त्या होतं”.

कर्तुत्व, त्याग, पराक्रम परंतु पूर्णपणे अपरिचीत असणाऱ्या या मराठा स्त्रीची, पर्यायाने बांदल घराण्याची तत्कालीन पत – प्रतिष्ठा काय असेल यविषयीची गोळा बेरीज वाचकांनीचं केलेली बरी….!

– अभिषेक कुंभार

Leave a comment