सोयराबाई राणीसाहेब या स्फटिका प्रमाणे निर्मळ आहे.

Discover-Maharashtra-Post | महाराष्ट्रातील कलचुरी राजघराणे

सोयराबाई राणीसाहेब या स्फटिका प्रमाणे निर्मळ आहे.

सोयराबाई राणीसाहेब या शिवरायांच्या तृतीय पत्नी असून त्या तळबीडच्या मोहिते घराण्यातील होत्या. त्यांचे लग्न १६५० पूर्वी शिवरायांशी झाले होते. शिवपूर्वकाळात मोहिते घराणे म्हणजे आदिलशहाच्या दरबारात एक मानकरी होते.छत्रपतींच्या भोसले घराण्या बरोबर हे घराणे दक्षिणेत उदयास आले. हंबीरराव मोहिते यांचे पणजोबा रतोजी मोहिते हे अहमदनगरच्या निजामशाहीत लष्करी सेवा बजावत होते .सन १५८४ साली निजामशाहीत उद्भभवलेली बंडाळी त्यांनी मोडून टाकली, तेव्हा निजामशहाने त्यांना ‘ बाजी ‘हा किताब बहाल करून त्यांचा मोठा सन्मान केला .तेव्हापासून त्यांचे वंशज स्वतःला ‘बाजी ‘ मोहिते म्हणवून घेऊ लागले.रतोजींचे पुत्र तुकोजी मोहिते यांनी तळबीडची पाटीलकी हस्तगत केली. तेव्हापासून मोहिते मंडळी तळबीडचे रहिवासी बनले .

या रतोजीना तीन अपत्ते झाली. संभाजी, धारोजी व कन्या तुकाबाई . यापैकी संभाजींचे लग्न घाडगे घराण्यातील मुलीशी तर धारोजी यांचे लग्न घोरपडे घराण्यातील मुलीशी झाले. घाडगे व घोरपडे हे दोघेही आदिलशाही सरदार होते. त्यांनी आपल्या जामातांना आदिलशाही दरबारात रुजू करून घेतले. सन १६२२ मध्ये दक्षिणेत एक महत्त्वाची घटना घडली .निजामशाही दरबारातील पराक्रमी सरदार शहाजीराजे भोसले त्या शाहीवर रूसून आदिलशाही दरबाराकडे आले. आदिलशहाने त्यांचा मोठा सन्मान करून त्यांना “सरलष्कर” ही पदवी व आपल्या वतीने पुणे प्रांताची जहागिरी बहाल केली.आदिलशहाच्यावतीने पुणे प्रांतावर आपला अंमल बसवीत असता निजामशाही सेनानी साबाजी अनंत यांच्याशी शहाजीराजांची सालप्याच्या घाटात लढाई झाली .या लढाईत शहाजीराजांच्या सोबत असणाऱ्या संभाजी व धारोजी या मोहिते बंधूंनी मोठे पराक्रम व शौर्य गाजवले .स्वाभाविकच राजांची त्यांच्यावर मर्जी बसली. या दोन्ही बंधूंनी १६२५ साली आपल्या बहिणीचा म्हणजे तुकाबाईं यांचा विवाह शहाजीराजांशी घडवून आणला. अशाप्रकारे ते राजांचे मेहूणेच बंनले.पुढे राजानी आदिलशहाला खास विनंती करून या बंधूंना १६२६ मध्ये तळबीड व बालघाटाची देशमुखी मिळवून दिली.

संभाजी व धारोजी हे मोठे पराक्रमी सेनानी होते .त्यांच्या पराक्रमाचे वेळोवेळी आदिलशहाने केलेले कौतुक अनेक आदिलशाही फर्मानात पहावयास मिळते.पुढे लवकरच संभाजी मोहिते यांना शहाजीराजांनी सुपे परगण्याचा सरहवालदार म्हणून नेमले पुढे हे संभाजी कर्नाटकात गेलेले दिसून येतात .हंबीरराव, सोयराबाई ,अण्णुबाई ही संभाजींना तीन मुले .अण्णुबाई व्यंकोजीराजांना दिल्या तर सोयराबाई छत्रपती शिवाजी राजांच्या पत्नी झाल्या .सोयराबाई अत्यंत सुस्वरूप व लवकरच त्या पुत्रवती झाल्या. सईबाईं राणीसाहेब यांच्या मृत्यूनंतर पट्टराणी म्हणून सोयराबाईंना मान मिळाला. अपत्यहीन राज्ञी प्रजाजनांचे पुत्रवत पालन करू शकत नाही असा धर्म संकेत होता म्हणून सईबाई राणीसाहेब यांच्या मृत्यूनंतर पट्टराणीचा मान सगुणाबाई राणींना न मिळता पुत्रवती म्हणून हा मान सोयराबाईं राणीसाहेब यांना मिळाला. सोरराबाई राणी यांना ना दोन अपत्ये झाली. दीपाबाई उर्फ बाळीबाई या कन्या. यांचा विवाह विसाजी उर्फ विश्वासराव यांच्याशी झाला व छत्रपती राजाराम महाराज हे पुत्र त्यांचा विवाह हंबीरराव मोहिते यांच्या कन्या ताराराणी यांच्याशी झाला पुढे मोहिते व भोसले यांचे घनिष्ठ संबंध शिवशाहीत निर्माण झाले होते .

२७ऑगस्ट १६८०रोजी एका गोसाव्याला छत्रपती संभाजीराजांनी दानपत्र दिले .त्यात त्यांनी वापरलेले हे वाक्य. शिवछत्रपतींच्या मृत्यूला सोयराबाई राणीसाहेब कारणीभूत आहेत, त्यांनी महाराजांवर विषप्रयोग केला अशी अफवा `पुराव्यानिशी ʼसादर करतो, म्हणून पसरवणाऱ्या इतिहास कारांसाठी ही एक चपराक आहे. सोयराबाई राणीसरकारांना संभाजी महाराज आईसमान मानत, त्यांचा त्याच पद्धतीने मान-मरातब होता. आणि त्यांचा मृत्यूही नैसर्गिकरित्या झालेला आहे .शेवटी त्या महाराणी होत्या. भोसले कुळाच्या सून होत्या. (संभाजी महाराज यांनी लिहिलेले पत्र आपल्याला “ज्वलज्वलन तेजस संभाजीराजा ” या डॉक्टर सदाशिवराव शिवदे यांनी लिहिलेल्या पुस्तकात पाहायला मिळेल.)

लेखन
(इतिहास लेखिका)
डाॅ. सुवर्णा नाईक निंबाळकर पुणे

खांदेरीचा रणसंग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here