धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग २७

By Discover Maharashtra Views: 3553 7 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग २७…

थंडीचे दिवस सरतीला लागले. राजे मोहिमेवरून राजगडावर येत असल्याची वर्दी आली. पेणभागात मिऱ्या डोंगराजवळ राजांची आणि शास्ताखानाचा सरदार

नामदारखान याची गाठ पडली होती. लढाईच्या चकमकीत राजांचे कृष्णाजी बाबाजी हे सुभेदार कामी आले. वाघोजी तुपे जाया झाले होते त्यांचा विचार मनात घोळत असतानाच राजे राजगडावर आले. आणि याच दरम्यान बरेच दिवस मनात घोळत असलेली एक पुरानी ख्वाइश औरंगजेबाने दिल्लीत बसून पुरी करून घेतली!

ग्वाल्हेरच्या अदबखान्यात असलेल्या आपल्या कैदी भावाला – मुरादला मुल्लामौलवींच्याकडून खुनी ठरवून त्याला कुराणे शरीफच्या कौलाने ‘सजा-ए- मौत ‘

बहाल केली. तुरुंगात खितपत पडलेल्या मुरादला दोन जल्लादांनी साखळदंडासकट बाहेर काढला. त्याच्यावर मौलवींनी अहमदाबादच्या “अली नकी या इस्लामी बंद्यांचा खून लादला होता. दिल्लीचा ‘बादशहा ‘ होण्यासाठी गुजराथ सुभा सोडून औरंगजेबाला सामील झालेला मुराद, “खुनी म्हणून ग्वाल्हेरच्या रयतेला साखळदंडासह दाखविण्यात आला! मयूर सिंहासनाचे स्वप्न पाहण्याचा मूर्खपणा करणाऱ्या मुरादला ग्वाल्हेरच्या “कत्तलीच्या चबुतऱ्या’वर चढविण्यात आले. बकरी ईदचे बकरे जेवल्या जाहीर शांतपणाने तोडण्यात येते, तेवढ्या ठंडपणाने

औरंगजेबाच्या जल्लादांनी मुरादची गर्दन ग्वाल्हेरच्या भर चौकात धडावेगळी केली!!

“शहाजादा मुरादचे प्रेत “बागीं’च्या’ म्हणजे “बंडखोरांच्या कब्रस्तानात दफन करण्यात आले! दाराला पूर्वीच दफा करण्यात आले होते, आता मुरादला मारण्यात आले; पण या नाचीज बाबींचा परिणाम ‘अबुल मुझफ्फर मुहिउद्दिन मुहम्मद औरंगजेब बहादूर आलमगीर पातशहा गाझी! ही किताबत लावणाऱ्या औरंगजेबाच्या खाजगी जिंदगीवर

व्हायचे काहीच कारण नव्हते. मुरादला कत्ल केल्यापासून तीन महिन्यांच्या आतच त्याने मुहम्मद अकबर याचा औरंगाबादेत शाही थाटात दावत घालून ‘सुंता !

साजरा केला!

‘औरंग ” म्हणजे ‘सिंहासन’! ‘जेब’ म्हणजे त्याची ‘शोभा वाढविणारा” हेच खरं!!

आपल्या नावाचा असा और मतलब फक्त औरंगजेबाच्या खानदानी शाही रक्तालाच सुचणारा होता! शिवाजीसारखे ‘काफर’ सिंहासनाला “गादी ‘ म्हणत होते. त्या गादीची

शोभा वाढविणाऱ्या गुणाला “इमान म्हणत होते! असला “गावंढळ’ मतलब औरंगजेबाला मात्र मुळीच मान्य नव्हता!

▶ राजगडावर कदरेच्या सदरेसाठी मोरोपंत, अण्णाजी दत्तो, निळो सोनदेव, नेताजीराव, येसाजी अशी मंडळी जमली होती. सदरबैठकीवर राजे, जिजाऊ आणि शंभू

सुखावले. राजांनी हाताने इशारत करताच सारी मंडळी बिछायतीवर बसली.

भंडारा उधळून राजांनी मनसुबा खुला केला –

“आमच्या कारभाराच्या कानुजाबत्यात काही फेर करणे आहे. ही सदर आम्ही त्या कारणे बोलावली. शास्ताखान पुण्यात तळ टाकून दौलतीच्या उरावर असता कारभाराचा गाडा हरबाबीत सावध, हुशार असणे हिसाबी आहे.

“आम्ही ज्या-ज्या असामींचा कसकानोसा मनी धरला आहे, त्यांचा मरातब करून त्यांना सल्ला म्हणून मनची बात बोलू

“हे राज्य श्रींचे. आम्ही श्रींचे भुत्ये म्हणोन एका हाती पोत आणि दुसऱ्या हाती पट्टा घेतला आहे. जे अंगेजणीने अवघियांच्या पाठबळावर आम्ही पैदा केले, ते आबादान

करून त्याहून अधिक राज्याचा घेर कैसा वाढेल, याची चिंता साऱ्यांनी करणे आहे.

“ज्यांचा आम्ही आज मरातब करतो आहोत, त्यांनी बरे ध्यानी धरावे की, पाठीवर मायेची थाप भरली तर धावणीचे मुके जनावरसुद्धा इमानाची स्वारीसंगत देते! मायेचा एक बोल दिला, तर आमचा मावळा उभं काळीज पायावर टाकण्यास रजाबंद होतो.

“नवे राज्य उभे करणे कठीण. त्याहून जतन करणे महाकठीण आणि वाढीला लावणे तर महामुश्कील! हे देवाधर्माचे राज्य साऱ्यांनी तोलून धरिले पाहिजे! या

राज्यासाठी जे-जे कामी आले त्यांची याद जागती ठेवून त्यासाठी हिमतीने कस्त केली पाहिजे!

“हाती सत्ता आली की, माणूस बिघडणे बघतो. अधिक सत्ता आली की, माणूस अधिक बिघडण्याचा खतरा असतो. अधिकार हे बंधन घालणाऱ्या लगामासारखे असतात.

त्याचा कोणाही अश्रापाच्या पाठीवर ओढणेचा कोरडा होणे वाजवी नाही!

“आम्ही तुमचे गुण पारखतो आहोत. तुम्ही आमच्या मावळलोकांचे गुण पारखले पाहिजेत! लहान-थोर साऱ्यांनाच हातजोड देऊन, बसत्यास उठता, उठत्यास चालता आणि चालत्यास दौडता केला पाहिजे! अवघियांस कार्यी लावून जाणते राजकारण उभे केले पाहिजे! ”

आबासाहेबांचे हे सारे बोल शंभूराजे एकचित्त होऊन ऐकत होते, मनी साठवीत होते. राजे बोलता-बोलता उभे राहिले. त्यांनी आपल्या खाजगीच्या कारभाऱ्यावर नजर

जोडून इशारत केली. एक मोठे तबक घेतलेल्या हुजऱ्यासह कारभारी राजांच्या तर्फेला पेश झाला.

🚩मोरोपंत पिंगळ्यांच्यावर नजरेचा मोहरा धरून राजे बोलले – “मोरोपंत, सदरेसामने या! ”

मोरोपंत लगबगीने उठले. उपरणे सावरीत ते राजांच्या समोर आले. मुजरा घालून, हात बांधीत, खालगर्दनीने अदबीत राजांच्या समोर उभे राहिले.

राजांनी हुजऱ्याच्या हातातील तबकातले जरीच्या नकसदार काठाचे सफेद उपरणे उचलले. मोरोपंतांच्या खांद्यावर ते चढवून सदरेकडे बघत राजे म्हणाले,

👉“आजपासून मोरेश्वर निळकंठ पिंगळे श्रींच्या राज्याचे पेशवे! आम्ही राज्यावर चालून येणारा गनीम आमच्या डोळ्यांनी पारखू आणि त्यास नतिजा देऊ. राज्यातील

कारभार पंतांच्या जागरूक डोळ्यांनी बघू! ”

मोरोपंत गहिवरून गेले. त्यांनी वाकून राजांच्या पायांना हात लावून तो आपल्या मस्तकाला टेकविला. त्यांना खांद्याला धरून वर उठवीत राजांनी त्यांच्या छातीला छाती

भिडवीत त्यांची ऊरभेट घेतली. पंतांनी जिजाऊंना आणि शंभूबाळांना मुजरा घातला.

👉मोरोपंतांची मुजुमदारी राजांनी निळो सोनदेवांना दिली. अण्णाजी दत्तो प्रभुणीकर यांना सुरनिशीची वस्त्रे बहाल केली. ‘पंडितराव’ हे धर्मशास्त्र जाणणाऱ्या विद्वानासाठी नवे पद निर्माण करून ते रघुनाथभट यांना दिले.

कदरेची ही सदर उठण्यापूर्वी राजांनी नेताजी पालकरांना सुपे भागात धामाधूम घालणाऱ्या नामदारखानाचा बंदोबस्त करण्याची कामगिरी जोडून दिली.

सदर उठली. “शास्ताखानास कोण हुन्नराने शास्त द्यावी,’ याचा विचार मनाशी झुंजवीत राजे आपल्या महालाकडे निघून गेले. जिजाऊंच्या संगती चालणारे शंभूराजे मात्र

एकाच बाबीला मनात घोळवीत होते – “आबासाहेब केवढे साजरे बोलतात! बसत्यास उठता – उठत्यास चालता – आणि चालत्यास दौडता केला पाहिजे!!’

▶ हुकुमाप्रमाणे नेताजीराव फौजबंद होऊन सुप्याजवळ नामदारखानाच्या फौजेवर तुटून पडले. हातघाईची चकमक उडाली. जोरावर असलेल्या खानाबरोबर नेताजींच्या शिबंदीचा निभाव लागला नाही. या चकमकीत खासे नेताजीच वर्मी जखमी झाले. त्यांनी माघार घेतली. नामदारखान आणि सरफराजखान नेताजींच्या पाठलागावर पडले, पण त्यांना हूल भरून नेताजी राजगडाच्या वाटेला लागले. जाया झालेले नेताजी राजगडावर आले. राजांनी स्वतः: त्यांच्या जखमा जातीने पाहिल्या. तबीबांना नेताजींच्या जखमा औषधी भरून आवळण्यास सांगून राजांनी नेताजींना विश्रांतीचा सल्ला दिला.

खुद्द सरनौबतच जाया झाल्यामुळे राजांचे हात आखडले. त्यातच पावसाला सुरुवात झाली. वेडावलेले आकाश मावळांवर कोसळू लागले. राजगडावरच्या

खासेमहालांच्या छपरावरून पागोळ्या पाघळू लागल्या. लाल ओहोळ गड उतरू लागले.

राजांनी या पावसाळ्यात वाकेनविसीची वस्त्रं गंगाजी-मंगाजी यांना बहाल केली.

पुरे पाच महिने धुडगूस घालून पावसाळा पळाला. बारा मावळांतून खबरा येऊ लागल्या. नामदारखानाने पुन्हा उचल खाल्ली होती. तो टप्प्यात येतील ती गावठाणं

तसनस करीत चालला होता. रोहिडा खोऱ्यातून कान्होजी जेध्यांचे चिरंजीव बाजी जेधे यांचे खानाच्या मुलूखमारीचे बयाजवार वर्णन करणारे पत्र आले.

त्याला उत्तर पाठविण्यासाठी राजे सदरेवर बसले होते. त्यांच्या शेजारी जिजाऊ आणि शंभू बसले होते. बाळाजी आवजी हे चिटणीस राजांच्या तोंडून फुलणाऱ्या

मजकुराची फुले लेखणीने कागदावर रचीत होते. राजे एकसुरात मजकूर सांगू लागले

क्रमशः- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग २७…

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव

Leave a comment