महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

पन्हाळगडावरील अंबरखाना ऊर्फ धान्यकोठार

By Discover Maharashtra Views: 1715 2 Min Read

पन्हाळगडावरील अंबरखाना ऊर्फ धान्यकोठार –

प्रत्येक गडावर बालेकिल्ला असतो. यामध्ये बहुधा खजिना, शस्त्रसाठा ठेवला जातो. मात्र पन्हाळगडावरील बालेकिल्ल्यात अन्नधान्याचा साठा ठेवला जात असे. या वास्तूस अंबरखाना’ ऊर्फ ‘धान्यकोठार’ म्हटले जाते.पन्हाळगडावरील अंबरखाना.

पन्हाळगडावरील अंबरखाना हा बालेकिल्ला भोजराजाने १०५२ मध्ये बांधला. बालेकिल्ल्यामध्ये गंगा, यमुना आणि सरस्वती या तीन धान्यकोठ्या आहेत. यामध्ये एकूण २५ हजार खंडी (१ खंडी = २० पोती) धान्य मावत असे. भात, नागली व वरी असे धान्य यामध्ये साठवले जाई. यामधील गंगा कोठीचे क्षेत्रफळ १०,२०० चौ. फूट आहे. तिची उंची ३५ फूट आहे. यमुना व सरस्वती या अनुक्रमे १५२ फूट लांब, ४० फूट रुंद, १८ फूट उंच व ८८ फूट लांब, ३५ फूट रुंद आणि ३० फूट उंच आहेत. सर्व कोठ्यांना प्रकाश व हवेसाठी झरोके ठेवले असून भक्कम बांधकाम तोफ मारूनही न पडण्यासारखे आहे.

या शेजारी असणाऱ्या भूमिगत कोठारामध्ये शस्त्रसाठा आणि चांदीची नाणी तयार करण्याची टांकसाळ होती. धान्य कोठाराजवळ एक छोटे महादेव मंदिर आहे. यामध्ये असणाऱ्या पिंडीसाठी वापरण्यात आलेला शाळीग्राम एक विशिष्ट प्रकारचा आहे. तापमानामध्ये ज्याप्रमाणे बदल होईल त्याप्रमाणे या शाळीग्रामचा रंग बदलत जातो. म्हणून यास रंग बदलणारी पिंड’ म्हणतात. बालेकिल्ल्याच्या संरक्षणासाठी सभोवार मोठी तटबंदी असून त्या बाहेर ९ फूट रुंद व १० फूट खोल असा खंदक होता.

शिवरायांनी २८ नोव्हेंबर १६५९ रोजी पहिल्यांदा पन्हाळा जिंकला तेव्हा चंद्रप्रकाशामध्ये त्यांनी सर्व गड फिरून पाहिला. त्यांना पहायची होती अजस्त्र अशी धान्यकोठारे. सिद्दी जौहरने गडास सव्वाचार महिने वेढा दिला होता, तेव्हा अंबरखान्यातील धान्यसाठ्यावरच गडावरील सर्व सैन्य, हत्ती, घोडे अवलंबून होते. या कोठारातील धान्य संपत आल्याचे दिसताच महाराजांनी १२ जुलै १६६० रोजी पन्हाळगडावरून विशाळगडाकडे कूच करण्याचे ठरविले.

© प्रथमेश फाळके.

Leave a comment