महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

झुंज भाग ६

By Discover Maharashtra Views: 4044 16 Min Read

झुंज भाग ६ –

(झुंज – कथा रामशेजची)

खरे तर इतका छोटा किल्ला घेण्यासाठी तोफांचा वापर करणे खानाला कमीपणाचे वाटत होते. आणि म्हणूनच तोफखाना जवळ असून देखील त्याने तोफांचा वापर करणे टाळले होते. पण आता त्याशिवाय दुसरा कोणता पर्यायच किल्लेदाराने त्याच्यापुढे शिल्लक ठेवला नव्हता. काहीशा नाराजीनेच त्याने दरबानाला आवाज दिला.

“जी हुजूर…” आल्या आल्या खानाला कुर्निसात करत तो मान खाली घालून उभा राहिला.

“तोपची खुदाबक्षको बुलाव…” त्याच्याकडे लक्षही न देता खानाने आज्ञा केली. परत एकदा त्याला कुर्निसात करत दरबान बाहेर पडला. काही वेळाने तो परत आत आला.

“हुजूर… तोपची खुदाबक्ष आए है…” त्याने वर्दी दिली.

“उसे अंदर भेजो…” खानाचा हुकुम होताच दरबान बाहेर गेला आणि पाठोपाठ खुदाबक्ष शामियान्यात हजर झाला…

“हुजूर…”

“खुदाबक्ष… तुम्हारे पास कितनी तोपे है?” खानाने प्रश्न केला.

“हुजूर… बीस बडी और पचास छोटी…”

“ठीक है… आज हमे किलेपर चांदसितारा देखना है…”

“हुजूर… जरूर दिखेगा…”

तोफांचा वापर करून किल्ल्यावर हल्ला केला जाणार हे समजताच खानाच्या सैन्यात नवचैतन्य आले. किल्ला घेणे आता आपल्याला काहीच अवघड नाही असेच ते समजून चालत होते. एकेक करून सगळ्या तोफांनी आपली जागा घेतली.

किल्ल्याच्या तटबंदीवरून किल्लेदार देखील हे पहात होता. खानाचे दोन डावपेच तर त्याने उध्वस्त केले होते. पण आता वेळ आणीबाणीची होती. तोफांना तोंड देणे तितकेसे सोपे काम नव्हते. तोफगोळ्यांनी एखादा बुरुज ढासळला तरी गनीम शिरजोर ठरणार होता. आता मात्र किल्लेदाराने परत सगळ्यांना गोळा केले.

“मंडळी… येळ आनिबानीची हाये… खानाच्या तोपा गडाखाली दिसून ऱ्हायल्या. आपला किल्ला तोपांपुढं किती तग धरंल ह्ये काय आताच सांगता यायचं नाई. तवा समदे पोरं आनी बायामाणसं हायेत त्यास्नी आदी धान्याच्या कोठारात धाडून द्या. आन प्रत्येकानं दबा धरून बसायचं हाये. एकादा बुरुज ढासळला तर फौज तितून यायचा प्रयत्न करील. तवाच समद्यांनी तितं तुटून पडायचं. येक बी गनीम जित्ता नाय रायला पायजे. आपल्या शिवाजी राजानं येळप्रसंगी २०० लोकास्नी घिवून दोन हजारच्या सैन्याला धुळ चारली. आपन तर पाचशे मानसं… आपले शंभूराजे येकाच येळेला पाचपाच शत्रू अंगावर घेतेत. मंग आपन कामून मागं ऱ्हायचं? आपला देव आपल्यासंग हाये तवा घ्या देवाचं नांव आन तुटून पडा शत्रूवर… हर हर महादेव…” किल्लेदाराचे भाषण प्रत्येकाच्या अंगात नवचैतन्य फुलवून गेले. प्रत्येकाने एकदा शिवाजी राजांचा, संभाजी राजांचा जयघोष केला आणि शक्य तो आडोसा घेतला. त्याच बरोबर त्यांच्या तलवारी म्यानातून बाहेर आल्या.

सगळ्या तोफां आग ओकण्यासाठी सज्ज झाल्या होत्या. सगळ्यात मोठी तोफ खुदाबक्षाने गडाच्या दरवाज्याच्या बाजूने उभी केली. सर्वात आधी मोठी तोफ डागली जाणार होती. खुदाबक्ष स्वतः त्याला आग देणार होता. लवकरच एक मोठा गोळा तोफेत ढकलण्यात आला. तोफेची मागची बाजू दारूने ठासून भरण्यात आली आणि खुदाबक्षाने आपल्या कानात कापसाचे बोळे सरकवले. दारू भरणारे लोकं पटापट बाजूला झाले. त्यांनीही आपले पागोटे आपल्या कानाभोवती गुंढाळले. तसेच ते तोफेच्या बाजूने पाठ करून उभे राहिले. खुदाबक्षने पलिता पेटवला आणि तो तोफेच्या आग देणाऱ्या तोंडाजवळ नेला. त्याबरोबर सरसरत वाट पेटली. काही क्षणांचा अवकाश आणि कानठळ्या बसवणारा आवाज करत तोफ धडधडली.

तोफेच्या या आवाजाने पहिल्यांदाच खऱ्या युद्धाला तोंड फुटले होते. आता कोणत्याही पक्षाला माघार घेणे माहित नव्हते. फक्त मारणे किंवा मरणे यापैकी एकच गोष्ट त्यांच्यापुढे शिल्लक राहिली होती.

आता मात्र किल्लेदारासह सगळ्यानीच शक्य तो आडोसा घेतला. पण झाले भलतेच. तोफेच्या तोंडून निघालेला गोळा किल्ल्याच्या तटबंदीपर्यंत पोहचू शकला नाही. त्यानंतर एकानंतर एक आवाज होतच राहिले पण एकही गोळा तटबंदीपर्यंत पोहचत नव्हता. बऱ्याच वेळानंतर तोफांचे गोळे आपल्या पर्यंत पोहचत नाहीत हे लक्षात आल्याबरोबर एकेक करून सगळ्यांनी परत एकदा तटबंदीजवळ गर्दी केली. तोफा धडाडत होत्या आणि गडावरील लोकं फक्त त्यांची गंमत पहात होते. खानाचा हा तिसरा डावपेच देखील पूर्णतः फोल ठरला. देव पूर्णपणे आपल्या बरोबर आहे याची जणू खात्रीच गडावरील लोकांना झाली. खानाचा जळफळाट झाला तर किल्लेदाराच्या चेहऱ्यावर स्मितरेषा उमटली.

आठ दहा दिवस किल्ल्याच्या दिशेने तोफांचा मारा चालूच होता पण त्याचा काहीही उपयोग आतापर्यंत झालेला नव्हता. तोफेचे तोंड वरील बाजूला असल्यामुळे तिची मारकक्षमता कमी होत होती. आता जो पर्यंत यावर कोणता नवीन तोडगा निघत नाही तोपर्यंत विश्रांती घेणेच खानाला क्रमप्राप्त झाले.

अनेक वेळेस प्रयत्न करूनही किल्लेदार सैन्याला किल्ल्यापर्यंत येऊ देत नव्हता. अनेक दिवस विचार केल्यानंतरही जेव्हा खानाची बुद्धी चालेना त्यावेळेस त्याने आपल्या सैन्यातील अधिकारी लोकांची सभा बोलावली. सगळे लोकं आलेले पाहताच खानाने कोणतेही आढेवेढे न घेता मूळ मुद्द्याला हात घातला.

“सब जानते है, वो काफर किलेदार अभीतक हम सबको चीढा रहा है, हमे यहां आये बहोत दिन हो गये पर हम एक छोटेसे किलेपर अपना चांदसितारा लेहेरानेमे नाकामयाब रहे है. हम बादशहा को क्या मुह दिखाएंगे? हम चढनेकी कोशिश करते है तो वो पत्थर फेकते है. क्या ये हम बादशहा को बोलेंगे? हमारे पास तोपे है फिर भी हम काफिरोंको शिकस्त देनेमे कामयाब नही हो पाए. अब जो कोई इसका हल निकलेगा उसे बादशहा सलामत की तरफ से दस गांवकी जहागिर दी जाएगी…” खान बोलायचे थांबला आणि अधिकाऱ्यांमध्ये चुळबुळ चालू झाली. प्रत्येक जण एकेक कल्पना मांडत होता आणि दुसरा ती कशी चुकीची आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होता.

“हुजूर… मनमे एक खयाल है, इजाजत हो तो…” इतके बोलून तो अधिकारी अडखळला.

“हां… बोलो…” खानाने फर्मावले.

“पर हुजूर… थोडा वक्त लगेगा…”

“ठीक है… जो भी है बोलो.”

“हुजूर, अगर हम यहांपर उस किलेजितना उंचा दमदमा बना ले और उसपर अपनी तोपे ले जाए तो हम किला आसनीसे ले सकते है.” यावर सगळ्यांमध्ये एकच हशा पिकला. कारण किल्ल्याच्या उंचीचा दमदमा बनवणे बिलकुल सोपे काम नव्हते. बरे नुसते दमदमा बनवून चालणार नव्हते. त्यावर मोठ्या तोफा चढवल्या जाणार होत्या. म्हणजेच तो दमदमा तितका मजबूतही पाहिजे होता. सगळे हसत असताना फक्त दोनच जण गंभीर होते. एक म्हणजे ज्याने हा विचार मांडला आणि दुसरा शहाबुद्दीन खान.

“चूप रहो सबलोग…!” खान भडकला. वातावरण एकदम शांत झाले.

“हां… तुम बोलो…” विचार मांडणाऱ्या अधिकाऱ्याकडे पाहत खान म्हणाला.

“हुजूर… अपने पास अभीभी आठ हजार लोग है. अगर १ हजार लोग किलेको घेरे रहेंगे तो भी सात हजार लोग चाहे तो हम ये कर सकते है. उसके लिए जो लकडी लगेगी वो इसी जंगलको काटकर हम ले सकते है.” त्याने आपली कल्पना सांगितली आणि खान खुश झाला.

“बहोत खूब…! जैसे ही किलेपर चांदसितारा फडकेगा, तुम्हे तुम्हारा इनाम दिया जाएगा…!” आनंदात खान म्हणाला आणि सभा संपली.

—————————————

किल्लेदार नेहमीप्रमाणे जय्यत तयारीनिशी तटावर हजर होता. खानच्या सैन्यात वाढलेली हालचाल त्याला काहीसे व्यथित करत होती. कारण त्याचा अर्थ होता की नवीन तयारीनिशी खान परत किल्ल्यावर आक्रमण करणार. आता पर्यंत जरी त्याचे मनसुबे सफल झालेले नसले तरी युद्धामध्ये कधी काय घडेल काही सांगता येत नव्हते. त्यामुळेच जराही गाफील राहणे किल्लेदाराला मंजूर नव्हते. दोन घटका होऊनही अजून किल्ल्यावर चढाईचा प्रयत्न झालेला नव्हता. सैन्याची हालचाल तर दिसत होती. किल्लेदाराच्या चेहऱ्यावर चिंता पूर्णपणे दिसून येत होती. जर संपूर्ण सैन्याने आक्रमण केले तर किल्लेदाराची मुश्कील वाढणार होती.

चार घटका झाल्या आणि खानाचे सैन्य आजूबाजूला पांगू लागले. गडावर चढण्याऐवजी ते गडाच्या विरुद्ध दिशेला कूच करत होते. खानाने माघार घेतली म्हणावे तर वेढा कायम होता. त्यामुळे खानाची यामागे काय रणनीती असावी याचा किल्लेदाराला काहीच अंदाज येईना.

किल्लेदाराचा संपूर्ण दिवस फक्त वाट पाहण्यात गेला. या संपूर्ण दिवसात त्याने जेवणाचीही पर्वा केली नव्हती. थोड्या थोड्या वेळात किल्ल्याच्या संपूर्ण भागात जाऊन त्याची पाहणी चालूच होती आणि तरीही त्याला जे दिसत होते त्यावर त्याचा विश्वास बसत नव्हता. खान आजूबाजूला जाऊन नवीन सैन्य घेऊन येतोय असे समजावे तर त्याच्याजवळ असलेले सैन्यही काही कमी नव्हते. बरे जादा कुमक मागवायची तर त्यासाठी संपूर्ण सैन्याची गरज ती काय? चार सहा घोडेस्वार देखील त्यासाठी पुरेसे होते. वेढा तर जराही ढिल्ला पडलेला दिसत नव्हता. शेवटी विचार करून किल्लेदाराचे डोके दुखू लागले पण खान काय करतो आहे याचा काहीही बोध त्याला होईना.

संध्याकाळ झाली. खानाचे पांगलेले सैनिक परत आपापल्या ठिकाणी गोळा झाले पण त्यांच्याकडून किल्ल्यावर आक्रमण होण्याचे कोणतेही चिन्ह दिसेना. सूर्य मावळला तसे गार वारे वाहू लागले. गारठा क्षणाक्षणाला वाढू लागला. पण किल्लेदाराला मात्र तो जाणवत नव्हता. त्याचे लक्ष फक्त आणि फक्त किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या मुगल सैन्यावर होते. रात्र झाली तसा त्याने त्याच्या सहकाऱ्याला आवाज दिला.

“तात्या…”

“जी किल्लेदार?” तात्या काहीसा धावतच त्याच्या पुढ्यात आला.

“आज काई म्या वाड्यावर जानार नाई… कुनाला तरी वाड्यावर धाडा. आन माह्यासाठी हितच भाकर बांधून आना… ह्यो खान येवढा सरळ मानुस नाई. त्यो काय ना कायतरी डाव टाकनार. आपन गाफील ऱ्हायलो तर मंग किल्ला त्याच्या ताब्यात जायला कायबी येळ लागायचा नाई…”

“व्हय जी… पर म्या काय म्हनतो, आमी हाय नव्हं त्याच्यावर पाळत ठिवायला?” तात्यानं चाचरत प्रश्न केला.

“आरं त्ये समदं ठीकच हाय पर म्या हितं ऱ्हायलो तर समदे लोकं डोळ्यात तेल घालून पहारा देतीन…” किल्लेदाराने तात्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तसे किल्लेदाराचा हुकुम मोडणे तात्याला शक्यही नव्हते त्यामुळे काही न बोलता तो स्वतःच किल्लेदाराचे जेवण आणण्यासाठी वाड्याकडे रवाना झाला.

संपूर्ण रात्र किल्लेदार आणि त्याचे सहकारी अगदी डोळ्यात तेल घालून पहारा करत होते पण खानाच्या फौजेने कोणत्याही प्रकारची चढाई केली नाही. शेवटी पहाट झाली तसा किल्लेदार आपल्या सहकाऱ्यांवर टेहाळणीची जबाबदारी टाकून वाड्याकडे निघाला.

किल्लेदार घरी पोहोचला त्यावेळेस त्याची बायको वाटच पहात होती.

“काय मंडळी… आजूक वाट बघतायसा?” त्याने काहीशा थट्टेच्या सुरात विचारले.

“मंग… धनी जागे ऱ्हायल्यावर आमच्या डोळ्याला डोळा सुदिक लागनं व्हय?”

“आवो… पर आमची जिंदगी आमची नाई, या रयतेची हाये… त्यावर रयतेचा अधिकार…”

“ठावं हाय मला पन आमची जिंदगी तर तुमची हाये नव्हं…!!!” किलेदाराची बायको लाजत लाजत म्हणाली आणि किल्लेदाराचा पूर्ण शीण नाहीसा झाला. एकतर सध्याच्या काळात जी परिस्थिती उद्भवली होती त्यात स्वतःसाठी फक्त असे काहीसे क्षणच चोरावे लागत होते.

“बरं मंडळी… आम्हास्नी आमची हार कबूल हाय…” किल्लेदार बायकोकडे पहात मिश्किलपणे म्हणाला आणि त्याच्या खाली मान घातलेल्या बायकोने तोंड वर केले.

“नाई… काय बी झालं आन समोर कुनीबी असलं तरी तुमी हार मानायची नाई. तुमास्नी शिवाजी राजाची शपथ हाये…” तिच्या चेहऱ्यावर किल्लेदाराने वापरलेल्या ‘हार’ या शब्दाबद्दलची नापसंती ठळकपणे दिसून येत होती. यावर काय बोलावे हेच त्याला कळेना.

“हंग अस्सं… आता बादशा आला तरी हार माननार नाई… आता तू बी उल्शिक आराम करून घे.” सांगत किल्लेदार आराम करण्यासाठी निघून गेला आणि त्याची बायको मात्र उठून कामाला लागली.

दिवसांमागून दिवस जात होते. वेढा कायम होता. अधूनमधून तोफाही धडधडत होत्या पण त्याची त्रिव्रता नसल्यातच जमा होती.

खानाचा तळ अजूनही हललेला नव्हता. आणि एक दिवस किल्लेदाराला काही सैन्य परत येताना दिसले. जाताना खाली हाथ गेलेले खानाचे सैनिक येताना काहीतरी घेऊन येत होते. अनेक बैलगाड्या, घोडागाड्या यावर लाकडे आणली जात होती. किल्ल्याच्या आजूबाजूचा हिरवा परिसर काहीसा कमी होत होता. आजूबाजूला दिसणाऱ्या हिरव्या रंगाची जागा तपकिरी काळ्या रंगाने घेतली होती. याचा अर्थ साफ होता. लढाई अजूनही संपलेली नव्हती. उलट ती आता जास्त आक्रमकपणे लढली जाणार होती.

गडाच्या पायथ्याशी लाकडांचे ढीग पडू लागले. कित्येक जण त्या लाकडांपासून फळ्या / खांब तयार करू लागले. खान आता जास्तच सक्रीय होऊन लाकूडकाम करणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवू लागला. या काळात त्याने किल्ल्यावर करण्यात येणारे आक्रमण पूर्णपणे थांबवले होते. जसजसे दिवस जाऊ लागले, किल्लेदाराला खान काय करतो आहे याचा अंदाज येऊ लागला. त्याने लगोलग तुका आणि सदूला बोलावले.

“गड्यांनो… वर्स होत आलंय पन खान अजूकबी हितंच हाये. त्यो काय करतोय ते तुमी बी बघितलं. त्यानं जर गडाच्या उंचीचा बुरुज बनविला मंग आपल्याला नमतं घ्यावं लागन. त्यापरीस आपन त्याचा ह्यो बेत हानून पाडायचा. आनी त्यासाठी आपल्याला लाकडाची तोप बनवावी लागन. तुका हाये ना तुज्या ध्यानात?”

“व्हय जी…” तुकाने सांगितले.

“मंग लागा कामाला…” किल्लेदाराने हुकुम सोडला आणि दोघही इतर काही जणांना मदतीला घेऊन कामाला लागले. जवळपास २५ दिवसात पहिली तोफ तयार झाली आणि किल्ल्यावरील लोकांमध्ये एकच चैतन्य संचारले. संभाजी महाराजांनी पाठविलेला दारुगोळा आता सगळ्यात जास्त उपयोगी पडणार होता. इकडे लाकडी बुरुजाचे कामही खूप जोरात चालू होते. खानाच्या सैन्याचे संपूर्ण लक्ष फक्त लाकडी बुरुज बनवण्यावर होते. बुरुज वर वर चढत होता आणि खान मनातून खुश होत होता.

नवीन बनविलेली लाकडी तोफ तटाजवळ आणली गेली. चामड्याच्या खळग्यात गोळा ठेवण्यात आला आणि किल्लेदाराचा हुकुम होण्याची सगळेजण वाट पाहू लागले. किल्लेदाराने हुकुम दिला. गोळा सुटला आणि आपले श्रम उपयोगी पडले याचे समाधान तुका आणि सदूच्या चेहऱ्यावर उमटले. पण त्यांचा हा उत्साह फक्त काही क्षणच टिकला. गोळा ज्या ठिकाणी पडला तिथपासून खानाचे सैन्य बरेच लांब होते. जी गत खानच्या तोफगोळ्यांची होत होती काहीसी तशीच गत या गोळ्याची देखील झाली. त्यानंतर दोघांच्याही चेहऱ्यावर नैराश्य दिसू लागले.

“भले शाब्बास !!!” किल्लेदाराची शाब्बासकीची थाप तुकाच्या आणि सदूच्या पाठीवर पडली. आपले श्रम वाया गेले असे त्यांना वाटत होते पण किल्लेदाराची शाब्बासकी मिळतात त्याच्या मनात आलेले नैराश्य कुठल्या कुठे पळाले.

“गड्यानो… मला तुमचा अभिमान हाये… जवर तुमच्यासारखी मानसं संबाजी राजासंग असतील, तवर स्वराज्यावर कुनी बी चालून आला तरी त्याला मागं फिरावं लागंन. आज गोळा हितं पडला हाये. आपन उल्षिक प्रयत्न केला त त्यो सैन्यापोतूर बी पोचन. या तोपेचा पल्ला कमी पडू ऱ्हायला पन त्यावर बी आपन कायतरी उपाय शोधू…” किल्लेदाराच्या शेवटच्या वाक्यात काहीशी चिंता दिसून येत होती. पण त्याचा त्याच्या माणसांवर पूर्ण विश्वास बसला होता. पण नवीन तोफ बनवायची म्हटली म्हणजे परत काही दिवस जाणार होते. शेवटी खानाकडून हल्ला होईस्तोवर शांत राहायचे धोरण किल्लेदाराने स्विकारले. दुसरीकडे मात्र लाकडी बुरुजाचे काम अव्याहतपणे चालूच होते.

खानाचा किल्ल्याला वेढा पडून जवळपास दोन वर्ष होत आले होते. लाकडी बुरुजाचे कामही जवळपास पूर्ण झाले होते. जवळपास पाचशे माणसे एकाच वेळेस बुरुजावर उभे राहू शकतील इतका मोठा बुरुज बनविण्यात आला होता. खान जरी शत्रू होता तरी त्याच्या या बुरुजाबद्दल किल्लेदाराने मनोमन त्याचे कौतुक केले. पण आता त्याची चिंता अनेक पटीने वाढली होती. किल्लेदार जरी मनातून खचला नव्हता तरी खानाच्या या बुरुजाची तोड त्याला अद्याप मिळाली नव्हती त्यामुळेच तो काळजीत होता.

क्रमशः झुंज भाग ६.

मिलिंद जोशी, नाशिक…

झुंज भाग १

झुंज भाग 5

झुंज भाग 7

Leave a comment