महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

त्रिंबकजी डेंगळे

By Discover Maharashtra Views: 5079 6 Min Read

त्रिंबकजी डेंगळे.

त्रिंबकजी डेंगळे हे मध्यमवर्गीय  घरातली व्यक्ती होती.दुसर्या बाजीराव पेशव्यांच्या स्वामी निष्ठेमुळे ते  पेशव्यांच्या नजरेत भरले .बाजीराव पेशवे ( दुसरे )पुणे सोडून महाडला गेले तेव्हा त्रिंबकजी त्यांच्याबरोबर होते.त्रिंबकराव डेंगळे यांनी बाजीराव पेशवे यांचे गुप्त पत्र पुण्यात पोहोचवले,म्हणून पेशव्यांची त्रिंबकजी डेंगळे यांच्यावर मर्जी बसली.त्रिंबकजींनी  पेशव्यांच्या पडत्या काळात त्यांची अनेक कामे मोठ्या कौशल्याने पार पाडून त्यांची मर्जी संपादन केली.सातारच्या छत्रपतची देखरेख करण्याचे काम  त्रिंबकजी वर सोपवलेले पहिले मोठे राजकीय काम होते. ते त्यांनी चोख पणे पार पाडले .ही तारेवरची कसरत करीत असताना त्यांचा धोरणीपणा पेशव्यांच्या लक्षात आला होता.

पुण्यात पेशव्यांचा तोफखाना सरदार पानशे यांचेकडे  होता .त्याची व्यवस्था नीट होत नाही असे पाहताच पेशव्यांनी तो पानशांकडून काढून त्रिंबकजी डेंगळ्यांकडे सोपवला .इंग्रजांचे सामर्थ्य त्यांच्या तोफखाणन्यात आहे हे ओळखून त्रिंबकजीने मोठ्या हिमतीने भांबुर्ड्याला तोफांचा कारखाना सुरू केला.

त्रिंबकजीची हुषारी, तडफ, तरतरीतपणा, व कामांतील दक्षता पाहून ते बाजीरावांचे विश्वासु सेवक बनले.

वसईच्या तहानें आपलें स्वातंत्र्य नष्ट झाल्याची जाणीव रावबाजीस मधून मधून होई व तें पुन्हां मिळविण्याची त्याची इच्छाही होती. पण स्वतः कर्तबगार व धाडशी नसल्यानें कोणाची तरी त्याला मदत लागे.असे विश्वासु मदतनीस त्याच्याजवळ यावेळीं फारसे कोणी शिल्लक राहिले नव्हते. बहुतेकांनीं इंग्रजांशीं स्वतंत्र तह करुन आपापला स्वार्थ सांभाळला होता. त्रिंबकजी धाडशी असल्यानें पेशव्यानें त्यानाच हाताशीं धरिलें. त्रिंबकजी हे इंग्रजांचे द्वेष्ट्ये होते. इंग्रजांचा कावा ओळखून त्याला तोड देणारा व मराठी साम्राज्य टिकविण्यासाठीं धडपडणारा त्रिंबकजी हा बापू गोखल्याप्रमाणें पेशवाईंतील शेवटचा पुरुष होता.

नाना फडणीसानंतर इंग्रजांनां त्रिंबकजीचा धाक होता.

त्रिंबकजीनें महत्त्वाचीं ठाणीं आपल्या विश्वासू माणसांच्या ताब्यांत देण्यास सुरूवात केली.दक्षिणेंस धारवाडचा किल्ला मजबूत असल्यानें तो कबजांत घेण्याची त्रिंबकजी यांनी खटपट केली, परंतु तेथील किल्लेदार किल्ला त्याच्या हवालीं करीना, तेव्हां बापू गोखले यानें मध्यस्थी करुन किल्ला त्रिंबकजीस देवविला.  त्रिंबकजीनें पेशव्यास सल्ला देऊन पेशव्यांची मर्जी संपादन केली. त्रिंबकजी अत्यंत  कडक शिस्तीचा होता. त्याच्या शिक्षा सौम्य तर कधीं अत्यंत कडकही असत. ठरल्याप्रमाणें इनामदार लोकांनीं चुकारपणा करुन वसूल भरणा केला नाहीं तर तो त्यांनां शिक्षा करी.

१८१४ सालीं त्रिंबकजीनें गुजराथेंत सरकारी फौज पाठवून गायकवाडाकडे असलेले प्रांत ताब्यांत घेतले. कारण यावेळीं गायकवाडाचा गुजरात करार संपला होता व नवीन करार करावायाची गायकवाडांची इच्छा होती.त्यासाठीं त्यांचा दिवाण गंगाधरशास्त्री पटवर्धन हा पुण्यास पेशव्यांकडे आला. शास्त्री फार हट्टी, हेकट  इंग्रजांच्या बळावर सर्वांस तुच्छ लेखणारा होता. गायकवाडाकडे सरकारची बाकी १ कोटी निघाली. ती देऊन मग वाटल्यास करार करावा  असें दरबारांत ठरलें; परंतु गायकवाडानें तें नाकारलें व हें प्रकरण चिघळत चाललें.

इतक्यांत पंढरपुरास गंगाधर  शास्त्र्याचा खून झाला. या खुनाचा आरोप इंग्रजांनीं त्रिंबकजीवर केला;  हा खून त्रिंबकजीनें केला नव्हता. शास्त्र्यांचा खून करण्यांत पेशव्यांचा अथवा त्रिंबकजी यांचा  मुळीच फायदा नव्हता, कारण त्यामुळें गुजरात हातची जात होती, उलट शास्रिजींना जिवंत राखण्यांतच फायदा होता.आपल्या  मार्गांतील त्रिंबकजी यांचा कांटा काढण्यासाठीं इंग्रजांनीं खुनाचा आरोप त्रिंबकजीवर केला.

त्रिंबकजीनें आपला खुनाशीं कांही संबंध नाहीं किंवा आपणांस त्यासंबंधीं कांहीं माहितिही नाहीं असे चक्क सांगितले. तथापि इंग्रज रेसिडेंटनें आपल्या फौजेच्या बळावर त्रिंबकजीस आपल्या स्वाधीन करण्याविषयीं बाजीरावाच्या मागें लकडा लावला. पण बाजीराव त्रिंबकजी यांना इंग्रजांच्या हवालीं करण्यास तयार होत नव्हते. शेवटीं नाइलाजानें बाजीरांवानें त्रिंबकजीस वसंतगड नामक किल्ल्यांत अटकेंत ठेवीलें; तरीही इंग्रजांचें समाधान न होतां त्यांनीं त्रिंबकजीस आपल्याच हवालीं करण्याचा तगादा लावला तेव्हां घाबरून बाजीरावानें त्यास इंग्रजांच्या स्वाधीन केलें.

इंग्रजांनीं त्रिंबकजीस ठाण्याच्या किल्ल्यांत अटकेंत ठेवले. त्याच्यावर जे पहारेकरी ठेविले होते त्यांत बहुधा, खबरदारी घेण्याच्या उद्देशानेंच, एकही हिंदी माणूस ठेवला नव्हता. ह्याचा फायदा घेऊन त्रिंबकजीनें सप्टेंबरच्या  दरम्यान तटावरुन उडी मारुन आपली सुटका करुन घेतली.

त्रिंबकजी निसटून जाण्याच्या कांहीं दिवस अगोदर त्याची मित्रमंडळी व नोकरचाकर त्यांची वाट पहात होते. त्रिंबकजीस त्यांचा निरोप कळविण्याचें काम किल्ल्यांतील एका अधिकार्‍याच्या मोतद्दरानें केलें. त्रिंबकजीस ज्या खोलींत ठेविलें होतें तेथील शिपायाला मराठी येत नव्हते. त्यामुळे त्रिंबकजीचा कावा त्याला ओळखता आला नाही. त्रिंबकजीनें ज्या अडचणींतून आपली सुटका करुन घेतली ती हकीकत ऐकून लोकांत त्याच्याबद्दल कौतुक व आदर वाढला.

यानंतर त्रिंबकजीनें पुन्हां फौज जमवून कधीं नाशिक तर कधी संगमनेर अशा डोंगरांत, कधीं खानदेश बागलाणांत तर कधीं सातार्‍याकडील महादेव पर्वतांत फिरून इंग्रजांच्या विरुद्ध त्यानें दंगा उसळून दिला. त्याला पकडण्यासाठीं इंग्रजांनीं फार खटपट केली, परंतु पुष्कळ दिवस ती सिद्धीस गेली नाहीं. त्याचा खरा पत्ताच लागेना. तो आपल्या सासुरवाडीस  अहिरगांवीं गुप्‍तपणें जाऊन राहिला होता.

यावेळीं कोरेगांवची लढाई होऊन एलफिन्स्टननें आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला होता; त्याप्रमाणें पेशवाईंतील सर्व मराठे सरदार, इनामदार इंग्रजांनां मिळाले होते व रावबाजी एकटे पडले होते. इंग्रजांनीं तशाहि स्थितींत त्रिंबकजी हा पेशव्यांच्या तर्फे धुमाकूळ घालीत असल्यानें त्याला पकडण्यासाठीं मोठमोठीं बक्षिसें लाविलीं. तेव्हां एका स्त्रीनें व त्रिंबकजीचा नोकर नाना यानें फितूर होऊन, ब्रिग्ज यांस त्रिंबकजीच्या ठिकाणाची माहिती दिली. कॅ. स्वान्स्टन हा एक हजार घोडदळाची पलटण घेऊन अहिरगांवीं आला. यावेळीं त्रिंबकजी तेथें एकटाच होता; फौजपांटा मुळींच नव्हता. गांवची नाकेबंदी करुन इंग्रजांनीं पहाटें त्रिंबकजीच्या वाड्यास गराडा दिला. वाडा दोनदां तळघरें बळदासंकट शोधला, परंतु त्रिंबकजी सांपडेना. शेवटीं तिसर्‍यांदा पुन्हां शोधला तेव्हां मात्र त्रिंबकजी सांपडले. एका बळदांत एका लोखंडी चोरदाराच्या पलीकडे बुरूजावर जाण्याचा एक जिना होता. तिथली भिंत त्रिंबकजी फोडीत होता. त्याला धरण्यास जात असतां जिन्यावरील एका मराठ्यानें त्यांनां अडथळा केला. जीं जीं माणसें धरण्यास गेलीं तीं या मराठ्यानें आपल्या भाल्यानें ठार केलीं. त्यांची संख्या तीस भरली. शेवटीं स्वान्स्टननें भालाइतावर गोळ्या झाडण्यास हुकूम केला व त्यामुळें मात्र तो मराठा पडला. असा तो शूर भालाईत पुरुष नसून ती त्रिंबकजीची स्त्री आहे हें समजल्यावर स्वान्स्टन यास फार आश्चर्य वाटलें.

त्रिंबकजी भिंत फोडीत असतां, त्याच्या अंगावर जाण्याची हिंमत कोणाचीच होईना तेव्हां निराशेनें त्रिंबकजी आपणच होऊन इंग्रजांच्या स्वाधीन झाला. त्यास नंतर बंगालमध्यें एका किल्ल्यांत  अखेरपर्यंत कैदेंत ठेविलें. त्याची ९० हजार रुपयांची मालमत्ता इंग्रजांनीं जप्‍त करुन ती स्वान्स्टन यास बक्षीस दिली.शेवटी १६ आॅक्टोबर १८२९ रोजी या शूर त्रिंबकजी डेंगळे यांचा मृत्यू झाला.

लेखन – डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर पुणे

1 Comment