महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

गोष्ट रांझ्याच्या पाटलाची

By Discover Maharashtra Views: 4363 4 Min Read

गोष्ट रांझ्याच्या पाटलाची –

स्त्रियांवरच्या अत्याचाराची एखादी घटना आजूबाजूला घडली की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कडक कायद्याची आठवण सर्वांनाच होते. आपल्या गावातील स्त्री बरोबर बदअमल करणाऱ्या रांझ्याच्या पाटलाचा शिवरायांनी चौरंगा केला. अगदी अश्याच कठोर कायद्याची देशाला गरज असल्याचे बोलले जात. जाणून घेऊयात मग शिवकालीन पत्रामधून काय होती ही घटना आणि त्याचा नेमका काय परिणाम झाला.(गोष्ट रांझ्याच्या पाटलाची)

दिनांक २८ जानेवारी १६४६ (काही ठिकाणी १८ जानेवारी) रोजी खेडेबाऱ्याच्या देशकुलकर्णी याना लिहिलेल्या पत्रातुन हा सगळा प्रकार आपल्या समोर येतो. पत्रात सांगितल्या प्रमाणे मौजे रांझे गावचा मोकदम(पाटील) बाबाजी बिन भिकाजी गुजर याने बदअंमल केला. हे महाराजांना कळल्यावर त्याला महाराजांसमोर हजर केलं गेलं. आणि त्याचा गुन्हा सिद्ध झाल्यावर त्याची मोकदमी(पाटीलकी) जप्त केली. आणि “त्याचे हातपाय मारून दूर केला”. म्हणजेच चौरंगा केला गेला.

बदअमल केला या शब्द व्याख्येवरून बऱ्याच वेळा तो व्यभिचार की बलात्कार असा प्रश्न उपस्थित होतो.पण शेवटी तोही गुन्हाच या न्यायाने या वादात न पडलेलं बर. गुन्हेगाराला तात्काळ शिक्षा आणि चांगल्या कामाला तात्काळ बक्षीस या तत्वामुळेच शिवराय सहकाऱ्यांवर एकाचवेळी दबाव आणि आपुलकीच नात निर्माण करू शकले.बाबाजी बिन भिकाजी गुजर याची तक्रार आल्यावर तात्काळ चौकशी केली गेली आणि गुन्हा शाबूत झाल्यावर तात्काळ शिक्षा अमलात आणली गेली. Justice delayed is justice denied” अस म्हणलं जात. पण शिवरायांच्या काळात गुन्हेगारास तात्काळ शिक्षा आणि त्यावर तात्काळ अंमलबजावणी हे सूत्र वापरले आहे.

बरं हे इथच थांबलेल नाही, बाबाजी बिन भिकाजी गुजर याचा चौरंगा जरी केलेला असला तरीही त्यानंतर तो जिवंत आहे. आता बाबाजी बिन भिकाजी गुजर याला वारस न्हवता त्यामुळं त्याचा एक नातलग सोनजी बिन बनाजी गुजर राहणार किल्ले पुरंदर, याने त्याला आपल्या ताब्यात घेतलं आहे. ते ही सरकारात ३०० पादशाही होणाचा भरून.

पण आता बाबाजी बिन भिकाजी ह्याचा सांभाळ तर आपल्याला करायला लागणार पण आपली तेवढी ताकद नाही त्यामुळं बाबाजी बिन भिकाजी गुजर याची जी पाटीलकी सरकारने जप्त केलीय ती मला द्यावी अस अर्ज या सोनजी बिन बनाजी गुजर याने महाराजांना केला. आणि मग त्याला ती पाटीलकी म्हणजे रांझे गावची मोकदमी देण्यात आली. बरं ती अशीच नाही दिलीय त्यासाठी वेगळे २०० पादशाही होणं सेरणी म्हणून सरकारात जमा करायला लावले आहेत.

मूळ मोडी पत्राचा देवनागरी अनुवाद खालील प्रमाणे :

शिवरायांची राजमुद्रा

अजरख्तखाने राजश्री शिवाजी राजे दामदौलत हु बजानीब कारकुणानी व देशकुलकर्णीयांनी तर्फ खेडेबारे बिदानद सुरू सन सित आर्बेन अलफ बावाजी बिन भिकाजी गुजर मोकदम मौजे रांजे तर्फे मजकूर हा मौजे मजकुराची मोकदमी करीत असता याजपासून कांहीं बदअमल जाला हे हकीकत हुजूर साहेबांपाशी विदित जाली त्यावरून बेहुकमी तलब करून साहेबी हुजूर आणून वाजपुस करिता खरे जाले याजकरिता बावाजी मजकूर याची वतनी मोकदमी हुजूर अनामत केली बावाजीचे हातपाय तोडुन दूर केला ते वक्ती सोनजी बिन बनाजी गुजर किल्ले पुरंदर हे जनांत गोत म्हणून येऊन अर्ज केला जे आपले हाती देणे बराय अर्ज खातरेस आणून बावाजी मजकूर याचे माथा गुन्हेगारी होण पादशाही तीनशे करार केले ते सोनजी मजकूर याने देऊन बावाजीस हाती घेतले याचे पोटी संतान नाही हे कुळीचे गुजर म्हणोन साहेब मेहेरबान होऊन मौजे रांजे तर्फे मजकुरची मोकदमी सोनजी बीन बनाजी गुजर याचे दुमलाकरून याजपासोन दिवाण सेरणी होणं पादशाही दोनशे करार करून घेऊन मोकदमी यास दिधली असे यास कोणी मुजाहिम न होणे असल पत्र फिराऊन भोगवटीस देणे उजूर न करणे

मोर्तब सूद

या घटनेचा नेमका काय परिणाम झाला हे दाखवणारी घटना १६५२ साली घडली. ती काय आहे जाणून घेऊयात पुढच्या भागात.

संकलक : महेश तानाजी देसाई

Leave a comment