महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

सरनोबत प्रतापराव गुजर

By Sonu Balgude Views: 5041 8 Min Read

सरनोबत प्रतापराव गुजर…
स्वराज्याचे तिसरे सरसेनापती

कुडतोजी हे मूळचे सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील.
मुघलांनी केलेला अन्याय त्यांना सहन झाला नाही म्हणून त्यांनी एकट्याने विरोध सुरू केला.

एकदा एका लढाईत शिवराय अन कुडतोजीनी एकाच वेळी एका खजिन्याची शिकार केली,
त्यावेळी स्वराज्यासाठी एक होत कुडतोजींनी स्वतःला शिवरायांना अर्पण केले.
आणि मावळा म्हणून ते स्वराज्याच्या सेवेत रुजू झाले.

कुडतोजी कसे झाले प्रतापराव???

१६६५ साली जेव्हा मिर्झाराजा जयसिंग अन दिलेरखान प्रचंड फौजेसह स्वराज्यावर चालून आले, त्यांनी स्वराज्याची नासधूस चालू केली.
राजगड खोऱ्यातील अनेक गावे जाळली.
या सर्वामुळे शिवराय काळजीत पडले.
आपले स्वराज्य कसे वाचवायचे याचा विचार महाराज करत होते.

त्यावेळी एका तरण्याबांड पोराने हे पाहिले,
की माझा राजा विचारात आहे,
माझा राजा चिंतेत आहे.
त्या मिर्झाराजा मुळे माझ्या धन्याची चिंता वाढली, राजांची नींद हराम झाली.
आपण काहीतरी केले पाहिजे,
आपल्या राजाच्या डोक्यातला विचार आपण नाहीसा केला पाहिजे.

हे करायचे असेल ज्याच्यामुळे माझ्या राजा चिंतेत आहे त्यालाच आपण खतम केले तर.
आणि तो मावळा तडक मिर्झाराजाच्या महालाकडे गेला.
मिर्झाराजा आराम करत बसले होते,
तोवर कुडतोजी पहारेकर्यांना गुंगारा देत महालात पोचले.
त्यांच्याकडे खंजीर होते.

ते खंजीर घेऊन मिर्झाराजाला मारणार तेवढ्यात मिर्झाराजा सावध झाला अन कुडतोजी सापडले.
मिर्झाराजाने विचारले “तू शिवाजी राजांचा माणूस का?”
समोरून उत्तर आले “व्हय”.

मिर्झाराजांनी कुडतोजींना विचारले “हे सगळं तुला शिवाजी राजांनी सांगितलं नसणार,
कारण शिवाजी राजांनी जर सांगितलं असत

तर आज मी वाचलो नसतो.”

कुडतोजींनी मान डोलवून दुजोरा दिला.

अन मग मिर्झाराजांनी विचारलं की मला मारायला का आलास??

कुडतोजी उद्गारले,
“जवापसन तुमी आमच्या स्वराज्याव चालून आलायसा, तवापासून माज्या राजाची चिंता लय वाढलीय, राजांचा इचार वाढलाय.
त्ये बगवल न्हाई मला,
अन आलो हिकडं.”

मिर्झाराजाला कुडतोजीच्या धाडसाचं कौतुक वाटले.
कुडतोजींना त्यांनी माफ केले अन बोलले आमच्या सैन्यात येशील,
अन कुडतोजी कडाडले,
“आमचं इमान फकस्त शिवाजी राजांच्या पायाशी हाय हुजूर,
गद्दारीच रगात न्हाई आमचं.”
मिर्झाराजाने आदराने कुडतोजींना सोडून दिले.

जेव्हा ही गोष्ट महाराजांना समजली तेव्हा महाराज नाराज झाले,
आपल्या मावळ्यांनी नसते धाडस करायला नको होते असे त्यांना वाटले.
पण शत्रू सेनापतीच्या गोटात जाणे हा एक खूप मोठा प्रताप होता.
आणि म्हणूनच काय तर शिवरायांनी कुडतोजींना “प्रतापराव” हा खिताब दिला.
अन कुडतोजी प्रतापराव गुजर झाले

पुढे ते स्वराज्याचे तिसरे सेनापती झाले.

१६७३-१६७४ ला बहलोलखान स्वराज्यात धुमाकूळ घालत होता.
स्त्रियांवर अत्याचार करत होता,
रयतेवर जुलूम चालू होते.
ही गोष्ट शिवरायांना समजली अन शिवरायांनी प्रतापरावांना आदेश दिला की
सरनोबत त्या खानाचा निकाल लावा.

प्रतापरावांच्या गनिमिकाव्याने बहलोलखानास सळो की पळो करून सोडले.
उमराणीच्या लढाईत प्रतापरावांनी खानास शिकस्त दिली.
तुडव तुडव तुडवला त्याला.

पण प्रतापरावांची एक कमजोरी होती, ती म्हणजे ते भावनिक होते.
बेहलोलखान झुकला,
गयावया करू लागला.
हातापाया पडू लागला.

खानास ठाऊक होते की मराठा फौज शरण आलेल्याला कधी मरण देत नाही.
तो प्रतापरावांना बोलला,
“प्रतापराव एक बार बक्ष दो,
दोबारा इस स्वराज्य की तरफ मूडकर नही देखूनगा.
खुदा के लिये एक बार माफी देदो.”

हे बोलणं ऐकून प्रतापरावांना दया आली अन त्यांनी खानाला माफ केले.

ही गोष्ट तिकडे शिवरायांना समजताच राजे संतापले,
त्यांचा समज असा होता की बहलोलखान हा दुतोंडी मांडूळ आहे,
परत फिरून टांग मारणारच,
प्रतापरावांनी त्याला सोडायला नको होते.
हे एका सेनापतीला शोभले नाही.

अन महाराजांनी “सला काय म्हणोनी केला???” असा करारी प्रश्न विचारला.
त्यांनी तसा खलिता प्रतापरावांना धाडला.
त्यात महाराज कडाडले,
“खानास गर्दीस मिळवणे बिगर आम्हास आपले तोंड रायगडी पुन्हा दाखवू नये.” असा आदेश नेसरीत येऊन धडकला.

तो खलिता वाचून प्रतापराव बैचेन झाले,
महाराजांवर निस्सीम भक्ती असणाऱ्या मावळ्यास आम्हास तोंड दाखवू नका असे म्हणणे म्हणजे जणू भयंकर शिक्षाच.
प्रतापराव आतल्या आत जळू लागले.
तो बहलोलखान पुन्हा स्वराज्यास डीवचू लागला.

प्रतापरावांनी विचार केला,
महाराजांना तोंड न दाखवता जगणे हे मरण्यापेक्षा भयंकर आहे.
बहलोलखानास सोडले हाच सल रावांच्या मनात होता,
राहून राहून महाराजांचे ते शब्द समोर येत होते,
खानास गर्दीस मिळवणे बिगर रायगडी तोंड दाखवू नये.

प्रतापरावांना उठता बसता फक्त बहलोल दिसत होता.
जखमी सिंहासारखे प्रतापराव चवताळले होते.
शिवरायांचा राज्याभिषेक ४-५ महिन्यावर आला असताना सेनापती राजधानीबाहेर होते.

प्रतापरावांचा तळ त्यावेळी होता सामानगडावर.
असेच प्रतापराव रात्री आपल्या सोबत्यांसह बसलेले.
एकच वाक्य त्यांच्या डोक्यात होते.
तेवढ्यात त्यांना घोड्यांच्या टापांचा आवाज कानी पडला.
तो हेर होता,
हेर घोड्यावरून उतरला,
प्रतारावांनी विचारले,
“कोण खबर?”

हेर बोलला “सेनापती,
बेहलोलचा तळ पडलाय,”
प्रतापराव चमकले, अन विचारले “कुठे?”
हेर बोलला “नेसरीच्या खिंडीत. यवन झोपलेले आहेत.”
आणि प्रतापराव उठते झाले.
राजांचे शब्द त्यांच्या कानात शिशाचा रस ओतल्यासारखे पडत होते.

आणि प्रतापरावांनी आपल्या सोबत्याना विचारले,
कोण येतो,
तेव्हा त्या फौजेतून सात मावळे सोबत यायला तयार झाले.
१.विसाजी बल्लाळ
२.दीपोजीराव राऊतराव
३.विठ्ठल पिलाजी अत्रे
४.कृष्णाजी भास्कर(हे वेगळे)
५.सिद्धी हिलाल
६.विठोजी
आणि सातवे खुद्द सरनोबत प्रतापराव गुजर.

सात गडी सज्ज झाले.
घोड्यावर बसले,
रिकिबीत पाय खेचला अन सात घोडी सुसाट सुटली रात्री गडहिंग्लज जवळ नेसरीच्या दिशेने.
अन हेराला आदेश दिला की फौजेला घेऊन या.
पण मागून कुमक येईपर्यंत प्रतापराव रुकले नाहीत.

बेहलोलखानाचे सैन्य सुमारे १५००० च्या वरती होते. अन रावांकडे सात गडी होते.
त्या गर्द काळोखात काही दिसत नव्हते,
त्या काळोखात प्रतापराव बहलोल ची छावणी शोधू लागले.
त्याची छावणी भेटली,
तोवर बाकीच्या वीरांनी कापाकापी सुरू केली.

बघताबघता शत्रूची फौज जागी झाली.
सात वीरांसोबत झुंजू लागली.
मराठ्यांनी असंख्य यवन कापून काढले.
तोवर बेहलोलला जाग आली,
आपली तलवार घेऊन तो छावणीच्या बाहेर आला.
इकडे तोपर्यंत बाकीचे वीर मुघलांच्या वारांना खर्ची पडले होते.

पण प्रतापराव एकटेच लढत होते,
शिवराय म्हणायचे माझा एकेक मावळा शंभराला भारी आहे,
पण इथे एक एक वीर पाचशे पाचशेला भारी पडला होता.
तेवढ्यात बहलोल प्रतापरावांच्या समोर आला अन पुन्हा रावांना राजांचे शब्द आठवले अन प्रतापरावांनी हाताच्या मुठी आवळल्या.

घनघोर युद्ध झाले.
बेहलोनखानाने बोलण्यात गुंतवून वार केला.
पण शेवटी प्रतापराव देखील पडले.

अवघे सात मराठे सुमारे पंधरा हजार फौजेवर चालून गेले.
यात काय नाही,
दुर्दम्य विश्वास, पराकोटीची स्वामिनिष्ठा,
आपल्या धन्याच्या शब्दखातर जीव देण्याची तयारी.
हो, हे वेडच होत
स्वराज्यखातर केलेलं.

प्रतापरावंचं ठीक पण त्या सहांपैकी एकाचे ही पाय अडखळले नाहीत. केवळ मरणावर चालून गेलेले ते सात वीर हे मराठी इतिहासातील एक स्वर्णीम पराक्रम पर्व आहे.
प्रतापराव आणि सोबतचे सहा सरदार मरण पावले. महाराजांना अतीव दु:ख झाले. स्वराज्याची अपरिमित हानी झाली.

पण शौर्य म्हणजे काय हे सगळ्या जगाने पाहिले.
कुसुमाग्रज यांचे ते गाणे ऐकायला किती छान वाटते ना “म्यानातून उसळे तरवारीची पात,
वेडात मराठे वीर दौडले सात.”

शिवरायांनी प्रतावरावांच्या नंतर त्यांच्या कार्याची अन मैत्रीची जाणीव ठेवत आपला मुलगा राजाराम महाराज आणि प्रतापरावांच्या कन्या जानकीबाई यांचे लग्न लावून दिले.
धन्य ते महाराज अन धन्य ते मावळे.

हा सगळा रणसंग्राम २४ फेब्रुवारी १६७४ साली घडला होता.
आकाशातून उल्का कोसळल्या दर्यात.
असे सुद्धा या प्रसंगाचे वर्णन केले जाते.

सोनू बालगुडे

Leave a comment