मिर्झा राजा जयसिंग

By Discover Maharashtra Views: 3708 7 Min Read

मिर्झा राजा जयसिंग…

मिर्झा राजा जयसिंग : (१५ जुलै १६११–२८ ऑगस्ट १६६७). मोगलांचे राजकार्यधुरंधर, मुरब्बी व निष्ठावान सेनापती. राजस्थानातल्या अंबरच्या राजघराण्यात जन्म. महाराजा जयसिंह (जयसिंग) वयाच्या दहाव्या वर्षी अंबरच्या गादीवर बसले. स्वतःला श्रीरामांचा पुत्र कुश यांचे वंशज म्हणजेच कच्छवाह राजपूत म्हणविणाऱ्या या घराण्याचे मोगलाशी पूर्वापार सलोख्याचे संबंध होते. राजस्थानातील बहुतांश राजपुतांप्रमाणे अंबरचे राजघराणेदेखील मोगलांचे मांडलिक तर होतेच; पण राजकीय फायदा आणि आपसांतील शत्रुत्वावर मात करण्यासाठी त्यांनी आपल्या घरातील मुली मोगल बादशहा अथवा शहजाद्यांना देऊन नातेसंबंधही निर्माण केले होते. जयसिंहांचे आजोबा भगवानदास यांची बहीण जोधा ही अकबराची पत्नी होती, तर जयसिंहांच्या वडिलांची बहीण म्हणजे महाराजा मानसिंहांची बहीण मानबाई जहांगिराची पत्नी होती. आपला वंश, राजपुती शान यांबरोबरच त्यांना या नातेसंबंधांचाही अभिमान वाटत असे.

शहजादा शाहजहानला गादी मिळवून देणाऱ्या काही मोजक्या राजपुतांपैकी महाराजा जयसिंह हे एक होत. १६२८ मधील मोगल सत्तांतराच्या काळात खान जहान लोधीच्या पठाणी सैन्याच्या बंडाचा बिमोड करून महाराजा जयसिंहांच्या उदयास सुरुवात झाली. या शौर्याचे पारितोषिक म्हणून त्यांना चार हजारांची मनसबदारी देण्यात आली. १६३६ च्या दरम्यान महाराजा जयसिंहाने बादशहा शाहजहानच्या बरोबरीने दक्षिणेतील सुलतानांशी लढताना अतुल्य पराक्रम करून आपल्या यशात भर घातली. त्याच्या पुढील काळात गोंड राजघराण्याविरुद्ध स्वतंत्रपणे उघडलेल्या मोहिमेत त्यांनी अपार यश मिळवले. त्यामुळे त्यांच्या मनसबदारीत एक हजारांनी बढती मिळून ते पंचहजारी मनसबदार झाले आणि अजमेर प्रांतातील चौसा परगणा त्यांच्या जहागिरीस जोडण्यात आला. अंबरच्या उत्तरेस सातत्याने त्रास देणाऱ्या पुंड पाळेगारांचा कायमचा बंदोबस्त करून त्यांनी आपल्या पूर्वजांच्या राज्याच्या सीमादेखील विस्तारल्या.

१६३८ मध्ये शहजादा शुजाबरोबर कंदाहार मोहिमेवर असलेल्या जयसिंहांच्या पराक्रमामुळे इराणचा सफाविद सरदार अली मर्दान खान याला कंदाहारचा किल्ला मोगलांना देणे भाग पडले. अली मर्दान खान याला इराणमधून काही मदत मिळू नये यासाठी त्यांनी काबूलमध्ये पन्नास हजाराची फौज जमवून त्याची पुरती कोंडी केली आणि शहजादा शुजाची कंदाहार मोहीम पार पडली. त्यांच्या या पराक्रमाचे कौतुक बादशहा शाहजहानने त्यांना ‘मिर्झा राजाʼ ही पदवी देऊन केले. मिर्झा म्हणजे राजपुत्र. महाराजा जयसिंहांना मिळालेल्या या पदवीने त्यांचे मोगल दरबारातील स्थान अधोरेखित होते. १६४१ मध्ये त्यांनी जगतसिंह हाडा (पठाणीया) याच्या आजच्या हिमाचल प्रदेशातील बंडाचा बिमोड करून मोगली दरबारातील आपले स्थान अजून भक्कम केले. १६४७ मध्ये ते शाहजहानच्या अफगाणिस्तानातील बाल्ख-बदखशानच्या मोहिमेत सहभागी होते. १६४९ मध्ये इराणच्या शहा अब्बासने शुजाने जिंकून घेतलेला कंदाहार प्रांत पुन्हा एकदा जिंकून घेतला. १६४९ ते १६५२ या काळात औरंगजेबाच्या नेतृत्वाखाली, तर १६५३ मध्ये दारा शुकोहच्या नेतृत्वाखाली मिर्झा राजांनी कंदाहार प्रांत जिंकून घेण्याचा अथक प्रयत्न केला; पण अपुरा दारूगोळा आणि सैन्यातील नियोजनाचा अभाव यांमुळे या सर्व मोहिमा अपयशी ठरल्या. १६५४ च्या अखेरीला ही मोहीम आटोपती घेण्यात आली. मिर्झा राजांच्या कारकिर्दीतील या एकमेव अपयशासाठी औरंगजेब त्यांना नेहमीच दोष देत असे.

१६५७ मध्ये शाहजहान आजारी पडल्याने त्याच्या चारही मुलांमध्ये सत्तास्पर्धा उफाळून आली. शहा शुजाने बंगालमध्ये, तर मुराद बक्षने गुजरातमध्ये स्वतःला हिंदुस्थानचा बादशहा घोषित केले. शाहजहानने आधीच आपला उत्तराधिकारी म्हणून जाहीर केलेला दारा शुकोह आपल्या वडिलांजवळ आग्र्यातच होता, तर औरंगजेब या सत्तास्पर्धेत उतरण्यासाठी दक्षिणेतून उत्तरेत दाखल होत होता. अशा कठीण प्रसंगी दारा शुकोहने मिर्झा राजा जयसिंहांना सहा हजारी मनसबदारी देऊन आपला मुलगा सुलेमान शुकोह याच्याबरोबर बिहारमधील बहादुरपूरपर्यंत आलेल्या शहा शुजाच्या बंदोबस्तासाठी रवाना केले. याही प्रसंगी शौर्य दाखवत मिर्झा राजांनी १६५७ च्या मे महिन्यात शुजाला बंगालपर्यंत मागे रेटले. पण तोपर्यंत औरंगजेबाने धरमत आणि सामूगढ ही दोन्ही युद्धे जिंकून राजधानी आग्रा आपल्या ताब्यात घेतली होती. मिर्झा राजा, सुलेमान शुकोह आणि त्यांचे सैन्य पूर्वेकडे आणि त्यांची मालमत्ता, जहागिरी आणि कुटुंब उत्तरेत अशी परिस्थिती निर्माण झाल्याने, दिलेरखान आणि मिर्झा राजांनी सुलेमान शुकोहला पळून जाण्याचा सल्ला दिला आणि स्वतः ससैन्य औरंगजेबाला येऊन मिळाले. अत्यंत कठीण परिस्थितीत गादीवर आलेल्या औरंगजेबाने राजकीय स्थैर्यासाठी राजपुतांशी मिळतेजुळते घेऊन मिर्झा राजा जयसिंहांना सर्वोच्च अशी सप्तहजारी मनसबदारी देऊन त्यांचा गौरव केला. या गौरवाचे एकमेव कारण म्हणजे मिर्झा राजा जयसिंह हे आता सकळ राजपूत लढवय्यांचे एकमेव नेतृत्व म्हणून गणले जाऊ लागले होते.

१६५९ पर्यंतचा काळ औरंगजेबाने आपली सत्ता स्थिरस्थावर करण्यात घालवल्याने १६५४ ते १६५९ या काळात फार मोठ्या मोहिमा झाल्या नाहीत. १६६५ मध्ये औरंगजेबाने मिर्झा राजांची छ. शिवाजी महाराजांच्या विरुद्ध उघडलेल्या मोहिमेवर नेमणूक केली. आपल्या युद्धकौशल्याने आणि कूटनीतीने मिर्झा राजांनी शिवाजी महाराजांना शरण येणे भाग पाडले आणि सुप्रसिद्ध पुरंदरचा तह घडवला. पुरंदरच्या तहानुसार छ. शिवाजी महाराजांची संपूर्ण शरणागती हे जयसिंहांच्या आयुष्यातील देदीप्यमान, पण शेवटचेच यश म्हणावे लागेल.

उत्तरेकडील सर्व राजकारणे, हेतू, दृष्टीकोन लक्षात घेऊन मिर्झा राजांनी छ. शिवाजी महाराजांना आग्रा भेटीची गळ घातली. या भेटीची औरंगजेबाकडून परवानगी मिळाल्यावरही शिवरायांच्या प्रवासाचा खर्च, प्रवासात आणि आग्र्यात त्यांची ठेवली जाणारी बडदास्त यांबद्दल दिलेल्या सूचनांची मिर्झा राजांनी आपले अधिकारी आणि आपला मुलगा रामसिंह यांना रवाना केलेली अनेक पत्रे हफ्त अंजुमन मध्ये उपलब्ध आहेत. रामसिंहाला लिहिलेल्या जवळजवळ प्रत्येक पत्रात ‘शिवाजी माझ्या आश्वासनावर विसंबून उत्तरेत येत आहे. त्याच्या जीविताची काळजी घेणे आपले परम कर्तव्य आहे.ʼ अशा सूचना वाचायला मिळतात. या सर्व प्रकरणामध्ये जयसिंहांचे काही उदात्त हेतू, दूरदृष्टीचे राजकारण, राजनिष्ठा, छ. शिवाजी महाराजांच्या बद्दलचा आदर, हिंदुत्वाबद्दलचे काही प्रमाणात प्रेम आणि उदात्त नीतिमत्ता अधोरेखित होते. मिर्झा राजांच्या या उदात्त हेतूव्यतिरिक्त औरंगजेबाच्या मनातील राजकारण वेगळे असल्याने छ. शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटीत बहुतांश घटना अपेक्षेप्रमाणे घडल्या नाहीत. त्यामुळे आग्र्याच्या दरबारातील शिवरायांची सिंहगर्जना, पुढील काळातील नजरकैद आणि आग्र्याहून नाट्यमय सुटका या मिर्झा राजांच्या कर्तृत्वावर आणि यशावर बोळा फिरवणाऱ्या घटना घडल्या. मिर्झा राजांनी आदिलशाही आणि कुत्बशाही विरुद्ध चालवलेली मोहीमही फारशी यशस्वी ठरली नाही. मिर्झा राजांच्या आणि रामसिंहाच्या राजनिष्ठेवर फार मोठा कलंक लावण्यात आला. रामसिंहाची मनसब कमी करून त्याला छ. शिवाजी महाराज पुन्हा कैद होईपर्यंत दरबारात येण्यास बंदी करण्यात आली. या सर्व घटनांनी मिर्झा राजे खचून गेले. शरम, पराजय, दुःख आणि चिंता या भावनांनी घेरलेल्या मिर्झा राजांचे आपल्या परतीच्या वाटेवरील बुऱ्हाणपूर (मध्य प्रदेश) येथे निधन झाले.

काही इतिहासकारांचे म्हणणे आहे की, औरंगजेबाने विषप्रयोग करून मिर्झा राजा जयसिंहाना ठार मारले .मिर्झा राजांनी छत्रपती शिवाजीराजांशी हातमिळवणी केल्याचा औरंगजेबाला संशय होता. पुरंदर तहाच्या वेळी छत्रपती शिवरायांनी अनेकदा मिर्झाराजांना आपल्या बाजूला वळवून घेण्याचा प्रयत्न केला होता. राजांनी संपूर्ण राज्य न देता स्वतःच्या मनाप्रमाणे तह घडवून आणला होता. आग्र्याला छत्रपती शिवाजी महाराजांना बोलावून नजर कैदेत ठेवण्यात आले, परंतु छत्रपती शिवाजी महाराज शिताफीने निसटले .येथे शिवरायांना जामीन मिर्झा राजा जयसिंग यांचा मुलगा रामसिंह होता त्यामुळे औरंगजेबाचा संशय पुन्हा बळावला.

शिवराय निसटून आल्यावर तहातील कोणत्याही कलमाचे पालन झाले नाही ,उलट शिवरायांनी किल्ले पुन्हा घेण्यास सुरुवात केली .सत्तेसाठी स्वतःच्या भावा सकट सव्वाशे नातेवाईक मारणाऱ्या औरंगजेबाने आपल्या निष्ठावंत सरसेनापतीचाही १६ ऑगस्ट १६६७ बुरानपुर येथे गुढ मृत्यू नंतर त्यांच्या स्मरणार्थ मिर्झाराजांची छत्री बांधण्यात आली आहे.

लेखन
(इतिहास लेखिका)
डाॅ. सुवर्णा नाईक निंबाळकर पुणे

बाजींद कांदबरी

Leave a comment