मदनगड | Madangad Fort

By Discover Maharashtra Views: 3706 6 Min Read

मदनगड | Madangad Fort

मदनगड हा सह्याद्रीतल्या सर्वात अवघड समजल्या जाणाऱ्या अलंग, मदन व कुलंग मधला एक गड. अलंग, कुलंग व मदन रांगेतला हा सगळ्यात छोटा किल्ला आहे. तसा हा किल्ला बराच प्राचीन आणि तेवढाच दुर्गमसुद्धा आहे. या परिसरातील भटकंती करायची असेल तर सर्वात योग्य असा कालावधी म्हणजे डिसेंबर आणि जानेवारी महिने. मदन गडावर जाण्यासाठी प्रस्तरारोणाचे साहित्य व तंत्र अवगत असणे आवश्यक आहे.

कळसूबाई शिखराच्या पश्चिमेला आणि इगतपुरीच्या दक्षिणेला १०-१२ कि.मी.वर मदनगड उभा आहे. मुंबई-आग्रा महामार्गावर इगतपूरीच्या दक्षिणेला सह्याद्रीची कळसुबाई ही बेलाग रांग आहे. या पुर्व पश्चिम रांगेवर कळसूबाईचे सर्वोच्च शिखर आहे. या रांगेची सुरुवात कुलंग गडापासून होते. या रांगेतील किल्ले दुर्गम असून यांची चढाई चढणाऱ्याचा कस काढणारी आहे. मदनगडच्या उत्तर पायथ्याला कुरंगवाडी नावाचे गाव आहे. येथुन तसेच आंबेवाडीकडूनही मदनगडाचा पायथा गाठता येतो. दोन्ही मार्ग अलंग आणि मदनच्या खिंडीतूनच जातात. आंबेवाडी गावातूनच अलंग आणि मदनच्या खिंडीपर्यंत जाण्यासाठी वाट आहे. वाट फार दमछाक करणारी आहे. खिंड गाठण्यास ३ तास लागतात. कुरंगवाडीतून येताना जंगलामधून पायवाटेने प्रथम खालच्या नंतर वरच्या पठारावर पोहोचावे लागते. पठारावर पोहोचण्यासाठी कुरंगवाडीतून तीन तासांची पायपीट करावी लागते.

पठारावर आल्यावर मदनगड व त्या शेजारील सुळके आणि कुलंगचा कातळकडा मनात धडकी भरवतो. समोर कुलंगचा कातळकडा ठेवल्यास डावीकडे मदनगड दिसतो. या दमछाक करणाऱ्या वाटेने चढाई केल्यावर आपण मदनगडला वळसा घालून अलंग व मदन यांच्या मधल्या खिंडीत येतो. खिंडीत पोहोचल्यावर डावीकडचा अलंग किल्ला तर उजवी कडचा मदन किल्ला होय. उजवीकडे वळल्यावर थोड्याच वेळात अरुंद मार्गाने पुढे जात कातळात खोदलेल्या पायऱ्या लागतात. सन १८१८ सालच्या इंग्रजांच्या तोफांनी काही ठिकाणच्या पायऱ्या तोडल्या आहेत त्यामुळे ही वाट अधिकच साहसी होते. या कातळकोरीव ८० अंशाच्या कोनातल्या पायऱ्या मनात धडकी भरवतात. या चढणीत पहिला १०-१२ फुटाचा कडा आहे. तो ओलांडून पुढे गडाचे मुख्य दरवाजा म्हणजे एक सरळसोट ५० फूट उंचीचा कडा लागतो. येथून प्रस्तरारोहणाचे साहित्य वापरून किल्ल्यावर प्रवेश करता येतो.

मधला ५० फुट उंचीचा कातळकडा दोर लावून पार केल्यावर पुढे कड्यातील एका अरुंद पायवाटेने पुढे गेल्यावर परत कातळात खोडलेल्या पायऱ्या आहेत. त्या आपल्याला थेट माथ्यापर्यंत घेऊन जातात.या वाटेवर आपल्याला किल्ल्याचा कोसळलेला दुसरा दरवाजा आणि एक छोटी गुहा लागते. खिंडीपासून गडमाथा गाठण्यासाठी २ तास लागतात. गडमाथा तसा लहानसा व बराचसा सपाट आहे. गडावर पाण्याची दोन टाकी आहेत. मात्र यात फक्त फेब्रुवारी महिन्यापर्यंतच पाणी असते. गडावर २० ते ३० जणांना राहता येईल एवढी गुहा आहे. ह्या गडावर एक नेढं म्हणजे कातळात नैसर्गिकपणे तयार झालेलं भगदाड आहे. पण तिथवर जाताना थोडे सांभाळून जावे लागते. गडावर इतर काही इमारती किंवा बांधकामाचे फारसे अवशेष दिसत नाहीत. या कड्यावरुन कळसूबाई रांगेचे अप्रतिम दृष्य दिसते. हाकेच्या अंतरावर असलेला बेलाग कुलंगगड आपल्याला खिळवून ठेवतो. त्याच्या उजवीकडे प्रचंड विस्ताराचा अलंगगड आपल्याला खुणावतो.

दूरवर कळसूबाईचे शिखर दिसते. पाबरगड, रतनगड, कायाबाई, भैरवगड, हरिश्चंद्र, सिद्धगड तसेच स्वच्छ हवामानात माथेरान पेण चंदेरी, मलंगगड तसेच माहुलीची रांगही न्याहाळता येते. बळवंतगड, भिंगलवाडी तसेच कावनाई आड, पट्टा याचेही सुरेख दर्शन होते. मदनगडाचे भौगोलिक स्थान अतिशय मोक्यावर असल्यामुळे चेंढ्या घाट, मेंढ्या घाट तसेच कसारा घाट मार्गावर टेहाळणी करणे सोयीचे जाते. ह्या गडाच्या इतिहासाबद्दल फारसी माहिती उपलब्ध नाही त्यामुळे हा कोणी बांधला वगैरे आपल्याला आज तरी कळत नाही. सन १७६० मध्ये मराठ्यांनी हा गड जिंकून घेतला. त्यानंतर सन १८१८ मध्ये कर्नल मॅकडोव्हेल च्या सैन्याने हा जिंकला व त्यानंतर गड कायमचा निकामी करण्यासाठी गडाच्या पायऱ्या सुरंग लावून उडवल्या. प्राचीन काळात घाटरस्त्यांनी होणारे दळणवळण कोकणातील बंदरांमधून घाटावर होत असे. असेच खूप जुने घाट सह्याद्रि रांगांमध्ये होते आणी अजूनही आहेत.

महत्वाचे व्यापारी केंद्र हे जुन्नर, पैठण आणी नाशिक होते. प्राचीन काळापासून या प्रदेशात होणारे व्यापारी दळणवळण पैठण-जुन्नर, पैठण-नाशिक, नाशिक-नगर, नाशिक-पुणे हे गोदावरी आणी प्रवरेच्या सुपीक प्रदेशातच उदयाला आले आणी त्यासाठी व्यापारी मार्गही तयार झाले. पारनेर, भंडारदरा, इगतपुरी कल्याण हा राजमार्ग होता. येथून कलकत्यापर्यंत माल जात असे. नेवासे ते रतनगड हा महामार्ग त्याकाळात महत्वाचा होता, अकोले, संगमनेर आणी सिन्नर ह्या मार्गावरचे महत्वाचे थांबे होते. याच मार्गावर भव्य शिवमंदिरे, बाजारपेठा याची पाऊलखुणा देतात. सातवाहन काळापासूनच हे राजमार्ग प्रचलित होते. यादवांच्या काळात या परीसराला चांगले दिवस आले. रतनगड, अलंग, मदन आणी कुलंग गड यादवांच्या काळातच निर्माण झाले. यादवांच्या साम्राज्यात संपत्तीची मोठ्या प्रमाणावर वाढ असल्याने संरक्षणाची गरज निर्माण झाली आणी त्यासाठी व्यापारी मार्गांचे संरक्षण हया गडांवरून होत असे. या परिसरात दुर्गांचे महत्व शिवकाळात वाढले.

मराठ्यांची शक्ति ही गडावर असल्यामुळे इंग्रजांचा अंमल येताच हेतुपूर्वक त्यांनी गडांची नासधूस केली. ह्याचेच परिणाम मदनगडांला भोगावे लागले. निसर्गाचे भव्य रुप आणि सह्याद्रीचे रौद्रभिषण कडे मनाला नेहमीच भुरळ घालतात. दुर्ग भटक्यांना नेहमीच आकर्षित करणारा मदनगड पहाण्यासाठी एका दिवसाचे नियोजन आवश्यक आहे. ह्या भटकंतीसाठी एखादा वाटाड्या घेण गरजेचं आहे, कारण येथल्या पायवाटा नवख्या माणसांना गोंधळवून टाकतात. अलंगकुलंगच्या पोटातून जाणारा मदनगडचा मार्ग हा घनदाट जंगलातुन आणी कारवीच्या जंगलातून जातो त्यामुळे रस्ता चुकण्याची दाट शक्यता आहे.

माहिती साभार
सुरेश किसन निंबाळकर
सदर संकेतस्थळाचे सर्व हक्क राखिव असून येथे प्रकाशित झालेला कोणताही लेख अथवा छायाचित्र हे लेखकाच्या किंवा प्रकाशकाच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. असे केलेले आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Leave a comment