हुतात्मा स्मारक, पुणे

By Discover Maharashtra Views: 2487 2 Min Read

हुतात्मा स्मारक, पुणे –

भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास पहिला तर, स्वातंत्र्य प्राप्तीसाठी खूप लोकांना बलिदान द्याव लागले. ते आपल्याला सहजासहजी मिळालेल नाही, अनेक क्रांतिकारकांनी त्यासाठी आपले प्राण हसत हसत अर्पण केले. देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होत होते. भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या सशस्त्र क्रांतीच्या लढ्यात सहभागी होणाऱ्यात तरूणांची संख्या भरपूर होती. यातीलच एक क्रांतिकारक भास्कर पांडुरंग कर्णिक यांच्या कार्याची साक्ष देणारे हुतात्मा स्मारक फरासखाना पोलीस चौकीजवळ आहे.

भास्कर कर्णिक यांचे प्राथमिक शिक्षण रत्नागिरी जिल्ह्यातल्या करूळ या गावी आणि माध्यमिक शिक्षण कर्नाटकातील गुलबर्गा इथे झाले. मुंबई विद्यापीठातून त्यांनी बीएस्सी केले. पुण्यातील देहूरोड इथल्या अॅम्युनिशन फॅक्टरीमध्ये इ.स. १९४२ मध्ये ते नोकरीला लागले. या काळात त्यांनी तिथे तयार होणारे बॉम्ब जेवणाच्या डब्यातून बाहेर आणायला सुरुवात केली. काही कालावधीनंतर अर्धा ट्रक बॉम्ब त्यांच्याकडे जमा झाले. या बॉम्बचे त्यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने हँड ग्रेनेडमध्ये रूपांतर केले. यातले बॉम्ब ग्रामदैवत जोगेश्वरी मंदिरातही लपवून ठेवण्यात आले होते. या कामात कर्णिक यांच्यासह तांबडी जोगेश्वरी मंदिराणे पुजारी बेंद्रे, नारायण सदाशिव आठवले आणि इतरही दहा ते बारा साथीदारांचा सहभाग होता.

पुणे कॅटोन्मेंट येथे असणान्या कॅपिटॉल म्हणजे आजच्या व्हिक्टरी या चित्रपटगृहात बॉम्ब टाकण्याचे नियोजन झाले आणि तिथे यशस्वीरीत्या बॉम्बस्फोट करण्यात आला. त्यात ०४ इंग्रज अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आणि बरेच जण जखमी झाले. कॅपिटॉलमध्ये मिळालेल्या बॉम्बच्या अवशेषांवरून इंग्रज अधिकाऱ्यांनी शोध घेतला आणि तपासा अंती कर्णिक यांच्यासह त्यांच्या काही साथीदारांना पकडून फरासखाना पोलिस चौकीत आणले. त्यावेळी लघुशंकेच्या निमिताने भास्कर कर्णिक बाजूला गेले आणि त्यांनी त्यांच्याकडील कुपीमध्ये असलेली साइनाइडची पूड खाल्ली. त्यामुळे त्यांचे निधन झाले. तो दिवस होता दि. ३१ जानेवारी १९४३. भास्कर कर्णिक यांचे अनेक सहकारी होते. पण त्यांच्या या बलिदानामुळे त्यांच्या इतर अनेक सहकाऱ्यांची नावे गुप्त राहिती. त्यांच्या या कार्याचे महत्व अधोरेखित करणाऱ्या या स्मारकाचे अनावरण बुधवार दि. ३० जानेवारी १९७४  रोजी विनायकराव कुलकर्णी, तत्कालीन महापौर वि.प.तथा शांताराम दिवेकर आणि आयुक्त व.शं.ढवळे यांच्या हस्ते झाले आणि त्या चौकाला हुतात्माचौक अस नाव दिलं गेलं.

पत्ता :
https://goo.gl/maps/fnCbxDKcGEeFrmEf9

आठवणी इतिहासाच्या

1 Comment