महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

हरिहरच्या पायऱ्या शिल्लक राहण्या मागची हकीकत

By Discover Maharashtra Views: 2697 3 Min Read

हरिहरच्या पायऱ्या शिल्लक राहण्या मागची हकीकत –

हरिहर प्रसिद्ध आहे तो त्याच्या सुंदर पायऱ्यांसाठी हरिहर म्हणजे सातवाहन ह्यांच्या कालखंडातील बांधकामाचा एक उत्तम नमुना आहे. ह्या किल्ल्यासंदर्भात एक चुकीची माहिती सध्या दुर्गप्रेमी ह्यांना मिळत आहे ती अशी कॅप्टन ब्रिग्ज हा इंग्रज अधिकारी हरिहरगड जिंकून घेतांना याच्या पाय-या बघून आश्चर्यचकित झाला व उद्गारला, “या किल्ल्याच्या पाय-यांचे वर्णन शब्दात करणे कठीणच. सुमारे २०० फूट सरळ व तीव्र चढाच्या या पाय-या अति उंच ठिकाणावर बांधलेल्या एखाद्या जिन्यासारखा वाटतात. हरिहर किल्ल्याच्या अनोख्या पाय-यांनी आपल्या राकट सौंदर्याची मोहिनी अशी काय कॅप्टन ब्रिग्जवर घातली की त्याने हरिहरगड जिंकून घेतला पण त्याच्या सुंदर पाय-यांच्या मार्गाला मात्र हात लावला नाही…..! हयात किती तथ्य आहे ते आपण बघुया. पहिली गोष्ट जी गोष्ट सांगितली आहे तिला कोणताच समकालीन पुरावा नाही. जर कॅप्टन ब्रिग्ज हा हरिहर च्या पायऱ्यांच्या प्रेमात पडला होता मग त्यांनी हरिहर चा दुसरा मार्ग का तोडला….?  त्याची हरिहरच्या पायऱ्या शिल्लक राहण्या मागची हकीकत पुढील प्रमाणे….!

१८१८ ला कसाऱ्या पासून नासिक पर्यंत जे जे किल्ले  कॅप्टन ब्रिग्ज ह्यांनी जिंकून घेतले त्यांचे मार्ग हे सुरुंग लाऊन तोडले पण ते पूर्ण पणे नाही तोडले. किल्ल्याच्या मार्गावर मधे मधे मार्ग तोडलेले आहेत पूर्ण मार्ग तोडलेला नाही का तर किल्यावर सहजा सहजी कोणी आश्रय घेऊ नये. त्याच प्रमाणे कॅप्टन ब्रिग्ज ह्यांनी हरीहारचा एक मार्ग मधून तोडला आणि मुख्य मार्ग जो आता आपल्याला दगडी जिना दिसतो तो. त्याचा आपण नीट निरीक्षण केलं तर आपल्याला दिसेल की त्या मार्गाच्या सुरवातीला सुद्धा सुरुंग लावलेल्या खुणा आजही दिसतात.

ह्याचा अर्थ तो ह्या पायऱ्या सुद्धा तोडणार होता पण त्याच वेळी पूर्व पश्चिम खान्देश आणि नासिक च्या  पश्चिम भागात भिल्ल आणि आदिवासी ह्यांचे उठाव होत होते आणि हे उठाव दडपण्यासाठी कॅप्टन ब्रिग्ज ह्याला पाठवण्यात आले. आणि म्हणूनच हरिहर च्या पायऱ्या शाबूत राहिल्या पुढे ही मोहीम मेजर मोरिन ह्याच्या हातात गेली त्यांनी नासिक चे बाकी किल्ले जिंकले पण त्यांचे मार्ग नाही तोडले. ह्याचाच अर्थ असा की किल्ल्याचे मार्ग तोडणे हे कॅप्टन ब्रिग्ज ह्याचे धोरण होते मग तो हरिहर किल्ल्याच्या पायऱ्या का शिल्लख ठेवेल त्यामुळे कॅप्टन ब्रिग्ज हा हरिहर किल्ल्याच्या पायऱ्या च्या प्रेमात पडला होता ही भाकड कथा आहे. त्याची दुसऱ्या मोहिमेवर नियुक्ती झाली म्हणून त्या पायऱ्या वाचल्या हे सत्य आहे……!

अक्षय कदम

Leave a comment