महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

गणपतीचे साडेतीन पीठे

By Discover Maharashtra Views: 1202 4 Min Read

गणपतीचे साडेतीन पीठे माहिती –

सर्व साधारणपणे लोकांना अष्टविनायक माहित आहेत पण गणपतीचे साडेतीन पीठे माहित नसतील म्हणून हा लेखनप्रपंच.

महाराष्ट्रामध्ये गणेशाची साडेतीन पीठे आहेत. मोरगावी कमलासुराचा मयुरेश्वराने वध केला त्याचे शीर जिथे पडले ते प्रथम पीठ मोरगाव व जिथे कमरेपर्यंतचा धडाचा भाग पडला ते राजूर  येथे दुसरे पीठ .कमरे पासून पाया पर्यंतचा भाग जिथे पडला ते पद्मालय हे तिसरे पीठ महान गाणपत्य मोरया गोसावी याना करा नदीत स्नान करताना त्याच्या ओंजळीत गणपतीची मूर्ती आली .हि मूर्ती घेऊन मोरया गोसावी भाद्रपद व माघी चतुर्थीला मोरगांवी जात असत. मोरगावचा मोरेश्वर चिंचवडी आला. म्हणून हे अर्ध पीठ ओळखले जाते. “गणपती बाप्पा मोरया ” हा घोष  हा तेव्हा पासून सुरु झाला.

पहिले पीठ श्री क्षेत्र मोरगाव

‘भूस्वानंदपूर ‘ म्हणजेच आजचे प्रचलित ‘मोरगाव’. गाणपत्य सांप्रदायाचे आद्यपीठ मोरगाव. या क्षेत्राचा आकार मोरासारखा आहे. ब्रम्ह, विष्णू, महेश, सूर्य व शक्ती या पंचदेवांनी ॐकार स्वरूपी गणेशाची तिथे स्थापना केली. उन्मत्त सिंदुरासुराचा वध करून त्याचा सेनापती कमलासूर याचाही वध श्री गणेशाने केला. कमलासूराचे शीर  जमिनीत गाडून त्याच्यावर तो आरूढ होऊन बसला. आजही त्याचे प्रतिक म्हणून विजयादशमीच्या दिवशी मोठा   उत्सव होतो. येथे गणेशापुढे नंदी आहे हे याचे वैशिष्ठ्य.

दुसरे पीठ श्रीक्षेत्र राजुर (जालना)

श्री राजूरेश्वर – राजूर म्हणजेच पूर्वीचे राजापूर. वरण्य राजाचा राजवाडा या भागात होता. कृष्णाच्या तोंडून म्हणजेच प्रत्यक्ष भगवंताच्या तोंडून अर्जूनाने गीता ऐकली. तद्वत साक्षात गणेशाने आपल्या मुखातून वरण्य राजाला गणेशगीता सांगितली. त्यामुळे गाणपत्य सांप्रदायात या स्थानाला  फार महत्व आहे. राजा वाराण्याने प्रतिष्ठापना केलेल्या या क्षेत्राला राजूरचा ‘महागणपती’ म्हणतात.

मराठवाड्यातील जालन्यापासून २२ कि.मी. वर हे क्षेत्र आहे. राजूर गावानजीक एका टेकडीवर हे गणेश मंदिर असून येथे वरण्य राजाची मूर्ती आहे. या ठिकाणाला गड म्हणतात.

हा गणपती नवसाच्या समईला पावतो. येथील मूर्तीपुढे अंदाजे सव्वाशे समया रोज तेवत असतात. शेकडो समयांतील ज्योतींच्या मंद व मंगल प्रकाशात ही मूर्ती फारच विलोभनीय दिसते. पराशर ऋषींच्या आश्रमातून श्री गणेशाला वरण्य राजाने चैत्र शु.प्रतिपदेला राजूर, राजापूर येथे आणले, म्हणून गुढीपाडव्याला या गणेशाचे दर्शन घेणे ही पर्वणी मानली जाते.

तिसरे पीठ पद्मालय (जळगाव)

पद्मालय – येथे दोन गणेश मूर्ती आहेत. महान दत्तभक्त सहस्त्रार्जुनाने स्थापन केलेला ‘प्रवाळ गणेश’ आणि त्याच्या शेजारी शेषाने स्थापन केलेला ‘धरणीश्वर गणेश’. यातील गणेशाची मूर्ती एक उजव्या सोंडेची व दुसरी डाव्या सोंडेची आहे. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल गावापासून ८ कि.मी. वर पद्मालय आहे. हे मंदिर डोंगरावर असून तेथील तलावात विविध प्रकारची पद्म (कमळे) फुलतात. म्हणून या क्षेत्राला ‘पद्मालय’ असे नाव पडले.

समुद्रमन्थनाच्या वेळी शेष समुद्रतळाशी होता. अमृत कुंभ देवांना आपल्यामुळे मिळाला असा अहंकार त्याला निर्माण झाला. त्याचा अहंकार पाहून संतप्त होऊन शिवाने त्याला खडकावर आपटले. त्याच्या डोक्याचे दहा तुकडे झाले. नारदाने त्याचे सांत्वन करून त्याला गणेश उपासना करावयास सांगितले. त्यानुसार त्याने ती केली. गणेश त्यावर प्रसन्न झाले व तू सहस्त्रवदन होशील आणि माझा सहवास तुला लाभावा यासाठी मी तुला माझ्या उदरावर धारण करीन. तसेच पृथ्वी,तू तुझ्या फण्यावर फुलासारखी तोलून धरशील असा आशीर्वाद दिला. म्हणून शेषाने स्थापन केलेल्या मूर्तीला ‘धरणीश्वर गणेश’ म्हणतात.

अर्धपीठ श्री क्षेत्र चिंचवड

चिंचवड – चिंचवड हे गणपती क्षेत्र पुराणोक्त नाही. महान गाणपत्य साधू मोरया गोसावींच्या मुळे याला महत्वाचे स्थान प्राप्त झाले. मोरया गोसाव्यांना मोरगाव येथे करा नदीत स्नान करताना गणेश तांदळा स्वरुपात आला. तो घेऊन ते मोरगांवी वारी करीत असत. सध्या तो तांदळा चिंचवड येथे देऊळवाड्यात आहे. मोरया गोसावींनी मार्गशीर्ष वद्य षष्ठी शके १३८३ रोजी जिवंत समाधी घेतली.

Leave a comment