स्वराज्यातील दुर्गसंपदा

By Discover Maharashtra Views: 2360 4 Min Read

स्वराज्यातील दुर्गसंपदा –

छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी आपल्या बुधभूषण या  संस्कृत ग्रंथात दुर्ग निरूपणामध्ये  दुर्गाचे महत्व विषद करत त्यांनी मांडलेले बारकावे हे आजच्या हजारो अभियंत्यानी व शास्त्रज्ञानी एकत्रीत येऊन मांडणी करता येणार नाही ती केवळ एकटया शंभूराजेंनी केलेली दिसते. यामध्ये या दुर्ग निरुपमातील प्रत्येक श्लोकातील शब्द अन शब्द बरेच काही सांगून जातो . एका झुंजार योध्यातील अपूर्व वास्तुविशारदता की जी शास्त्राच्या कसोटीवर टिकते ,यातील बारकावे हे सटीकतेने अभेद्यता वाढवितांना दिसतात .एक दुर्ग आपल्या राज्यासाठी कश्या पद्धतीने सज्ज असावा याचे भाष्य करताना संभाजीराजे म्हणतात.(स्वराज्यातील दुर्गसंपदा)

दुर्गावर एकाच वेळी १०० च्या वर लोकांचा नाश करणारी  यंत्रे दुर्गावर असावी शेकडो यंत्रानी तो दुर्ग सगळीकडून सज्ज असावा .राजाने या किल्याच्या मधोमध संपूर्ण साधनांनी युक्त असा ,सर्व बाजूनी काळजीपूर्वक विचार करुन विविध आयुधे,सुरक्षितते साठी गुप्त असा ,सर्व ॠतुमध्ये फळे ,फुले ,वृक्ष व जल देणारा शुभ्र असा राजवाडा तयार करावा.असा राजवाडा हा किती सुरक्षित असेल याची आपण कल्पना करू शकतो .अश्या देश कोश आदि सर्व साधने व वस्तु याच्या योगाने सुरक्षित झालेल्या उत्तम,स्वच्छ ,निर्मल,शुभ्र गुणांनी युक्त अर्थात पवित्र नगरात ,राजकीय चिन्हे संपन्न अश्या राजमंदिरात राजाने वास करावा.

दुर्गामध्ये लांबलचक आयाताकार रांगा तयार कराव्यात .त्यापैकी एका पत्किंच्या टोकास चौथऱ्यावर प्रार्थनास्थळ असावे .दुसऱ्या रांगेच्या चौथऱ्यावर राजाचे राहण्याचे ठिकाण निर्माण करावे .तिसऱ्या चौथऱ्यावर धर्माध्यक्षाचे स्थान असावे .चौथ्या चौथऱ्यावर अग्रभागी गोपुरांची रचना करावी .अश्या स्वरूपाची चौरस, आयताकृती किंवा गोलाकार अशी तीन प्रकारची नगरचना करून घ्यावी असे संभाजी राजे सांगतात .

*अर्धचंद्रप्रकारं च वज्रकारं च कारयेत्*

शेवटी त्रिकोन यामधे याप्रमाने अर्धचंद्राकार किंवा वज्र आकाराची रचना करावी .

राजवाडयाच्या दक्षिण दिशेला कोशागार करणे योग्य आहे व त्या कोशागाराच्या दक्षिण भागात गजशाळा म्हणजे हत्तीशाळा असावी .धनरक्षणाची ही रीत प्रशंसनिय आहे .अशी रचना ही संभाजी राजे यांच्या दुरदृष्टी व वास्तु विशारद असल्याचाच भाग म्हणावा लागेल .

दुर्गावरील यज्ञशाळेचे मुख हे गजशाळेच्या पूर्वेस किंवा उत्तरेस करावे .दक्षिणपूर्वमध्य म्हणजे आग्नेय दिशेला आयुधागार बनविणे योग्य आणि तेथेच शेजारी रथ,शकटशास्त्र,धर्मज्ञ व दुसऱ्या कर्मशाळा असाव्यात .थोडक्यात या दिशेला सर्व औद्योगिक विभाग असावा .पुरोहीताचे घर राजवाड्याच्या डाव्या बाजूला करावे त्या भागात मंत्री ,ज्योतिषशास्त्र वेत्ता आणि राजवैदयाचे निवासस्थान असावे .महाभागांची निवासस्थानेही तयार करावीत .गाईचे गोठे,द्योडयाच्या पागा तयार कराव्यात .अश्वशाळा उत्तराभिमुखी असावी .राजाने अश्व रात्रभर नजरेखाली ठेवावेत व त्या अश्व शाळेत कोंबडे ,वानर,ठेवावीत .

गाई,हत्ती,घोडे इ.च्या मलाचे उत्सर्जन,देवदैवादिक कृत्ये सूर्य मावळल्यानंतर  करू नये असे संकेत दुर्ग निरूपणात संभाजी राजे देतात .

योद्धे,शिल्पशास्त्रज्ञ अशा सर्वांना उत्तर घरे द्यावीत आणि मंत्रविदयाजाणकार व ज्योतिषांना तसेच घरे द्यावी .किल्यामधे मोठमोठे रोग उद्भवतात .राजाने गाई ,घोडे,हत्ती यांच्या रोगाचे निदान करण्यासाठी व रोगस्वरूप त्यांचे परिणाम यांचा सर्व अंदाज व्यक्त करून त्यावरील औषधांचे जाणकार वैद्याना किल्यात राहण्यास जागा  द्यावी .कुशल शीलवान ब्राम्हणांना दुर्गामध्ये स्थान असावे पण काही काम नसलेल्यांनी तेथे गर्दी करू नये .असे संभाजी राजे सांगतात .बुधभूषण या ग्रंथाच्या द्वितिय अध्यायातील दुर्ग निरुपणातील या बाबी संभाजीराजे एक कुशल योद्धा,सर्वश्रेष्ठ युवराज,थोर साहित्यीक,विचारवंत,तत्ववेत्ता त्याचबरोबर वास्तुज्ञास्त्र विशारद असल्याचेही स्पष्ट होते .दुर्गशास्त्राचे असलेले ज्ञान व त्यांनी केलेली बुधभूषण मधील दुर्गाविषयीची संपूर्ण मांडणी याचे शास्त्र शुद्ध पद्धतीने अभ्यास करून मांडणी केल्यास अधिक स्पष्टता येईल.

संदर्भ – बुधभूषण.

संजय खांडवे

Leave a comment