महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

टिम दातेगड वर्धापनदिन माझ्या नजरेतून भाग – 1

By Discover Maharashtra Views: 3518 4 Min Read

टिम दातेगड वर्धापनदिन माझ्या नजरेतून….

दोन वर्ष झाली मावळे इथं काम करतायेत…. वास्तु आता बोलु लागल्यात आमच्याशी… महादरवाजा आता आम्हाला काळजी घेऊन काम करा म्हणतो… देवड्या म्हणतात या रे दोन मिनीट विसावा घेऊन जा… तलवार विहीर आमच्यासाठी गार पाणी प्यायला राखून ठेवते. ते टाकं, ते धान्याच कोठार, चौथरा सर्व काही खुणावत असतं. या दोन वर्षात आमचा दातेगडाकडे बघण्याचा दृष्टीकोन खुप बदलला आहे. कदाचित तसाच तो दातेगडचाही आमच्या बद्दल बदलला असेल.
अशातच, द्वितीय वर्धापनदिन साजरा करु अशी संकल्पना मांडली गेली आणि तशी तयारीही सुरु झाली. असाच एक दिवस सागर(कदम) दादांचा संदेश आला की “तुम्ही आदल्याच दिवशी पोहोचा खुप काम आहेत”. मीपण होकार कळवला.
साधारण बुधवारी दिपक दादांनी माझ्या भावाला (सागरला) विचारलं मी कधी येणार आहे? त्यावर सागर बोलला की नक्की नाही त्याच, कदाचित शनिवारी येईल. त्यावर दिपक दादा बोलले की शुक्रवारच्या आत येईल बघ तो. किस्सा सांगण्याचा उद्देश एवढाच की टिमचा ‘विश्वास’. असो….

ठरल्याप्रमाणे तयारी केली आणि साहित्य टाकून आम्ही निघायला सज्ज झालो. गाडीतून जाताना दिपक दादा आणि मी दोघे ब-याच गोष्टींवर चर्चा करत होतो. जसं की आमचा आवडता विषय गडकिल्ले आणि त्यावरिल शिल्प. घाटातुन डुलत-डुलत गाडी निघाली, घाट उतरला आणि परश्यान (आमचा गाडी ड्राईवर) एक शॉक दिला, “ब्रेक फेल झालेत”. गाडी कशीबशी मिस्त्री कडे नेली. ते नीट केल आणि गण्यादासाठी एक कोल्डड्रिंक सोबत घेतली जी त्याला अर्धी सुद्धा भेटली नाय. गण्यादा बद्दल सांगायच तर हा अवलिया सकाळी 8 वाजता गडावर पोहोचलेला तेही पाटणपासुन चालत. याची आम्हाला काळजी पण हा फट्टया दोन भाकरी हाणून वरुन सोबतच खायला खाऊन टम होता.

सामान उतरवलं तर खरं पण वर गडावर न्यायला माणसं चार. कारण रुपेश दादांची 20 मावळ्यांची फळी मध्येच कुठतरी अडकलेली. आम्ही चार होतो त्यातील एक ओंकार- हा म्हणजे एखाद्या धडधाकट तारुणाला लाजवेल असा पट्ठया, दुसरे आपले अती उत्साही गण्यादा, तिसरे ज्यांच्यावर मोहिमेची धुरा होती ते दिपक दादा आणि मी. चढवायला सुरुवात केली खरी पण समजलं हे प्रकरण जरा जड जाणार आहे. पण थकतील ते हे तिघं कुठले? साहीत्य चढवलं वरती आणि वरुणराजाने दोन मिनीटाचीही उसंत न देता सुरुवात केली. त्या देवडीमध्ये खुर्च्या टाकुन बसलो. आणि विचार आला मावळ्यांचा तेही असचं बसत असतील का? वगैरे-वगैरे. रेंज नसल्या कारणाने मी आणि दिपक दादा बाहेर पडलो. तेव्हा मला समजलं वैभव दादा आजच येणारेत. म्हटलं चला आज भेट होणार तर. आजची रात्र चर्चेतच जाणार. आमचे जे मावळे जेवण घेऊन येणार होते त्यांनी हातावर तुरी दिली असं वाटलं पण तसं नव्हतं, ते आले उशिरा का होईना ते आले. पण तोवर लव्हदादांच्या आईने जेवण घालून आम्हाला टम फुगवलेलं. त्या माईबद्दल तर बोलाव इतकं कमी.

पोटच्या लेकराहून जास्त काळजी घेतली त्या माईन. भिजून आलेलो म्हणून सुके कपडे दिले, चहा पाजला, नको म्हणत असतानाही गरम भात आणि डाळ वाढली, उबदार पांगरुन देउन आम्हाला झोपायची सोय केली. तोवर आम्ही 12 जण तरी जमलो असु. विचार करा कोण व्यक्ती अनोळखी, दाढी वाढलेली, तरणी बांड पोर घरात झोपवल? पण ह्या म्हाता-या जोडप्यान आम्हाला झोपायला सांगितलं. पण झोपु ते आम्ही कसले? शेवटी परिस (वैभव दादा) होतं आमच्या सोबत. चांगले दिड-दोन वाजेपर्यंत गप्पा रंगल्या. दिपक दादांनी कसंबसं आम्हाला झोपवलं.

✍ प्रतिक शिवाजी मोरे

दातेगड वर्धापनदिन माझ्या नजरेतून भाग- २

Leave a comment