महाराष्ट्रातील ताम्रपाषाणयुग भाग 2 | Chalcolithic Age

महाराष्ट्रातील ताम्रपाषाणयुग भाग 2 | Chalcolithic Age

महाराष्ट्रातील ताम्रपाषाणयुग भाग 2 | Chalcolithic Age –

पर्यावरण हा कोणत्याही प्राण्यावर परिणाम करणारा मुख्य घटक असतो.  मानव हा याला अपवाद असून तो विशिष्ट पर्यावरणाप्रमाणे स्वतःला व स्वतः प्रमाणे आसपासच्या पर्यावरणाला बदलू शकतो असे  काही विद्वान भूगोल अभ्यासकांचे म्हणणे आहे.  महाराष्ट्राचा इतिहास पाहताना ते तितकेसे योग्य वाटत नाही. कारण बदलत्या पर्यावरणामुळे देशोधडीला लागलेले लोक असे चित्र या इतिहास पटलावर कायम रेखाटलेले दिसते. इ.स.पू. 1200 च्या सुमारास बदलत्या पर्यावरणामुळे तापी, प्रवरा, गोदावरी या नद्यांच्या खोऱ्यातील जोर्वे संस्कृतीचे लोक स्थलांतर करू लागले. त्यामानाने  घोड, भीमा, कृष्णा या नद्यांच्या खोऱ्यातील लोक  कसेबसे का होईना तीनशे वर्षे तेथेच तग धरून राहीले(इ.स.पू.1200 ते 900).  याच काळात युरोपमध्ये हिमयुगासारखी थंडी होती (nuclear winter)असे पुरावे आढळलेले आहेत. जेव्हा जेव्हा युरोपात अशी थंडी असते तेव्हा तेव्हा भारतासारख्या विषुववृत्तीय प्रदेशात दुष्काळ पडतात.(महाराष्ट्रातील ताम्रपाषाणयुग भाग 2)

पूर्वी किमान दोन खोल्या असतील अशा घरांनी आता कधीही सहज काढता व लावता येतील अशा गोलाकार झोपड्यांचे रूप घेतले होते (आजच्या ऊस तोडणाऱ्या मजुरांच्या घरांप्रमाणे). घरातच खड्डा करून त्यात चूल पेटवली जायची. धान्य साठवण्याची कोणतीच व्यवस्था उत्खननात आढळून आली नाही कारण तितकं धान्यचं नसावं. शिकारीचे प्रमाण या काळात खूप वाढले. उत्खननात ठिकठिकाणी सापडणारी प्राण्यांची हाडे याची साक्ष देतात (हरीण व माळढोक पक्षाची हाडे प्रामुख्याने).

पुढे पुढे तर परिस्थिती अशी बदलत गेली की गोलाकार झोपड्याही धड गोलाकार राहिल्या नाहीत. काही काळ वास्तव्य करून लोक पुढे जात(आजच्या धनगरांप्रमाणे). फक्त चुली व दफने यांवरून येथे वस्ती होती असे कळते. दफने मात्र फार वेगळ्या प्रकारची व प्रतिकात्मक असायची. त्या वेळच्या सामाजिक समजुती व समूह मानसशास्त्र (collective psychology) समजून घेण्यासाठी त्यांचा फार उपयोग होतो. अशा या आद्य शेतकऱ्यांच्या मृत्यूची निशाणी  भविष्यात त्यांच्याबद्दल आपल्याला बरंच काही सांगणार होती…..त्या दफनांविषयी नंतर

– पितांबर जडे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here