महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

झुंज भाग ९

By Discover Maharashtra Views: 4071 12 Min Read

झुंज भाग ९ –

(झुंज – कथा रामशेजची)

मराठा सैन्याने ज्या प्रकारे हल्ला केला अगदी त्याच प्रकारे माघारही घेतली. जवळपास एक हजारावर मोगल सैनिक गारद झाले. जवळपास दीड ते दोन हजार जायबंदी झाले आणि बाकीचे मात्र स्वतःला वाचविण्यासाठी वाट फुटेल तिकडे पळून गेले. या वेळात संपूर्ण रसद गडावर पोहोचली होती. पण त्र्यंबकगड असो वा अहिवंत किल्ला दोन्ही ठिकाणी सुरक्षा देणे तितकेच महत्वाचे असल्यामुळे दोन्हीकडून आलेले मराठा सैन्य मागे फिरले. मराठा सैन्याने अतुलनीय पराक्रम गाजवला. तशी मराठा सैन्याची देखील हानी झालीच पण ती मोगलांच्या मानाने अगदीच नगण्य होती.

जवळपास ८ दिवसांनी फतेहखान तीस हजाराची फौज घेऊन गडाखाली पोहोचला. त्याच्या बरोबर यावेळेस लांब पल्ल्याच्या तोफा, दारुगोळा, बंदूक दस्ता तसेच जवळपास तीन हजार घोडदळही होते. आधीची जवळपास सहा हजाराची फौज देखील त्याला मिळणार होती. त्यामुळेच हा किल्ला काही दिवसातच आपल्या ताब्यात येईल याबद्दल तो आश्वस्त होता. पण तिथे पोहोचल्यानंतर मात्र त्याचा पूर्णतः हिरमोड झाला. शहाबुद्दीन खानाने दिलेल्या वेढ्याचा पूर्ण बिमोड झालेला होता. सगळीकडे उध्वस्त छावण्या, मुगल सैन्याची प्रेते आणि जळके तंबू एवढेच काय ते दिसत होते. कित्येक जण तर फक्त जखमी झाल्यावर व्यवस्थित औषधोपचार न मिळाल्याने काळाच्या घशात गेले होते. शिकार न करता आयतेच खाद्य मिळाल्याने आजूबाजूच्या हिंस्र प्राण्यांचा संचारही त्या ठिकाणी वाढलेला दिसून येत होता. बराचसा दारुगोळा नष्ट झाला होता. कित्येक दगडी तोफा निकामी करण्यात आल्या होत्या. मुगल सैन्याच्या अन्नधान्याच्या छावण्यांना आग लावण्यात आली होती आणि सगळीकडे एक प्रकारची प्रेतकळा पसरली होती.

१० हजार मुगल सैन्याची अशी अवस्था पाहून फतेहखानाचा पारा चढला.

“सैय्यदशा… जल्दी जाव… यहां आसपास जितनेभी गांव है उसको जला दो. औरतोंको कैद करके यहां लेके आव. अगर कोई बच्चा, बुढा है तो उसका वहीपर सर कलम कर दो… अगर कोई जवान हो तो उसको कैद कर लो… इन मरहट्टोको पता चलने दो… फतेहखान क्या चीज है…” हुकुम देताना फतेहखान रागाने थरथरत होता.

“जो हुकुम हुजूर…” म्हणत खानाला कुर्निसात करत सैय्यदशा बाहेर पडला. त्याने बरोबर तीनशे लोक घेतले आणि तो आशेवाडी गावाच्या दिशेने निघाला. तो जेव्हा गावात पोहोचला तेंव्हा संपूर्ण गांव ओस पडले होते. सगळ्या घराची दारे बंद होती. छोट्याशा गल्ली बोळात फक्त काही तरस आणि लांडगे फिरताना दिसत होते. मनुष्यप्राणी औषधालाही सापडत नव्हता. हे पाहून सैय्यदशा पुरता चवताळला. त्या रागातच त्याने दिसेल ती झोपडी जाळायला सुरुवात केली. तो जेव्हा तिथून निघाला तेंव्हा तिथे फक्त राखेचे ढीग तेवढे उरले होते. हीच काहीशी अवस्था जवळपासच्या इतर पाड्यांचीही झाली होती.

हे सगळेच किल्लेदाराला गडावरून दिसत होते पण त्याला फक्त बघ्याची भूमिका घेण्याखेरीज काहीही करता येणार नव्हते. तसे अशा गोष्टींनी विचलित होणे किल्लेदाराला शोभणारही नव्हते. त्याच्यापुढे आता वेगळाच प्रश्न उभा ठाकला होता. अन्नधान्य तर मुबलक मिळाले होते पण यावेळेस आलेला बादशहाचा फौजफाटा तिप्पट होता. त्याच बरोबर त्यांच्याकडे लांब पल्ल्याच्या तोफाही होत्या. दोन वर्ष किल्लेदाराने मोठ्या हिमतीने लढा दिला होता पण तीच हिंमत आपल्या सैन्यातही टिकवून ठेवण्याची कामगिरी त्याला करावी लागणार होती.

परत एकदा गडाला वेढा पडला. यावेळेसचा वेढा जरा जास्तच कडक होता. आधी दोन छावण्यांमधील अंतर दोन फर्लांगाचे होते. यावेळेस ते फक्त एक फर्लांग इतकेच ठेवले होते. थोडक्यात वेढा भेदणे आता जवळपास अशक्यच झाले होते. खानाने आक्रमण करण्याआधी सगळ्या मनसबदार, जहागीरदार, फौजदार यांची सभा बोलाविली. आधीच्या सैन्यातील जितके जण स्वतःचा जीव वाचवून पळाले होते त्यातील बरेच जण परत आले होते. आणि अशा लोकांची संख्याही काही कमी नव्हती. आधीच तीस हजारांची नव्या दमाची फौज आणि त्यात त्यांना मिळालेले जवळपास तीन ते चार हजार अपमानाने पोळलेले मुगल सैनिक.

एकेक करून सगळे अधिकारी फत्तेखानाच्या शामियान्यात जमू लागले. सगळे जमले आहेत याची खात्री केल्यावर खानाने सुरुवात केली.

“महान शहंशहा आलमगीर औरंगजेब और मुगल सल्तनत के वफादारों… दो साल से हम एक छोटेसे किलेपर अपना चांदसितारा लेहेरानेकी कोशिश कर रहे है, पर वो मरहट्टे, बुजदिलोकी तरह हमपर पथ्थर फेंक रहे है… ये मुगल फौजके लिए बेहद शर्म की बात है… अगर हम इस किलेपर फतेह नही करते तो हमे मुगल फौजके सिपाही केहेलानेका कोई हक नही है… क्या तुम सब भूल गये, तुमने कितनी जंगे जीती है? तो फिर इस बार क्या हुवा? तुट पडो उन चुहोपर… आलमगीर शहंशाहने ऐलान किया है, जो भी मुगल सिपाही उस काफर किलेदारका सर काटकर बादशहाको पेश करेगा उसे तुरंत पाच हजारकी मनसब और बादशहाकी खिलतसे नवाजा जायेगा. उसके साथ ही उसे दसहजार सोनेकी मोहरे बादशाहकी तरफसे भेंट की जायेगी…”

खानाचे बोल ऐकून नवीन सैनिकात उत्साह संचारला. जो तो मनसब मिळण्याची स्वप्ने पाहू लागला. अपवाद फक्त जुन्या सैनिकांचा होता. काहीसे असेच बोल शहाबुद्दीन खान बोलला होता आणि त्याची १० हजाराची फौज फक्त चार हजारांवर आली होती. तसेच त्याला अपमानास्पद रीतीने परत फिरावे लागले होते.

“गुस्ताखी माफ हुजूर…” उपस्थित अधिकाऱ्यांमधून आवाज आला. खानाने आवाजाच्या रोखाने पाहिले. शहाबुद्दीनच्या सैन्यातील एक अधिकारी मान खाली घालून उभा होता.

“बोलो… क्या बोलना है?” काहीसा तिरस्कारयुक्त दृष्टीक्षेप त्याच्याकडे टाकत खानाने विचारले.

“हुजूर… हमारी तोपोंके गोले वहां तक जातेही नही… इसीलिये अभीतक हमारी फतेह नही हुई…” त्याने खाली मानेनेच उत्तर दिले.

“तो?” खानाला त्याच्या बोलण्यातील आशय नीटसा समजला नाही.

“हुजूर अगर हम शुरुवात बडी तोपोंसे करेंगे तो जरूर फतेह हमारी होगी…”

“ठीक है…” खानाचा स्वर मवाळ बनला.

“दलेरखान… कल हम बडी तोपे दागेंगे… उसकी तय्यारी करो…” खानाने हुकुम सोडला आणि इतर काही गोष्टीची चर्चा करून सभा संपली.

किल्लेदार मात्र काहीसा चिंतीत बनला होता. त्याला गडावरून खानाने आणलेल्या नवीन लांब पल्ल्याच्या तोफा दिसत होत्या. याचाच अर्थ आलेला नवीन खान पुऱ्या तयारीनिशी आला होता. एक गोष्ट मात्र किल्लेदाराला समाधानकारक वाटत होती. ती म्हणजे त्याच्या माणसांनी बनविलेल्या लाकडी तोफा. आता खानाच्या तोफांना गडावरूनही काही प्रमाणात प्रत्युत्तर मिळणार होते. उरलेला प्रश्न होता तो फक्त मुगल फौजफाटा गडावरील सैन्यापेक्षा कैक पटीने जास्त होता या गोष्टीचा. आणि या प्रश्नांचे उत्तर फक्त एकच होते आणि ते म्हणजे एकेकाने दहा जणांना पुरून उरणे.

——————————————-

दिवस उजाडला. खानाचा तोफखाना सिद्ध झाला. इकडे गडावर देखील किल्लेदाराने सगळ्यांना जमवून योग्य त्या सूचना दिल्या.

परत एकदा तोफा धडाडल्या. यावेळेस त्यांचा आवाज आधीच्या तोफांपेक्षा जास्त होता. तोफेच्या तोंडून बाहेर पडलेला गोळा बुरुजाच्या पायथ्याशी पडला आणि किल्लेदाराचे धाबे दणाणले. यावेळीही तोफगोळे बुरुजापर्यंत पोहोचणार नाही असेच किल्लेदार समजून होता पण या पहिल्याच तोफगोळ्याने त्याला वास्तवात आणले. त्याला काही समजायच्या आतच दुसरा गोळा बुरुजाला येऊन धडकला. जबरदस्त मोठा आवाज झाला आणि किल्लेदाराने सावधगिरी म्हणून किल्ल्याच्या तटाजवळ असलेल्या बायकामुलांना सुरक्षितजागी नेण्याचा हुकुम केला.

वेळ खरंचच आणीबाणीची होती. तटाजवळ थांबणे धोकादायक होते. पण तिथून बाजूला होणे त्यापेक्षाही धोकादायक ठरणार होते. काहीही करून खानाच्या तोफखान्याला निर्बंधित करणे गरजेचे होते. पण कसे? उत्तर एकच… प्रतिहल्ला…

“तुका…” किल्लेदारानं आवाज दिला.

“जी किल्लेदार…” तुका काहीसा पळतच किल्लेदाराजवळ हजर झाला.

“पुन्यांदा तुजी तोप वापरायची हाय आपल्याला…” किल्लेदाराने सांगितले आणि गडावर लगबग सुरु झाली. तुकाने बनविलेल्या दोन्ही तोफा दोन बाजूला ठेवण्यात आल्या. त्यातील एका तोफेच्या चामडी भागात तोफगोळा ठेवण्यात आला आणि काही वेळातच तो तोफेतून सुटला. हा गोळा खानाच्या तोफखान्याच्या काही अंतर समोर पडला आणि त्याचा स्फोट झाला. गोळ्याचे तुकडे इतस्ततः विखुरले गेले. कित्येक तुकड्यांनी बंदुकीच्या गोळीप्रमाणे आपले काम चोख बजावले. समोर असलेले अनेक जण जखमी झाले. काही वेळासाठी खानाची तोफ थंडावली. हा किल्लेदारासाठी शुभशकून होता.

“भले शाब्बास…” किल्लेदाराचा उत्साह दुणावला. किल्लेदाराच्या शाब्बासकीची थाप पाठीवर पडल्यामुळे गडावरील सैन्यात देखील उत्साह आला.

इकडे मात्र तोफखान्याच्या समोरच तोफगोळा पडल्याचे पाहून खान पूर्णतः संतापला.

“या अल्ला… इन मरहट्टोके पास तोपे कहांसे आयी? मैने तो सुना था, इस किलेपर एक भी तोप नही है?” त्याने त्याच्या अधिकाऱ्याला विचारले.

“हुजूर… जितना पता चला है… उपर एक भी तोप नही है…” त्याने घाबरत घाबरत उत्तर दिले.

“तो? ये जो गोला किलेपरसे आया है वो क्या किसीने हाथसे फेका है?” खानाने संतापून विचारले.

“-“ काय बोलावे हे न समजल्याने तो अधिकारी मान खाली घालून उभा राहिला.

“बोलो…” खान परत गरजला…

“गुस्ताखी माफ हुजूर…”

खरे तर जी अवस्था अधिकाऱ्याची होती तशीच काहीशी अवस्था खानाचीही होती. काय होते आहे ते त्याला तरी कुठे समजत होते? तेवढ्यात एका घोडेस्वाराने खानाजवळ येवून मुजरा केला.

“हुजूर… अल्ला कि मेहेर हुई है… पीछे की तरफ से किलेकी तटबंदी टूट गयी है…” त्याने खानाला माहिती दिली आणि खानाचा राग कुठल्या कुठे पळाला.

“बहोत बढीया…” म्हणत खानाने घोड्याला टाच मारली आणि तो गडाच्या मागील बाजूस निघाला.

खान आला त्यावेळेस तोफखान्याचा गडावर जोरदार मारा चालू होता. काही वेळापूर्वी गडावरून येणारे तोफगोळे काहीसे थांबले होते. खानाने वर पाहिले त्यावेळेस गडाच्या तटबंदीला खिंडार पडले होते. सैय्यदशा तिखट मारा करत होता.

“सय्यदशा… किलेपर हमला करो…” त्याने उत्साहात सांगितले…

“जी हुजूर…” म्हणत सय्यदशाने जवळपास २ हजार पायदळ बरोबर घेतले आणि गड चढायला सुरुवात केली. गडावरून काहीही प्रतिसाद येत नव्हता त्यामुळे त्याचा उत्साह वाढत होता. जवळपास अर्धा गड चढून झाला आणि परत अघटीत घडले. किल्ल्यावरून हर हर महादेवच्या घोषणांनी परिसर दणाणला. कुणाला काही समजण्यापूर्वीच मोठमोठे दगड खाली घरंगळत आले आणि त्यांनी त्यांचे काय चोखपणे बजावले. हा अनुभव जुन्या सैन्याला असला तरी खानाच्या नवीन सैन्यासाठी पूर्णतः नवा होता. त्यामुळे त्यांच्यात हाहाकार माजला. एकेक जण जायबंदी होऊ लागला आणि मुगल सैन्याला पुढे पाऊल टाकणे दुरापास्त झाले. शेवटी त्यांना माघार घ्यावी लागली. स्वतः सैय्यदशा देखील अगदी थोडक्यात बचावला होता.

माघारी परतणारे सैन्य पाहून मात्र खानाचा पारा चढला. पण वरून होणारा दगडांचा मारा इतका तिखट होता की स्वतः खानाला देखील माघार घ्यावीच लागली असती.

आतापर्यंत सूर्य अस्ताला गेला होता. थंडीचा कडाका वाढला होता. सैन्य देखील थकले होते त्यामुळे मग दुसऱ्या दिवशी सकाळीच गडावर पुन्हा तोफांचा मारा करण्याचे त्याने ठरवले. या वेळेस देखील जवळपास हजार जण निकामी झाले होते.

सकाळ उजाडली तसा तोफखाना तोफगोळ्यांचा मारा करण्यासाठी सज्ज झाला. सैय्यदशा तोफखान्याजवळ पोहोचला. त्याने वर पाहिले आणि त्याचे डोळे विस्फारले. डोके गरगरले. आपण काय पाहतो आहोत त्यावर त्याचा विश्वासच बसेना. तेवढ्यात खानही तिथे आला. त्याचीही गत सैय्यदशा सारखीच होती. ज्या ठिकाणी तटबंदीला खिंडार पडले होते ते रात्रीतून बुजवण्यात आले होते. किल्ल्याची तटबंदी पुन्हा पहिल्या सारखीच दिमाखात उभी होती. त्याला ती आपल्यावर हसते आहे असा भास झाला. आणि त्याच्या मनात आता फक्त एकच विचार घोळत होता… तो म्हणजे… “किल्ल्यावर माणसेच आहेत की भुते???”

क्रमशः- झुंज भाग ९.

मिलिंद जोशी, नाशिक…

झुंज भाग १

झुंज भाग 8

झुंज भाग 10

Leave a comment