झुंज भाग २

By Discover Maharashtra Views: 3900 6 Min Read

झुंज भाग २ –

(झुंज – कथा रामशेजची)

औरंगजेब बादशहाचा दरबार खच्चून भरला होता. प्रत्येकजण आपापल्या हुद्द्याप्रमाणे बसलेला होता. तेवढ्यात द्वारपालाने हाळी दिली. बादशहाचे दरबारात आगमन झाले. आज बादशहा काहीसा खुशीत दिसत होता. तसेही आजकाल बादशहा नेहमीच खुश दिसत होता. त्याचे मुख्य कारण म्हणजे त्याचा सगळ्यात मोठा शत्रू शिवाजी महाराजांच्या निधनाची वार्ता त्याला समजली होती. ज्याच्यापुढे आपल्या मोठमोठ्या फौजा हतबल ठरल्या होत्या. ज्याने आपल्या प्रत्येक दक्षिण मोहिमेत अडसर निर्माण केला तो दख्खन का चुहा आपोआप मार्गातून बाजूला झाला होता. आणि म्हणूनच ‘आल्लातालाची आपल्यावर मेहेर झाली आहे’ असेच तो समजत होता. बादशहा गादीवर जाऊन बसला. त्याच्या पाठोपाठ त्याचे सगळे मानकरी, सरदार देखील आपापल्या जागी स्थानापन्न झाले आणि दरबाराच्या कामकाजाला सुरुवात झाली.

“शहाबुद्दीन खान…!” बादशाहने आपला मोर्चा शहाबुद्दीन खानाकडे वळवला.

“जी जहांपना…!” काहीसे उठत मान खाली घालून खानाने बादशहाला कुर्निसात केला.

“हमारा सबसे बडा दुश्मन कौन था?” आपली दाढी एका हाताने कुरवाळत बादशाहने प्रश्न केला.

“वो.., दख्खन का चुहा जहांपना…!” खाली मानेनेच खानाने उत्तर दिले. खानाचे उत्तर ऐकताच बादशहाच्या चेहऱ्यावर कुटील स्मित आले.

“अब तो वो नही है ना?” बादशहाचा पुढचा प्रश्न.

“नही जहांपना…!” खान फक्त विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत होता. दरबारात पूर्ण शांतता होती. प्रत्येक जण बादशहा काय म्हणतोय हे कान देऊन ऐकत होता.

“तो फिर दख्खनके किले अभी हमारी सल्तनतमे क्यो नही है?” एकाएकी बादशहाचा आवाज चढला.

“हुकुम किजीये जहांपना. कुछ ही दिनोमे सारे किले अपनी सल्तनतमे शामिल होंगे.” खानाने आपली नजर वर उचलत आणि एक हात आपल्या तलवारीच्या मुठीवर ठेवत उत्तर दिले.

“ठीक है… जितनी भी फौज चाहो, तुम्हे मिल जायेगी..” बादशहा खुश झाला.

“गुस्ताखी माफ जहांपना…!” एक सरदार उठून कुर्निसात करत म्हणाला.

“बोलो… क्या बात है?” बादशहा काहीसा चिडला.

“जहांपना.. सिवा का बेटा संभा अपने बापसे दस कदम आगे है… आजतक हमारी फौजे उसको एक बार भी शिकस्त देनेमे कामयाब नही हुई है…” त्या सरदाराने खाली मानेनेच मनातील विचार बोलून दाखवला. मराठ्यांच्या छापेमारीने आणि पराक्रमाने हैरान झालेला बादशहा अजूनच भडकला. एक तुच्छ सरदार आपल्यापुढे आपलेच अपयश दाखवतोय हेच त्याला सहन होण्यासारखे नव्हते. पण राज्य टिकवायचे तर प्रत्येक गोष्टींचा विचार करणे हेही तितकेच महत्वाचे होते. त्यामुळे त्याने आलेल्या रागावर काहीसे नियंत्रण मिळवले पण चेहऱ्यावर आलेला संताप कुणापासूनही लपू शकला नाही.

“तो?” बादशहा काहीसा ओरडलाच.

“माफी जहांपना… पर संबाको शिकस्त देनी है तो पेहेले उसके मुलुखपर कब्जा करना पडेगा. अभी संबा रायगडपे है, हम गुलशनाबाद लेते है तो संबा अपने बीलसे निकलेगा, और हम आसानीसे उसे खात्म कर सकते है…!” सरदाराने आपला कुटील विचार बोलून दाखवला. हे ऐकून मात्र बादशहाचा संताप बराच कमी झाला. सरदाराने जे काही बोलला त्यात काहीच गैर नव्हते. जोपर्यंत संभाजी सह्याद्रीच्या खोऱ्यात आहे तोपर्यंत त्याला शिकस्त देणे आपल्याला शक्य नाही हे बादशाह पक्के जाणून होता.

“ठीक है…!” बादशहा म्हणाला आणि सरदार खाली बसला. खान मात्र अजूनही उभाच होता. बादशहाने पुन्हा आपला मोर्चा खानाकडे वळवला.

“शहाबुद्दीनखान… तुम १० हजार की फौज लेकर गुलशनाबाद जावो. सबसे पहले वहां का सबसे छोटा किला रामसेज कब्जेमे लो. फिर त्र्यंबक, अहिवंत, मार्कंडा और साल्हेरपे आपना चांदसितारा लेहेरावो… अगर जरुरत पडे तो धोडपसे अलीवर्दीखान तुम्हे सहायता देगा.” बादशहाने हुकुम दिला.

“जी जहांपना…”

“रामसेज याद है ना? पेहेले भी तुमने कोशिश की थी, और खाली हाथ आए थे..!” बादशाहने खानाला मुद्दाम आठवण करून दिली. कारण जितका खान संतापेल तितका अधिक आक्रमक होऊन किल्ला लवकरात लवकर घेईल हेच बादशहा मानत होता.

“जी जहांपना..! पर तब बात अलग थी. अब बात अलग है. किलेपर कोई भी सरदार नही है. कोई नया किलेदार तैनात है. बहुत छोटासा किला होने के कारन वहां लोग भी ज्यादा नही है. और जो है उसमेभी बहोतसे बुढे और बच्चे है…!” संपूर्ण दरबारात बादशहाने आपल्याला खिजवले हे खानाला पसंत पडले नाही. त्याचा चेहराच ते सांगून जात होता.

“तो? कितने दिन चाहिये?” आपली मात्रा बरोबर लागू पडली हे पाहून खुश होत बादशहाने विचारले.

“सिर्फ एक दिन जहांपना… सिर्फ एकही दिनमे उसपर अपना चांदसितारा फडकेगा..!” खान आढ्यतेने म्हणाला आणि बादशहा खुश झाला.

“ठीक है, कलही १० हजार की फौज लेकर तुम निकलो.” बादशहाने हुकुम दिला आणि खान खाली बसला.

रायगडावर संभाजी राजे आपल्या मंत्रिमंडळाबरोबर मोहिमेची तयारी करत होते. तेवढ्यात एक दूत गुप्तहेराने पाठवलेला निरोप घेवून आला. बादशहाच्या दरबारात घडलेल्या सगळ्या घटना त्याने राजांच्या कानावर घातल्या. एकीकडे मुघल फौजांची एक तुकडी सह्याद्रीच्या खोऱ्यात धुमाकूळ घालत होती. त्यांचा बिमोड करण्यासाठी राजांना रायगड सोडता येणार नव्हता. बातमी तर खूपच गंभीर होती. नाशिक हातून जाणे म्हणजे स्वराज्याचे सगळ्यात मोठे नुकसान होणार होते. शेवटी सगळ्यांची चर्चा केल्यानंतर राजांनी रामशेजच्या किल्लादारासाठी एक खलिता पाठवला. त्यात जितका होईल तितका प्रतिकार करावा पण वेळप्रसंगी योग्य तो निर्णय स्वतःच घ्यावा असा निरोप पाठविण्यात आला.

हाच खलिता रावजी घेऊन आला होता.

क्रमशः-  झुंज भाग २.

मिलिंद जोशी, नाशिक

झुंज भाग १

झुंज भाग ३

Leave a comment