झुंज भाग ११

By Discover Maharashtra Views: 3973 11 Min Read

झुंज भाग ११ –

(झुंज – कथा रामशेजची)

“तुम किला फतेह कर सकते हो?” खानाने प्रश्न केला.

“जी हुजूर… पर…” मांत्रिकाच्या चेहऱ्यावर धन कमविण्याची हाव खानाला स्पष्ट दिसली. त्याचे माथे ठणकले. पण याच्यावर काही धन खर्च करून फौजेचे मनोबल वाढणार असेल तर तो सौदा देखील खानासाठी फायद्याचा ठरणार होता. म्हणूनच तो गप्प राहिला.

“पर??? आगे बोलो…” काहीशा चढ्या आवाजात खानाने फर्मावले.

“हुजूर… वहां एक नही बहोत सारे भूत है… उन सबको वशमे करना पडेगा… उसका खर्च थोडा जादा होगा…” मांत्रिकाने सांगितले. त्याच्या चेहऱ्यावरील कुटिल भाव स्पष्ट जाणवत होते.

“आगे बोलो…”

“हुजूर… इसके लिए मुझे एक सोनेका नाग बनवाना पडेगा… फिर उसकी पूजा होगी, तो वो सिद्ध हो जायेगा. उसके बाद वो अपनी हर इच्छा पुरी करेगा. तो एक क्या सौ भूतोंपर भारी पडता है…”

“ठीक है… इसके लिए कितना खर्च होगा?” खानाने विचारले.

“उसके लिए सौ तोला सोना चाहिये…” काहीसे अडखळत मांत्रिकाने सांगितले.

“ठीक है… सबकुछ मिल जाएगा…”

“हुजूर… दो दिन बाद पुनव है… उसी दिन हम उस नाग की मदत से किला जीत लेंगे…” खानाला खुश करण्यासाठी मांत्रिक म्हणाला आणि त्यांची भेट संपली.

दोन दिवसांनी १०० तोळे सोन्याचा नाग हातात घेऊन मांत्रिक खानापुढे हजर झाला. खानाच्या शामियान्याच्या बाहेर त्याने पूजा मांडली. त्या पूजेच्या मधोमध त्याने सोन्याचा नाग ठेवला आणि तोंडाने असंबद्ध शब्दोच्चार चालू झाले. जवळपास सर्वच सैन्य अधिकारी त्याची पूजा पाहण्यास हजर झाले होते. स्वतः खान देखील मांत्रिकाचा खेळ पहात होता. जवळपास घटकाभर त्याचा हा खेळ चालला. त्यानंतर त्याने तो नाग स्वतःच्या हातात घेतला आणि गडावर आक्रमण करण्यासाठी खानाची परवानगी मागितली.

काही वेळातच खानाचे सैन्य पुन्हा तयार झाले. यावेळेस सैन्याच्या सगळ्यात पुढे डोक्यावर नाग घेऊन मांत्रिक चालत होता. त्याच्या मागोमाग काही अधिकारी आणि त्यांच्या मागे जवळपास तीन ते चार हजार पायदळ. सर्वांनी गड चढायला सुरुवात केली.

हे सगळेच किल्लेदार त्याच्या साथीदारांसह तटबंदीवरून पहात होता. आज कुणीतरी काळे कपडे घातलेला माणूस त्या सगळ्या सैन्याचे नेतृत्व करत होता. त्याच्या डोक्यावर काहीतरी चमकत होते पण ते नक्की काय आहे हे मात्र त्याला नीटसे समजले नाही. ते जसे अर्धा डोंगर चढून वर आले तेंव्हा किल्लेदाराच्या लक्षात सगळा प्रकार आला. त्याला खानाच्या या कृत्याचे हसू आले.

“कामून हासून ऱ्हायले किल्लेदार?” तात्याने विचारले.

“ह्यो खान तर लैच येडा हाये तात्या…” किल्लेदार हसून म्हणाला.

“येडा? आन त्यो कसा?” तात्या गोंधळला.

“तात्या… आपन ऐकत नाई म्हनून त्यानं मांत्रिकाला बोलीवला… आता त्यो मांत्रिक काय करनार हाय?”

“पन किल्लेदार… त्याच्या मागं फौज बी हाय की…”

“असू दे ना… आपल्याकडं दगड धोंडे काय कमी हायेत का?” किल्लेदार हसला आणि तात्यालाही हसू आले.

“तात्या… आपल्या समद्या पोरास्नी बोलव… आन त्येंना सांग बरुबर तुमची गलोरीबी घिवून या…”

“जी किल्लेदार…” खरे तर किल्लेदार पोरांना का बोलावतो आहे हेच मुळी तात्याच्या ध्यानात आले नाही. पण किल्लेदाराने बोलावले म्हटल्यावर नाही तरी कसे म्हणणार?

काही वेळात पोरं गलोरी घेऊन किल्लेदारासमोर हजर झाले.

“कारं पोरांनो… आज युध करनार का?” त्याने विचारले आणि पोरांना आनंद झाला.

“व्हय किल्लेदार…” सगळ्यांनी एक सुरात उत्तर दिले.

“आज म्या तुमची नेमबाजी पहानार हाये… तुमी दावणार ना?”

“व्हय…”

“मंग आता गडाच्या खाली पघा… त्यो काळा डगला घातलेला मानुस हाय नव्हं, त्याच्यावर समद्यांनी गलोरी तानायची.” गड चढत असलेल्या मांत्रिकाकडे बोट दाखवत किल्लेदाराने सांगितले. मांत्रिकाकडे पाहिल्यावर पोरे थोडीशी गडबडली.

“त्येच्यावर?” त्यांच्या स्वरात गोंधळ उडालेला पूर्णतः दिसून येत होता.

“व्हय…”

“पर किल्लेदार…”

“का? काय झालं?” किल्लेदाराने विचारले.

“माजी आय म्हनते, सादूच्या आन मांत्रिकाच्या नादी लागायचं नाय…” त्यांच्यातील एक जण उत्तरला.

“कामून?”

“आवं… त्ये लोकं आपल्यावर खाक फुकून पाखरू बनिवता, उंदीर बनिवता. कदी कदी त दगुड बी बनतो मानसाचा…” त्याने सांगितले आणि किल्लेदाराला हसू आले.

“आरं… असं काय बी नस्तं. आन त्यानं अशी खाक फुकली त आपला देव हाय ना… ह्यो रामाचा गड हाये. रामाचं नाव घेतलं की भूतं बी पळत्यात. ह्यो तर मानुस हाये…” किल्लेदाराने सांगितले आणि पोरं विचारात पडली.

“काय बरुबर ना?”

“जी किल्लेदार…” पोरांनी एकसुरात उत्तर दिले.

“मंग घ्या रामाचं नांव आन ताना गलोरी त्या बाबावर…” किल्लेदाराने सांगितले आणि मुलांच्या गलोरी ताणल्या गेल्या.

मधूनच वर पहात अगदी सावधपणे डोक्यावर नाग घेऊन मांत्रिक गड चढत होता. त्यालाही तटावर माणसे दिसत होती. मनातून तो पूर्णतः घाबरला होता. कुठून आपण सोन्याच्या मोहाला बळी पडलो आणि या ठिकाणी आलो असेच त्याचे मन त्याला सांगत होते. पण आता वेळ निघून गेली होती. मागे मुगल सैन्य असल्यामुळे परत फिरणे त्याला शक्यच नव्हते. त्याचा हाच विचार चालू होता आणि एक छोटासा दगड त्याच्या कपाळावर लागला. त्याच्या तोंडून आवाज निघतो न निघतो तोच एका पाठोपाठ एक दगड त्याच्या अंगावर आपटू लागले. त्याच्या हातून सोन्याचा नाग केंव्हाच दूर जाऊन पडला. तो खाली कोसळला तरीही दगडांचा मारा संपला नव्हता. त्या छोट्या दगडांनी त्याला कित्येक जखमा केल्या होत्या. त्याच्या आरोळ्यांनी आसमंत दणाणून गेले. आजपर्यंत त्याने सांगितले म्हणून कित्येकांना दगडाने ठेचून मारले गेले होते. त्या सगळ्याचे फळ त्याला या रूपाने मिळत होते. काही वेळातच त्याचा आवाज बंद झाला आणि गडावरून परत एकदा मोठे दगड गडगडत येण्यास सुरुवात झाली. खानाच्या सैन्यात हाहाकार माजला. यावेळेस जो मोठे दगड वाचवत होता त्याला गलोरीचा प्रसाद मिळत होता. दोन ते तीन घटकातच जवळपास हजारएक लोकं कामास आले आणि मागे असलेले सैनिक पुढच्या तुकडीची ही गत पाहून मागच्या मागे पळून गेले.

खानाच्या हा डाव देखील नेहमीप्रमाणे त्याच्यावरच उलटला.

—————————————-

जरी खानाने वरवर दाखवले नाही तरी ही घटना त्याच्यावर खूपच नकारात्मक परिणाम करून गेली. त्यानंतरही त्याने काही दिवस वेगवेगळे प्रयत्न केले पण त्याचा एकही प्रयत्न यशस्वी झाला नाही. पण त्याला माघार घेणेही कमीपणाचे वाटत होते आणि त्यामुळेच आपले सैन्य हकनाक बळी पडत आहे हे माहित असूनही त्याला गड घेण्यासाठी प्रयत्न करत रहावे लागत होते. बरे कोणतीही शक्कल लढवली तरी त्याचा परिणाम फक्त एकच होता. आणि तो म्हणजे त्याची हार.

आजही खान आपल्या शामियान्यात नेहमीसारख्या फेऱ्या घालत होता, तेवढ्यात हुजऱ्या आत आला. त्याने खानाला कुर्निसात केला आणि बादशहाकडून जासूद आल्याची वर्दी दिली. क्षणाचाही विलंब न लावता खानाने त्याला आत बोलावले. बादशहाने कोणता हुकुम पाठवला असणार हे खानाने आधीच ओळखले. जासुदाने बादशहाचा खलिता खानाच्या स्वाधीन केला. जी गोष्ट घडू नये असे खानाला वाटत होते तीच गोष्ट त्याच्या नशिबी आली. बादशहाने त्याला रामशेजच्या स्वारीची सूत्रे कासम खानाच्या सुपूर्द करायला सांगितली आणि त्याची तळकोकण प्रांतात परस्पर रवानगीही केली होती. पण जो पर्यंत कासम खान मोहिमेची सूत्रे हातात घेत नाही तो पर्यंत मात्र फतेहखानाला तिथेच थांबण्याचा आदेशही देण्यात आला होता.

शहंशहाचा खलिता मिळाल्यापासून जवळपास ५ दिवसांनी कासम खान बरोबर १० हजाराची फौज घेऊन हजर झाला. ही फौज पूर्णतः नवीन दमाची होती. जवळपास १५ हजाराची फौज तिथेच ठेवून उरलेली फौज घेऊन फतेहखान तळकोकणाकडे रवाना झाला.

पुढील काही दिवस कासमखानाने देखील गड घेण्याचे आटोकाट प्रयत्न केले पण सगळे विफल झाले. शेवटी त्याने गडाला वेढा देऊन वाट पाहण्याचे ठरवले.

गडावरील रसदही संपत आली होती. कासमखानाने गडावरील हमला पूर्णतः बंद केला आणि त्यामुळेच हळूहळू किल्ल्यावरील लोकांची बेचैनी वाढत होती. पण त्यांच्या हातात यावर उपाय करण्यासारखे काहीही नव्हते.

रायगडावर संभाजी महाराज चिंताग्रस्त वाटत होते. त्रंबक गडावरून रामशेज बद्दलची माहिती आठवडा / १५ दिवसांच्या अंतराने त्यांना मिळतच होती पण अगदी इच्छा असूनही त्यांना रामशेजच्या मदतीला जाणे शक्य होत नव्हते. स्वतः बादशहा औरंगजेब औरंगाबादला तळ ठोकून होता. जंजीऱ्याचा सिद्धी, गोव्याचे पोर्तुगीस, औरंगजेब बादशहाने स्वतःकडे फितूर केलेले मराठे सरदार आणि पोर्तुगीजांनी फितूर केलेला मराठा सरदार सावंत यांच्याशी महाराजांच्या चकमकी उडत होत्या. आणि त्यामुळेच त्यांना रामशेजकडे लक्ष देणे जमत नव्हते. जवळपास तीन वर्षांपासून रामशेज एकटा झुंजत होता. आणि अजूनही त्याने हार मानली नव्हती. असा किल्ला मुगलांच्या हाती जाऊ द्यायला महाराजही तयार नव्हते. शेवटी त्यांनी मनाचा निश्चय केला आणि रामशेजच्या मदतीला कुमक पाठवायचे निश्चित केले. गडाला वेढा घालून बसलेल्या मुगल फौजेचे संख्याबळ जवळपास २५००० होते. तेवढे सैन्य पाठवणे महाराजांना शक्य नव्हते. शेवटी त्यांनी रुपाजी भोसले आणि मानोजी मोरे या दोन सरदारांना रायगडावर बोलावले.

दोन दिवसातच दोघेही सरदार महाराजांपुढे हजर झाले.

“आज्ञा महाराज…” महाराजांना मुजरा करून रुपाजी उभे राहिले.

“रुपाजी, मानोजी… बसा…” महाराजांनी त्यांना बसायला सांगितले. दोघेही स्थानापन्न होताच महाराजांनी सुरुवात केली.

“तुम्ही तर जानताच सध्या स्वराज्यासाठी आपणा सर्वांनाच जीवाचे रान करावे लागत आहे. एकही दिवस उसंत नाही. आणि याचाच फायदा मुगल बादशाह उचलतो आहे. त्याने नाशिकप्रांतात धुमाकूळ माजवला आहे. गेल्या तीन वर्षांपासून रामशेजचा किल्लेदार एकटा मुगल फौजेशी झुंज देतोय. तसे त्याला त्र्यंबक गडाचा किल्लेदार आणि अहिवंत किल्ल्याचा किल्लेदार यांनी रसद पुरवली पण ती कितीशी असणार? औरंगजेबाने या दरम्यान तीन सरदार बदलले आहेत. रामशेजचा किल्लेदार स्वतः शूर आहेच पण आपल्या रयतेचे काय? रसद संपली तर स्वतःच्या प्राणांचे बलिदान किंवा मुगलांचा अमल यापैकी एक गोष्ट त्यांच्या वाट्याला येईल. आणि असे झाले तर आम्हाला राजा म्हणवून घेण्यास काय अभिमान वाटणार? हे राज्य रयतेचे आहे. इथे आपण रयतेसाठी लढा देत आहोत. त्यामुळे तुम्ही दोघांनी तत्काळ रसद घेऊन रामशेजच्या मदतीला जा. पण एक लक्षात ठेवा… कोणताही आततायी निर्णय घेऊ नका. यावेळेस आपल्याला लढाई करायची नाही तर किल्लेदाराला रसद पुरवायची आहे.” महाराजांनी नेमकी गोष्ट दोघांना सांगितली.

“आपल्या मनाप्रमानंच हुईल महाराज… काळजी नसावी…” मानोजींनी त्यांना आश्वस्थ केले.

“आणि किल्लेदाराला आमचा निरोपही कळवा… तुमच्या सारखे मर्द मराठे स्वराज्याचे रक्षक असल्यामुळेच आम्ही निश्चिंत आहोत…”

“जी महाराज…” महाराजांना मुजरा करून दोघांनीही राजांच्या निरोप घेतला.

दोघेही सरदार बरोबर फक्त पाचशे घोडेस्वार घेऊन निघाले. खरे तर रुपाजी मनातून काहीसे हिरमुसले होते. महाराजांनी स्पष्ट शब्दात त्यांना शक्यतो लढाई न करण्यासाठी बजावले होते. एकावेळेस पाच पन्नास माणसांना अंगावर घेण्याची धमक असलेला शूर गडी खानाच्या सैन्यासमोर जाऊनही फक्त लपून बसून वाट पाहणार ही गोष्ट त्यांना काहीशी खटकत होती. पण स्वराज्यासाठी प्रसंगानुरूप वागण्याची कलाही दोघांनी चांगलीच साधली होती आणि याच गोष्टीमुळे महाराजांनी त्यांची निवड केली होती.

मराठा तुकडी जशी नाशिक प्रांतात शिरली तशी त्यांनी सगळ्यात पहिली भेट पट्टा किल्ल्याला दिली. तेथील किल्लेदाराकडून संपूर्ण रसद स्वतःच्या ताब्यात घेऊन त्यांनी रामशेजकडे प्रयाण केले.

क्रमशः- झुंज भाग ११.

मिलिंद जोशी, नाशिक…

झुंज भाग १

झुंज भाग 10

झुंज भाग 12

Leave a comment