महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

माहुलीचा वेढा

By Discover Maharashtra Views: 2397 3 Min Read

 माहुलीचा वेढा…

शहाजीराजे हे निजामशाहीच्या सेवेत रुजू होते. निजामशाहाच्या मृत्युपश्चात त्याची सात आठ वर्षाची दोन मुले होती. निजामशाही दरबारात साबाजी अनंत हे ब्राम्हण मुत्सद्दी तसेच थोर अकलवंत कार्यरत होते. पातशाहच्या बायकाेने साबाजीस विचारले “आता पातशाहीस एखादा वजीर दिवाण पाहिजे, चोख बंदोबस्त करणारा असा अकलवंत मोहरा पाहिजे”. त्यानंतर साबाजी यांनी शहाजी राजांस पातशाहीच्या बायकाेकडे घेऊन गेले. मुळात शहाजीराजे हे देखणे, अकलवंत आणि तसेच शूर शिपाई असल्याकारणाने साबाजी यांनी शहाजीराजे यांचे नाव सुचवले आणि म्हणाले “हा दिवाण वजीरीलायक आहे” असा अर्ज साबाजी यांनी केला त्यावरून निजामशाहच्या बायकाेने देखील यास मंजुरी दिली.

निजामशाहीच्या अस्तानंतर राज्य चालवण्यासाठी शहाजीराजांनी त्यांच्या दोन्ही मुलांना स्वत: मांडीवर घेतले आणि गादीवर बसुन राज्य कारभार पाहू लागले. गादीखाली जाधवराव वगैरे मनसबदार लोक मुजऱ्यास घेतले. कित्येक दिवस अशा प्रकारे कारभार केला. लखुजीराव जाधव याना त्यावेळी खूप दुःख झाले होते कारण, त्यांच्याकडे भोसले यांची सोयरीक जुळली होती आणि तेच भोसले पातशाहीची मुले घेऊन कारभार पाहतात आणि आम्हास मुजरा करावा लागतो हे त्यास योग्य नाही वाटले. त्यावेळी जाधवरावांनी मनसुबा करून दिल्लीस शाहजाद्याकडे वकील अर्जी पाठवून साठ हजार फौज उत्तरेकडून मागवली आणि ते दौलताबादेस चालून आले.
जेव्हा हि खबर शहाजीराजे यांस कळाली तेव्हा त्यांनी मुलगा आणि बायकोसमवेत (म्हणजेच पुत्र संभाजी आणि जिजाऊसाहेबां सोबत) कल्याण भिवंडी जवळ असलेल्या किल्ले माहुली येथे आले. कोकणातील थोर किल्ला पाहून सोबत काही फौज घेऊन ते येथे आश्रयास आले. मागून जाधवराव व उत्तरेकडून आलेली फौज माहुलीस सहा महिने लढाई – वेढा घालून बसली होती. शहाजीराजांनी लढा चालू असतानाच विजापूरच्या पातशाहास अर्ज लिहून वकील पाठवला आणि त्यात म्हंटले कि “पातशाहची मोहीम झाली. आमचे सासरे फौज घेऊन आमच्यावर चालून आले. आम्ही माहुली किल्ला बळकावून बसलो आहे. जर का पातशाह आम्हाला कौल पाठवतील आणि दौलत अधिक देतील तर आम्ही फौजेसह पातशाहीच्या चाकरीत येऊ”. त्यावरून पातशाह विजापूरचे मुरारजगदेव दिवाण पातशाही त्यांनी कौल आणि इमान पाठवले.
त्यानुसार शहाजीराजे यांनी आपल्या पाच हजार फौजेनिशी जाधवरावांचा वेढा मारून रातोरात माहुली वरून पलायन केले. सोबत पुत्र संभाजी आणि जिजाऊसाहेब होत्याच. त्यावेळी जिजाऊसाहेब सात महिन्याच्या गरोदर होत्या. त्यामुळे पलायन, आपल्या वडिलांचा होणार पाठलाग हि सर्व दगदग त्यांना सहन होत नव्हती. शहाजीराजांनी हे जाणिले आणि त्यांनी आपल्या फौजेतील शंभर स्वार जिजाऊंसोबत ठेऊन ते पुढारी निघून गेले. मागून जाधवराव आपल्या फौजेनिशी येत होते त्यांनी वाटेत जिजाऊसाहेबांना पाहिले. जाधवराव यांनी पाचशे स्वार पाठवून जिजाऊसाहेबांना त्वरित शिवनेरी किल्ल्यावर घेऊन गेले. त्यावेळी जिजाऊसाहेब यांनी शिवनेरीवर असलेल्या शिवाई देवीस नवस आपणास जर पुत्र जाहला तर त्यास तुझे नाव देऊ…
एकंदरीत वरील घटना पाहिल्यावर एक गोष्ट लक्षात येते, जर का माहुलीचा वेढा काही काळ अजून चालू राहिला असता तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा किल्ले माहुली येथे झाला असता.
संकलन – मयुर खोपेकर, बा रायगड परिवार
संदर्भ – ९१ कलमी बखर (राजवाडे. साने, फॉरेस्ट)

 

Leave a comment