महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

सुरत – बतसुरत | भाग १

By Discover Maharashtra Views: 5434 18 Min Read

सुरत – बतसुरत | भाग १.

इतिहासप्रसिद्ध सुरतेची पहिली लूट…

काळोख पडून , १ प्रहर झाला , चंद्रप्रकाशाला चिरत , शिवराय ३०० जाबाज , मावळ्यांना घेऊन लालमहालात प्रवेशले . ठरल्याप्रमाणे सर्वजण आपापल्या कार्याला लागले , बहिर्जी नाईक स्वतः राजांसोबत होते . लालमहालात कापाकापी सुरू झाली , परंतु शास्ता ला ह्याची काही खबरच नाही , तो पुरता निद्राधीन झाला होता , प्रत्येकजण आपापली जबाबदारी पार पाडीत होता , बहिर्जी राजांना घेऊन खानाच्या कक्षाकडे घेऊन चालले होते , वाटेत येणाऱ्या , हशमांची सरळ कत्तल केली जात होती , लालमहालात रक्ताचा सडाच मराठ्यांनी घातला होता .(इतिहासप्रसिद्ध सुरतेची पहिली लूट)

अखेर तो निर्णायक क्षण आला , राजे शास्ताखानाच्या कक्षात आले , बघतात तर काय खान निर्धास्त झोपला आहे , समोर आपला काळ तलवार उपसून उभा आहे , ह्याची खानाला कल्पनासुद्धा नव्हती , राजांनी पलंगाला असलेले , कापडी आवरण टरकन फाडले , आवाजामुळे शास्ता जागा झाला , त्याच्या पायाखालची जमीनच हादरली , ” शिवाजी , शिवाजी …. ” , म्हणतात तो हा , राजे वार करणार तेवढ्यात खानाने पळ काढला , राजेही त्याच्यामागोमाग आले , अंधार होता , खान शेजारील स्त्रियांच्या शयनकक्षात शिरला , बुरखा घातला , शमादानं विझवली , राजे अचूक त्या शयनकक्षात आले , शिवाजी स्त्रियांवर शस्त्र उचलीत नाही हे खानाला पुरते ठाऊक होते , परंतु जरी खानाने बुरखा परिधान केला असला तरी राजांच्या तीक्ष्ण नजरेतून तो वाचला नाही , राजे समशेर घेऊन पुढे म्हणत आले , ” शास्ता आता तुझी खैर नाही ” , आपल्याला शिवाजीने ओळखले हे खानाने ओळखले त्याने बुरखा काढून पळायला सुरुवात केली , राजे त्याचा पाठलाग करत होते , खान जीवाच्या भीतीने पळत होता , राजे मागेच होते , हा प्रकार लालमहालाच्या पहिल्या मजल्यावर होत होता , पळता पळता खानाने एका खिडकीतून खाली उतरून पळ काढायचा

असा ठरवून तो खिडकीतून उतरू लागला , राजांनी लगोलग हेरून खानवर एक घाव घातला , खान पडला ….. राजांनी बघितले तर खान पडला होता , त्यावेळी राजांना असे वाटले की , खानाची गर्दन मारली , अंधार फार होता , आता राजांना लालमहालातून पसार होणे गरजेचे होते , कारण बाहेर पाऊण लाख फौज होती , आणि मोहिमेचा मुख्य भाग पार पडला होता , पुढे ठरलेल्या योजनेनुसार सर्वांनी आपली भूमिका पार पडली , मोहीम यशस्वी झाली . राजे सिंहगडी आले , दुसऱ्यादिवशी समजले की , खान मेला नाही , जो वार झाला त्यात खानाच्या हाताची ३ बोटे छाटली गेली .

परंतु शास्ताखान म्हणजे प्रतिऔरंगजेब , ह्याला शिवरायांची प्रचंड दहशत बसली , त्याने पुण्यातून ४ दिवसातच पळ काढला , नंतर औरंगजेबाने त्याची नियुक्ती बंगालला केली .

शास्तावर छापा घालून बरेच दिवस झाले , शास्ताचा प्रभाव कमी झाला आहे , हे पाहून आता आपण काही मोठी कामगिरी बजावू , जेणेकरून बादशहाच्या मनात आपले स्थान उंचावेल , असा मनसुभा बांधून जसवंतसिंह ( जोधपूरचा राजा ) , हा ३० हजार फौझेसह , तोफखाना , तसेच प्रचंड लवाजमा घेऊन निघाला , ” कोंढाणा घ्यायला ” , त्याने गडाला वेढा घातला आणि मराठ्यांसोबत संघर्ष चालूच होता ….. मराठे अतिशय तीव्र प्रतिकार करीत होते , जसवंतसिंह १ लाख फौज जरी घेऊन आला असता तरी त्याला विजय मिळाला नसता , हे निर्विवाद सत्य होते .

■ राजधानी गजबजली : –

शाईस्तेखानाचा एवढा मोठा पराभव , शिवाजी महाराजांनी केला , त्यामुळे राजगडावर आनंदीआनंद पसरला होता . दरबार भरला होता , राजांनी ह्या मोहिमेत , ज्यांनी पराक्रम गाजविला त्यांचा यथोचित सत्कार केला , सर्वांचा मानसन्मान केला . दरबाराचे कामकाज पूर्ण झाले , राजांनी बहिर्जी नाईकांना थांबायला सांगितले , बहीर्जींनी ओळखले , राजांच्या मनात नवी मोहीमेबद्दल विचार चालू आहे , आणि वेळ न दवडता बहिर्जी राजांना म्हटले , ” राजे कोणती मोहीम काढलीत ” , राजे स्मित देत म्हणाले , बहिर्जी तुम्ही सर्वच जाणता , तुम्ही तर आमचा ३ रा डोळा आहात , आणि डोळ्यापासून काहीही वाचत नाही . बहिर्जी आधी सिद्दी नंतर शास्ता ह्यांनी स्वराज्याची अपरिमित हानी केली , बराच प्रदेश बेचिराख केला आहे , त्यात रयतेचे हाल खूप वाईट आहेत , मोगलांनी गेल्या

३ वर्षात गावच्या-गावं पेटविली , सर्वत्र हाहाकार उडाला आहे , त्यात आरमाराला धन लागतंय आणि आरमार मजबूत करण्यासाठी एक नवा सागरीकिल्ल्याचे निर्मिती करण्याचा विचार आमच्या मनात आहे ; पण यासाठी मोठ्या प्रमाणात धन लागणार आहे , त्यामुळे आपण असं स्थान शोधा जेथून प्रचंड धन आपल्याला प्राप्त होईल . त्यावर बहिर्जी म्हणाले सद्यस्थितीत , अशी २ वैभवसंपन्न शहरं आहेत , ” सुरत व बुऱ्हाणपूर ” . राजे बुऱ्हाणपुरपेक्षा सुरत बरं आहे , त्याला दोन कारणं आहेत , संपत्ती बुऱ्हाणपूरच्या अधिक आणि परदेशांच्या वखारी आहेत . राजे लागलीच म्हणाले , आपण तात्काळ सुरतेत जावे , आणि सुरतेची खडानखडा , तपशीलवार माहिती काढून आणा . राजांना मुजरा करून ,बहीर्जींनी

निरोप घेतला .

■ बहीर्जींची अय्यारी : –

बहिर्जी अपल्यासमवेत हेरांचे एक मोठे पथक घेऊन सुरतेत दाखल झाले , त्यापथकात सुंदरजी , रावजी , विठूजी मानके , अप्पा रामोशी , अब्दुल कादर , संताजी बोबडे अशा अनेक गुप्तहेरांचा समावेश होता . सर्वांनी वेषांतर करून आपापल्या कार्याला सुरुवात केली , बहीर्जींनी स्वतः जातीने सुरतेच्या सुभेदाराची हेरगिरी केली , तपशील घेतला , इतर गुप्तहेर , गुप्तरित्या माहिती अतिशय सूक्ष्मपणे गोळा करत होते . १ महिना हेरांचे कार्य सुरू होते , संपूर्ण माहिती गोळा केली , आणि काही हेरांना सुरतेत ठेवून नाईक , राजगडाच्या रोखाने निघाले ….

■ राजे व बहीर्जींची गुप्तभेट : –

राजांना वर्दी देण्यात आली , राजे , बहिर्जी नाईक आल्यात , भेटीसाठी परवानगी मागत आहेत , त्यावेळी राजे मोरोपंतांसोबत मसलतीत गुंतले होते , राजांनी वर्दी देणाऱ्या मावल्याला , नाईकांना पाठवायला सांगितले आणि मोरोपंतांना जावयास सांगितले . नाईक आले , राजांना मुजरा केला , राजे बोलले , बोला बहिर्जी , कामगिरी बजावली आपण . बहिर्जी म्हणाले , राजे कामगिरी चोख बजावली . राजे म्हणतात एकूण सुरत काय म्हणते , त्यावर बहिर्जी म्हणाले , ” राजन सुरत काही म्हणत नाही , कारण ती गर्विष्ठ ; पण सुरत मारल्याने , अग्नीत द्रव्य आपणाला मिळेल ” . काय म्हणता बहिर्जी , होय राजे , सुरत ही प्रचंड वैभवसंपन्न आहे , सर्वीकडे श्रीमंतीथाट , राजे कुबेराचे ऐश्वर्य सुद्धा फिके पडेल इतकी , वैभवता सुरतेत आहे . तिथे ३ व्यापारी आहेत , वीरजी बोहरा , हाजी सय्यद बेग , हाजी कासम . राजे ह्या वीरजी बोहरा ह्याच्याकडे एवढी संपत्ती आहे , की त्यातून शास्ताखानाने आपल्याकडे ३ वर्ष जी हानी केली ती भरून निघेल , राजे म्हणतात एवढे धन . होय महाराज , हे तर काही नाही राजे हाजी कासमचं घर कोटीच्या संपत्तीने भरले आहे , त्याची अनेक जहाजे रेशीम तसेच इतर मौल्यवान वस्तूंनी खचाखच भरून , बंदरात आहेत . असे बरेच व्यापारी आहेत , राजे जगाच्या मोठमोठ्या व्यापाराच्या वाटाघाटी ह्या सुरतेत होतात , टोपीकर इंग्रज , वलंदेज , अरमेनी , फरांसिस , मुनानी , फिरंगी , डच असे १८ टोपीकर आपल्या वखारी स्थापित करून सुरतेत स्थित झाले होते , तसेच राजे , ईरानी , तुराणी , हबशी , अरबी , बोहरी , यहुदी , खोजा , अफगाणी , मुगली , बलुची , इत्यादी परदेशी व्यापारी येथूनच व्यापार करीत असत .

सर्वचजण अमाप संपत्ती कमवित , ह्या सर्वांमुळेच सुरतेची बाजारपेठ गजबजलेली होती . राजे त्यामुळे सुरत मारल्याने आपल्याला अगणित धन मिळेल , त्याने आपल्या स्वराज्याची आत्ता आर्थिक स्थिती सुधारेल ; परंतु दीर्घकाळ स्वराज्य आर्थिक अडचणीत सापडणार नाही , हे निश्चित . बहिर्जी अप्रतिम , आपण खरच उत्तम कार्य केलं आहेत , परंतु बहिर्जी मोगलांची एवढी वैभवशाली नगरी आहे , तर सुरक्षा सुद्धा तशीच असेल ना ? , नाही राजे ती तर वेगळीच बाब आहे , राजे सुरतेचा सुभेदार आहे , इनायतखान , तो नेहमी शान –

– शौकिमध्ये दुबलेला असतो , वास्तविक सुरतेच्या संरक्षणाकरीता , औरंगजेबाने ५ हजार सैन्याची सोय केली आहे , पण हा जरा अतीच आहे , त्याने सुरतेत १ हजार सैनिकांची नियुक्ती केली आहे , उर्वरीत ४ हजार सैनिक कागदावरच होते , त्यासर्वांची त्वनखा हाच फस्त करायचा [ भ्रष्टाचार सारा , वास्तविक औरंगजेबाला सर्व माहीत होते परंतु सुरतेतून करोडोंची जकात मिळत होती त्यामुळे तोही मौन बाळगून होता ] , त्याचं असं म्हणणं सुरतेकडे वाईट नजरेने बघण्याची हिंमत कोण करेल , पण स्वराज्याचा नरसिंह , नजर ठेवून आहे त्याला माहित नव्हते . राजे सुरतेत एक भुईकोट किल्ला आहे , बळकट आहे , किल्लेदार सुद्धा लढवय्या आहे , इतर ही बारकावे सांगितले , राजांनी आणि बहीर्जींनी , सुरतेची लुटीची योजना आखावयास सुरूवात केली , सर्व ठरले कसे जायचे , किती फौज घ्यायची , किती सरदार बरोबर घ्यायचे , मुळात सुरत लुटण्यासाठी ३२५ मैल आत मोगली मुलखात मजल मारायची होती , पण फायदाही तेवढाच मोठा होता , मेख वेगळीच होत होती , मजल मारून लूट करणे थोडं सोपे होते , परंतु लूट मोगली प्रदेशातून , स्वराज्यात व्यवस्थित आणणे , हे सर्वात कठीण होतं , त्यावरही राजांनी उपाय काढला , तसेच सुरतेला अतितटीच्या वेळी कुठल्या मोगली ठाण्यावरून मदत येईल , तसेच मदत यायला वेळ किती लागेल ह्याचा राजांनी विचार केला , सर्व रणनीती आखली , तारीख निश्चित केली , नाईक मुजरा करून निघाले .

■ महाराज निघाले , देवदर्शनाला : –

राजे राजगडावरून १० हजार हत्यारबंद फौजेसह , तसेच मोरोपंत , प्रतापराव [ कुडतोजी गुजर ] , व्यंकाजीपंत , निळोपंत , मकाजी आनंदराव ,अनाजीपंत , दत्ताजीपंत , मानसिंग मोरे , व रुपाजी भोसले हे विश्वासू आणि पराक्रमी सरदारांना घेऊन राजे [ १५ डिसेंबर , १६६३ ] , निघाले , गडावर बातमी पसरविली त्र्यंबकेश्वरास दर्शनाकरिता जाणार , हा गनिमीकावा राजांनी खेळला . मराठे निघाले , जातानाचा मार्ग हा किल्ले कोंढाणा जवळून होता , येथे जसवंतसिंह वेढा घालून होता , आतापर्यंत अनेक दिवस गेले ; परंतु मराठ्यांचा मारच खात होता , इकडे राजे सुद्धा गेले . राजे एवढी मोठी फौज घेऊन , मात्र ३ मैलांवरून गेले , तरी ह्या जसवंतसिंहास खबर लागली नाही , इतका हा बेफिकीर होता .

पुढे , राजे १५ दिवसांनी ,

त्र्यंबकेश्वरला [ दि. ३१ डिसेंबर १६६३ ] , आले.

राजे त्र्यंबकेश्वरला दाखल झाल्यानंतर , फौज पाहून गावकऱ्यांमध्ये भीतीदायक वातावरण निर्माण झालं ; परंतु गावकऱ्यांना जेव्हा समजलं कि , दस्तुरखुद्द शिवाजी महाराज आलेत , तेव्हा गावकरी स्थिरावले , राजांना पाहून ते धन्य झाले , नंतर राजांनी त्यादिवशी त्र्यंबकेश्वराची , योग्यपणे पूजा व अभिषेक केला , काही रक्कम दान म्हणून दिली आणि दुसऱ्याच दिवशी राजे निघाले [ इथपर्यंत कोणालाही , माहीत नव्हतं , की राजांच्या मनात नक्की काय आहे किंवा मोहीम कोणती आहे ] , परंतु घोडी जशी गुजरातच्या दिशेने दौड घ्यायला लागली तसं , सरदारांना थोडंफार अंदाज यायला लागला , पण पुढे एका गावात मुक्काम असताना , सर्व मुख्य सरदारांना सुरतेच्या मोहिमेबद्दल सविस्तररित्या माहिती दिली , मोहिमेचं महत्व सर्वांस समजाविले . ४ दिवस जलदगतीने प्रवास करून राजे , दि. ५ जानेवारी १६६४ रोजी , राजे सुरतेपासून ५ मैल अंतरावर , ‘ उदना ‘ ह्या गावी आले , उदना मध्ये सर्वत्र भयावह वातावरण निर्माण झाल होतं .

■ वकिलगिरी : –

शिवाजी महाराजांनी एकदम हल्ला केला नाही , प्रथम राजांनी सुरतेच्या सुभेदाराशी बोलणी करायला [ खंडणीची ] , आपला वकील वल्लभदास गुजराथी , ह्यांस पाठवले .

इकडे सुरतेत सर्वीकडे , घाबराघाबर सुरू झाली , शिवरायांची धास्ती तर होतीच , आणि खुद्द शिवाजी राजेच आलेत , त्यामुळे शहरात सर्व घाबरले . राजांची सुरतेत प्रचंड दहशत होती . सुभेदाराला पण ही

वस्तुस्थिती माहीत होती , परंतु तो असे दर्शवित नव्हता [ हा अतिशय गाफील होता ] . वल्लभदास हे , इनायतखानाला भेटले , त्यानेही योग्य ते आदरातिथ्य केले , मग वल्लभदास हे मुख्य खंडणीची बोलणी करावयास सुरुवात केली , प्रथमतः त्यांनी खंडणीचा प्रस्ताव मांडला , तो असा होता , ” सुभेदार इनायतखान , आपल्या मोगल सल्तनीचे , नामचीन सरदार अबू तालिब

शाईस्तेखान , ह्यांनी गेली ३ वर्षे आमच्या स्वराज्याचे प्रचंड नुकसान केले , शेतीचे तसेच रयतेचे अपरिमित हानी केली , त्यामुळे ह्यासर्वाची परतफेड म्हणोन , आपण १ कोटी होनाची खंडणी आम्हांस लगोलग म्हणजेच उद्याच म्हणजे सुपूर्त करावी , आणि उद्या म्हणजेच

बुधवारी , दस्तुरखुद्द शिवाजी महाराज खंडणी

घ्यावयास येतील , व तेव्हा ह्यावेळी सुरतेतील

सर्वात श्रीमंत व्यापारी , वीरजी बोहरा , हाजी कासम , हाजी सय्यद बेग हे , खानसाहेब जेव्हा आपण शिवाजी राजांना खंडणी पेश करता वेळेस हाजीर असावेत ” . खानसाहेब जर आपण खंडणी व्यवस्थितरीत्या दिलीत , तर राजे सुरतेतील कोणत्याही वस्तूला , घरांना हात लावणार नाहीत ; परंतु जर असे घडले नाही तर

सुरतेची बतसुरत होण्यापासून कोणीही वाचवू

शकत , एवढं नक्की संपूर्ण शहराची लूट केली जाईल आणि सुरतेमध्ये प्रचंड जाळपोळ दिसेल , व जाळपोळ इतकी भयानक असेल की , ते भयावह दृश्य दिल्लीतूनही स्पष्टपणे दिसेल .

राजांच्या वकिलाचे बोलणे ऐकून , खान पुरता चक्रावला , परंतु हे तो दाखवू शकत नव्हता , मग त्याने अतिशय उर्मटपणे उत्तर दिले , आम्ही खंडणी देणार नाहीत , आणि जर उद्या शिवाजी आला तर त्याला दंड

दिल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत , पुढे मूर्ख प्रवृत्तीच्या इनायतखानाने वल्लभदास ह्यांना अपमानित केले , त्यामुळे वल्लभदास निघून राजांपाशी आले .

वल्लभदास घडलेला सर्व प्रकार अतिशय सविस्तरपणे सांगितला , राजांना असेच होणार हे ठाऊक होते , आता सुरतेत लुटीस प्रारंभ करणे , असे योजनेप्रमाणे राजांनी ठरविले .

[■] टोपीकर इंग्रजांचे धोरण : –

शिवाजी राजे , सुरतेच्या जवळ

आलेत , हे जेव्हा इंग्रजांना कळाले , सर्व टोपीकर अस्थिर झाले , टॉपिकरांचा सुरतेतील प्रमुख प्रतिनिधी जॉर्ज ऑक्झिडण ( Jorge Auxidon ) , हा  इनायतखानाला भेटायला आला , तो खानाला म्हणाला , आम्हाला निश्चित कळलंय , शिवाजीराजा आपल्या फौझेनिशी आला आहे , त्याने जर शहरात प्रवेश केला , तर तो प्रचंड धुमाकूळ घालेल . आपण सुरतेचे मोगली सुभेदार आहात , त्यामुळे सुरतेच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी ही आपली आहे . त्यावर स्मित करत खान म्हणाला , ” आम्ही तुम्हा टोपिकरांचा असा विचार करायचो की , तुम्ही अतिशय धाडसी , शूर , पण तुम्ही असा विचार करता , आपण असा विचार करणे सोडा , सुरतनगरी अतिशय सुरक्षित ह्या इनायतखानाच्या नजरेखाली . जो आलाय तो खरा शिवाजी आहे का ? की कोणी दरोडेखोर आहे , आणि एक लक्षात ठेवा , खुद्द खरा शिवाजी आला तरी , आम्ही त्यास मौत देण्यास सक्षम आहोत ” . असे बोलणे एकून

जॉर्ज खानाला मुजरा करून निघाला ….

【 वरील प्रकरणावरून मोगली मोठेपणा व गाफिलपणा , किती मोठ्याप्रमाणात सुरतेत होता हे , सिद्ध होतंय . 】

शिवराय आपल्या मुख्य सरदारांना लूट कशी करायची , ते समजावून सांगत होते , रणनिती स्पष्ट करीत होते , बहिर्जी सर्व बारकावे , सर्वांस समजावीत होते . उद्याचा दिवस सुरतेसाठी आणि मोगल सल्तनेसाठी , अतिशय भयावह आणि नामुष्की आणणारा होता , शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली सर्व तयारी चालू होती . १० हजार फौज , सकाळचं तांबडं कधी फुटतंय आणि राजे आदेश कधी देणार ह्याची वाट पाहत होते …..

संदर्भ ग्रंथ : –

  • छत्रपती शिवाजी महाराज [ श्री.वा.सी. बेंद्रे ]
  • छत्रपती शिवाजी महाराज [ श्री.प्र.देशपांडे ]
  • क्षत्रियकुलावंतस छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र [ श्री.कृष्णराव अर्जुन केळुसकर ]
  • शिवकाल (१६३०-१७०७)[डॉ.वि.खोबरेकर]
  • शिवजीचारित्र [ जदुनाथ सरकार ]
  • छत्रपती शिवाजी व शिवकाल
  • राजा शिवछत्रपती [ श्री.बाबासाहेब पुरंदरे ]
  • ऐतिहासिक बखरी
  • इंग्लिश दस्ताऐवज
  • इतर ग्रंथ .

माहिती साभार – जगविजेता संभाजी फेसबुक पेज
राहुल पाटील

(इतिहासप्रसिद्ध सुरतेची पहिली लूट,इतिहासप्रसिद्ध सुरतेची पहिली लूट,इतिहासप्रसिद्ध सुरतेची पहिली लूट)

Leave a comment