महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

सावनूर स्वारी (२० ऑक्टोबर १७५५ ते १९ जुलै १७५६)

By Discover Maharashtra Views: 1185 2 Min Read

सावनूर स्वारी (२० ऑक्टोबर १७५५ ते १९ जुलै १७५६)

मुजफरजंगाची चिथावणी सावनुरकर नवाबास मिळाल्यावर त्याने मुरारराव घोरपडे यास आपल्या पक्षात ओढले. कर्नाटकातून पेशव्यांची सत्ता उखडून टाकणे हा यांचा डाव पेशव्यास कळताच स्वता पेशवे सदाशिवराव भाऊसह २० ऑक्टोबर १७५५ सावनूरवर जाण्यास निघाले. वानबडी बेतगीवरून मराठी सैन्य जानेवारी १७५६ त बागलकोटास आले. बागलकोटचा किल्ला घेतल्यावर पेशवे तारीख १२ जानेवारी १७५६ ला होस्केरीस आले. पेशवे आपल्याच दिशेने चालून येत आहेत हे सावनूर नवाबास ठावूक असल्यामुळे त्यानेही पेशव्यांशी झुंज देण्याची जय्यत तयारी केली. पेशव्यानी मुजफरजंगाचा तोफखाना आपल्या विरुद्ध बाजूस आहे ह्याची जाणीव ठेवून आपल्याकडेही फ्रेंचांच्या मदतीने तोफखाना उभारला व तोफखान्याची मुखत्यारी पानसे यास दिली. उत्तरेकडून आपले सैन्य बोलाविले. निजामास मदतीस येण्यास पत्र पाठविले. सावनूरच्या नबाबाचा निजामासहि राग होताच.(सावनूर स्वारी)

सावनूरकर नवाव दक्षिण सुभेदाराथा मांडलीक न समजता आपण दिल्लीच्या बादशहाचे मांडलीक आहोत, असे सांगून त्याने निजामास खंडणी देण्याचे नाकारले म्हणून निजामाने आपले सैन्य पेशव्यांच्या मदतीस पाठविले (फेब्रुवारी १७५६). पेशव्यांनी जय्यत तयारीनिशी सावनूरवर हल्ला चढविला. सावनूर किल्ला जिंकण्याचे उदिष्ट ठेवून किल्ल्यास वेढा दिला. शत्रू मोठया हिंमतीचा, त्याचा पराभव होण्यास वेळ लागेल हे ओळखून पेशव्यांनी होळकर व विठ्ठलराव विंचुरकर यांना किल्ला जिंकून घेण्याचे काम दिले. विंचूरकर, होळकर या सर्वानी किल्ल्यावर जोराचा हल्ला केला. इतक्यात बुसी निजामाच्या सैन्यासह येऊन पेशव्यांस मिळाला. त्यावेळी

बुसीच्या तोफखान्याने सावनूर किल्ल्यावर आग ओकावयास सुरवात केली. सावनूरकर नबाब हैराण होऊन त्याने सलुखाची बोलणी लावली. तारीख २० एप्रिल १७५६ रोजी सावनूरकरांचा पेशव्यांशी तह झाला. तहात ठरलेली ११ लाख

रुपयाची खंडणी पेशव्यास मिळाली शिवाय सव्वा आठ लक्षाचा मुलूख सावनूरकरांकडून पेशव्यांनी आपल्या ताब्यात घेतला. त्यामुळे मराठी राज्याची हद्द कृष्णेवरून तुंगभद्रेस पोंचली. सर्व सरदारांस शाबासकी देऊन पेशव्यांनी सावनूर सोडून कंचनी या गांवी २ मे १७५६ रोजी मुक्काम केला.

लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

Leave a comment