महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ७५

By Discover Maharashtra Views: 2425 9 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ७५ –

सोयराबाईंच्या महाली संभाजीराजे फरसबंदीवर अंथरलेल्या बिछायतीवर मांड घेऊन बसले होते. त्यांच्या मांडीवर हातपाय झाडीत खिळणारे रामराजे होते. भिंतीला धरून चंद्रा दासी उभी होती. मंचकावर बसलेल्या सोयराबाई रामराजांच्या अंगड्यावर वेलबुट्टीच्या नक्षीचे विणकाम आपल्या खाशा हातांनी भरू लागल्या. टाका-टाका गुंतू लागला. मध्येच थांबवून सोयराबाई हसत संभाजीराजांनी घेतलेल्या बाळांच्याकडे बघत होत्या.

“तुम्हाला असे आमच्या सूनबाईनी बघितले तर?” हसून सोयराबाईनी संभाजीराजांना विचारले.

“बघू देत. यांना फक्त त्यांनीच घ्यावं, असा काय रिवाज आहे!” संभाजीराजे रामराजांच्या लपलपत्या टाळूवरून तळहात हलकेच फिरवीत म्हणाले. खिदळते रामराजे एकाएकी थांबले. त्यांनी संभाजीराजांच्या जाम्यावर सरसरती धार लावली. “ही कोण बेअदब! दादामहाराजांचा पेहराव खराब केलात!” म्हणत सोयराबाई लगबगीने मंचकावरून खाली उतरल्या. चंद्रा चटकन पुढे झाली.

“असू देत!” म्हणत संभाजीराजांनी दोघींनाही हात उठवता करून थोपवबिले. रामराजे पुन्हा खिदळले. चंद्रा मागे हटली. सोयराबाई मंचकावर ठेवलेले अंगडे उचलायला वळळ्या. एवढ्यात – एवढ्यात धाराऊ आणि येसूबाई महालात प्रवेशल्या. संभाजीराजांना बघून येसूबाई उंबरठ्यावर अडखळल्या! ते ओळखून सोयराबाई त्यांना धीर देत म्हणाल्या, “या सूनबाई,” ते ऐकताना संभाजीराजे गोंधळले! त्यांनी मागे वळून पाहिले – आणि तसे पाहताना भिजला जामा चतुराईने मांडीखाली लपविता सारला! ते बघून सोयराबाई हसल्या. येसूबाईंना म्हणाल्या, “बाळराजांना तुम्ही एकल्यानंच घ्यावं असा काही रिवाज नाही… असं तुमची स्वारीच म्हणते!”

“धाराऊ!” संभाजीराजांनी बाजी अंगलटलेली बघून धाराऊला हाक घातली.

“आलू,” म्हणत धाराऊ चटक्याने पुढे झाली.

“यांना घ्या!” म्हणत संभाजीराजांनी रामराजांना धाराऊच्या हाती दिले. महालाबाहेर पडता-पडताच गडबडीने ते सोयराबाईंना कसेतरी म्हणाले – “येतो आम्ही.”

“या.” सोयराबाई समाधानाने जबानभर म्हणाल्या. येसूबाईंना हाताला धरून आपल्या मंचकाकडे धीरे नेताना सोयराबाई न राहवून म्हणाल्या, “खरंच सूनबाई, तुम्ही भाग्यवान आहात!” रामराजांना मांडीवर डोलवीत असलेली धाराऊ भरल्या कानांनी आणि मनाने ते नुसते ऐकत राहिली!

तोंडावर आलेल्या दिवाळीसणासाठी राणीवशाकडे लागणाऱ्या अलंकारांची यादी बाळाजी आवजींनी आपल्या चिटणिशी बैठकीवर बसून तयार केली. जोखमीची असलेली ती यादी मुजुमदार निळोपंतांना स्वत:च्या हातांनी देण्यासाठी ते बैठकीवरून उठले. त्यांनी खांद्यावरचे उपरणे ठाकठीक केले. “मी ही यादी देऊन येतो मुजुमदारांना. तुम्ही इथंच थांबा. कुठं जाऊ नका.” बाळाजींनी आपल्याबरोबर फडावर आणलेल्या आपल्या आवजी व खंडोजी या दोन्ही मुलांना ताकीद दिली. पुढच्या मागच्या वयाच्या आवजी- खंडोजींनी माना डोलाबल्या.

सदरबैठकीवर कुणीच नव्हते. चौकाच्या दरवाजावर दोन धारकरी पहारा देत होते. फरास, सरपोस चालणारे हु हुजरे अधूनमधून डोकावत होते. पण त्यापैकी कुणाचेही ध्यान आवजी व खंडोजी यां डे जायचे कारण नव्हते.

त्या दोन्ही चिटणीसपुत्रांनी एकमेकांकडे पाहिले. सारी सदर मोकळी होती. भिंतीवरच्या रेखल्या रामायण-भारतातील चित्रांकडे ते दोघे बघत राहिले. दोन चित्रांमधल्या मोकळ्या जागेत ढाल, तलवारी, भाले, तीरकमठे ऐटदार पद्धतीने मांडले होते. थोरल्या आवजींचे लक्ष बाळाजींच्या कलमदानावर गेले. त्याला काय वाटले कुणास ठाऊक, तो आपल्या भावाच्या कानात दबके म्हणाला, “खंडा, मी त्या पिसानं लेख काढून बघतो! तू कुणी आलं, तर लक्ष ठेव.”

“हां. जा तू.” खंडोजीने त्याला दुजोरा जोडला. आवजी चिटणीस बैठकीवर चढला. मोठ्या कुतुहूलाने त्याने बैठक घेऊन कलमदानातील शहामृगपीस उचलले. थरथरत्या हाताने ते शाईच्या बुधलीत डुबविले. आवजी थरथरत्या हाताने चौरंगीवरच्या कागदावर लिहू लागला – “नम: शिवाय!” खंडोजीने त्याला दुजोरा जोडला.

अंत:पुराच्या रोखाने आलेले संभाजीराजे सदरजोत्यावरून आपल्याकडे बघताहेत याचे त्या दोघांनाही भान नव्हते! संभाजीराजांच्या पाठीशी उभ्या असलेल्या अंतोजी, रायाजी, जोत्याजी या मंडळींतील मग कुणीतरी दाटून खाकरले. आवजीने आवाजाच्या रोखाने बघितले मात्र; तो ताडकन वर उडाला! त्याला मुजरा करायचे सुधारले नाही. हातीचे पीस घरंगळून हेलकावे खात केव्हा पडले हे त्याला कळलेच नाही. बैठकीवरून खाली ताडकन उडी मारावी आणि बेलाग दौडत सुटावे, असे त्याला बाटले. तरतरीत नाकाचा, तांबूस गोरा, छोटेखानी डाळिंबी पगडी डोक्यावर असलेला खंडोजी मात्र क्षणापूर्वी भिंतीवरची चित्रे ज्या हरवल्या डोळ्यांनी निरखत होता तसाच संभाजीराजांना निरखू लागला.

आपल्या पाठीच्या मंडळींना जागीच थोपवण्याची हातखूण देऊन संभाजीराजे चिटणिसी बैठकीच्या रोखाने शांतपणे चालत आले. बैठकीवरचा आवजी थरथरला. चतुर खंडोजीने मात्र झटकन पुढे होत संभीजाराजांच्या पायांना हात लावला.

संभाजीराजांनी आवजीने लेख रेखलेला कागद हलक्‍या हाताने उचलला डोळ्यांखाली घातला. त्यावरची “नम: शिवाय!” ही आवजीने रिवाज म्हणून काढलेली अक्षरे त्यांना वेगळ्याच अर्थाने जाणवली. त्यांची चर्या ते वाचून फुलून उठली बैठकीवर पडलेले शहामृगपीस संभाजीराजांनी उचलले. शाईच्या बुधलीत ते डुबविताना त्यांच्या तर्जनीवरचा पुष्कराज खडा झळकून उठला. संभाजीराजे आवजीने रेखलेल्या मजकुराकडे रोखून बघू लागले. त्यांना राजांची आठवण झाली. या वेळी राजे सुरतेस मनचाहे धुमाकूळ घालीत होते. त्या मजकुराखाली पुन्हा संभाजीराजांनी शब्द उमटविले – “तुळजाभवानी प्रसन्न!”

संभाजीराजांनी हातीचे शहामृगपीस हलकेच कलमदानात ठेवीत आपला व आवजीचा हस्तलेख बारीक निरखला, आणि ते आवजीकडे बघत म्हणाले, “तुमचं हातवळण आमच्याहून गोमटं आहे! कोण तुम्ही? इथे का?”

आवजीचा जीव भांड्यात पडला, पण त्याला बोलणे साधेना! खंडोजी मात्र धिटाईने म्हणाला, “आम्ही चिटणिसांचे मूल! हे आवजी, आम्ही खंडोजी!”

“बसा. आवजी बैठक घ्या.” संभाजीराजांनी आवजीला चिटणिसी बैठकीवर बसण्याची खूण केली. आवजी आता थिरावला! एवढ्यात बाळाजीच प्रवेशले. आवजीला चिटणिसी बैठकीवर बसलेले बघून त्यांनी गटकन आवंढा गिळला. तुरुतुरु चालत ते आवजीला कानगोष्ट देण्यासाठी येऊ लागले. त्यांचा मनसुबा हेरून संभाजीराजे त्यांना हसून म्हणाले, “चिटणीसकाका, बघू द्या त्यांना! तुमचा आहे तसाच त्यांचा हात गोमटा आहे. हातीच्या पिसांचा त्यांना सराव द्या.” आणि संभाजीराजे बळते होऊन थेट राजांच्यासारखे झपाझप चालत अंतःपुरात गेले. त्यांच्या पाठीवरच्या जाम्यावरची जरीबतूची गिर्रेबाज कोयरी बघताना खंडोजीचे डोळे दिपले. त्याने कमरेत झुकून पाठमोऱ्या संभीजाराजांना मुजरा रुजू घातला!!

गडाच्या तोफखान्यावर स्वागती तोफा धडधडल्या. नगारे, शहाजणे, शिंगे कल्लोळून उठली. मोगली सुरत पुन्हा एकवार “बेसूरत ‘ करून, वणी-र्दिडोरीच्या रानात फौजबंद शाही सर्दार इखलास व दाऊदखान कुरेशी यांना पुरते खडे चारून, वऱ्हाडातील “लाडांचे-करंजे ‘ ही संपन्न व्यापारपेठ मावळी लाडाने लुटून, साल्येरीचे खुले जंग फत्ते करून, तिथल्या किल्ल्यावर जरीपटक्याचा भगवा टिळा मढवून, बागलण, वऱ्हाड, खानदेश या मोगली मुलखाची मारतोड करून विजयी राजे परतले. जाताना मोकळ्या नेलेल्या किल्तानी बारदानांच्या पडशीसारख्या मोहोरबंद पिशव्या पाठीवर वाहून आणलेली घोडी दमछाक झाली होती. पूर्वी झाला, त्याहून हा पराक्रम थोरच झाला.

पालखी घेऊन राजगड उतरून आलेले आपले सेवक प्रतापराव सिलींबकर, किल्लेदार सुभानजी बाळाजी, अण्णाजी, निळोपंत व मोहिमेतील रूपाजी, प्रतापराव गुजर, मोरोपंत, येसाजी यांच्या सोबतीत राजे गड चढून आले. बालेकिल्ल्यांच्या सदर दरवाजाशी येऊन जिजाऊसाहेब आणि संभाजीराजे यांनी राजांची आगवानी केली. संभाजीराजांना या वेळी राजांच्या मुद्रेवर एक आगळेच तेज आढळले.

राजांना राजगडी येऊन पंधरवडा हटला. आणली लूट प्रतवार ठरवून दास्तानी लावण्यात आली. जाया झालेले स्वार आणि घोडी तबिबांनी आपल्या ताब्यात घेऊन त्यांना दवादारू केली.

माघ वद्य एकादशीचा दिवस मावळ चढून आला. राजगडाची कदरेची सदर बसली. “जखम-दरबार ‘ जमा झाला. सदर बैठकीवर राजे, जिजाऊसाहेब, संभाजीराजे यांनी बैठक घेतली होती. भोवतीने मोरोपंत, अण्णाजी, बाळाजी, येसाजी, प्रतापराब, निळोपंत, निराजी रावजी, रघुनाथभट, दत्ताजी त्रिमल अदब धरून उभे राहिले.

चिकाच्या पडद्याआड सोयराबाई, पुतळाबाई, काशीबाई असा राणीवसा, सखूबाई, अंबाबाई, असा कन्यावसा, येसूबाई, धाराऊ जमा झाल्या होत्या. रिवाजाप्रमाणे समोर आलेल्या भंडाऱ्याची चिमट राजांनी सदरदेवतेवर उधळली. समोर उभ्या असलेल्या जखम-दरबारच्या मानकऱ्यांवर एकदा अभिमानाची नजर फिरवली आणि ती नजर तशीच चिटणीस बाळाजी आवजींना दिली. बाळाजींनी ‘जखम-दरबार’चा मायना खुला केला –

“मातुःश्री आऊसाहेबांचे कृपाप्रसादे करोन खासा सरकार स्वामींनी मोगलाई, बागलाण, वऱ्हाड, खानदेश, सुरत ऐशी भरपल्याची मोहीम घातली. शेलका पाऊलोक, घोडाई दिमतीस घेतला, मनी धरला तेव्हढा मनसुबा घडवून आणिला. “ये स्वारीत मर्दानगी केले हातास, जाया झाले असामीस, कामी आले हत्यारगिरांचे वारसास मरातब द्यावा म्हणोन हा ‘जखम-दरबार ‘ बसता केला असे –

“ये सदरी मरातब म्हणोन मशारन्हिल्ले….”

बाळाजी एक-एक नाव वाचू लागले. राजे संबंधिताला कडे, मोहरा, तोडे, मानवस्त्रे बहाल करू लागले. जखम-दरबार सरतीला आला. बाळाजी झुकून तसेच पाच कदम मागे हटले. सारा जखम-दरबार राजांच्या कदरदानीने भारावून गेला होता. राजांच्या हातून मिळालेल्या वस्तूकडे बघताना अभिमानाने ऊर भरले होते. त्या समाधान अभिमानात काही क्षण गेले. राजांनी जिजाऊंच्याकडे बघितले. एक निसटती लकेर जिजाऊंच्या ओठांमागे तरळली. चेहऱ्यावर आता दाटत आलेल्या सुरकुत्यांत ती मिसळून गेली.

क्रमशः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ७५.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव

Leave a comment