युद्धाची बारूद शत्रूच्या गोटात…

महाराणी येसूबाईसाहेब | महाराणी येसूबाई राणीसाहेबांनी मोरया गोसावींना लिहीलेले पत्र

युद्धाची बारूद शत्रूच्या गोटात कुलमुखत्यार राणीयेसूबाई साहेब…

सिंहगड जिंकून घेतल्यानंतर औरंगजेब हा १ मे १७०३ रोजी पुण्यात आला. पुण्यात तो नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत होता. त्यानंतर तो राजगड व तोरणा हे किल्ले जिंकून घेण्यासाठी पुण्यातून बाहेर पडला. पण बादशहाच्या पुण्यातील या सहा महिन्याच्या मुक्कामात त्याने काय केले..?

मात्र दरबाराच्या बातमीपत्रात शोध घेतल्यास काही विचित्र नोंदी आढळतात. शिवाय औरंगजेबाचा चरित्रकार साकी मुस्तेदखान हा औरंगजेबाचा पत्रलेखक म्हणून त्यावेळी पुण्याच्या छावणीतच होता. तसेच औरंगजेबाच्या पत्रांचा संग्रह (अहकामे आलमगिरी) करणारा औरंगजेबाचा चिटणीस इनायतुल्ला हाही छावणीतच होता. औरंगजेबाचा निकटचा कारभारी आणि औरंगजेबाच्या आठवणी या ग्रंथाचा लेखक हमिदुद्दिन हा सुद्धा त्या काळात पुण्याच्या छावणीतच होता.

प्रस्तुत साधनांवरून पुण्यात औरंगजेबाची छावणी आजच्या स्वारगेटपासून गोळीबार मैदानाचे पलीकडे पसरली होती. खुद्द औरंगजेबाचा निवास स्थान अर्थात त्याचा गुलालबार तंबू हा स्वारगेट आणि गोलीबार मैदान यांच्या मध्ये भवानी पेठेच्या कोपऱ्यावर ओढ्याच्या काठावर होता.

छावणीतील माणसांची संख्या ४० ते ५० हजार असावी व सैनिकांची संख्या वीस ते पंचवीस हजार असावी असे तत्कालीन कागदपत्रातील नोंदीवरून वाटते.

पुण्याला येऊन आठ दिवस झाले नहीं तो औरंगजेबाने एक विलक्षण निर्णय घेतला.!

९ में १७०३ रोजी औरंगजेबाने आपला कारभारी हमीदुद्दीन खान याला बोलावून म्हंटले, तुम्ही शाहू कडे जा आणि त्यास म्हणावे कि तू मुसलमान हो’

त्याप्रमाणे हमीदुद्दीनखान शाहूकड़े गेला आणि त्यांने बादशाहचा निरोप संगीतला.

यावर शाहूने काय म्हटले असावे याचे उत्तर पुढील बातमीपत्रात आहे की,

शाहूने बादशहाच्या या इच्छेला ठाम नकार दिला!!!

ही गोष्ट दरबारच्या कागदपत्रात सहजपणे आली आहे. शाहूवरील धर्मांतराचा हा प्रसंग म्हणजे महाराष्ट्रावर या निमित्ताने केवढे संकट आले होते याची कल्पनाही करवत नाही. पण सहज विचार मनात येतो की शाहूला हा निर्धार झाला कसा..???

वयाच्या आठव्या वर्षी बाल शाहूराजा मोगलांच्या कैदेत आला त्या वेळेपासून पुढील अठरा वर्षे त्याचे आयुष्य मोगलांच्या छावणीतच गेले. त्या बालवयात भोवतालच्या मोगली वातावरणाचे संस्कार त्याच्यावर कमी का झाले असतील! अशा विपरीत परिस्थितीत आपल्या परंपरेबद्दल उदासीनता आणि परकीय संस्कृतीबद्दल आकर्षणही मनात बिंबणे काही अवघड नव्हते. अशा विपरीत परिस्थितीत शाहू राजाचा नकार म्हणजे एक आश्चर्य !

हे कसे घडले..????

शाहूच्या निर्धाराचे हे मूळ शोधून पाहता एक गोष्ट लक्षात येते ती ही की, शाहूच्या निर्बंधाच्या काळात त्याची आई राणी येसूबाई ही सतत त्याच्या पाठीशी उभी होती. त्या कठीण काळात आपल्या मुलावर योग्य तेच संस्कार व्हावेत याबद्दल तिने जीवाचा आटापिटा केला असला पाहिजे. हे सहज समजण्यासारखे आहे. त्यामुळे मुगल छावणीतील वातावरण काहीही असो, आईच्या सानिध्यात शाहू आपले संस्कार आणि आपला धर्म जगत होता आणि जोपासत होता हेच खरे.

तसेच शंभूराजांच्या ज्वलंत धर्माभिमानाची पुण्याईही मागे होतीच!

शाहूने धर्मांतर केले असते तर महाराष्ट्राचा सगळा इतिहासच बदलला असता. मराठ्यांनी त्याची सत्ता माणली नसती, पण मराठ्यांच्या फळीला खिन्डार पडले असते. औरंगजेबाने त्याला जहागीर देऊन नबाब केले असते. पुढील काळात पेशवे उदयाला आले नसते. शाहूचा आशीर्वाद पाठीशी घेऊन त्यांनी अटकेपर्यंत मजल मारली आणि मराठी राज्याचे अखिल भारतीय साम्राज्यात रूपांतरण केले, या गोष्टी शक्य झाल्या नसत्या. त्यामुळे शाहूचा निर्धाराचा नकार ही महाराष्ट्राच्या इतिहासातील एक कलाटणी देणारी घटना म्हणावी लागेल आणि त्या निर्णयामागे आपल्याला जाणवते ते येसुबाईंचे प्रखर व्यक्तिमत्व!!

येसूबाईंच्या रूपाने प्रत्यक्ष अंबाभवानीने त्या काळात शाहूचा आणि पर्यायाने महाराष्ट्राचा धर्म वाचविला असे जर कोणी माणसाला वाटले तर त्यात नवल वाटायला नको!

खरेतर या मातेने महाराष्ट्राच्या इतिहासात फार पूर्वीच मोलाची कामगिरी बजावली होती. १६८९ मध्ये शंभूराजांच्या बलिदानानंतर मोगलांचा वेढा रायगडास पडला. त्यावेळी राणी येसूबाईने राजारामाला किल्ल्याबाहेर काढले आणि पन्हाळ्याकडे पाठविले. त्याचा परिणाम असा झाला की भोसल्यांचे सर्व कुटुंब एकाच वेळी पकडून मोहीम संपवावी हा औरंगजेबाचा डाव उधळला गेला. पुढे राजारामने जिंजीला एक लाख सैन्य गोळा केले व ज्यामुळे मोगलांना आपले सैन्य महाराष्ट्राच्या बाहेर काढून जिंजीला पाठवावे लागले. या वेढ्यात सहा वर्ष मोगलांना वेळ घालवावा लागला. येसूबाईंच्या या मदतीमुळे सहा महिन्यात आटोपणारी ही मोहीम वीस वर्षे लांबली! औरंगजेबाची संपूर्ण हयात गेली आणि मोगलांची सत्ता संपुष्टात आली!

आणि यातूनही दिव्य ते शाहू राजांच्या रूपाने शत्रूच्या गोटात जोपासलेली युद्धाची बारुद!!!ज्याने पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याचे साम्राज्यात रुपांतर घडवून आणले!!

“सखीराज्ञी जयती” या शिक्क्याने स्वराज्याची कुलमुखत्यार म्हणून जिने शंभूराजांना अखंड साथ दिली तिनेच शंभूतत्व त्यांच्या बलिदानानंतरही प्रत्यक्ष शत्रूच्या छावणीत जपले म्हणजे थोरच!!

वरील धर्मांतराचा प्रसंग वाचून उगीच कोणी धार्मिक दृष्टिकोनातून चाचपणी करू नका, कारण हा इतिहास आहे!!

खरेतर जे तत्व व सत्व जपण्यासाठी शंभुराजे अनंत यातना सहन करत प्राणत्याग करतात, त्या तत्त्वामध्ये स्वातंत्र्य आणि स्वाभिमान तर सत्वामध्ये मराठीमाती आणि हिंदू संस्कृतीचा अभिमान नव्हता काय..?

हेच तत्व आणि सत्व राणी येसूबाईंनी आपल्या मुलामध्ये हरप्रयत्ने अखेरपर्यंत जपले. आणि म्हणूनच लक्ष लक्ष गनिमाच्या गोटात स्वराज्याच्या युद्धाची बारूद अखंड जपणाऱ्या दुसऱ्या मांसाहेब अर्थात कुलमुखत्यार राणीयेसूबाई साहेब यांना मानाचा मुजरा!!!

-शौर्यशंभूचा शिलेदार

प्रा रवि आत्माराम बाविस्कर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here