राहुरी नव्हे रामपुरी ७००
अहिल्यानगरच्या ऐतिहासिक वस्तू संग्रहालयात राष्ट्रकूट राजा चौथा गोविंद याचा ‘सांगली ताम्रपट ‘ जतन.करून ठेवलेला आहे. याचा काळ शके ८५५ म्हणजे इसवी सन ९३३-३४ असा येतो.खरं तर या ताम्रपटाचा सांगली जिल्हा किंवा परिसराशी काही संबंध नाही. तेथील एका कुटुंबाकडे तो सापडला म्हणून त्याला सांगली ताम्रपट नाव पडले.हा ताम्रपट नेवासा तालुक्यातील लोहगाव नावाच्या गावाशी संबंधित आहे.
या ताम्रपटात लोहगावाच्या चार बाजूंना असलेल्या गावांची नावे दिली आहेत. ही गावं जे एफ फ्लीट नावाच्या ब्रिटिश इतिहास संशोधकाने ओळखली होती ती अशी लोहगावच्या पूर्वेकडे असलेले घोडेग्राम म्हणजे आजचे घोडेगाव , दक्षिणेला वंजुली म्हणजे आजचे वांजोळी , उत्तरेला सोन्नही म्हणजे आजचे सोनई आणि पश्चिमेला चिंचविहिरे. ही सर्व गावे रामपुरी ७०० या प्रदेशाचा भाग होती. ही रामपुरी म्हणजेच आजची राहुरी असं फ्लीट म्हणतो.
फ्लीट ने लोहगाव ते राहुरी हे अंतर १२ मैल दिलेले आहे त्यामुळे आताचे राहुरी शहर हे रामपुरी नसावे. तर राहुरी खुर्द नावाचे शेजारील गाव रामपुरी असले पाहिजे.
रामपुरीचा अपभ्रंश होऊन पुढे राहुरी झाले असावे. तसाही राहुरी नावाचा ३०० वर्षापेक्षा जास्त जुना पुरावा सापडत नाही. राहुरी गावचे नाव राहू नावाच्या राक्षसावरून पडले अशी आख्यायिका आहे. काल्पनिक कहाण्या जोडून इतिहास अभ्यासण्यापेक्षा अस्सल साधनांवर आधारित इतिहास अभ्यासावा. म्हणूनच ताम्रपट, शिलालेख महत्वाचे साधन ठरतात.
© सतीश भि.सोनवणे