सरसेनापती प्रतापराव गुजर वाडा, भोसरे

सरसेनापती प्रतापराव गुजर वाडा, भोसरे

सरसेनापती प्रतापराव गुजर वाडा, भोसरे…

सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील भोसरे गावात शूर सरसेनापती प्रतापराव गुजर यांचा भव्य वाडा आहे. भोसरे गाव कोरेगाव रहिमतपूर पासून जवळ आहे. साताऱ्यापासून साधारण ४० किलोमीटरच्या अंतरावर आहे. गावात असलेला वाडा सद्यस्थितीत खूप चांगल्या अवस्थेत नाही. वाड्यामध्ये छोट्या घरात प्रतापराव गुजर यांचे वंशज राहतात. तेथेच प्रतापरावांचा अर्धपुतळा व स्मारक आहे. जवळच प्रताप सृष्टीचे काम सुरू आहे. गुजरांची अजून एक शाखा नागपूरला आहे.

प्रतापराव यांचा जन्म घरंदाज पाटील घराण्यात झाला होता. त्यांच्या आई-वडिलांनी त्यांचे नाव “कुडतोजी” असे ठेवले होते. लहानपणापासूनच त्यांना दांडपट्टा, तलवारबाजी, कुस्ती यांची आवड होती. धिप्पाड शरीरयष्टी, बुद्धिमत्ता, हुशारी या गुणांमुळे महाराजांनी त्यांना स्वराज्य कार्यामध्ये सामावून घेतले. जेव्हा महाराज आग्रा मध्ये अडकले होते त्यावेळी प्रतापरावांनी सरदार अष्टप्रधान या सर्वांच्या बैठका घेऊन स्वराज्य सावरले होते व संपत्ती गोळा केली होती या सर्वांमुळे कुडतोजी यांना महाराजांनी “प्रतापराव”  ही पदवी दिली.

इ.स. २४ एप्रिल १६६० रोजी शाहिस्तेखानाला जाऊन मिळालेल्या मराठा सरदार संभाजी कावजी यांना प्रतापरावांनी ठार मारले. इ.स. १६६३ मध्ये सिंहगड व मावळ प्रांतात हैदोस घालणाऱ्या मोगली सैन्याचा बंदोबस्त केला. सिंहगड जिंकण्याचा प्रयत्न करणाऱ्या शाहिस्तेखानाची नाचक्की केली व तो पुण्यात येऊन बसला. इ.स. ३० सप्टे १६६४ रोजी मिर्झाराजे जयसिंग याच्या खुनाचा प्रयत्न प्रतापरावांनी केला पण तो असफल ठरला. इ.स. १७ ऑक्टोबर १६७० रोजी नाशिक दिंडोरी जवळ मोगली सैन्याचा पराभव केला. क्रूर मोगल सरदार दाऊद खान व इकलासखान यांना ठार मारले.

बहलोलखान जेव्हा पन्हाळगडावर चालून आला तेव्हा महाराजांनी विजापूर वर स्वारी करण्यासाठी प्रतापरावांना धाडले. तेव्हा खवासखान हा घाबरून गेला व त्याने बहलोलखानाला पुन्हा विजापूरला बोलावून घेतले. तो विजापूरला परतत असताना प्रतापरावांनी उमराणी जवळ त्याच्या सैन्यावर हल्ला चढविला व त्याला जेरीस आणले. अखेरीस त्याने जिवाची पर्वा करत हिरे, सोने, संपत्ती सर्व प्रतापरावांना घेऊन आपली सुटका केली. शत्रूला असेच सोडून दिले म्हणून महाराज प्रतापरावांवर रागवले तेव्हा त्यांनी शपथ घेतली की बहलोलखानाला मारल्याशिवाय महाराजांना तोंड दाखवायचं नाही. आणि तो असामान्य शौर्याचा दिवस उजाडला इ.स. २४ फेब्रुवारी १६७४ रोजी प्रतापराव आपले सहकारी विठोजी शिंदे, विठ्ठल अत्रे, दिवाजी राऊतराव, सिद्दी हिलाल, कृष्णाजी भास्कर, विसोजी बल्लाळ यांच्यासह गडहिंग्लजजवळील नेसरीच्या खिंडीत बहलोल खानावर तुटून पडले. पण बहलोलखानाच्या सैन्यापुढे या सर्वांना वीरमरण प्राप्त झाले. पुढे कवी कुसुमाग्रज यांनी “वेडात मराठी वीर दौडले सात” ही अजरामर काव्यरचना केली.

प्रतापरावांची दोन मुले जगजीवन व खंडोजी हे शंभुराजे सोबत होते. जेव्हा क्रूर औरंगजेबाने संभाजी राजेंना धर्मांतर करायला लावले तेव्हा आपल्या राजाचं धर्मभ्रष्ट होऊ नये म्हणून या दोघांनी आपले धर्मांतर केले. खंडोजी बनले अब्दुल रहीम व जगजीवन बनले अब्दुल रहमान. अशा या पराक्रमी गुजर कुटुंबीयांना शत शत नमन.

टीम- पुढची मोहीम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here