मराठा सरदार खंडेराव | सेनाखासखेल

वतन की स्वराज्य

सेनाखासखेल

छत्रपती संभाजी महाराजांच्या निधनानंतर येसाजी दाभाडे आपले पुत्र खंडेराव आणि शिवाजी यांस घेऊन छत्रपती राजाराम महाराजांच्या सोबत जिंजीस गेले. जिंजीहून परत येताना मोगलांच्या पाठलागापासून छत्रपती राजाराम यांना वाचवताना शिवाजी दाभाडे यांचा म्रुत्यु झाला. माघारी येताना खंडेराव दाभाडे यांनी राजाराम महाराज यांना पाठीशी बांधून पन्हाळा किल्ल्यावर आणले.
खंडेराव यांच्या पराक्रमा बद्दल राजाराम महाराजांनी त्यांना “सेनाखासखेल” ही पदवी आणि जुन्नर, पुणे व हरिश्चंद्र या तीन प्रांताची व अकोले आणि जावळें या महालाची सरपाटीलकी तसेच चाकण आणि पारनेर परगण्यातील 164 गावांची सरदेशमुखी दिली.
राजाराम महाराज म्हणतात, तुम्ही स्वामीच्या पायाशी एकनिष्ठ धरून बहुत दिवस सेवा केली आहे. स्वामी कर्नाटक प्रांती असता तुम्ही स्वामींच्या पायाशी एकनिष्ठ धरून समागमे येवून शेवा करीत आहा यास्तव तुमचे उत्तरोत्तर चालवणे हे स्वामीस अगत्य याकरिता प्रांत बीडदेश येथील सरदेशमुखीचे वतन व सरदेश कुलकर्णी चे वतन दोनही वतने अजरामहामत करून दिली असे.
राजाराम महाराज यांच्या नंतर खंडेराव यांनी ताराबाई साहेब यांच्या छत्र छायेत मोठा पराक्रम गाजवला. महाराणी ताराबाई यांना पाठविलेल्या एका पत्रात खंडेराव दाभाडे लिहीतात, महाराजांच्या ठिकाणी आपण आहात, खासा स्वारी असताना कामकाज उदईक करू म्हणत होतो ते उद्याचे आजकरून आपणास विनंती लिहीत जाऊ.
आपल्या हुकूमासरशी त्रुणवत प्राण मानून उडी घेत जाऊ. काही काळजी करु नये.
सेनाखासखेल

शाहू महाराज कैदेतून सुटून आल्यावर खंडेराव शाहू महाराजांना सामील झाले. शाहू महाराजांनी त्यांना सेनापती पद दिले. दिल्लीच्या फरूखसियार बादशहाने दख्खनचा सुभेदार हुसेन अली याच्या विरुद्ध लढण्यासाठी शाहू महाराजांना सांगितले. शाहू महाराजांनी ही कामगिरी खंडेराव यांच्या वर सोपवली. खंडेरावांनी गुजरात प्रांतात हल्ला करून हुसेनखानाचा दक्षिणेत जाण्याचा रस्ता रोखला. त्यावेळी हुसेन याने झुल्फिकार बेग यास खंडेराव यांच्या विरोधात लढण्यासाठी आणि दिवाण मोहकमसिंगास झुल्फिकार बेगच्या मदतीसाठी पाठवले. खंडेरावांनी या दोघांचा पराभव केला.

खंडेरावांच्या पराक्रमावर खुष होऊन शाहू महाराजांनी त्यांना गुजरात प्रांताची मोकासबाब दिली. खंडेराव शाहू महाराजांच्या काळात विविध मोहीमेत सहभागी झाले होते. दिल्लीत गेलेल्या मराठ्यांच्या सेनेचे खंडेराव सेनापती होते. निजाम आणि सय्यद बंधुचे सुभेदार अलमअल्ली यांच्यात 1720 सालच्या बाळापूर च्या लढाईत त्यांना शाहू महाराजांनी अलमअल्ली च्या मदतीला पाठवले होते. फत्तेसिंह भोसले यांच्या कर्नाटक स्वारीत ते सामील होते. आपल्या पराक्रमाने खंडेरावांनी वसई पासून सुरतपर्यंतच्या सागरी किनाऱ्यालगतचा भाग काबीज केला होता.
त्यांच्या पराक्रमा बद्दल शाहू महाराजांनी पुढील उद्गार काढले होते – “बडे सरदार, मातबर, कामकरी हुषार होते.”
#उत्तरेतील_मराठयांचा_दरारा
#आम्हीच_ते_वेडे_ज्यांना_आस_इतिहासाची
फोटो – काल्पनिक मराठा सरदार

Facebook Page:- मराठा रियासत (स्वराज्याचे शिलेदार)

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here