किल्ला म्हणजे काय आणि किल्ला कसा पाहवा

किल्ला म्हणजे काय आणि किल्ला कसा पाहवा |

किल्ला म्हणजे काय आणि किल्ला कसा पाहवा?

महाराष्ट्राच्या पश्चिम भागात सह्याद्री पर्वत आहेत. आणि याच परिसरात आपल्याला सर्वाधिक किल्ले पहायला मिळतात. डोंगर, कडे कपारीमध्ये किल्ला बांधण्याचा मुख्य उद्देश काय असावा, किल्ला म्हणजे काय आणि किल्ला कसा पाहवा ? असा प्रश्न देखील आपल्या समोर येतो. परंतु जिथे राहून शत्रूच्या हालचालींवर नजर ठेवता येईल, वेळ प्रसंगी शत्रूवर हल्ला करता येईल आणि नैसर्गिक किंवा बांधकाम करून दुर्गम केलेल्या ठिकाणी राहिल्यामुळे आपले संरक्षण ही होईल, अशा ठिकाणीच किल्ले बांधलेले दिसून येतात. म्हणजेच इतिहासात स्वतःचे साम्राज्य शत्रूपासून सुरक्षित ठेवण्यासाठी आणि वेळ प्रसंगी राहण्यासाठी बांधण्यात आलेल्या अशा ठिकाणांना किल्ला असे म्हणतात.

किल्ला कसा पहावा याचं देखील एक तंत्र असतं, प्रत्येकाने किल्ल्याची वाट चालत असताना हे तंत्र पाळत आणि किल्ल्याचे सौंदर्य अनुभवत दुर्ग भ्रमंती करायला हवी. दुर्ग भ्रमंती करत असताना ज्या व्यक्तीचे त्या किल्ल्यासंबंधी काही वाचन आहे, ती व्यक्ती कल्पनाशक्तीच्या आधारे किल्ल्यांचे सौंदर्य आणि इतिहास अनुभवू शकते.

सह्य़ाद्रीच्या कडेकपारीत वसलेले किल्ले म्हणजे मराठेशाहीचं वैभव. या किल्ल्यांवर आज अवशेष रूपात असलेल्या वास्तुरचनांचा अभ्यास केला म्हणजे त्या काळातील वास्तुवैभवाची कल्पना येते.

किल्ल्यांवरील ठिकाणांची नावे: किल्ल्यावर बांधण्यात आलेल्या प्रत्येक इमारतीस, प्रत्येक बांधकामास विशिष्ठ नावे देण्यात आलेली आहेत. काही किल्ल्यांना विशिष्ठ प्रकारे बांधण्यात आलेल्या माच्या, तटबंदी, प्रवेशद्वार असतात. त्यानुसार त्या किल्ल्यांचे महत्व बदलत जाते.

महादरवाजा

किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी बांधण्यात आलेल्या मुख्य प्रवेशद्वारास महादरवाजा असे म्हणतात. काही किल्ल्यांवर महादरवाज्याच्या संरक्षणासाठी बुरुजांची रचना केलेली असते. काही किल्ल्यांवर एकामागोमाग एक असे अनेक दरवाजे असतात. प्रवेशद्वाराच्या आतील बाजूस पहारेकऱ्यांना बसण्यासाठीची जागा ठेवलेली असे, त्यास ‘देवडी’ असे म्हणतात.

नगारखाना

किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर नगारखाना असे. गडाची दारे उघडताना आणि बंद करत असताना तसेच महत्त्वाच्या प्रसंगी येथे नगारे वाजवले जात.

तटबंदी

किल्ल्याची माची आणि बालेकिल्ला या भागात दगडी बांधकामात बांधण्यात आलेल्या भिंती आहेत, या भिंतींना ‘तटबंदी’ असे म्हणतात. किल्ल्याच्या दिशेने तोफेच्या गोळ्याचा मारा झाला, तर किल्ल्यावर त्याचा परिणाम कमी व्हावा, याकरिता तटबंदीची भिंत नागमोडी बांधत असत.

बुरुज

तटबंदीमध्येच काही ठराविक अंतरावर तटबंदीपासून पुढे आलेले बुरुज बांधले जात असत. हे बुरुज काही किल्ल्यांवर अर्धगोलाकार, त्रिकोणी, षटकोणी तर काही किल्ल्यांवर कमळाच्या फुलाच्या आकारात बांधण्यात आलेले आहेत. या बुरुजांवर तोफा ठेवल्या जात असत.

ढालकाठी

ढालकाठी म्हणजे निशाण रोवण्यासाठी बांधलेला दगडी ओटा होय. ढालकाठी बहुधा एखाद्या बुरुजावर उभारण्यात येत असे.

जंग्या

तटबंदी आणि बुरुजावरून गोळीबार करण्यासाठी ठिकठिकाणी छिद्रे ठेवलेली असत, त्यांना जंग्या म्हणतात.

चऱ्या

किल्ल्याच्या तटबंदी आणि बुरुजावर घडीव किंवा पाकळ्यांच्या आकाराचे दगड ठेवलेले असत, त्यांना चऱ्या असे म्हणतात. या चऱ्यांच्या आड लपून किल्ल्यावरून गोळीबार करता येत असे.

फांजी

किल्ल्याच्या तटबंदीवर पहारेकऱ्यांना गस्त घालण्यासाठी जागा ठेवलेली असे, त्यास ‘फांजी’ म्हणतात.

दारू कोठार

किल्ल्यावरील दारूगोळा या कोठारामध्ये साठवला जात असे. हे दारू कोठार लोक वस्तीपासून दूर बांधले जात असे.

पागा

किल्ल्यावर घोडय़ांना बांधून ठेवण्यासाठी बांधण्यात आलेल्या जागेस पागा असे म्हणतात.

चोर दरवाजा

प्रत्येक किल्ल्यावर येण्यासाठी महादरवाजा सोडून इतरही एक ते तीन दरवाजे असत, छोट्या वाटेचे अथवा चढाईस कठीण असलेल्या अशा दरवाज्यांना चोर दरवाजा असे म्हणत असत. हे चोर दरवाजे तटबंदीमध्ये लपवलेले असत. छुप्या पद्धतीने केल्या जाणाऱ्या अनेक कामांसाठी या दरवाज्यांचा उपयोग होत असे.

पाण्याचे टाक/ तलाव/ विहीर

किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याचा साठा असावा या उद्देशाने ठिकठिकाणी टाक, तलाव आणि विहिरी बांधलेल्या असत. या पाण्याच्या साठ्यांची विशेष काळजी घेतली जात असे.

राजवाडा अथवा इमारती

किल्ल्यावर राहणाऱ्या खास मंडळींसाठी राजवाडे, कचेरी, सदर इत्यादी इमारती बांधलेल्या असत. काही किल्ल्यांवर अशा काही विशिष्ठ इमारती आहेत, ज्यांना विशेष महत्व आहे.

शिलेखाना

शिलेखाना म्हणजे चिलखते आणि शस्त्रास्त्रे ठेवण्याची जागा होय. याठिकाणी अवजारांना धार लावणारे शिकलगार आणि लोहार नेमलेले असत.

कडेलोटाची जागा

गुन्हेगारास शिक्षा म्हणून, त्याला किल्ल्यावरून खाली ढकलून दिले जात असे, किल्ल्यावरील ज्या ठिकाणावरून खाली ढकलले जात असे, त्या जागेस कडेलोटाची जागा असे म्हणत.

राणीवसा /राणी महाल

राजधानीच्या किल्ल्यात राजनिवासाजवळच, पण वेगळी इमारत राणी महालासाठी बांधलेली दिसते. रायगडावर महाराजांच्या निवासस्थानामागील बाजूस सहा वास्तूंचे चौथरे आहेत त्यांना राणीवसा म्हणून ओळखले जाते. तो राणीवसा आहे की नाही हा वादाचा विषय असला तरी रायगडावर राण्यांसाठी वेगळी वास्तू होती हे नक्की आहे. गाविलगड, नरनाळा, कंधार या किल्ल्यांवर राणी महाल वेगळे बांधलेले आढळतात. हे तीनही किल्ले मुस्लीम शासकांकडे असल्यामुळे या महालांची रचना इस्लामी वास्तुशास्त्राप्रमाणे आढळते. नरनाळा आणि गाविलगडावरच्या राणी महाल हा घुमट, कमानी यांनी सुशोभित केलेला आहे. कंधार किल्ल्यावरील राणी महाल तीन मजली आहे. महालात तांब्याच्या पाइपने पाणी खेळवलेलं आहे. राजमहाल आणि राणी महाल प्रवेशद्वार, तटबंदी यांनी मुख्य किल्ल्यापासून वेगळे केलेले असतात.

हवामहाल

उन्हाळ्याच्या दिवसात राजघराण्यातील लोकांना थंडावा मिळावा यासाठी राजवाडय़ाबाहेर हवामहाल बांधले जात. हवामहालाचे वैशिष्टय़ म्हणजे हा महाल दगडात बांधलेला असे. त्याचे छतही दगडी असे. महालात हवा खेळती राहण्यासाठी मोठय़ा खिडक्या आणि झरोके ठेवलेले असतात. हे महाल किल्ल्याच्या सर्वोच्च टोकावर, तलाव, विहीर, खंदक यांच्या काठी हवेशीर जागी बांधले जात. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसातही थंडावा मिळत असे. देवगिरी, वेताळवाडीचा किल्ला, धारुर, इत्यादी अनेक किल्ल्यांवर आपल्याला हवामहाल पाहायला मिळतात. देवगिरी किल्ल्यावर सर्वोच्च माथ्याच्या थोडासा खाली ‘बारदरी’ हा हवामहाल आहे. धारुर किल्ल्यात एका बाजूला पाण्याने भरलेला खंदक आणि दुसऱ्या बाजूला कृत्रिम तलाव यांच्या मध्ये तटबंदीत हवामहाल बांधलेला आहे. या ठिकाणी दोन्ही बाजूच्या पाण्यावरून येणाऱ्या गार वाऱ्यामुळे हवामहालात थंडावा मिळतो. वेताळवाडी किल्ल्याच्या उत्तर टोकावर बारदरी नावाची दोन कमान असलेली इमारत आहे.

जलमहाल

उन्हाळ्याच्या दिवसात राजघराण्यातील लोकांना थंडावा मिळावा यासाठी राजवाडय़ाबाहेर हवामहाल बांधले जात, तसेच जलमहालही बांधले जात. जलमहालाचं वैशिष्टय़ म्हणजे ते पाण्याच्या साठय़ाच्या जवळ बांधले जात. बऱ्याच ठिकाणी हे महाल जमिनीच्या खाली बांधलेले आढळतात. त्यामुळे बाहेरील उन्हामुळे हे महाल तापत नसत. थंडावा राहण्यासाठी हे महालही पूर्ण दगडात बांधलेले आहेत. या महालांना फक्त पाण्याच्या बाजूला खिडक्या आणि झरोके ठेवलेले असत. जेणेकरून पाण्यावरून येणारी गार हवा महालात यावी. नळदुर्ग, कंधार, औसा, नगरधन इत्यादी किल्ल्यांवर जलमहाल पाहायला मिळतात. नळदुर्ग किल्ल्यावर पात्र वळवून संपूर्ण किल्ल्याला खंदक निर्माण केला आहे. या नदीवर एक बंधारा बांधला आहे. या बंधाऱ्याच्या आतमध्ये जलमहाल बांधलेला आहे. नांदेडजवळच्या कंधार आणि नागपूरजवळच्या नगरधन किल्ल्यातील विहिरीवर जलमहाल बांधलेले आहेत. विहिरीतल्या पाण्यावरून येणाऱ्या हवेमुळे इथे थंडावा जाणवतो.

याशिवाय आरसेमहाल, रंगमहाल, चित्रशाळा इत्यादी इमारतीही किल्ल्यांवर बांधलेल्या पाहायला मिळतात. एखाद्या राजवटीला एखाद्या ठिकाणी बराच काळ स्थैर्य मिळाले असेल तर अशा प्रकारच्या महालांची निर्मिती केलेली पाहायला मिळते.

दारूकोठार

दारूकोठार ही दगड आणि चुना वापरून बांधलेली पक्की इमारत असते. यदाकदाचित दारूकोठारावर शत्रूचा तोफेचा गोळा पडला तरी त्याचे नुकसान होऊ नये यासाठी इमारतीच्या िभतींची जाडी एक ते दीड मीटर ठेवलेली असते. जमिनीला ओलावा येऊ नये यासाठी दारूकोठाराच्या वास्तूचा चौथरा जमिनीपासून चार ते पाच फूट उंच उचलून जमिनीची फरबंदी केलेली असते. दारूकोठारात उजेडासाठी अग्नी (मशाल, दिवा, टेंभा इत्यादी) नेणे शक्य नव्हते. त्यामुळे दारूकोठारात उजेड येण्यासाठी खिडक्या ठेवलेल्या असत. बंदुका आणि तोफेकरिता लागणारी दारू लाकडी पेटय़ा आणि चामडय़ाच्या थल्यांमध्ये ठेवली जात असे. या दारूच्या पेटय़ा कोठारात लाकडाची घडवंची बनवून त्यावर ठेवल्या जात असत. दमट ओलसर हवेमुळे दारू ओलसर होऊन खराब होऊ नये यासाठी ती वरचेवर उन्हात सुकवली जात असे.

१८१८ साली मराठे आणि इंग्रज यांच्यात रायगडावर झालेल्या युद्धात इंग्रजांनी पोटल्याच्या डोंगरावरून तोफा डागल्या होत्या. त्यात रायगडावरील दारूकोठार उद्ध्वस्त झाल्यामुळे युद्धाचे पारडे फिरले होते.  इतिहासात अनेक युद्धांत दारूकोठार उद्ध्वस्त झाल्याने युद्धाचे पारडे फिरलेले आपल्याला पाहायला मिळते. दारूकोठार किल्ल्यावरील वस्तीजवळ असल्यास मोठय़ा प्रमाणावर मनुष्यहानी होण्याची शक्यता असते. त्यामुळे दारूकोठार नेहमी किल्ल्यावरील वस्ती, सदर आणि तटबंदीपासून दूर बांधले जात असत. शत्रूच्या तोफेच्या माऱ्यात न येणाऱ्या भागात दारूकोठाराची बांधणी केलेली पाहायला मिळते.

अंबरखाना (धान्यकोठार)

सन्य पोटावर चालते अशी म्हण आहे. एखादा किल्ला दीर्घकाळ लढवण्यासाठी जशी दुर्दम्य इच्छाशक्तीची गरज असते तसेच सन्याला अन्न आणि पाण्याचीही गरज असते. युद्ध, दुष्काळ अशा आणीबाणीच्या काळात धान्याचा साठा अपुरा पडू नये यासाठी किल्ल्यांवर धान्यकोठारे बांधली जात. धान्यकोठारांच्या इमारती वस्तीजवळ आढळून येतात. किल्ल्याचा घेर मोठा असल्यास एकापेक्षा धान्यकोठार बांधलेली पाहायला मिळतात. धान्यकोठारांच्या इमारती दगड, विटा, चुना याने बांधलेल्या पक्क्या इमारती असतात. या इमारतींचे छतही पक्के असते. यात हवा खेळती राहण्यासाठी खिडक्या आणि छताला झरोके असतात. जमिनीला ओलावा येऊ नये यासाठी धान्य कोठाराच्या वास्तूचा चौथरा जमिनीपासून चार ते पाच फूट उंच उचलून जमिनीची फरसबंदी केलेली असे. लाकडी पाटांवर धान्याची पोती रचून ठेवलेली असतात. पन्हाळा किल्ल्यावरील गंगा, यमुना, सरस्वती ही तीन धान्य कोठारं प्रसिद्ध आहेत. याशिवाय पट्टा (विश्रामगड) किल्ल्यात गुहेमध्ये कातळात खोदलेली धान्यकोठारं पाहण्यासारखी आहेत. भर पावसातही ती कोरडीठाक असतात.

देऊळ

प्रत्येक किल्ल्याची देवता असते जशी शिवनेरीची शिवाई देवी, रायगडाची शिर्काई, मंगळगडावरची कांगोरी देवी या गडदेवीचे मंदिर गडावर असते. याशिवाय अनेक किल्ले ऋषींची तपोभूमी म्हणून ओळखले जातात. त्यांची मंदिरेही किल्ल्यांवर पाहायला मिळतात. उदाहरणार्थ मरकडेय ऋषींचे देऊळ मरकडय़ा, कपिल मुनींचा आश्रम अंकाई इत्यादी. याशिवाय मुख्यत्वे शंकराची मंदिरे गडावर पाहायला मिळतात. किल्ल्यावर गुहा मंदिरे आणि घडीव दगडात बांधलेली मंदिरे अशी दोन प्रकारची मंदिरे पाहायला मिळतात. याशिवाय हनुमान, क्षेत्रपाल यांच्या मूर्ती उघडय़ावर ठेवलेल्या असतात.

दर्गा

किल्ल्यावर घुमट असलेली दग्र्याची इमारत पाहायला मिळते. यात पिराचे थडगे असते.

स्तंभ, मिनार, मनोरे

रायगड किल्ल्याच्या बालेकिल्ल्यात गंगासागर तलावाच्या बाजूला तीन स्तंभ आहेत. किल्ल्यावरच्या शिलालेखातही त्याचं वर्णन ‘स्तंभ: कुंभिगृहे नरेंद्र सदनरभ्रंलिहे मीन्हीते’ अशा प्रकारे करण्यात आले आहे. तीन स्तंभांपकी दोन स्तंभ द्वादशकोनी असून एक अष्टकोनी आहे. तीन मजली उंच असलेल्या या स्तंभांमध्ये तांब्याचा पाइपामधून पाणी खेळवलेले आहे.

खरं तर स्तंभ म्हणजेच मनोरे, मिनार ही इस्लामी स्थापत्यकलेतील रचना आहे. नमाजाच्या वेळा समजाव्यात म्हणून मशिदीवरून बांग दिली जाते. ही बांग सर्वदूर ऐकू जावी यासाठी मशिदीला लागून उंच मिनार बांधले जातात. हेच मिनार इस्लामी स्थापत्यकलेत वेगवेगळ्या प्रकारे वापरलेले पाहायला मिळतात. मिनार म्हटल्यावर चटकन आठवणाऱ्या वास्तू म्हणजे ताजमहाल, चारमिनार इत्यादी. रायगडावरील स्तंभांची रचना त्यातील खोल्यांमधील घुमटाकार छत, खिडक्या आणि त्यात खेळवलेले पाणी या सर्वावर इस्लामी वास्तुशैलीची छाप आहे. महाराष्ट्रातील देवगिरी किल्ल्यावर १०० मी. उंचीचा एक मनोरा आहे. इ.स १४३५ च्या वेळी सुलतान अहमदशहा याने गुजरातच्या स्वारीच्या विजयाप्रीत्यर्थ हा मनोरा बांधला असे म्हणतात. चाँदमिनार या नावाने हा मनोरा ओळखला जातो.

जवाहरखाना / तिजोरी

राजाकडील किमती जवाहीर, रत्ने, सोने नाणे, दागिने, किमती वस्तू इत्यादी ठेवण्यासाठी जवाहरखान्याची निर्मिती केलेली असते. जवाहरखान्यात मौल्यवान व किमती वस्तू असल्यामुळे त्याचे स्थान अत्यंत सुरक्षित ठिकाणी म्हणजेच राजवाडय़ाच्या परिसरात असते. ते ठिकाण गुप्त असणे आवश्यक असल्यामुळे ते तळघरात असण्याची शक्यता आहे. त्यामुळेच असेल महाराष्ट्रातील किल्ल्यांवर जवाहीरखाना अशी वेगळी वास्तू दाखविण्यात येत नाही. दुर्गदुग्रेश्वर रायगड या पुस्तकात प्र. के. घाणेकर यांनी रायगडावर शिवाजी महाराजांच्या निवासस्थानाजवळ तळघरात  खलबतखाना म्हणून जे ठिकाण दाखवतात तो जवाहरखाना असावा असे मत मांडले आहे. त्याची कारणमीमांसा पटण्यासारखी आहे.

कंधार किल्ल्यात महाकाली बुरुजात भुयारवजा खोली आहे तिला तिजोरी या नावाने ओळखले जाते. या ठिकाणी खजिना ठेवला जात असे असे सांगितले जाते. या वास्तूचे अरुंद प्रवेशद्वार तीन फूट बाय दोन फूट असून आत गेल्यावर १५ फूट बाय सात फूट आणि दहा फूट उंच दालन आहे. याव्यतिरिक्त कुठल्याही किल्ल्यावर जवाहरखाना म्हणून जागा दाखवली जात नाही. पण फुकटच्या धनाच्या लोभाने गावोगावी किल्ल्यावरील वास्तू खणून काढलेल्या पाहायला मिळतात.

खलबतखाना

राजाला महत्त्वाच्या गुप्त बठकी घेण्यासाठी खलबतखान्याची निर्मिती केलेली असते. खलबतखाना राजवाडय़ात किंवा राजवाडय़ाला लागून असतो.

पोथीशाळा

राजशकट चालवण्यासाठी विविध धर्मग्रंथांचा आधार घेतला जातो. त्या त्या काळात निर्माण झालेले ग्रंथ, राजाच्या इतिहासकारांनी लिहिलेले दस्तऐवज इत्यादी ठेवण्यासाठी पोथीशाळांची निर्मिती केली जात असे. याचे स्थानही राजवाडय़ाच्या परिसरातच असे.

कुंभिगृह , गजशाळा (हत्तीखाना)

हत्तीचा उपयोग युद्धात आणि राजाचे ऐश्वर्य दाखवण्यासाठी होत असे. गडावर हत्ती ठेवण्यासाठी हत्तीखान्याची निर्मिती केली जात असे. हत्तीखान्याची इमारत पक्की बांधलेली असे. हत्ती आत- बाहेर येण्यासाठी मोठी प्रवेशद्वारे. हत्तींच्या मलमूत्रांचा निचरा होण्यासाठी उतार असलेली पक्की जमीन, हत्ती बांधण्यासाठी लोखंडी खांब या गोष्टी गजशाळेत पाहायला मिळतात. हत्तीची निगा राखणारे, माहूत यांचीही राहण्याची सोय हत्तीखान्याच्या परिसरात केली जात असे. हत्तीला चढवायचा साजशृंगार, अंबारी इत्यादी साहित्य ठेवण्यासाठी गजशाळेजवळ एखादे भांडारगृहही असेल. आज अशा प्रकारची रचना असलेली गजशाळा महाराष्ट्रातील किल्ल्यांवर तरी दिसत नाही. रायगड किल्ल्यावर गजशाळा होती. शिलालेखात कुंभिगृह असा उल्लेखही येतो. पण आज रायगडावर असलेली गजशाळा वरील वर्णनाशी मेळ खात नाही.

टांकसाळ

प्रत्येक राजा आपली नाणी तयार करत असे. या नाण्यांसाठी तांबे, चांदी, सोने इत्यादी धातू वापरले जात. ही नाणी तयार करण्यासाठी टांकसाळ किल्ल्यावर असे. टांकसाळीत तयार केलेली नाणी, त्यासाठी वापरला जाणारा धातू या सगळ्यासाठी आवश्यक असणारी सुरक्षितता बालेकिल्ल्यात मिळत असे. त्यामुळे टांकसाळ राजवाडय़ाच्या परिसरात बांधली जात असे. रायगड किल्ल्यावर सध्या जी जागा टांकसाळ म्हणून दाखवतात त्यात शौचकूप आहेत. या अरुंद जागेत टांकसाळ असण्याची शक्यता नाही. नाशिक जिल्ह्य़ातील चांदवड किल्ल्यावर होळकरांनी त्यांची नाणी पाडण्यासाठी टांकसाळ बांधली होती.

कैदखाना

किल्ल्यावर कैदी ठेवण्यासाठी कैदखाना बांधलेला असतो. कंधार किल्ल्यावर असे बारा कैदखाने पाहायला मिळतात. फांजीला लागून असलेल्या या कैदखान्याला वरच्या बाजूला पाण्याचा टाकीला असते तसे गोल तोंड आहे. बाकी सर्व बाजूंनी खोली बंद आहे. कैद्याला गोल तोंडातून आत सोडले जात असे. त्याला अन्न आणि पाणीही तेथूनच दिले जात असे. रायगडावर महाराजांच्या निवासस्थानाच्या खालच्या बाजूला कैदखाना दाखवला जातो. पण राजनिवासाच्या एवढय़ा जवळ कैदखाना असण्याची शक्यता फारच कमी आहे. रायगडावर न्यायनिवाडा करण्यासाठी आणल्या जाणाऱ्या कैद्यांसाठी तात्पुरता कैदखाना असू शकतो. रायगडच्या प्रभावळीत असलेल्या किल्ल्यांवर कैदखाने होते असा उल्लेख आहे.

हमामखाना

हमामखाना म्हणजे आंघोळीची जागा. ही पण मध्यपूर्वेतील संकल्पना आणि वास्तू इस्लामी राज्यकर्त्यांबरोबर आपल्याकडे आली. यात दोन प्रकारचे हमामखाने पाहायला मिळतात. एक राजघराण्यातील लोकांसाठी आणि दुसरा सामान्य लोकांसाठी. महाराष्ट्रातील फार कमी किल्ल्यांवर हमामखान्याचे अवशेष पाहायला मिळतात. देवगिरी किल्ल्याच्या पायथ्याशी वस्तुसंग्रहालयाच्या मागे शाही हमामखाना आहे. बहादूरपूर किल्ल्यावर हमामखान्याचे अवशेष आहेत. कंधार किल्ल्यावर राजघराण्यातील लोकांसाठी आणि सामन्य लोकांसाठी असे दोन हमामखाने आहेत.

घोडय़ाच्या पागा

किल्ल्यावर असणाऱ्या राजाच्या घोडदळासाठी घोडय़ाच्या पागा बांधल्या जात. या पागांजवळ घोडय़ांचा खरारा करणाऱ्यांची राहाण्याची सोय केली जात असे. घोडय़ाला चढवायची खोगीरे, लगाम, चारा, वैरण इत्यादी साहित्य ठेवण्यासाठी पागांमध्ये एखादे भांडारगृहही बांधले जात असे. कंधारसारख्या काही किल्ल्यांवरील पक्क्या पागा आजही पाहता येतात. काही डोंगरी किल्ल्यांवर अध्र्या उंचीवर असलेल्या गुहांचा जुन्या पुस्तकांमध्ये पागा म्हणून उल्लेख आलेला आहे. पण त्या टेहळणीच्या गुहा असून अशा अडचणीच्या जागी पागा असण्याची सुतरामही शक्यता नाही.

सदर/कचेरी

किल्ल्यावर आजूबाजूच्या भागातील महसूल, शेतसारा जमा होत असे. तसेच गडावरच्या इतर गोष्टींची नोंद ठेवण्यासाठी सदर किंवा कचेरीची इमारत गडावर असते. राजधानीच्या किंवा मोठय़ा किल्ल्यांवर ही इमारत प्रवेशद्वाराजवळ असते. जेणेकरून कामासाठी आलेल्या माणसाला किल्ल्यावर टेहळणी करण्याचा मोका मिळू नये.*

दरबार

किल्ल्यावर दरबाराची वेगळी इमारत राजवाडय़ाच्या परिसरात असे. महत्त्वाच्या प्रसंगी दरबार भरवला जाई. रायगडावरील दरबाराची इमारत कौलारू होती. इस्लामी राज्यकर्त्यांनी दरबार ए खास आणि दरबार ए आम असे दोन दरबार भरवण्यास सुरुवात केली.

बाजारपेठ

किल्ल्यावर बाजारपेठ असेल का हा प्रश्नच आहे कारण बाजारात येणाऱ्या बाजारबुणग्यांमुळे किल्ल्याची टेहळणी होणे, किल्ल्यावरच्या बातम्या बाहेर जाणे सहज शक्य होते. तसेच बाजारपेठेत माल विकण्यासाठी, घेण्यासाठी आल्याचे भासवून शत्रूच्या हेरांकडून दगाफटका, गोंधळ होण्याचा संभव होता. त्यामुळे कुठलाही शहाणा राजा आपल्या किल्ल्यावर बाजारपेठ वसवणार नाही. वसवली तरी किल्ल्याच्या बाहेर किंवा पायथ्याशी वसवेल. छत्रपती शिवाजी महाराजांचं हेर खातं अतिशय सक्षम होतं. त्यामुळे त्यांना हेरांच्या सर्व खाचाखोचा माहिती होत्या, असा राजा आपल्या राजधानीच्या किल्ल्याच्या मधोमध बाजारपेठ वसवेल का हा विचार करण्यासारखा विषय आहे. मग किल्ल्यांवर बाजारपेठा नव्हत्या का? ज्या ठिकाणी राजधानीचे नगर वसवलेले होते अशा नगर किल्ल्यांमध्ये अशा प्रकारच्या बाजारपेठा होत्या.

आपण लहानपणापासून ज्या गोष्टी वाचतो त्यात आटपाट नगर असते. ते आटपाट नसून आठपाट आहे. हे नगर वसवताना त्याची आठ दिशांना आठ भागांत विभागणी केली जात असे. उत्तरेत विद्वान, ब्राम्हण, संन्यासी, ईशान्येला दूध, फळांचे व्यापारी, पूर्वेला सरकारी अधिकारी, आग्नेयेला सोनार, लोहार, तांबट हे अग्नीशी संबंधित काम करणारे व्यावसायिक, दक्षिणेस वैश्य, सावकार, सुतार, नर्ऋत्येला पशुपालन करणारे, कोळी, चांभार, कुंभार, पश्चिमेस सनिक, कारकून इत्यादी, वायव्य कोतवाल, किल्लेदार इत्यादी अशा प्रकारे आठ दिशांना आठ पाट वसवून मध्यभागी तटबंदीच्या आत राजनिवास असे. या नगरालाही बाहेरून तटबंदी असे. अशा प्रकारे बाजारपेठा वसवल्या जात.

सराई, धर्मशाळा

व्यापारी, संन्यासी, कामकाजासाठी येणारी माणसे यांच्या निवासासाठी सराई, धर्मशाळा बांधल्या जात. संरक्षणाच्या दृष्टीने या किल्ल्यांवर न बांधता किल्ल्यांच्या बाहेर बांधल्या जात. देवगिरी किल्ल्याच्या पायथ्याशी मागच्या बाजूला सराई आहे. अजिंठय़ाला सराई आहे.

तेल तुपाचे टाके

खरंतर ही इमारत नाही. पण तेल आणि तूप साठवण्यासाठी घडीव दगडांची टाकी बांधलेली आपल्याला पाहायला मिळतात. किल्ल्यावर रात्रीच्या वेळी दिवाबत्ती करण्यासाठी तेलाची आणि तुपाची आवश्यकता भासे. तसेच युद्धात झालेल्या जखमा भरण्यासाठी गाईचे जुने तूप वापरले जात असे. नरनाळा किल्ल्यात आपल्याला तेल-तुपाचे टाके पाहायला मिळते.

आज दुर्दैवाने किल्ल्यावरच्या या सर्व वास्तू एकाच किल्ल्यावर पाहायला मिळत नाहीत. पण जसजसे आपण जास्त किल्ले फिरत जातो त्या वेळी  किल्ल्यावरच्या पडक्या वास्तूंचे अवशेष आपल्याशी बोलायला लागतात.

हेमाडपंती स्थापत्यशैली

भारतीय स्थापत्यशैलींपैकी एक प्रमुख शैली म्हणून हेमाडपंती शैलीचा उल्लेख केला जातो. देवगिरीच्या यादवांच्या राज्याचे सन १२५९ ते १२७४ याकाळात मुख्य प्रधान राहिलेल्या हेमाद्री पंडित किंवा हेमाडपंत यांनी या प्रकारच्या इमारतबांधणीचा महाराष्ट्र आणि दख्खन पठारावर अनेक ठिकाणी उपयोग केल्याने ही बांधणीपद्धत त्यांच्या नावावरून हेमाडपंती म्हणून ओळखली जाऊ लागली. मंदिरांचे हेमाडपंती पद्धतीने झालेले बांधकाम टिकून राहिले आणि त्यामुळे ते आजही अभ्यासकांना उपलब्ध आहे. सामान्यतः इमारत बांधणीत घडवलेल्या दगडांमध्ये चुना किंवा त्याप्रकारचा दर्जा न भरता दगडच वेगवेगळ्या कोनातून कापून, त्यांनाच खुंट्या आणि खाचा पाडून ते एकमेकांत घट्ट बसू शकतील अशी रचना केली जाते. मंदिरांसारख्या वास्तूत पायापासून शिखरापर्यंत ही दगड एकमेकांत गुंफून केलेली रचना एकसंध उभी राहाते आणि टिकाऊही बनते. वेरूळचे घृष्णेश्वर मंदिर, औंढा नागनाथ येथील मंदिर ही हेमाडपंती स्थापत्यशैलीची काही उदाहरणे होत.

उष्ट्रखाना

उंटशाळा सुतरनाला नावाच्या हलक्या तोफा वाहून नेण्यासाठी आणि सांडणीस्वारांबरोबर पत्रांच्या किंवा अन्य वस्तूंच्या थैल्या पाठवण्यासाठी उंटांची आवश्यकता असे. रायगडावर आणि बहुधा पन्हाळगडावरही उष्ट्रखाना होता.

आयुर्वेदप्रवीण

वैद्यांसाठी गडांवर औषधीखाना असे. या कारखान्यात भस्मे, चूर्णे, अवलेह आणि अन्य रसायने बनत. पाने, फुले, मुळ्या आणि कंद यांचा संग्रह कारखान्यात करून ठेवलेला असे.

कडेलोट

रायगडावरील टकमक टोकावरून गुन्हेगाराला कडेलोटाची शिक्षा दिली जाई. अशीच एक कडेलोटाची वैशिष्ट्यपूर्ण जागा ब्रम्हगिरी किल्ल्यावर आहे. तिला दुर्गभंडार म्हणतात कडा म्हणजे किल्ल्यावरून खाली दरीपर्यंत पोचणाऱ्या पर्वताची उभी भिंत. ही भिंत तासून तासून गुळगुळीत केलेली असते. या कड्याच्या बाजूने शत्रूचा हल्ला होण्याची अजिबात शक्यता नसते.

कुरणे

ही गडाखाली असत. गडावरील गुरांसाठी रोज चारा गडाखालून येत असे. तसा पुरेसा साठा आधीच गडावर करून ठेवलेला असे.

कोठी आणि जिन्नसखाना

गडावरील वस्तीस लागणाऱ्या गोष्टी ठेवण्याची जागा. रायगडावरील कोठीत कलाबतूचे कापड, खारका, बदाम, कस्तुरी, छीट, आणि नाना प्रकारची तेले ठेवली असल्याचे उल्लेख आहेत. नेहमी नेहमी लागणाऱ्या किरकोळ वस्तू जिन्नसखान्यात असत.

खंदक

किल्ल्याभोवती खोदलेला चर. याच्यावर एखादा पूल असे. खंदक ओलांडून किल्ल्यावर आक्रमण करणे सोपे नसे. खंदकामध्ये काटेकुटे असत आणि विषारी साप सोडलेले असत. चाकणच्या किल्ल्याभोवती तीस फूट खोल आणि पंधरा फूट रुंद असा पाण्याने भरलेला खंदक होता. यशवंतगडाभोवती आग्नेय दिशा वगळून अन्य बाजूंना २४ फूट रुंदीचा आणि १३ फूट खोलीचा खंदक आहे. गोपाळगडाच्या दक्षिण बाजूला १५ फूट खोल खंदक आणि बाकीच्या बाजूंना समुद्र आणि खाडीचे पाणी आहे.

झरोके किंवा छिद्रे

किल्ल्याच्या तटाला बंदुकीचा मारा करण्यासाठी छिद्रे किंवा झरोके ठेवलेले असतात. त्यांची दिशा तिरपी खालच्या बाजूला असते. जवळजवळच्या तीन झरोक्यांतून तटाखालच्या तीन बिंदूवर रोखलेल्या तीन तीन बंदुका असतात. म्हणजे तटावरील एकच माणूस तीन ठिकाणी एकाच वेळी मारा करू शकतो. जिथे शत्रू तटाच्या अगदी जवळ पोचण्याची संभावना असते तेथे छिद्र अधिक तिरके असते.

तवा

देवगिरीच्या किल्ल्याला असा एक तवा आहे. किल्ल्यात प्रवेश करण्यापूर्वी एक खंदक लागतो, त्यावर हा तवा ठेवलेला आहे. बिजागऱ्या लावून तो उभा करता येतो. तव्यामागे आग पेटवून तो तवा लालभडक करीत. हा तवा ओलांडून शत्रू किल्ल्यात प्रवेश करू शकत नसे. अल्लाउद्दीन खिलजीने पखालींनी पाणी ओतून ओतून हा तवा थंड केला आणि देवगिरीच्या किल्ल्यात प्रवेश केला.

दगडी जिने

किल्ल्यावरील उंचसखल जागी जाण्यासाठी उताराचे पायरस्ते किंवा दगडी जिने असत. ब्रम्हगिरी किल्ल्याच्या उंचसर भागाकडून चाळीस-पन्नास पायऱ्याचा एक जिना किल्ल्याच्या पोटात जातो. तिथे एक नैसर्गिक दगडी भिंत लागते. भिंतीवरून शंभर-दोनशे पावले चालल्यावर परत एक दगडी जिना लागतो. या जिन्यावरून वर चढून गेल्यावर दुर्गभंडार नावाचे कडेलोटाचे ठिकाण येते.

देवड्या

देवड्या म्हणजे बुरुजांवरील किंवा दरवाज्यांच्या दोन्ही बाजूंस असलेली पहारेकऱ्याची जागा, चौकी. सुवर्णदुर्गाच्या दरवाज्यापाशी अशा देवड्या आहेत.

वीरगळ

विरगळ म्हणजे वीर पुरुषांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेला (सहसा – दगडांचा अथवा लाकडाचा) स्तंभ असतो. यास वीरस्तंभ असेही म्हणतात. महाराष्ट्रात जुन्या देवळांच्या बाहेर वीरगळ आढळतात.

Credit – WhatsApp

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here