महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

कोप्पम अर्थात खिद्रापूर ची ऐतिहासिक पार्श्वभूमी भाग २

By Discover Maharashtra Views: 1198 2 Min Read

कोप्पम अर्थात खिद्रापूर ची ऐतिहासिक पार्श्वभूमी भाग २ –

सोमेश्वर चालुक्य व चोलांच्या संघर्षाचा आढावा आपण पहिल्या भागात घेतला होता. त्याकाळी शिलाहारांची कोल्हापूर शाखा अस्तित्वात होती.त्या शाखेचा तत्कालीन राजा मारसिंह होता.याचा मिरज ताम्रपट सर्वपरीचीत आहेच.याचा सर्वात धाकटा मुलगा गंडरादित्य हा होय.याच्या काळात कोल्हापुरात मंदिर बांधणी मोठ्या प्रमाणात झाली.कोपेश्वर मंदिर ही याच्या काळात बांधले असावे असे बऱ्याच अभ्यासकांचे मत आहे.तसेच खिद्रापूर  मधील जैन मंदिर ही याच्या काळात बांधले असावे. याचा मुलगा विजयादित्य व याचा सेनापती  दंडनायक  “बोप्पण ” याचे बरेच शिलालेख कोपेश्वर मंदिरावर बाहेरील बाजूच्या भिंतीवर कोरलेले आहेत.त्यातील मजकूर असा की ” जसा हरीला गरुड, शिवाला नंदी, रामा ला हनुमान तसाच विजय(विजयादित्य) ला बोप्पण ”  विजयादित्य चा मुलगा भोज दुसरा..हाच तो प्रसिद्ध राजा ज्याच्या नावाने पश्चिम महाराष्ट्रातील 15 किल्ले बांधले असा प्रचार केला जातो.याची राजधानी पर्णाल अर्थात पद्मनाल(पन्हाळा) होय.(कोप्पम अर्थात खिद्रापूर ची ऐतिहासिक पार्श्वभूमी भाग २)

२- इ.स १२१४ मध्ये यादव सम्राट सिंघण द्वितीय याने दक्षिण महाराष्ट्र काबीज करण्याचे ठरवले व सुरुवात शिलाहार राजा भोज दुसरा याच्यापासून केली. दोन्हीं राज्याचे सैन्य कृष्णा काठी खिद्रापूर च्या रणभूमीवर उभे राहिले. राजा सिंघण द्वितीय हा एक कसलेला सेनानी होताच परंतु पराक्रमी योद्धा देखील होता.त्याने चाणाक्षपणे युद्धाला सुरुवात करून भोजा च्या सैन्याची धूळधाण उडवली.शिलाहार सैन्याचा सेनापती बन्नेस सुद्धा त्वेषाने लढत होता. ही लढाई तुंबळ झाली कारण ही एका राज्याच्या अस्तित्वाची सार्वभौमत्वाची लढाई होती. यादव सेनेने पराक्रमाची शर्थ करीत लढाई जिंकली. व भोज राजा ला कैद करीत त्यास पन्हाळा गडावर ठेवले. आणि या रूपाने शिलाहार राजवंशाची इतिश्री झाली. कोपेश्वर मंदिर व परिसर ही नुसतीच भूमी नसून पराक्रमाची क्षात्रतेजाची गंगोत्री आहे असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही.

राजा सिंघण द्वितीय याने कोपेश्वर देवाला असलेल्या जुन्या देणग्या चालू ठेवत तसेच मंदिराचे अपूर्ण बांधकाम पूर्ण करण्यासाठी जुगुळ व सिरगुप्पी ही गावे देखील इनामास लावून दिली. परंतु या मंदिराच्या नशिबात नियतीने अपूर्णत्वाचा जणू शिक्काच लावला होता.

(क्रमशः )

©इतिहासदर्पण & Aashish Kulkarni

Leave a comment